आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी बिहारच्या सारन जिल्ह्यातील एका साधारण कुटुंबात, ‘नाई’ परिवारात जन्म घेतलेल्या बालकाने काही काळातच भोजपुरी साहित्याला एक नवीन ओळख मिळवून दिली होती. आपण बोलतोय भोजपुरी भाषेचा शेक्सपियर म्हणून ओळखले जाणाऱ्या ‘भिखारी ठाकूर’ यांच्याबद्दल. भोजपुरी या आपल्या बोलीभाषेत त्यांनी अनेक नाटके आणि कवितांची रचना केली होती.
भिखारी यांचा जन्म बिहारच्या सारन जिल्ह्यातील कुतुबपुर या छोट्याशा गावात झाला. लोकांच्या घरी आमंत्रण सांगण्याचे काम त्यांचा परिवार करायचा. पुरोहितांना पूजा अर्चना करण्यात मदत करण्यात देखील त्यांचा परिवार मदत करायचा. अत्यंत गरीब घरात जन्मल्यामुळे भिखारी यांच्यावर बालपणापासूनच या पारंपरिक व्यवसायाची जबाबदारी येऊन पडली. अभ्यासात भिखारी यांचे मन अजिबात लागायचे नाही. याऐवजी नाचगाणे यातच त्यांना जास्त रस होता. ते आपल्या गाई चरायला घेऊन जायचे तेव्हा फावल्या वेळात त्यांना गायन आणि कविता करण्याची सवय लागली होती.
शेतात व माळरानावर त्यांच्या प्रतिभेला अंकुर फुटत होते. त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी आपली पहिली भोजपुरी कविता लिहिली होती.
काही वर्षांत आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी भिखारी ठाकूर बंगालच्या दिशेने रवाना झाले. बंगालमध्ये जाऊन केशकर्तनालय उघडण्याचा त्यांचा विचार होता, पण त्यांचे मन तिकडेदेखील रमले नाही. त्यांनी नाचगाण्याकडे आपला मोर्चा वळवला.
काही दिवसांनी ते बंगालच्या मेदिनापूर येथे ते गेले. याठिकाणी त्यांनी रामलीला मंचन नावाचा कार्यक्रम पाहिला. त्यांच्या मनात रामलीला मंचन भोजपुरी भाषेत लिहिण्याचा विचार आला. त्यांनी लगेचच आपल्या मातृभाषेत रामलीला लिहिण्यासाठी प्रयत्न सुरु केले. कमी शिकलेले होते तरी देखील त्यांनी संपूर्ण रामायण तोंडपाठ केले. काही काळातच त्यांनी भोजपुरी भाषेत आपले रामलीला मंचन लिहून पूर्ण केले.
इथून घरी परतल्यानंतर त्यांनी आपल्या भावाच्या मदतीने नाटक मंडळी सुरू केली. याच काळात त्यांनी रामलीला आणि रासलीला या नाटकांचे भोजपुरी भाषेत मंचन लिहिले. काही काळातच त्यांची ही नाटके सर्वदूर प्रसिद्ध झाली. भिखारी ठाकूर यांना मोठी प्रसिद्धी मिळाली.
प्रत्येक कलाकार हा त्याच्या आसपास घडणाऱ्या घटनांचा वेध घेत असतो. ज्यावेळी भिखारी यांनी आपल्या गावात वाढती लोकसंख्या आणि कृषियोग्य जमिनीचा अभाव या गोष्टींचे निरीक्षण केले त्यावेळी त्यांच्या मनात विद्रोहाने पेट घेतला.
ज्यावेळी ते गावातील सामान्य लोकांना सावकारीमुळे पिचलेल्या अवस्थेत बघायचे, त्यावेळी त्यांच्या मनात करुणा जागृत व्हायची.
शेतकरी मजूर बनून आपली शेती सोडून मोठं मोठ्या शहराकडे वळताना बघून त्यांचे मन दुःखी होत होते. मजूर म्हणून शहरात गेलेले हे शेतकरी तिकडेच स्थायिक व्हायचे, तिकडे लग्न करून घ्यायचे, इकडे त्यांच्या बायका मात्र अत्यंत हालाखीचे आयुष्य जगायच्या.
या सर्वच घटनाक्रमावर भिखारी ठाकूर यांनी बहारा बहार नावाचे नाटक लिहिले. त्यांचे हे नाटक फारच गाजले. १९६३ साली या नाटकावर आधारित बिदेसिया नावाचा चित्रपट देखील तयार करण्यात आला. हा चित्रपट तेव्हा भोजपुरी भाषिकांमध्ये फार गाजला. आजही तो तितकाच लोकप्रिय आहे.
भिखारी ठाकूर यांनी आपल्या लेखणीने भोजपुरी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. त्यांनी लोककल्याणासाठी आपल्या कलेचा वापर केला. त्यांनी आपल्या सबंध आयुष्यात २९ पुस्तकांचे लेखन केले. ते भोजपुरी साहित्य आणि संस्कृतीचे प्रमुख प्रचारक बनले. त्यांच्या नाटकांमधून समाजातील अनेक अंधश्रद्धा व कुप्रथा नष्ट होण्यास मदत झाली.
भिखारी ठाकूर यांची प्रतिभा बघून महापंडित राहुल संस्कृत्यायन यांनी त्यांना ‘भोजपुरी शेक्सपिअर’ ही पदवी दिली होती. भिखारी ठाकूर यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. १० जुलै १९७१ साली भोजपुरी साहित्याची ही ज्योत मालवली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.