आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जागतिक आश्चर्य आणि युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्सपैकी एक असलेल्या ताज महालला आपण भारताची शान मानतो. अशात जर एखादी व्यक्ती तुम्हाला येऊन म्हणाली, ताजमहाल खरेदी करणार का? तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? नक्कीच त्या व्यक्तीला तुम्ही वेडं ठरवून मोकळं व्हाल यात शंकाच नाही. कोणी असं ताजमहाल विकण्याची कल्पना तरी कसं करू शकतं? मात्र, काही दशकांपूर्वी भारतात अशी एक व्यक्ती होती जिनं सरकारी अधिकारी बनून एकदा नाही तर तब्बल तीनवेळा परदेशी लोकांना ताजमहाल विकला होता. केवळ ताजमहालच नव्हे तर त्यानं लाल किल्लाही दोनदा विकला होता.
हे काय कमी होतं का? राष्ट्रपती भवन आणि भारतीय संसद भवन देखील त्याने विकले होतं, तेही त्यात बसलेल्या ५४५ खासदारांसहीत! हे सगळे उद्यव्याप करणारा व्यक्ती होता ‘नटवरलाल’. नटवरलाल भारतातील सर्वात सराईत ‘कॉनमॅन’ म्हणून प्रसिद्ध होता.
१९१२ साली नटवरलालचा जन्म बिहारच्या सिवान जिल्ह्यातील बांग्रा गावात झाला होता. त्याचं मूळ नाव मिथिलेश कुमार श्रीवास्तव होतं. घरातील दोन भावांमध्ये तो मोठा होता. त्याचे वडील स्टेशन मास्टर होते.
एकदा शेजाऱ्याने त्याला बँक ड्राफ्ट जमा करण्यासाठी पाठवलं होतं. तेव्हा आपण सहज शेजाऱ्याच्या सहीची नक्कल करू शकतो हे नटवरलालच्या पहिल्यांदा लक्षात आलं होतं. त्यानं आपली ही योजना अंमलात आणली देखील. त्यानं खोटी सही करून शेजाऱ्याच्या खात्यातून एक हजार रुपये काढून घेण्यात यश मिळवलं आणि इथूनचं त्याच्या करामतींना सुरुवात झाली होती.
त्यानंतर तो कलकत्त्याला पळून गेला. तिथं नटवरलालनं ‘कॅज्युअल स्टॉक ब्रोकर’ म्हणून काम करता-करता वाणिज्य शाखेच्या पदवीसाठी प्रवेश घेतला. त्यानंतर त्यानं कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यात त्याला यश आलं नाही. तोपर्यंत त्याचे फसवणुकीचे लहान-मोठे गुन्हे सुरूचं होते.
१९३७ साली, ९ टन लोखंडचोरीच्या गुन्ह्यात त्याला पहिल्यांदा अटक झाली होती. त्यानंतर त्यानं आपला चोरी करण्याची पद्धत बदलली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नटरवरलाल नियमितपणे शहरातील विविध भागांमध्ये वेश्यांना भेटण्यासाठी जाई. तिथे त्यांना दारू तो पाजत असे आणि त्यांचे दागिने व पैसे चोरुन पळून जाई. मात्र, या कामात मोठा धोका असल्याची खात्री झाल्यानंतर नटवरलालनं ही पद्धत देखील बंद केली.
असं म्हटलं जातं की, नटवरलालने शेकडो दुकान मालक, ज्वेलर्स, बँकर्स आणि परदेशी लोकांना फसवलं होतं. त्यानं आपल्या हयातीमध्ये पन्नासपेक्षा जास्त वेशांतरे केली होती.
कधी तो सामाजिक कार्यकर्ता बनून गरजू लोकांच्या नावाखाली पैसे मिळवायचा तर कधी बँक अधिकारी होऊन लोकांकडून पैसे उकळायचा. लोकांची फसवणूक करण्यासाठी तो कांदबऱ्यांमधील कल्पनांचा उपयोग करीत असे. अशीच एक कल्पना वापरून त्यानं पंजाब नॅशनल बँकेला साडेसहा लाख रुपयांना फसवलं होतं.
नटवरलालला अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या खोट्या स्वाक्षरी करता येत होत्या. असं म्हटलं जातं की, त्यानं टाटा, बिर्ला आणि धीरूभाई अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपतींची फसवणूक केलेली आहे.
