आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
गेल्या काही दशकांपासून भारतीय योग अर्थात योगासनं जगभरात लोकप्रिय झालेली आहेत. याचं कारण याचा “Holistic Approch”. भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात असणार्या योगविद्येला जगानं आपलसं करून आरोग्याचा मंत्र मिळवला आहे. असा योग नेमका कोणी शोधला? कोण आहे योग जनक?
प्राचीन भारतीय आरोग्यशास्त्रात आरोग्याचा समग्र विचार करताना आहार, विहार यांचा विचार करून ऋतूचर्या नेमून दिलेली आहे. यात महत्वाचा विषय म्हणजे व्यायाम. भारतात कायमच योगासनं आणि ध्यान यांचं महत्व जाणून त्याचा दैनंदिनीत समावेश केलेला आहे.
हजारो वर्षांची परंपरा असणार्या योगला काहीही सिध्द करण्याची गरजच नव्हती कारण “पतंजली” नावाच्या चिकित्सकानं हजारो वर्षांपूर्वी योगचिकित्सा करून त्याला अंधश्रध्दांतून बाहेर काढत जीवनशैलीत त्याचा अंतर्भाव केलेला होताच. फ़क्त आधुनिक वैद्यकशास्त्रानं त्यावर मोहोर उमटवली इतकंच.
अनेक वर्षं योग आणि हिंदू धर्म यांची विनाकारणच सांगड घालत हे एक काहीतरी एखाद्या धर्माचं पालन करण्याचं शास्त्र असल्याचा समज जोपासला गेला. मात्र आधुनिक शास्त्रानं योगासनांचे अनेक फ़ायदे जगासमोर ठेवले आणि योगासनांना जगभरात अमाप लोकप्रियता लाभली.
स्वामी विवेकानंदांनी १८९६ साली लिहिलेलं राज योग हा ग्रंथ पतंजली यांच्या योगसूत्रावर आधारीत आहे तर आधुनिक काळातील अध्यात्मिक गुरू ओशोंच्या मते योग हा धर्म, आस्था आणि अंधविश्र्वास यांच्यापलिकडचं शास्त्र आहे. हे एक प्रकारचं प्रायोगिक विज्ञान असून एकप्रकारची पूर्ण चिकित्सापध्दत आहे. त्यांच्यामते परदेशात जसं आईनस्टाईनचं नाव सर्वतोपरी आहे त्याचप्रमाने भारतात पतंजली आहेत. आज बाबा रामदेव यांच्या स्वदेशी ब्रॅण्डमुळे “पतंजली” हे नाव तळागाळातल्या लोकांनाही परिचित आहे मात्र पतंजली कोण होते आणि त्यांचं कार्य काय हे फ़ार कमी भारतीयांना माहित आहे.
पतंजली हे एक महान चिकित्सक होते. रसायन विद्येचे आचार्य असणार्या पतंजली यांची , अभ्रक, धातुयोग आणि लौहशास्त्र ही जगाला दिलेली देणगी आहे. पुष्यमित्र शुंग याच्या कालखंडात (ईपू १९५-१४२) पतंजली होऊन गेल्याचे संदर्भ आहेत. राजा भोजनं पतंजलींना शरीसासोबतच मनस्वास्थ्याचे आचार्य म्हणूनही संबोधलं आहे. भारतीय दर्शन साहित्यात पतंजली लिखीत तीन मुख्य ग्रंथ आढळतात. योगसूत्र, अष्टाध्यायी आणि आयुर्वेद यावर त्यांनी ग्रंथनिर्मिती केलेली आहे. व्याकरणाचार्य पाणिनी यांचे शिष्य समजल्या जाणार्या पतंजली यांनी पाणिनीच्या अष्टाध्यायीवर ग्रंथरचना केली जिला महाभाष्य म्हणून संबोधलं जातं.
