आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आजच्या आधुनिक वैद्यकशास्त्राच्या चमत्कार हा शब्द परवलीचा ठरला आहे. आजच्या काळात कोणाला मृत्यूच्या दाढेतुन बाहेर काढणे तितके कठीण राहिलेले नाही. पण एकेकाळी हे फार कठीण काम होते. काही दुर्धर आजारांवर उपचार देखील उपलब्ध नव्हते. अगदी रक्ताची कमतरता असताना रोग्याला रक्त चढवणे आजसारखे सोपे नव्हते.
ज्याला आज आपण “ब्लड ट्रान्सफ्युजन” म्हणतो, त्याची सुरुवात कशी झाली, ते आपण आज जाणून घेऊया..
असे म्हणतात की, १६ व्या शतकात ब्लड ट्रान्सफ्युजन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. १६२८मध्ये विल्यम हार्वेने ब्लड ट्रान्सफ्युजनचा सर्वप्रथम उल्लेख केला होता. १६५९मध्ये ख्रिस्तोफर रेनने ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी सिरिंजचा शोध लावला होता. सर्वप्रथम या सिरिंजच्या मदतीने इंग्लंड आणि फ्रान्सच्या जनावरांच्या रक्ताचे ट्रान्सफ्युजन करण्यात आले होते.
१६६६मध्ये रिचर्स लोवर या डॉक्टरने दोन प्राण्यांमधून सर्वप्रथम यशस्वी ब्लड ट्रान्सफ्युजन केले होते. यानंतर ब्लड ट्रान्सफ्युजनचा प्रवास सुरु झाला आणि अर्थातच भविष्यात यात असंख्य बदल घडून आले.
१६६७ साली ब्लड ट्रान्सफ्युजनचा पहिला सफल मानवी प्रयोग करण्यात आला होता. सर्वांत पहिल्या ब्लड ट्रान्सफ्युजनचे श्रेय डॉक्टर जीन बॅप्टिस्ट डेनिस यांचे आहे. ते फ्रान्सचा राजा चौदावा लुई याचे खाजगी डॉक्टर होते. ज्यांच्याकडे दोन पेशंट होते, एक १५ वर्षांचा मुलगा होता तर एक मजूर होता. दोघांना रक्ताची गरज होती. हे काम कठीण होते पण डेनिसने त्यासाठी कंबर कसली होती, त्याने एका मेंढीच्या शरीरातील रक्त या जवळच्या दोन्ही रुग्णांना दिले आणि अशाप्रकारे तो यशस्वीपणे ब्लड ट्रान्सफ्युजन करण्यात यशस्वी ठरला होता. ह्युमन ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे आधुनिक वैद्यकशास्त्रासाठी नवीन दरवाजे उघडले.
डॉ. डेनिस यांच्या सफलतेनंतर सर्वच जण मेंढीच्या रक्ताचा वापर करून लागले. काही बाबतीत हे यशस्वी ठरले होते, पण अनेक वेळा याच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागले. ज्यामुळे या रक्ताच्या वापरावरच बंदी घालण्यात आली होती. मेंढीच्या रक्तावर बंदी आल्यानंतर देखील ब्लड ट्रान्सफ्युजनची प्रक्रिया थांबली नाही. लोक इतर गोष्टींचा वापर करू लागले.
१८१८ मध्ये ब्रिटिश प्रसिद्ध विज्ञान जेम्स ब्लांडेल याने एका माणसाचे रक्त दुसऱ्या माणसाला दिले. हे ट्रान्सफ्युजन यशस्वी झाले. पण यात खरा क्रांतिकारक बदल १९०१ साली कार्ल लँडस्टीनर या वैज्ञानिकाने मानवी रक्तगटाचा शोध लावल्यावर घडून आला होता.
ब्लड ग्रुपच्या शोधानंतर ब्लड ट्रान्सफ्युजनची प्रक्रिया जलद आणि सोपी झाली होती. यामुळे एका ब्लड ग्रुपच्या लोकांचे रक्त एकेमकांना दिल्यास काहीच अडचण नव्हती. या शोधामुळे जग बदलले व अनेकांची आयुष्ये वाचली.