विविध गुन्ह्यांसाठी नटवरलालला ११३ वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. परंतु, त्याने केवळ २० वर्ष तुरूंगात काढले होते. एकदा त्यानं जेलमधील सुरक्षा रक्षकाला १० हजार रुपयांची लाच देऊन पलायन केलं (जेव्हा रक्षकानं या नोटा पाहिल्या त्या सगळ्या खोट्या नोटा असल्याचं समोर आलं होतं). मार्च १९५६ मध्ये त्याला मेरठमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर १० महिन्यांनी त्याला लखनऊ जेलमध्ये नेण्यात आलं.
फेब्रुवारी १९५७मध्ये त्यानं एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाची वर्दी चोरी केली आणि ती घालून पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. १९८० मध्ये त्याला मुंबईच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तेव्हा नटवरलालनं प्रकृती बरी नसल्याच्या तक्रारी सुरू केल्या. पोलिसांनी त्याला १४ जूनला जे.जे. रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर मूत्रपिंडाचा विकारावर उपचार केले गेले.
२८ जून रोजी रात्री त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रुग्णालयातून परत तुरुंगात जात असतानाचं त्यानं पुन्हा पलायन केलं. तो इतका चपळ आणि हुशार होती की, वयाच्या ८४व्या वर्षी देखील तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. कानपूर येथून एम्समध्ये भरती करण्यासाठी त्याला व्हीलचेयरवर नेलं जातं होतं. तेव्हा दिल्ली रेल्वे स्टेशनवरून त्यानं पलायन केलं होतं.
नटवरलालच्या नावे १०० पेक्षा जास्त गुन्ह्यांचा नोंद होती आणि ८ राज्यातील पोलीस त्याच्या मागावर होते. जेव्हा पोलीस त्याच्या मागावर नसत तेव्हा तो आपल्या गावातील लोकांमध्ये रमत असे. लुटीतून मिळवलेले पैसे तो गावातील गरजू नागरिकांना देत असे. त्यामुळे त्याचे गावकरी त्याला खूप मान देत. त्याच्या नजरेत त्याची प्रतिमा चांगली होती, त्याचा एक पुतळा बसवण्याची तयारी देखील गावकऱ्यांनी केली होती.
नटवरलाल अतिशय चतुर होता. त्यानं केलेल्या अनेक चोऱ्या आणि फसवणुकीचे गुन्हे अविश्वसनीय वाटतात. पण, त्यानं कधीही गरीब व्यक्तींना फसवलं नाही. त्यामुळं त्याच्या गावी त्याची प्रतिमा रॉबीनहूडसारखी होती.
२५ जुलै २००९ मध्ये नटवरलालनं अखेरचा श्वास घेतला असून त्याच्या विरोधात प्रलंबित असलेले शंभरहून अधिक खटले रद्द करण्याची मागणी करणारी एक याचिका त्याच्या वकिलांनी कोर्टात दाखल केली होती. मात्र, नटवरलालचा मृत्यू १९९६ मध्येच झाला असून रांचीमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्याचा दावा नटवरलालचा भाऊ गंगा प्रसाद श्रीवास्तव यांनी केला होता. त्यामुळं ज्या पद्धतीनं नटवरलालचं आयुष्य गुढ होत त्याप्रमाणं त्याचा मृत्यू देखील गुढचं आहे.
नटवरलालचं आयुष्य रंजक होतं. त्याच्या आयुष्यावर आधारित दोन हिंदी चित्रपट तयार झाले आहेत. पहिला चित्रपट ‘मिस्टर नटवरलाल’ १९७९मध्ये आला होता. त्यात अमिताभ बच्चन यांनी नटरवलालची भूमिका केली होती. तर, दुसरा चित्रपट ‘राजा नटवरलाल’ २०१४मध्ये आला होता. त्यात इम्रान हाश्मीनं नटवरलालचं पात्र साकारलं होतं. याशिवाय त्याच्या गुन्ह्यांवर आधारित ‘जुर्म’ नावाचा एक कार्यक्रम आज तक वाहिनीवर दाखवला जात होता.
नटवरलाल भारतीय इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात हुशार गुन्हेगार समजला जातो. त्याच्यासारखी बुद्धीमत्ता असलेल्या व्यक्ती चांगल्या कामांमध्ये आल्या तर देशाला आणि समाजाला त्यांची नक्कीच मोठी मदत होईल, यात शंका नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