योगची सुरवात जरी पतंजली यांच्या कार्यकाला आधीच झालेली असली तरिही योग ला एक विज्ञान म्हणून श्रध्देतून त्याला बाहेर काढ्ण्याचं श्रेय पतंजली यांनाच जातं.
योग शब्दाची व्युत्पत्ती संस्कृत शब्द, ‘युज’पासून झालेली आहे. युजचा अर्थ आहे व्यक्तिगत चेतना किंवा आत्म्याची सार्वभौमिक चेतना असा आहे.
त्यांच्यामुळे आज योग हा केवळ एका धर्माचा उरला नसून तो प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनला आहे. पतंजली यांच्या योगसूत्रात, समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद या चार अध्यायांचा समावेश असून यात १९५ सूत्रांचा समावेश आहे.
या अध्यायांमधे केवळ शारिरीक तंदुरूस्तीचाच विचार केला गेलेला नाही तर मनःस्वास्थ्याचाही बारकाईने चिकित्सात्मक अभ्यास केला गेला आहे. प्रथमपादात चित्ताच्या भिन्न वृत्तींचे समाधीच्या मदतीनं संतुलन राखणे, द्वितियपादात यम, नियम, आसन, प्राणायम आणि प्रत्याहार यांचं विवेचन केलेलं आहे. तृतीय पादात अंतरंग तीन धारणा, ध्यान आणि समाधी यांचं वर्णन आहे. यात योगाभ्यासामुळे लाभणार्या काही सिध्दींचाही समावेश आहे.
चौथा अध्याय हा मुक्तीचं ते परमोच्च शिखर आहे जिथे साधक आपल्या मूळ साक्षात्काराशी एकरूप होऊन जातो. महर्षि पतंजली यांनी द्वितीय आणि तृतीय पादात अष्टांग योग साधनेचं महत्व विशद केलं आहे. या अष्टांग योगाची नावं अशी- यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. या आठ मुख्य प्रकारांचे उपप्रकारही आहेत. वर्तमान स्थितीत यापैकी केवळ तीनच योग प्रचलित आहेत- आसन, प्राणायम आणि ध्यान.
यम- अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अप्रिग्रह हे पाच प्रकारचे यम म्हणजे खरं तर नैतिकतेचे धडे आहेत. जगभरातील सर्व धर्मात हे पाठ आढळतील.
नियम- सशुच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर आराधना हे स्वयंशिस्तीसाठीचे पाठ आहेत. नियमानी बध्द दिनचर्येमुळे शरीर आणि मन दोन्हींचं आरोग्य राखलं जातं.
आसन- चित्त स्थिर ठेवायाला ज्याची मदत होते ती म्हणजे आसनं. केवळ व्यायामाचा विचार करून आसनांची बांधणी झालेली नाही तर कसं बसावं? कसं उभं रहावं?कसं चालावं या सगळ्यांचा विचार यात केलेला आहे.
योग करताना तो काळजीपूर्वक करावा असं सांगितलं आहे. गुरूचं मार्गदर्शन महत्वाचं मानलं आहे. आजच्या काळात आपण यांना ट्रेनर म्हणून संबोधतो. कारण योगासनं करताना शरीराची हालचाल, मुद्रा, श्वसन हे सगळं काळजीपूर्वक करावं लागतं. ही आसनं कधी आणि कशी करावीत, ती करताना पेहराव काय असावा, या सगळ्यांचा विचार केला गेला आहे. हठयोग, विनयासा योग, विक्रम योग, अष्टांग योग, आयंगार योग, जीवमुक्रित आणि कुंडलिनी योग ही मुख्य आसनं मानली जातात.
योग नेमका कोणत्या देशाचा? यावर बरेच वाद असले तरिही भारतीय शिलालेखांतून हे स्पष्ट होतं की योग हा शंभर टक्के भारतीयच आहे आणि तो प्राचीन काळापासून अस्तित्वात असला तरिही महर्षि पतंजली यांनी त्याची शिस्तबध्द चिकित्सा करून एक शास्त्र म्हणून त्याला जगासमोर मांडलं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.