आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
छोट्या पडद्यावर एक काळ असा होता जिथे फक्त दूरदर्शनचीच चलती होती. या चॅनेलने एक से बढकर एक अशा कार्यक्रमांची मेजवानी दिली. एकाच वेळी कित्येक सिरियल्स देऊनही प्रत्येक सिरियल्सची स्टोरी, थीम लाईन अगदी वेगळी असायची. सास-बहुचा मसाला ड्रामा आणि त्याच-त्या स्टोऱ्या यापेक्षा या सगळ्या सिरियल्स एक युनिक स्टोरी घेऊन यायच्या.
बुनियाद, देख भाई देख, हम लोग, ये जो है जिंदगी आणि तारा अशा प्रत्येक सिरियल्सची स्टोरी एकदम हटके असे. अशातच दूरदर्शनवर आलेली एक कॉमेडी सिरीयल होती इधर उधर. या सगळ्या सिरियल्सची वेगवेगळी थीम आणि त्यातील वैशिष्ट्यपूर्ण स्त्री पात्रे यामुळे या प्रत्येक सिरीयलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
रत्ना पाठक-शाह आणि सुप्रिया पाठक या दोघी बहिणींवर चित्रित झालेली ही एक धम्माल विनोदी मालिका. १९८० च्या दशकात आलेल्या या मालिकेत स्वतंत्र राहणारे दोन तरुण आणि तरुणी यांची कथा दाखवली होती. या चार जणांत जो काही गोंधळ उडत असतो तो यात अत्यंत विनोदी अंगाने मांडला होता.
मुंबईत राहणाऱ्या श्रीमती ब्रीगॅन्झा यांची मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये राहत असते. त्या काही कामानिमित्त आपल्या मुलीकडे जाणार असतात. त्यांच्याकडे दोन मुली पेयिंग गेस्ट म्हणून राहत असतात.
श्रीमती ब्रीगॅन्झा यांच्या माघारी त्या घराची संपूर्ण जबाबदारी सुनिता आणि पूनम या दोन मुलींवर पडते. घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्या दोघी आणखी दोन पेयिंग गेस्ट ठेवण्याची शक्कल लढवतात. धाडसी आणि विनोद बुद्धी असणारा एक तरुण पेयिंग गेस्ट म्हणून हवा आहे, अशी पेपरमधून जाहिरात देतात.
तरुण पेयिंग गेस्ट मिळाल्यास आपल्याला घरातील कामातून सुट्टी मिळेल अशी त्यांची कल्पना असते. शेवटी त्या २ बीएचके घरात ज्या काही गोष्टी घडत जातात त्यामुळे प्रेक्षक अक्षरश: हसून हसून बेजार होतात.
१९८५ साली पहिल्यांदा ही सिरीयल दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात आली. आनंद महेंद्रू यांनी या सिरीयलचे दिग्दर्शन तर शोभा डॉक्टर यांची निर्मिती होती. सुनिता आणि पूनम ही पात्रे ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शहा आणि सुप्रिया पाठक या बहिणींनी साकारली आहेत.
या व्यतिरिक्त रवी बासवानी यांनी कुमार भैरव, असिफ मोहम्मद खान यांनी रोनी गोन्साल्वीस आणि लीलीपुत (एम. एम. फारुकी) यांनी सुधीर ही पात्रे साकारली आहेत. हे चौघे जेंव्हा एकत्र राहू लागतात तेंव्हा काय होते, हे या सिरीयलमधून दाखवण्यात आले आहे.
यामध्ये दोन मुली आहेत ज्या स्वातंत्रपणे राहताहेत आणि स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी नोकरी करत आहेत. यातील सुनिता ही मुलगी विमान सहाय्यक म्हणून काम करते तर पूनम एका ऍड एजन्सीत एक्झिक्युटिव्ह असते. या दोघींचेही करिअर लाइफ म्हणजे परस्पर विरोधी टोक आहे.
सुनिता अगदीच भोळसट किंवा अल्लड आहे तर पूनम एक जबाबदार प्रौढ व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करत आहे. ही दोन्ही स्त्री पात्रे अगदी व्यवस्थितपणे रेखाटली आहेत. ज्यातून एक जबाबदार स्त्री म्हणवून घेण्यासाठी धडपडणाऱ्या स्त्रियांचे खरेखुरे चित्र प्रतिबिंबित होते.
रत्ना पाठक यांच्या करिअरचा हा पिकअप पॉइंट ठरला. कॉमेडी क्वीन म्हणवून घेण्याची संधी त्यांना याच सिरीयलने दिली. या सिरीयलच्या आठवणी सांगताना त्या म्हणतात, आनंदला वाटत होते की मी सुनीताचा रोल करावा. त्याने जेंव्हा ही कल्पना माझ्यासमोर मांडली तेंव्हा मी तर उडालेच. कारण मला वाटले होते की कदाचित हा पूनमच्या भूमिकेसाठी मला विचारेल. पण, “जेंव्हा सुनिताचे कॅरेक्टर माझ्यासमोर उभे राहीले तेंव्हा मला कळाले की या पात्राने माझ्यातील अभिनेत्रीचा एक वेगळु पैलू समोर आणला आहे. जो तोपर्यंत मला स्वतःलाही माहिती नव्हता.”
