आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
उत्तर कोरियाने केलेल्या हैड्रोजन बाँबच्या परिक्षणाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. याशिवाय उत्तर कोरियन शासकांच्या कहाण्या तर सर्वपरिचित आहेतच. त्याच उत्तर आणि दक्षिण कोरियाचा आजवरचा प्रवास आपण थोडक्यात पाहू.
कोरियाचे शेजारी देश म्हणजे रशिया, चीन आणि जपान. एक हजार वर्षे राज्य करणारे कोरियाचे राज्य संपवून जपानने कोरियाची सत्ता हस्तगत केली. जपानने ज्याप्रमाणे चीनमध्ये अनन्वित अत्याचार केले त्याचीच नकल कोरियामध्ये देखील केली. राजकीय आणि आर्थिक शोषणाबरोबरच जपान्यांनी “comfort woman” या नावाखाली कोरियन स्त्रियांची विटंबना केली. (चीन प्रमाणेच कोरियन लोकांच्या मनात जपान विषयी अनन्यसाधारण असा द्वेष आहे तो यामुळेच.)
पुढे दुसऱ्या महायुद्धात अणुबाँब पडल्यानंतर जपानचा सम्राट अमेरिकन जनरल मॅकआर्थर समोर शरण आला. जपान शरण आल्यानंतर जपान मधून अमेरिकन सैन्य दक्षिण दिशेने कोरियात दाखल झाले तर उत्तरेतून रशियन सैन्य कोरियात दाखल झाले. ही दोन्ही सैन्य ज्या सीमारेषेवर समोरासमोर आली त्या बिंदूला 38th Parallel म्हणतात. अमेरिका आणि रशियाने आपापसात समझोता करुन हे दोन्ही भाग वाटून घेतले.
अमेरिकने त्यांच्या ताब्यातील दक्षिण कोरियात सरकार निवडीची प्रक्रिया राबवली व १९४८ साली दक्षिण कोरियाची सुत्रं Syngman Rhee या कम्युनिस्ट विचारधारेचे कट्टर विरोधक अमेरिकन आशीर्वादाने सत्तेवर आले तर रशियन आशीर्वादाच्या बळावर उत्तर कोरिया मध्ये Kim IL Sung हे सत्तेवर आले. या दोन्ही सत्ताधाऱ्यांना वाटत होतं की संपूर्ण कोरिया एकच असून दुसरा सत्ताधारी अनधिकृत असून त्याला बरखास्त केले पाहिजे व कोरियाचे एकीकरण केले पाहिजे. या विचारधारेमुळे दोन्ही देशांत तणाव वाढला.
उत्तर कोरियाला रशियाने सढळ हाताने रणगाड्यांसहीत अनेक शस्त्रांची मदत केल्यामुळे तो सशक्त झाला होता तर अमेरिकने हात आखडता घेतल्यामुळे दक्षिण कोरिया कमजोर होता. (या घडामोडीतील आणखी एक महत्वाचा पदर म्हणजे रशियाने देखील आण्विक चाचणी घेतल्यामुळे आता फक्त अमेरिका अण्वस्त्रधारी देश राहिलेला नव्हता व शीतयुद्धाला सुरुवात झाली होती.) १९५० साली उत्तर आणि दक्षिण कोरिया मध्ये प्रत्यक्ष युद्धाला सुरवात झाली तेव्हा उत्तर कोरियाने शस्त्रांच्या बळावर एकामागोमाग एक दक्षिण कोरियन प्रदेश जिंकायला सुरुवात केली.
तिकडे युनायटेड नेशन्स म्हणजे तेव्हाच्या अमेरिकेने उत्तर कोरिया विरुध्द सैनिक पाठवण्याचा ठराव पास केला. युनायटेड नेशन्सच्या सैनिकांचा सेनापती म्हणून जनरल मॅकआर्थर यांची निवड झाली.
तोपर्यंत इकडे उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाचा ९०% भाग गिळंकृत करत पार बुसान पर्यंत धडक मारली होती. जनरल मॅकआर्थर यांनी विचारपुर्वक योजना आखून दक्षिण व उत्तर कोरियाच्या मधोमध असणाऱ्या इंनचॉन शहरात समुद्रमार्गे धडक मारुन उत्तर कोरियन सैनिकांची रसद तोडून टाकली. ही योजना कमालीची यशस्वी झाली. रसद नसल्यामुळे हवालदील झालेले उत्तर कोरियन सैन्य मागे हटू लागले.
जनरल मॅकआर्थर यांनी दक्षिण कोरिया तर मुक्त केलाच पण आता ते 38th parallel रेषा ओलांडून उत्तर कोरियन प्रदेशात घुसले.
त्यांनी अमेरिकन अध्यक्षांची सुचना नाकारत उत्तर कोरियन सैन्याला इतके मागे रेटले की यालू नदीजवळील चीनच्या सिमेपर्यंत पोहचले.
