आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
चित्रपटाची समीक्षा कशी करावी याबद्दल काही गोष्टी शिकताना असं कळालं की सिनेमाचा कॉन्टेक्स्ट हा सिनेमा बघताना प्रत्येकाला माहीत असतोच असं नाही, त्याबद्दल जर समीक्षकांनी लिहिलं तर लोकांना चित्रपट जास्त चांगल्या प्रकारे समजून सांगायला मदत होईल. हाच समीक्षेचा मूळ उद्देश असतो.
हा कॉन्टेक्स्ट हैदर सारख्या चित्रपटाबद्दल बोलताना शेक्सपिअरच्या नाटकाबद्दल आणि ईडीपस कॉम्प्लेक्सबद्दल असेल, आर्टिकल 15 बघताना जातीविषयक असेल आणि ‘गली बॉय’बद्दल बोलताना भारतातल्या रॅपर्सबद्दल असेल.
जेव्हा हा कॉन्टेक्स्ट धर्म किंवा राजकारणावर येतो तेव्हा मात्र तो सांगितला की मतमतांतर असणाऱ्या लोकांचे कमेंट मध्ये भांडण लागतात, जे आता “पाताल लोक” बद्दल होतंय, त्याबद्दल जरा बोलूयात.
अनेक कलाकारांनी बोलून दाखवलंय की समाज प्रबोधन करणं हे काही आमचं काम नाहीए. तर काही कलाकार समजतात की ते समाजावर संस्कार करताय. माझं मत पहिल्या प्रकारातील आहे, बराच काळ एकच बाजू दाखवणारे सिनेमे आले की लोकांच्या भूमिकांवर किंवा किमान मतांवर परिणाम होतो हे खरंय.
एकच बाजू खरी आहे हे समजून तुम्ही जगत गेलात तर तुम्ही भ्रमात जगाल, आणि तो भ्रम तुटेल तेव्हा तुमची जी परिस्थिती असेल ती किती दयनीय असेल? उदा. अमेरिका किती ग्रेट आहे याबद्दल ढिगानं चित्रपट बनले. पण कोरोनाच्या महामारीत त्यांचे होणारे हाल बघून आता आपला “अमेरिका ग्रेट” हा भ्रम तुटत चाललाय.
जगातल्या सर्वात महान देशातल्या मृतांचा आकडा एक लाखात जात असताना त्यांचा राष्ट्राध्यक्ष गोमूत्रापेक्षाही बिनडोक काहीतरी बोलतोय….
तर म्हणून दुसऱ्या बाजूने विचार करायला लावणारे सिनेमे, पुस्तकं गरजेचे असतात. ते आपली भूमिका अधिक चोखंदळ बनवतात. आपल्याला परिस्थितीची जास्त चांगली जाणीव करून देतात.
आतापर्यंत आपण मोजूही शकत नाही एवढ्या चित्रपटांमध्ये महिलांचा वापर वस्तूंप्रमाणे केलाय. आपल्या सिनेमातला हिरो नेहमी हिंदूच असायचा, पोलीसही हिंदूच. व्हिलन, चोर मात्र मुस्लिम. कधीतरी मुस्लिम मोहल्ल्यातला एखादा सिन आठवतोय का जेव्हा आपला हिरो फक्त त्याच्या मुस्लिम मित्राला भेटायला गेलाय किंवा काही कामाला गेलाय. मुस्लिम मोहल्ला दिसलाकी आपल्याला लगेच समजतं, इथं आता पोलीस किंवा हिरो येणार, सगळे लोक मार खाणार, व्हिलन मरणार आणि The End.
मग आता याचीच दुसरी बाजू दाखवणारे सेक्रेड गेम्स, मुल्क, पाताल लोक आले तर चांगलंच आहे ना…हे बघताना तुमच्या प्रतिक्रियांवरून तुम्हालाच हे कळेल की तुम्ही किती धर्मनिरपेक्ष विचार करू शकता. जर एवढा काळ प्रत्येक मुस्लिम पात्र दहशतवादीच दाखवलंय तर आता हिंदू पात्रांना फक्त व्हिलन केलं तरी तुम्हाला त्रास होत असेल तर समजून घ्या की धर्मनिरपेक्षता फक्त तुमच्या संविधानात आहे, तुमच्यात नाही.
