आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
मागच्या वर्षी नाशिकच्या १० हजार शेतकऱ्यांनी शेतकरी आंदोलनाला सुरुवात केली. बघता बघता ह्या शेतकरी जनआंदोलनाला महाराष्ट्रभरातून प्रतिसाद मिळाला आणि सरकारकडे ह्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि हमीभाव अशा अनेक मागण्या केल्या होत्या. सततच्या दुष्काळाला आणि नापिकीला नाशिक जिल्ह्यातील शेतकरी वर्ग एकीकडे कंटाळला असला तरी त्याच नाशिक जिल्ह्यात एक गाव आहे, त्याचं नाव वडनेर भैरव. ह्या गावच्या रहिवाश्यांनी ह्या सततच्या दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या समस्येवर मात केली आहे.
ह्या गावचे ८० टक्के लोक हे शेती संबंधित व्यवसाय करतात. ह्या गावात मुख्यतः द्राक्षांची शेती केली जाते.
अत्यंत मधुर आणि रसाळ द्राक्षे ही ह्या गावची ओळख बनली आहेत. ह्या गावच्या शेतकऱ्यांना ह्या आस्मानी संकटातून वाचवण्यात एका व्यक्तिच्या भगीरथ प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे बापू भाऊसाहेब साळुंखे.
१५ वर्षांपूर्वी ह्या ३७ वर्षीय माणसाने पावसाचे पाणी साठवण्यासाठी आपल्या २२ एकराच्या शेतात काही पद्धतींचा अवलंब केला आणि त्याला आता वर्षाकाठी २ कोटी लीटर पाण्याची बचत करणे शक्य झाले आहे. पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा सामना करण्या बरोबरच शेतमालात वृद्धी करण्यात देखील त्यांना यश मिळालं आहे. यामुळे वर्षाकाठी त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात पण मोठी वाढ झाली आहे.
पावसाच्या पाण्याला वाहून न जाऊ देता, भूजल पातळीत वाढ करणे आणि शेततळ्यात पाणी साठवणे अशे उपक्रम त्यांनी अत्यंत यशस्वीपणे राबवले आहेत. या पद्धतीमुळे त्यांच्या शेतावर मुबलक पाणीसाठा आहे.
साळुंखे यांचे हे यश उत्तर गावकऱ्यांना देखील प्रेरणा देऊन गेलं आहे. त्यांनी साळुंखे यांचा मार्ग पत्करला आणि त्यांना देखील आश्चर्य झाले.
साळुंखे हे माध्यमिक शाळेत शिकत असतांना त्यांची शाळा सुटली. त्यांना तरुणपणी शिक्षणापेक्षा शेती करण्यात खूप मोठा रस होता. शेती हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय असून २००४ सालापासून साळुंखे आपल्या वडिलांना शेतीच्या कामात मदत करू लागले. जेव्हा शेतात काम सुरू केलं तेव्हा त्यांना दुष्काळी भागात शेती करणे हे किती अवघड काम आहे, याची जाणीव झाली.
त्याकाळी साळुंखे यांचा परिवार डाळी, भाजीपाला आणि द्राक्ष ह्या पिकांचे उत्पादन करायचा.
ह्या गावाला अवकाळी गारपीट आणि पावसाळ्यात अल्प पर्जन्य अशा दुहेरी संकटांचा सामना करावा लागत होता. ह्यामुळे जे काय थोडंफार उत्पन्न हाती यायचं त्याची बाजारात विक्री करून थोड्या थोडक्या पैशावर त्यांचा कुटुंबातील सदस्यांची गुजराण चालू होती. जमिनीची मशागत आणि शेततळे अशा दोन्ही संकल्पनापासून साळुंखे यांचा परिवार पूर्णपणे अनभिज्ञ होता.
एकदा एका नातेवाईकाच्या सांगण्यावरून आणि आग्रहावरून साळुंखे औरंगाबाद येथे सुरू असलेल्या जल व्यवस्थापन कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांची गाठ प्राध्यापक बी एम शेटे यांच्याशी पडली. त्यांनी साळुंखे यांना जल व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या पद्धती समजावून सांगितल्या. त्यांनी साळुंखे यांना सिंचन पद्धत, पावसाच्या पाण्याची बचत, चांगले उत्पन्न देणारे रोपं, इत्यादी सर्व गोष्टींची माहिती दिली.
