आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
लेखिका- सौ. मीरा चित्तरंजन कावडकर
पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता समाजाभिमुखता स्पष्ट होते.
स्नान करुन गोपीचंदनाचा टिळा लावावा. नित्यनियमाने हरिपाठ म्हणावा. संतांचे ग्रंथ वाचावेत. देवाच्या मुर्तीचे दर्शन घ्यावे, भजन किर्तनात सहभाग घ्यावा, पंढरपूरी वारी करावी, तसेच एकादशी व्रत करावे. सात्विक आहार, सत्त्वाचरण, परोपकार व परमार्थ करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून मुक्त होऊन पांडुरंगाशी एकात्म व्हावे, नामस्मरण करावे असा साधा परमार्थ वारकरी संप्रदायात सांगितला जातो .
पायी केल्या जाणाऱ्या या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचा उल्लेख सापडतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पूढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालविली.
आळंदी-पूणे-सासवड-लोणंद-फलटण-नातेपोते-माळशिरस-वेळापूर-भंडीशेंगा-वाखरी-पंढरपूर अशा मार्गाने पालखी जाते. वाखरी येथे शेवटचे सर्व पालख्यांचे रिंगण असते.
असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाताना संत तुकाराम महाराजांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या कळसाचे दर्शन झाले व विठूरायाच्या ओढीनेते तिथून धावत निघाले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.
वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे आणखी एक वैशिष्ट्य मानले जाते. कडूस फाटा, वेळापूर, वाखरी येथे रिंगण होते. रिंगण ही वारकऱ्यांसाठी अतिशय श्रध्देय संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातून मोकळ्या जागेतून माऊलींचा अश्व धावतो.
या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरुढ होतात, अशी वारकरी संप्रदायात श्रध्दा आहे.
हैबतबाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख. त्यांच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले.
हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून समारंभासह थाटामाटाने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली. तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे, वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून येत असे. या खर्चास सहाय्य त्या त्या वेळचे व राजे श्रीमंत पेशवे सरकार करित असे. पूढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यानंतर खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे.
वारीच्या वेळी निरनिराळ्या फडावर किर्तन प्रवचन आदी कार्यक्रम होतात. फड म्हणजे दिंडिप्रमुख व त्यांचे शिष्य मंडळींचा सुसंघटित समुदाय. वारकऱ्याने ज्यांच्याकडून माळ स्वीकारली असेल, त्यांचा तो शिष्य असतो. वार आल्यावर नियमाने तो त्या त्या फडावर किर्तन भजनादी श्रवण करतो.
आषाढी कार्तिकी विसरु नका मज। सांगतसे गुज पांडुरंगा।।
माझ्या जिवाची आवडी। पंढरपूरा नेईन गुढी।।
वारीची आवड ही आपल्या जिवाची आवड आहे हे सांगताना संत ज्ञानेश्वर म्हणतात ‘भेटेन माहेरा आपुलिया।।’
माहेर या विशेषणात पंढरिचे अवघे माहात्म्य सामावलेले आहे. पंढरी माहेर आणि भक्तवत्सल विठोबा ही सर्व संतांची विठूमाऊली होय. पंढरिची वारी एकट्याने नव्हे तर सामूहिकपणे करण्याची वारी आहे. इथे वैयक्तिक नव्हे तर सामुहिक भक्तीला विशेष महत्त्व आहे.
हरि तेथे संत, संत तेथे हरी
ऐसे वेद चारी बोलताती।।
अनाथांच्या नाथ असलेल्या पंढरिनाथाच्या भेटीची आस हरिभक्तांना वर्षभर लागून राहिलेली असते. दुःख विसरून मनामध्ये आनंदरुपी चैतन्याचा ठेवा निर्माण करते ती वारी, त्यातून मिळालेला सुखाचा समाधानाचा ठेवा जनमानसात वाटला जातो.
कुंचे पताकांचे भार घेऊन असंख्य वैष्णव टाळ म्रुदुगांच्या गजरात नाचत गात विठ्ठलाच्या गावी आपूल्या माहेरा जातात. आणि त्या निर्गुण निराकार अशा विठ्ठलाचे पायी नतमस्तक होऊन काय मागतात तर प्रेम, अखंड विश्वाचे कल्याण, संपूर्ण मानवजातीचे कल्याण.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.