रत्ना पाठक यांच्यातील अभिनयाचे विनोदी अंगाबद्दल त्यांना स्वतःलाही फारशी खात्री नव्हती. पण, त्या किती उत्तम विनोदी अभिनय करू शकतात हे या मालिकेतून दिसून आले. जे स्वतः रत्नाजींसाठीही खूपच आश्चर्यकारक होते. नंतरच्या काळात कॉमेडी क्वीन अशी जी त्यांची प्रतिमा बनली त्याचा पाया याच सिरीयलने घातला.
यानंतर साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेतील माया साराभाई, हे सुप्रसिद्ध पात्र साकारण्याचीही त्यांना संधी मिळाली. या कामाने त्यांना एक कलाकार म्हणून आणखी चांगल्या पद्धतीने व्यक्त होण्याची संधी दिली, ही गोष्ट त्यांच्यासाठी फार महत्वाची आहे.
या इंडस्ट्रीत एक कलाकार म्हणून माझी वेगळी ओळख निर्माण करण्यात विनोदाने खूपच सहाय्य केले. “इधर उधार ही माझ्यासाठी विनोदी भूमिका साकारण्याची पहिली संधी होती,” असे त्या म्हणतात.
सुरुवातीला महेंद्रू यांनी शोभा डॉक्टरसोबत या कार्यक्रमाचे दिग्दर्शन सुरु केले असले तरी नंतर जसे जसे मालिकेचे भाग वाढत जातील तसतसे या मालिकेत अधिकाधिक स्थिरता आणण्यासाठी आणि मालिकेच्या स्ट्रक्चरवर काम करण्यासाठी त्यांनी मोबीस प्रोडक्शनच्या संजीव शर्मा आणि मन्सूर खान यांना देखील या मालिकेच्या कामात सामावून घेतले.
“मन्सूर हे पोस्ट प्रोडक्शनची कामे करत असत. त्याकाळी व्हिडीओ एडिटिंगची कामे करणे आजच्या इतकी सोपी गोष्ट नव्हती. त्याकाळी आमच्याकडे एकच सोय होती प्रोड्यूस करणे आणि इन-हाउस पोस्ट-प्रोड्यूस करणे,” शर्मा या सिरीयलच्या आठवणीबद्दल बोलताना सांगत होते.
“इधर उधरचे शुटींग सुरु असताना आम्हा कलाकारांना तीन-तीन महिने घरी देखील जाण्याची संधी मिळत नव्हती,” शर्माजी अगदी त्या काळात हरवून जावून या गोष्टी जशाच्या तशा जिंवत करून सांगतात. या सिरीयल करताना सर्वच कलाकारांमध्ये एक हार्मनी होती. ज्यामुळे सिरीयलचे काम करताना मजा आली. शुटींगचे ते दिवस आता अनुभवता येत नाहीत.
आनंद यांना एक उत्तम कलाकृती सादर करून दाखवायची होती. प्रत्येक एपिसोड हा जणू शेवटचा एपिसोड आहे असे समजूनच आम्ही काम केले.
अविवाहित मुली आणि मुले एकाच फ्लॅटमध्ये राहणे ही थीमच मुळात अतिशय वेगळी होती. अगदी आजच्या काळातही ही कल्पना वास्तवात उतरू शकत नाही, पण फक्त एक विनोदी आणि पारलौकिक अनुभव घेण्यासाठी ही सिरीयल बनवण्यात आली.
विशीत असणारे हे तरुण-तरुणी आयुष्यात काही तरी करून दाखवण्यासाठी धडपडत होते. त्यांच्या अशा-अकांक्षाशी कोणीही तरुण-तरुणी स्वतःला रिलेट करू शकेल. पण, एका वेगळ्या अर्थाने ही कथा प्रागतिक होती.
आजच्या काळात अशा प्रागतिक कथा टीव्हीवरून हद्दपार झाल्या आहेत. कलाकृती म्हणून सिरीयल वर काम करण्याऐवजी केवळ पैसा मिळवण्याचे साधन म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्याच त्या सास-बहुच्या कथा आणि त्यातील तो मेलोड्रामा ही केमिस्ट्री आता प्रेक्षकांनाही सहन होत नाहीये.
म्हणून आजच्या काळात अशा एका वेगळ्या जीवनाचे दर्शन घडवणाऱ्या आणि आधुनिक विचार मांडणाऱ्या मालिकांची प्रकर्षाने उणीव जाणवत राहते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









