आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारात अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे. यापैकी एक आहेत राजस्थानचे प्रसिद्ध गायक रमजान खान उर्फ मुन्ना मास्टर, ज्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मागच्या वर्षी वाराणसी हिंदू विश्वविद्यालयाच्या संस्कृत विभागात यांच्या मुलांच्या झालेल्या नियुक्तीवर मोठा वादंग निर्माण झाला होता.
मुन्ना मास्टर हे जयपूरचे रहिवासी असून ते भगवाण श्रीकृष्णाचे निस्सीम चाहते आहेत. त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि गोमातेवर लिहिलेल्या भक्तिगीतांसाठी ते प्रसिद्ध आहेत.
अनेक लोक त्यांनी लिहलेल्या भक्तिगीताचे निस्सीम चाहते आहेत. मुस्लीम धर्मीय असूनही भगवान श्रीकृष्णाविषयीचे त्यांचे निस्सीम प्रेम सदैव त्यांच्या भक्तीगीतातून ओघळत असते.
त्यांच्या ह्या भक्तीगीतांमुळे त्यांची चर्चा सर्वदूर पसरली आहे. त्यांच्या ह्या प्रतिभेमुळे आज त्यांना पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
ह्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक मान्यवरांना पद्म पुरस्कार घोषित झाले. त्यात माजी वित्तमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, आणि माजी संरक्षणमंत्री अरुण जेटली ह्यांच्याबरोबर ७ व्यक्तींना पद्माविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मनोहर पर्रीकर आणि पी व्ही सिंधू समवेत सोळा जणांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
ह्या सोबत १८८ जणांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. ह्यात मुन्ना मास्टर यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
मुन्ना मास्टर यांचे वय ६१ वर्ष असून त्यांनी श्याम सुंदर वंदना श्रीकृष्णाचे भावगीत असलेल्या ह्या पुस्तकाचे लेखन देखील केले आहे. ते जयपूरचे रहिवासी असून ते संस्कृत भाषेचे चांगले ज्ञान बाळगून आहेत.
मुन्ना मास्टर यांचा मुलगा फिरोज याची वाराणसी हिंदू विश्वविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या साहित्य शाखेत सहाय्यक प्राध्यापक म्हणूण नेमणूक करण्यात आली होती. ज्यात काही धार्मिक अधिष्ठान शिकवले जातात असा दावा तिथल्या विद्यार्थ्यांनी केला होता. त्यामुळे त्यांनी फिरोजच्या नियुक्तीला प्रचंड विरोध केला.
त्यांची नियुक्ती धर्मानुसार नसल्याचं म्हटलं होतं. ९ नोव्हेंबरला फिरोज आपल्या कामाची जबाबदार स्वीकारत नाही त्या आधीच त्याठिकाणी वादंग निर्माण झाला. ७ तारखेला त्या विभगाचे विद्यार्थी आंदोलनाला बसले.
त्यांनी शेवटपर्यंत आपला कडवा विरोध कायम ठेवला परिणामत: फिरोज यांनी रोजच्या जाचाला कंटाळून अखेरीस राजीनामा दिला.
पुढे वाराणसी हिंदू विश्वविद्यालयातच संस्कृत विभागात फिरोजला नोकरी मिळाली.
रमजान खान हे पुढारलेल्या विचारांचे होते, त्यांनी फिरोज खान यांना संस्कृत भाषेत शिक्षण दिलं. यासाठी त्यांच्या इतर मुस्लीम नातेवाईकानी त्यांच्याशी असलेले संबंध संपुष्टात आणले.
त्यांना वाळीत टाकण्यात आले, एवढं असून देखील रमजान खान मागे हटले नाहीत त्यांनी फिरोजला संस्कृत भाषा शिकवली. आज जेव्हा फिरोज संस्कृत भाषा तज्ञ झाला आहे.
सर्व नातेवाईकांनी रमजान खान यांच्याशी पुन्हा संबंध प्रस्थापित केले आहे.