कलाकार काहीतरी साकारतो तेव्हा त्याची प्रेरणा त्याच्या आयुष्यातून आलेली असते, त्याने तसं जग अनुभवलं असावं. त्याचं मत खरं असेलच असं नाही. उदा. पाताल लोकमध्ये एक महंत दलितांच्या घरून आल्यावर गंगाजलने अंघोळ करतो असा सिन आहे. ज्यावरून त्याची तुलना योगी आदित्यनाथ यांच्यासोबत करण्यात आली. मी एक खाली लिंक देतोय ज्यात योगी आदित्यनाथ दलितांच्या घरी जेवले पण जेवण, पाणी, ताट बाहेरून आलं होतं असा आरोप केल्याची बातमी आहे. आता हे खरं असेल किंवा नसेल हा वेगळा वाद पण असा काहीतरी गोंधळ आपल्या समाजात अस्तित्वात आहे हे तर खरं! संदर्भ
हे मांडण्यातून सध्याचं धार्मिक राजकारण जर सिनेमात येत असेल तर काय गैर आहे ? त्या महंतांचा अपमान जर हिंदू धर्माचा अपमान असेल तर मुळात दलितांची ही अवस्था असणं हाच हिंदू धर्माचा जास्त मोठा अपमान नाही का?
दुसरी खटकणारी गोष्ट होती की मुस्लिमांवर दहशतवादाच्या खोट्या केसेस टाकल्या गेल्या आणि त्यातून ते पात्र गुन्हेगारी विश्वात आलं. आता मुस्लिमांवर खोट्या केसेस किती आहेत याबद्दल गुगलला विचारा तुम्हालाच कळेल. राज कुमार रावचा “शाहीद” चित्रपट बघा, त्यात तर खऱ्या केसेस दाखवल्यात. मग ही बाजू समाजासमोर आणू नये का? संदर्भ
मी रिव्ह्यूव्हमध्ये या राजकारणाबद्दल का लिहिलं नाही?
कारण हा त्या कथेचा गाभा नाहीए. किंवा ही ड्रायव्हिंग फोर्सही नाहीए. हा धर्म आणि राजकारणाचा प्लॉट फक्त व्यक्तिमत्व उभारायला दिलेला आधार म्हणून काम करतो. क्लायमॅक्स आल्यावर कळतं की हे सगळं तर राजकीय खेळीचा एक भाग आहे. उदाहरणार्थ. 3 इडियट्समध्ये रॅगिंगचा सिन रँचोचं पात्र उभा करतो. सिनेमा रॅगिंग विषयी नसला, तरी त्या विश्वात असणारी ती एक महत्वाची आणि खरी गोष्ट आहे, यातून कथा समृद्ध होते. तसंच पाताल लोकमध्ये छोट्या छोट्या गोष्टींमधून पात्र घडवली आहेत. त्यातून ती कथा अधिक खरी होते.
यात एक “चिनी” म्हणून तृतीयपंथी पात्र आहे. उत्तरपूर्व भागातून आल्यामुळे त्याला ते चिनी म्हणत असतात. त्या प्रकारचा लूक असल्यामुळे त्याला “स्पा” मध्ये नोकरी मिळते. त्यातूनच तो या केसमध्ये अडकतो. परवा बातमी आली होती की कोलकातामध्ये उत्तरपूर्वच्या राज्यांतून आलेल्या नर्सेसने सामूहिक राजीनामा दिला आणि पुन्हा कधीही त्या शहरात येणार नाही हे सांगून गेल्या. कारण काय होतं? तर तिथले सुशिक्षित लोक त्यांना, करोना, करोना, म्हणून हिणवत होते… आपल्याच देशातील नर्सेस आपल्याच लोकांना कोरोना पासून वाचवत असताना त्यांना अशी वागणुक मिळणं हे किती लाजिरवाण आहे… हे सत्य, ही दुसरी बाजू आपल्या सिनेमाचा भाग असू नये का? हे फक्त त्या “चिनी” पात्राच्या उत्तरपूर्व भागातून आलेल्या दिसण्याबाबद्दल आपण बोलतोय, तो तृतीयपंथी असण्याबद्दल तर अशी किती उदाहरण देऊन बोलता येईल…
समाज लोकांना घडवतो, या समाजाने घडवताना दुर्लक्ष्य केलेल्या पात्रांच्या व्यक्तित्वाचा शोध घेत आपल्या लोकशाहीच्या कार्यपद्धतीवर भाष्य करणारी ही सिरीज अशा अनेक अंगांनी विशेष आहे…
ही हिंदूविरोधी आहे का? तर नाही, समीक्षेतून हिंदुधर्म अधिक सक्षम होईल असं मानलं तर ही हिंदुसमर्थन करणारीच सिरीज आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.