आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
टीव्हीपासून हातातल्या मोबाईलपर्यंत आज मनोरंजनाची कितीतरी साधनं उपलब्ध आहेत. पण, या सगळ्या आधुनिक साधनांची रेलचेल सुरु होण्यापूर्वी एक काळ असा होता जेव्हा रेडीओशिवाय पर्यायच नव्हता. आजच्या काळातही रेडीओने आपले एक वेगळे आणि हटके स्थान टिकवून ठेवले आहे. आजच्या माहितीच्या ओव्हरडोसच्या जमान्यात रेडीओ हे एकमेव माहितीचे विश्वासार्ह स्त्रोत ठरत आहे, हे मात्र नक्की!
भारतातील रेडीओचा इतिहास रंजक आणि रोचक आहे. सुरुवातीला संवादाचे आणि जनतेपर्यंत संदेश पोचवण्याचे हेच एकमेव माध्यम होते. पूर्वीच्या काळी रेडीओला जितके महत्त्व होते आजही तितकेच आहे. माहिती आणि मनोरंजनाच्या साधनात दिवसागणिक भर पडतच आहे. परंतु यात रेडीओचे महत्त्व कुठेही कमी झालेलं नाही.
त्याकाळी देशातील सामान्य जनतेपर्यंत देशभरातील घडामोडी पोचवण्यासाठी रेडीओइतके स्वस्त साधन नव्हतेच. आजच्या काळात तर रेडीओवरील चॅनेल्सची संख्याही वाढली आहे. तरीही टीव्हीप्रमाणे इथल्या वाढीव चॅनेलसाठी कधी वाढीव दर मोजावा लागत नाही की रेडीओ ऐकण्यासाठी कधी परवाना काढावा लागत नाही.
परंतु एक काळ असा होता की, जेंव्हा रेडीओ ऐकण्यासाठी परवाना म्हणजेच लायसन्स काढावे लागत होते.
वाचून तुम्हाला धक्का बसला असेल किंवा ही माहिती अविश्वसनीयही वाटेल. पण, हे खरे आहे जिथे आज आपण सर्वजण कधीही कुठेही रेडीओ फुकटात ऐकू शकतो त्याच रेडीओसाठी कधीकाळी सरकारकडून परवाना घ्यावा लागत होता.
जाणून घेऊया रेडीओच्या ‘परमिट राज’विषयीची अधिक माहिती, या लेखातून.
भारतात १९२४ साली रेडीओचे आगमन झाले. सुरुवातीला तर अगदी तुरळक ठिकाणीच याचा वापर केला जात असे. मात्र पुढील दोन वर्षांत हळूहळू याचा वापर वाढू लागला. भारतात रेडीओचे पहिले प्रसारण रेडीओ क्लब ऑफ बॉम्बे या खाजगी कंपनीने केले होते.
परंतु त्याकाळी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत झखडलेला होता. त्यामुळे रेडीओच्या कामकाजात प्रचंड सरकारी हस्तक्षेप होत असे. रेडीओच्या संपूर्ण प्रसारणावर सरकारची नजर असे. सुरुवातीला काही खाजगी कंपन्यांनीच रेडीओ चालवण्याची मक्तेदारी घेतली होती. परंतु नंतर या कंपन्या बंद पडल्या आणि मग रेडीओ प्रसारणाचा पूर्ण ताबा ब्रिटीश सरकारने स्वतःकडे घेतला. यासाठी त्यांनी भारतीय प्रसारण सेवा नावाचा एक स्वतंत्र विभाग स्थापन केला.
दुसरे महायु*द्ध समाप्त झाले आणि यावेळी देशात स्वातंत्र्य चळवळीने अधिकच जोर धरला. ब्रिटिशांना वाटले रेडीओमुळे लोकांमधील असंतोषाला वाट मिळतेय आणि सरकार विरोधात बंड करण्याचे धाडसही वाढते आहे. म्हणून ब्रिटीश सरकारने रेडीओ ब्रॉडकास्टिंगचे परवानेच रद्द केले. लोकांना त्यांच्याकडील ट्रान्समिटर सरकारी कार्यालयात जमा करण्याचे आदेश दिले.
