आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
सिंघम फेम दाक्षिणात्य सुपरस्टार सुरीया दमदार डायलॉग, रॉ ॲक्शन आणि रंजक कथा असणाऱ्या टिपिकल साऊथच्या मुव्ही इंडस्ट्रीतील कायमच हिट चित्रपट देणारा हिरो. अशीच त्याची ओळख आहे. छोट्या शहरातल्या काहीतरी सामाजिक संदेश देणाऱ्या, सामान्य कथा विनोदी करून दाखवायच्या आणि एक वेगळा सिनेमा म्हणून ओळख निर्माण करण्याचं एक ट्रेंडच सध्या सुरू आहे. यात सुपरस्टार वगैरे लोकांना अभिनय येतच नसतो, ते फक्त त्यांच्या इमेजमुळे हिट असतात, असं मत बहुदा सगळ्याच, सजग प्रेक्षकांचं झालंय.
सुपरस्टार्सची स्क्रीनवरची इमेज हा पण एका वेगळ्या प्रकारचा अभिनय असतो असं आपल्याला वाटतच नाही. पण जसं गली बॉयमधून रणवीर आणि आलियाने हे सिद्ध केलं की सुपरस्टार असा गंभीर स्वरूपाचा काहीशी मेथड ॲक्टिंग वाटेल असा अभिनय पण करू शकतात तसंच सुरीयाने सुरराई पॉटरुमधून प्रेक्षकांच्या नजरेत एक सुपरस्टार आणि एक गंभीर अभिनेता म्हणून स्थान निर्माण केलंय.
सुरीया आता त्याच्या कारकिर्दीत असं काय करेल जे या आधी केलं नव्हतं? कदाचित याचंच उत्तर शोधत असताना त्याने या सिनेमासाठी हो म्हटलं असावं. एकही फायटिंग सिन नसणारा गंभीर सिनेमा एक एवढा मोठा स्टार करतोय म्हणून याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं.
हा सिनेमा ‘सिम्प्लि फ्लाय’ या कंपनीच्या खऱ्या खुऱ्या संघर्षावर बेतलेला आहे. भारतात विमान वाहतूक ही फक्त श्रीमंत लोकांसाठीचीच सोय आहे. पण ही सोय सामान्य लोकांनाही उपभोगता यावी यासाठी या कंपनीने दक्षिण भारतात आपली विमान वाहतूक सुरू केली होती. याचे मालक आणि त्यांची पत्नी यांची प्रेमकथासुद्धा या सत्य घटनेचा एक मोठा भाग आहे.
चांगली नोकरी सोडून स्वतःचं हे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मारा सरकारी कचेऱ्या, उद्योगपती, यांचे उंबरे झिजवत असतो. एवढा त्रास होऊनही त्याची जिद्द कमी होत नसते. प्रसंगी अगदी नापिक जमिनीतही उत्पन्न घ्यायला तो कष्ट करत असतो. पहिल्याच सीनमध्ये एका मृताला घेऊन जात असताना त्याचा एक गणपती डान्स म्हणावा तसा डान्स आहे. स्वतःच्या संघर्षावर त्याचं असणारं प्रेम, जवळपास एका व्यसनासारखं त्याला चिटकलंय हे त्या दोन-तीन सिनमधून आपल्याला स्पष्ट होतं.
बोंमीचं पात्र साकारणाऱ्या अपर्णा बालमुरली हिचं मूळ पात्रच हिरोला साथ देणारी प्रेयसी असं रटाळ लिहिलं गेलं नव्हतं. स्वावलंबी, स्वाभिमानी आणि मारा इतकीच स्वतःच्या स्वप्नांसाठी पॅशिनेट असलेली बोंमी स्वतःच्या बेकरी सुरू करण्याच्या स्वप्नालासुद्धा विमान कंपनी सुरू करण्याइतकंच महत्व देत असते.