त्यानंतर साळुंखे यांनी आपल्या शेतीत याचा प्रयोग करून बघण्यास सुरुवात केली. त्यांनी ६ लाखाची गुंतवणूक करून २००७ साली १ एकरात शेततळे उभारले.
२७५× १५५ फुटाची खोली असणाऱ्या ह्या शेततळ्यात तब्बल दोन कोटी लीटर पाणीसाठा करता येतो असा साळुंखे यांचा दावा आहे. दोन महिन्यांच्या पावसात हे शेततळे तुडुंब भरते. ह्या शेततळ्याच्या पाण्यावर ते आपल्या शेतातील बहुतांश जमीन सिंचित करतात. त्यांनी अजून एका शेततळ्याची निर्मिती त्यांच्या शेतात केली असून त्यात ते ५० लाख लीटर इतका पाणीसाठा करतात. यासाठी त्यांना आर्धा एकर जमीन वापरावी लागली आहे.
आपल्या बांधाची उंची वाढावून त्यांनी शेतातून पाण्याला वाहून जाण्यास मज्जाव केला असून ते पाणी जमिनीतच मुरेल अशी व्यवस्था केली आहे. त्यांच्या ह्या पद्धतीचा वापर इतर शेतकऱ्यांनी देखील केला असून त्यांना देखील ह्या पद्धतीचा फायदा झाला आहे.
त्यांनी आपल्या शेतात मायक्रो इरिगेशन अर्थात सूक्ष्म सिंचन पद्धतीचा देखील अवलंब केला आहे. ह्या पद्धतीत पाणी हे अत्यंत कुशलपणे फक्त द्राक्षाच्या झाडाच्या मुळाना पुरवले जाते. ह्या पद्धतीत बाष्पीभवनाचा धोका नसतो. त्यामुळे पाणी मुळापर्यंत पोहचून उत्तम द्राक्षाचे पीक येते.
साळुंखे यांनी आपली शेती आता फक्त द्राक्षा पुरता मर्यादित केली असून त्यांनी भाजांचे उत्पादन घेणे बंद करून त्यांच्या शेतीला एका वाइनयार्ड सारखे तयार केले आहे.
ते आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय पीकपद्धतीचा वापर करत असून आपल्या झाडांच्या बुंध्यावरील माती झाकण्यासाठी उसाचा पत्त्यांचा वापर करत आहेत. त्यांनी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळला आहे. त्यांच्यामते यामुळे मातीची सुपीकता टिकते तसेच ह्याचा वापर पुढे खतनिर्मितीसाठी देखील होतो.
आपल्या पाणी बचतीच्या पद्धतीमुळे त्यांनी ३-५ एकराला लागणारे पाणी संपूर्ण २२ एकर जमिनीसाठी यशस्वीरित्या उपयोगात आणले आहे. आज साळुंखे यांच्या शेतात २२ हजार द्राक्षांची झाडं आहेत.
त्यांच्या शेतातील तब्बल २०० टन द्राक्ष्यांची युरोप, अमेरिका आणि चीनसारख्या देशात निर्यात होते आहे. आता त्यांनी आपला व्यवसाय अजून मोठा केला असून ते त्यांच्या दलाला मार्फत त्यांच्या शेतातील बहुतांश माल परदेशात निर्यात करत आहेत. यामुळे मोठा नफा मिळतो आहे. त्यांच्या शेतातून त्यांना एकरी ४ लाख इतकी कमाई होते आहे. साळुंखे म्हणतात की मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे एक साधी सायकल होती पण आज माझ्याकडे २ कार आणि ७ मोटरसायकल आहेत. मला कधीच वाटलं नव्हतं की पाणी बचतीच्या काही पद्धतींमुळे माझं आयुष्य इतकं पालटून जाईल.
आज साळुंखे हे भारतातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श म्हणून उभे असून त्यांची यशोगाथा नक्कीच अनेक लोकांना आयुष्यात उभारी देईल हे मात्र नक्की!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.