परंतु नरीमन अब्र्बाद प्रिंटर नावाचे एक कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते, ज्यांना रेडीओ खूप आवडायचा. त्यांनी आपला ट्रान्समिटर सरकारकडे जमाच केला नाही. त्यांनी ट्रान्समिटरचे सर्व भाग सुटे केले आणि घरातच कुणाच्याही नजरेला पडणार नाहीत अशाप्रकारे लपवून ठेवले. कॉंग्रेसला तर ही गोष्ट माहिती होती. पुढे गांधीजी आणि इतर कॉंग्रेसच्या नेत्यांना अटक झाली तेंव्हा कॉंग्रेसच्या नेत्यांनी नरीमन प्रिंटर यांच्याशी संपर्क साधला आणि हा ट्रान्समिटर मुंबईतील सी व्ह्यू बिल्डींगवर जोडण्यात आला. या ट्रान्समिटरवरूनच लोकांना स्वातंत्र्य चळवळीविषयीची माहिती दिली जाऊ लागली. परंतु, दोनच महिन्यात इंग्रजांनी हा डाव हाणून पडला. ट्रान्समिटर चोरून ठेवल्याबद्दल नरीमन प्रिंटर यांच्यावर ब्रिटीश सरकारने गुन्हा नोंदवला. त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चार वर्षांसाठी तुरुंगात डांबण्यात आले.
ब्रिटीशांनी रेडीओ ऐकण्यासाठी परवाना काढण्याची सक्ती केली होती. आजच्या काळात तर उद्योगधंदे, वाहन यांच्यासाठी परवाना लागतो मात्र रेडीओसाठी परवाना म्हणजे कितीतरी विचित्र गोष्ट वाटते ना. पण, विनापरवाना रेडीओ ऐकणे म्हणजे त्याकाळी मोठा गुन्हा होता. हा परवाना गावातील पोस्टाकडून घ्यावा लागे. जो कोणी या कायद्याचा भंग करेल त्याला वायरलेस टेलिग्राफी ऍक्ट १९३३ नुसार शिक्षा सुनावली जाई.
रेडीओसाठी दोन प्रकारचे परवाने दिले जायचे. एक घरगुती रेडीओसाठी आणि दुसरा औद्योगिक रेडीओसाठी. दोन्हीसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जायचे. रेडीओचे हे लायसन्स एखाद्या पासपोर्ट पुस्तकासारखेच असे. पोस्टाकडून याच्यावर एक तिकीट लावले जाई. हे तिकीट किमान वर्षभर तरी वैध असे. त्यानंतर पुन्हा या परवान्याचे नूतनीकरण करावे लागे.
पूर्वी टीव्हीला सिग्नल मिळावा म्हणून घराच्या छतावर अँटिना बसवला जात असे. अगदी तसाच त्याकाळी रेडीओच्या सिग्नलसाठीही छतावर अँटिना बसवावा लागे. म्हणूनच इंग्रजांना रेडीओ प्रसारणावर नियंत्रण ठेवणे सोपे गेले.
देश स्वतंत्र झाल्यावर मात्र हे चित्र बदलले. तसेही पुढे टीव्ही आणि इतरही अनेक माध्यमे आली ज्यामुळे मनोरंजनाचे क्षेत्र विस्तारत गेले. त्यामुळे पैसे भरून रेडीओ ऐकणे कुणालाही परवडत नव्हते आणि त्याची गरजही उरली नव्हती. मग ही सेवा नि:शुल्क करण्यात आली.
आजच्या काळात अनेक प्रकारची मनोरंजनाची साधने आहेत. तरीही रेडीओला तोड नाही. रेडीओच्या चाहत्यांना आजही त्यांचे आवडते कार्यक्रम भुरळ घालतातच. शिवाय, आता तर हातातील फोन मध्येच रेडीओ आला आहे, त्यामुळे कधीही कुठेही ही चैन परवडते. रेडीओमध्येही प्रत्येक भाषेत वेगवेगळी चॅनेल्स निघाली आहेत. त्यामुळे रसिकांना आवडेल तो कार्यक्रम ते ऐकू शकतात. त्यांच्या मनपसंत कार्यक्रमासाठी त्यांना वेळ राखून ठेवता येतो. आजही रेडीओवरून प्रसारित होणाऱ्या बातम्या असो वा इतर माहिती, त्याच्या वैधतेबाबत कुणीही शंका घेत नाही.
८०च्या दशकात टीव्हीचे प्रस्थ वाढले होते, अशावेळी रेडीओ वाचवण्यासाठी त्याचा परवाना आणि त्यासाठी आकारले जाणारे भरमसाठ शुल्क रद्द करण्याशिवाय सरकारकडे पर्यायही नव्हता. टीव्हीच्या जमान्यात रेडीओ लुप्त होऊन जाईल की काय या भीतीनेही कदाचित सरकारने हा परवाना रद्द केला असावा.
त्यामुळेच रेडीओवर एफएम चॅनेल्सची संख्या वाढली आणि रेडीओच्या मनोरंजनाची पद्धत आणि वेळही बदलली. दिवसदिवसभर या चॅनेल्सनी अमाप मनोरंजनाचा खजानाच रिता केला. परवाना रद्द झाला म्हणूनच सामान्यांसाठी मनोरंजनाचा हा हक्काचा दोस्त आजही आपल्या सेवेत हजर आहे. नुसताच सेवेत हजार नाही तर ही सेवा निखळ आणि अस्सल असेल यासाठीही तत्पर आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.