सुरीयाच्या भारावून टाकणाऱ्या स्क्रीन प्रेजेंससमोर तिचं काम पण आपल्याला चकित करतं. आपापल्या कामांच्या प्रति प्रचंड पॅशनेट असलेल्या दोघांचा संसार, रोमान्ससुद्धा तितकाच पॅशनेट दाखविणे हा कलात्मक निर्णय खरंच वाखणण्याजोगा होता. त्यात भर घालायला त्यांचं एक गाणं आहे. त्या गाण्याचं चित्रीकरण आणि नृत्य यामुळं सिनेमाला एक छान हाय पॉईंट मिळतो.
जसं भाग मिल्खा भाग चित्रपटामध्ये मिल्खा सिंगच्या मूळ क्रीडाक्षेत्रातल्या योगदानाला दुसरं प्राधान्य देऊन प्रथम प्राधान्य त्यांच्या भावनिक विश्वाला आणि बालपणाला दिलेलं दिसलं, तसं इथं केलेलं नाही.
त्याचा विमान कंपनी थाटण्याचा प्रवास आणि तिचा बेकरी उभारण्याचा संघर्ष हाच प्रामुख्याने समोर असतो, आणि त्यातही ही एक पॅशनेट प्रेमकथा आपलं लक्ष वेधून घेते.
अर्थात सुरीया ॲक्शन करताना बघण्याची एवढी सवय झाली आहे की प्रत्येक सीनमध्ये त्याचे हावभाव बघून असं वाटतं की आता हा समोरच्याला मारणारच. पण हा आपल्या सवयीचा दोष आहे. मुळात हे पात्रच तितकं ध्येयवेडं होतं, म्हणूनच की काय सुरीयासारख्या बोल्ड स्क्रीन प्रेजेंस असणाऱ्याला त्यासाठी निवडलं असेल. कित्येक भावनिक प्रसंगातून त्याने अतिशय उत्तम अभिनय दाखवलाय. यानंतर नक्कीच त्याच्याकडे मारधड सोडून वेगळ्या धाटणीचे सिनेमे येतील हे नक्की.
परेश रावल यांनी केलेली खलनायकाची भूमिका लक्षात राहते. या आधीही घनचक्कर, टेबल नंबर 21 मधून त्यानी थंड डोक्याच्या खलनायकाला साकारलं होतं, यावेळीसुद्धा त्यांनी त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल असं काम केलंय. विमान, विमान प्रवास याबद्दलच्या तांत्रिक गोष्टींत घेतलेली मेहनतही सीन्समध्ये दिसते. मोठे स्वप्न असणाऱ्या हुशार पण गरीब माराचे कपडे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साकारतील इतके छान डिझाईन केले आहेत. सगळ्या डार्क कपड्यात फक्त त्याच्या हावभावांकडेच आपलं लक्ष जातं. यातून त्याच्या आयुष्यात भौतिक गोष्टींचं महत्त्व किती कमी आहे हे अधोरेखित होत जातं.
सिनेमात नायकाच्या आर्थिक परिस्थितीचं, स्थळ, वेळ यांचं खूप छान वास्तवदर्शी स्थलांतर दिसत राहतं. उगाच स्वप्न बघितलं आणि अचानकच स्वतःच्या कंपनीचे विमानं उडू लागली असं दाखवलं नाही तर, तो सगळा प्रवास होता तितकाच कठीण दाखवला गेलाय.
सिनेमॅटोग्राफरने हालचाल दाखविण्यावर भर दिलाय आणि ही सगळी दृश्य गडद हिरव्या-निळ्या कलर पॅलेटवर फिरतात. यातून एक इंटेन्स ड्रामा बघितल्याचा फील टिकून राहतो.
अतिशय तांत्रिक विषय असूनही पात्रांना एवढं पॅशनेट दाखविण्याचा कलात्मक निर्णय आणि कथेत स्थानिक जीवनशैलीचा तडका, यामुळे हा सिनेमा फक्त एक बायोपिक म्हणून न राहता अडकवून ठेवणारा ड्रामा बनतो. “भाग मिल्खा भाग”च्या बरोबरीने प्रेक्षकांना सगळ्यात जास्त आवडलेला बायोपिक म्हणून हा सिनेमा नेहमीच एक आदर्श बायोपिक म्हणून आठवणीत राहील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.