रक्ताच्या साठ्याचा पहिला प्रयत्न फार प्रभावी ठरला होता. १९२१ मध्ये ब्रिटिश रेड क्रॉस सोसायटीच्या सदस्यांनी लंडनच्या किंग्ज हॉस्पिटलमध्ये रक्तदान करून रक्त संग्रह केला होता. १९३६ मध्ये शिकागोच्या कुक कंट्री हॉस्पिटलमध्ये पहिली ब्लड बँक अस्तित्वात आली होती. यु*द्धकाळात सैनिक व नागरिकांना मदत म्हणून अमेरिकेने रेड क्रोस ब्लड सर्व्हिसेसची सुरुवात केली.या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर रक्तदान मोहीम राबविण्यात आली. या माध्यमातून सैनिकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या रक्तसाठ्याचा आजही वापर करण्यात येत आहे.
ब्लड ट्रान्सफ्युजनचे महत्त्व वाढत असून दरवर्षी अमेरिकेतील सुमारे ५० लाख लोकांना याची गरज पडते. फक्त मोठ्या दुर्घटनेसाठी ब्लड ट्रान्सफ्युजन करण्यात येत नाही. अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी याचा उपयोग करण्यात येतो. सर्जरी करताना पेशंटला रक्तपुरवठ्याची गरज असते कारण यावेळी पेशंटचा, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असतो. काहीवेळा आजारपणात ब्लड ट्रान्सफ्युजन करण्यात येते. अपघातग्रस्तांना रक्तपुरवठा करण्यात येतो. किडनी आणि लिव्हरच्या रुग्णांना देखील अशाच प्रकारे रक्त पुरवठा करण्यात येतो.
भारतात ब्लड ट्रान्सफ्युजन गरजेचे असून भारतात लोकसंख्या जास्त असल्यामुळे रक्तपुरवठ्याचा तुटवडा भासण्याची शक्यता असते, त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. पण तरीही देशात एकूण रक्तसाठ्यात १० टक्क्याची तफावत असते, कारण काही ठिकाणी रक्तदान गरजेपेक्षा जास्त होते तर कुठे एक बॅग मिळणंसुद्धा अवघड असतं. कोरोना काळात परिस्थितीमध्ये सुधारणा झाली आहे.
भारत सरकार देखील रक्त जमवण्याच्या कार्यात सक्रिय असून त्यांनी देखील जागोजागी ब्लड बँक उघडायला सुरुवात केली आहे. भारतात कुठेही रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करण्यात येत आहेत.
ब्लड ट्रान्सफ्युजनची प्रक्रिया खूप सोपी आणि जलद आहे. यासाठी सुरुवातीला तुमच्या शरीराचे तापमान मोजले जाते. यानंतर नाडी व ब्लड प्रेशर मोजण्यात येते. जर सर्वकाही सामान्य असेल तर मग ब्लड ग्रुपचा शोध घेण्यात येतो. जर ब्लड ग्रुप जुळला तर पडताळणी पूर्ण करून ब्लड ट्रान्सफ्युजन प्रक्रिया सुरु करण्यात येते. ही प्रक्रिया गरजेनुसार १ ते ३ तासापर्यंत चालू शकते. फार कमी वेळा ट्रान्सफ्युजन दरम्यान समस्या निर्माण होतात. ट्रान्सफ्युजन प्रक्रियेदरम्यान जर कुठलाही त्रास झाला तर त्वरित डॉक्टरला सूचित करावे लागते. ट्रांस्फ्युजन प्रक्रियेनंतर नवीन रक्ताशी जुळवून घ्यायला शरीराला थोडा वेळ लागत असतो. यानंतर २४ ते ४८ तास आराम करण्याची सूचना करण्यात येते.
ब्लड ट्रान्सफ्युजन प्रक्रियेने मानवी आयुष्यात फार मोठा बदल घडवून आणला असून यामुळे असंख्य लोकांचे प्राण वाचवता आले आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.