रमजान यांचा परिवार हा गेल्या तीन पिढ्यांपासून गोसेवा करतो आहे. रमजान खान यांचे वडील ग्फ्फुर खान हे देखील मोठे गोसेवक होते. कृष्णावर अगाध श्रद्धा असल्याने रमजान यांच्या घरात मांस भक्षण वर्जित होते.
आधी पासूनच रमजान यांच्या वागण्याचा तिटकारा असणाऱ्या मुस्लीम नातेवाईकानी फिरोजला जवळच्या मदरशात शिक्षण देण्यासाठी जबरदस्ती रमजान यांच्यावर करण्यास सुरुवात केली. पण रमजान यांनी संकल्प केला होता की दोन्ही मुलांचे शिक्षण हे माध्यमिक शाळेत व्हावे आणि त्यांनी संस्कृत भाषेचा आभ्यास करावा.
यासाठीच त्यांनी मुलाला राजकीय वरिष्ठ उपाध्याय संस्कृत शाळेत शिकायला घातले.
संस्कृत भाषेत फिरोजने पीएचडी पर्यंत शिक्षण घेतले आणि जयपूरच्या संस्कृत महाविद्यालयात तो शिक्षक म्हणून रुजू झाला. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात फिरोजचा सत्कार राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते करण्यात आला.
आज फिरोज वाराणसी हिंदू विश्वविद्यालयाच्या संस्कृत विभागात प्राध्यापक बनला याचे संपूर्ण श्रेय त्याचे वडील रमजान खान उर्फ मुन्ना मास्टर यांचे आहे.
आपला धर्म, आपली विचारधारा वेगळी असून देखील फक्त भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमापोटी त्यानी मुलांना संक्सृत शिकवलं. इतकंच नाहीतर संस्कृत विषयाचा पंडित बनवलं. आज त्यांची मुलं नाव कमावत आहेत.
रमजान खान यांनी श्रद्धेपोटी फिरोजच्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी छापण्यात आलेल्या मंगलपत्रिकेवर गणेश मंत्र आणि गणेशाचा फोटो छापला होता, अनेक मुस्लिमांना ते बघून आश्चर्य वाटलं होतं.
याहून महत्वाची गोष्ट म्हणजे रमजान यांनी समाजाच्या विरोधाला न जुमानता आपल्या दोन्ही मुलींपैकी एकीचे नाव लक्ष्मी ठेवले तर एकीचे अनिता ठेवले. शिवाय चारी मुलांना ते नेहमी मंदिरात पूजेसाठी घेऊन जायचे.
त्यांनी जितकं प्रेम अल्लाह वर केलं तितकंच प्रेम कृष्णावर देखील केलं आहे.
रमजान खान हे भारताच्या खऱ्या विविधतेने नटलेल्या परंपरेचे वाहक असून आपल्या समाजात द्वेष पसरवणाऱ्या लोकांना त्यांनी एक संदेश दिला आहे.
फिरोज देखील वाराणसी हिंदू विद्यापीठात मिळालेल्या वागणुकीवर असलेली कटुता विसरून गेला असून आपण आपल्या पित्याने शिकवलेल्या धार्मिक सहिष्णुता व स्नेहभावाच्या रस्त्यावर चालण्याचा त्याने निर्धार केला आहे.
तो आपल्या पित्याला मिळालेल्या ह्या सन्मानाबद्दल प्रचंड आनंदी आहे.
रमजान खान आणि त्यांचा परिवार हा त्या शेकडो परिवारांचा प्रतिनिधी आहे, जे एकत्र येऊन आजचा भारत घडवत आहे, ज्यांनी जातीधर्माचे बंधन झुगारून टाकत माणुसकीचा मार्ग निवडला आहे. रमजान खान यांना आज मिळालेला पद्मश्री हा भारतीयत्वाचा गौरव आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.