इतके दिवस वाट बघत असलेल्या चीनला निमित्त मिळाले आणि त्यांनी या युद्धात उडी घेतली. लाखो सैनिकांना घेऊन चीन युद्धात उतरल्यावर चीनने यु एनच्या सैन्याला पुन्हा मागे रेटत सेऊल वर कब्जा मिळवला. जनरल मॅकआर्थर यांनी चीन वर अणुबाँब टाकण्याची सुचना अमेरिकन अध्यक्ष ट्रुमन यांना केली परंतु ती नाकारुन अध्यक्षांनी मॅकआर्थर यांना परत बोलवले. त्यानंतर पुन्हा युएन सैन्याने सेऊल ताब्यात घेतले व 38th parallel च्या परिसरातच दोन वर्षे लढाई करत राहिले.
ही परिस्थिती पाहून जवाहरलाल नेहरुंनी पुढाकार घेत हे युद्ध थांबवण्यासाठी एक योजना युनायटेड नेशन्स समोर मांडली व सर्वानुमते मान्य करण्यात आली. 38th parallel ही दोन्ही देशांची सीमारेषा गृहीत धरून त्या रेषेपासून दोन-दोन किलोमीटर अंतरावर चीन आणि युएन सैन्य मागे हटले.
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की अधिकृतरीत्या शांतता तह न झाल्यामुळे हे दोन्ही देश आजही कागदावर का होईना पण युद्ध सुरू आहे असंच मानतात.
जगातील सर्वात स्फोटक सीमारेषा म्हणून 38th parallel ओळखली जाते. सर्वात जास्त तैनात सैनिक आणि जागोजागी सुरुंग पेरलेली सीमारेषा म्हणजे 38th parallel सीमारेषा. या कोरीयन युद्धात अडीच कोटी लोकसंख्येपैकी पंचवीस लाख नागरिक आणि अंदाजे दहा लाख सैनिक मारले गेले. वित्तहानी किती झाली त्याची मोजदाद करता येणे अशक्य आहे. एवढं सगळं घडून देखील शेवटी आहे तीच राजकीय व प्रादेशिक स्थिती राहिली.
या युद्धाचं वैशिष्ट्य म्हणजे युनायटेड नेशन्सने पहिल्यांदा सैनिकी कारवाई केली. अमेरिकन व रशियन विमानदल पहिल्यांदा करत समोरासमोर लढले. हेलिकॉप्टर आणि जेट विमानांचा वापर केला गेला. महायुद्धाच्या मागोमाग हे युद्ध झाल्यामुळे त्या परिस्थितीत हे युद्ध विशेष उल्लेखनीय म्हणून ओळखले जात नाही.
सत्तरच्या दशकात दक्षिण कोरियाने तंत्रज्ञानात झेप घेत ह्युंदाई सॅमसंग सारख्या उत्पादनाच्या बळावर आर्थिक प्रगती केली आहे आणि ८०च्या दशका पासुन तिथे लोकशाही नांदते आहे तर उत्तर कोरियात kim il sung यांच्या नंतर त्यांचा मुलगा kim jong il आणि त्यानंतर त्यांचा नातु kim jong un सत्तेवर आला आहे.
उत्तर कोरियात देखील निवडणुका होतात आणि नागरीकांना मतदान करणे सक्तीचे आहे. फक्त इथे विनोद असा आहे की उमेदवार म्हणून kim jong un हा एकमेव व्यक्ती असतो आणि तुम्हाला त्यालाच मतदान करुन यावे लागते.
रशियाच्या पतनानंतर उत्तर कोरियाचा मोठा आधार गेला आणि त्यामुळे ते अधिक स्वकेंद्रीत झाले.
Kim un च्या आजोबाने त्याच्या काळातच “juche” नावाची संकल्पना मांडली होती. त्यानुसार उत्तर कोरिया आत्मनिर्भर असेल. अन्न, वस्तू, शस्त्र सर्व उत्तर कोरियातच तयार केले जाईल. उत्तर कोरियन नागरिकाला देश सोडुन कुठेही जाता येणार नाही आणि बाहेरुन कुणाला आत येता येणार नाही. मोबाईल ,टिव्ही , इंटरनेट वापरता येणार नाही इतकेच काय सरकारने ठरवलेल्या दहा केशरचने व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे केस देखील कापता येणार नाहीत.
नासाने या दोन्ही देशाचा प्रसिद्ध केलेला एक फोटो पाहून दोन्ही देशांची आर्थिक परिस्थिती लगेच लक्षात येते.
अशा सनकी देशाला पाकिस्तानी शास्त्रज्ञ ए क्यु खान आणि चीनच्या आशीर्वादाने आण्विक व क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळाले आणि त्याचा मुक्त वापर करत जगाला फाट्यावर मारून उत्तर कोरिया एकामागोमाग एक आण्विक परिक्षणं करत चालला आहे. जग ज्वालामुखीच्या तोंडावर बसले आहे हेच खरे.
===
लेखक : तुषार दामगुडे
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.