आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
१९४७मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले पण, फाळणीमुळे हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. फाळणीने ज्या काही वेदना दिल्या त्या भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांसाठी दुखद आणि भयानक होत्या. भारताच्या आणि पाकिस्तानच्या इतिहासातील हा कालखंड फारच खेदजनक आहे. या फाळणीने दोन्ही देशांत अमाप हानी झाली. सीमेच्या दोन्ही बाजूला सारखीच क्रूरता पहायला मिळाली. दोन्ही देशांचे अतोनात नुकसान झाले.
फाळणीने केलेले अनेकांच्या मनावरील आघात आजही कायम आहे. पाकिस्तान आणि भारतासाठीही हा एक रक्तरंजित कालखंड होता.
फाळणीच्या वेळी घडलेल्या प्रत्यक्ष घटनांनी कलाक्षेत्र तर हादरून जाणे साहजिक होते. या वास्तविक भयपटाचा काही छटा साहित्य, नाटक, चित्रपट यासारख्या माध्यमातून प्रतिबिंबित झाल्या.
सआदत हसन मंटोच्या ‘टोबा टेक सिंग’, ‘खोल दो’ आणि ‘काली सलवार’, सारख्या कथा, इस्मत चुगताईची ‘जडे’ आणि उर्वशी बुतालीयाच्या ‘द ऑदर साईड ऑफ सायलेन्स’ या साहित्यिक कलाकृतींनी फाळणीच्या वेदना मांडल्या.
गरम हवा आणि धरमपुत्र यासारख्या चित्रपटातून फाळणीचा रक्तरंजित पट मोठ्या पडद्यावर उभा राहिला. फाळणीने लाखो लोकांच्या आयुष्यावर जो कायमस्वरूपी आघात केला त्याचे दर्शन घडवण्यात दूरदर्शनही मागे राहिले नाही.
१९८०च्या दशकात दूरदर्शन वरून प्रसारित होणारी ‘बुनियाद’ ही मालिका फाळणी आणि फाळणीच्या परिणामांवर आधारलेली होती. प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते.
१९८६ पासून दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या या मालिकेतून एका मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबाचे चित्रण करण्यात आले होते. मास्तर हवेलीराम (ज्येष्ठ अभिनेते अलोक नाथ यांनी ही भूमिका साकारली होती) आणि लालोजी (अनिता कन्वर) यांची कशी भेट होते, त्यानंतर फाळणीमुळे त्यांच्या कुटुंबात कशी फुट पडते. शेवटी सर्व कुटुंब पुन्हा एकत्र येते आणि गुण्यागोविंदाने नंदू लागते अशीही कथा होती.
बुनियाद अनेकांसाठी थरकाप उडवणारे वास्तव होते. ज्यांनी ही मालिका बघितली असेल त्यांच्यासाठीही या मालिकेने एक रोमांचक वास्तवाची ओळख करून दिली होती. तर काहींनी दोन्ही सीमेपार ही मालिका प्रत्यक्षात जगली होती.
या मालिकेत हवेलीराम यांच्या बहिणीची विरावलीची भूमिका साकारणाऱ्या जोनेजा सांगतात, “या मालिकेत काम करण्याचा अनुभव खूपच विदारक होता. ही मालिका साकारताना मला नेहमी असे वाटायचे की, आपल्या आजी-आजोबांचीच गोष्ट मी पडद्यावर साकारतेय. माझे आजोबा मोठे जमीनदार होते. पण, छंद म्हणून ते मुलांची शिकवली घेत. सगळेजण त्यांना मस्टरजी म्हणूनच ओळखत असत.
फाळणीनंतर एक वर्षभर ते पाकिस्तानमध्येच राहिले. या काळात त्यांनी अनेक मुलींचे प्राण वाचवले. माझ्या आजोबांचे नाव लालजी होते आणि माझ्या आत्याचे नाव विरावली. म्हणजे एकप्रकारे मी माझ्या आई-वडिलांची आणि आजोबांचीच गोष्ट या भूमिकेतून जगत होते. या मालिकेत काम करताना त्यांच्याकडून फाळणीच्या ज्या ज्या भयानक गोष्टी मी ऐकल्या होत्या त्या-त्या मला सतत आठवत असत.”
अनेकांना हा अनुभव मालिका पाहताना आलाच असेल. दिल्ली येथे राहणाऱ्या रोहिणी अहलुवालिया यांनीही असाच अनुभव सांगितला. “माझ्या घरी तर सुरुवातीला ही मालिका पाहण्याला विरोधच होता. कारण, माझ्या आई-वडिलांना फाळणीच्या त्या दुखद आठवणी पुन्हा पुन्हा आठवायला नको वाटत होते. त्या आठवणीत पुन्हा पुन्हा जाणे असह्य होते. परंतु, आम्हा लहान मुलांनाही कधीतरी फाळणीची ही हकीकत समजली पाहिजे असे त्यांना वाटे. म्हणून हळूहळू आम्ही ही मालिका बघायला सुरुवात केली.
या मालिकेतील एकेका एपिसोडसोबत त्यांच्याही काही आठवणी ते आम्हाला सांगत. ज्यामुळे फाळणीच्या वेळी आमच्या पालकांना काय त्रास झाला हे आम्हालाही अधिक चांगल्या प्रकारे समजले. दिल्लीतील अनेकांचे अनुभव थोडे बहुत असेच होते.”
ही मालिका त्याकाळी प्रचंड गाजली होती. उत्तरेतील ९३% प्रेक्षकांनी या मालिकेचे संपूर्ण भाग पाहिले होते.
१९८६ साली ही मालिका पहिल्यांदा प्रसारित झाली. त्यानंतर पुन्हा सहा वेळा याचे पुनर्प्रसारण दाखवण्यात आले. परंतु पुनर्प्रसाराणासाठी रमेश सिप्पींना कसलाही मोबदला देण्यात आला नाही. हा व्यवहारावर बरेच वाद झाले पण, अखेरपर्यंत यावर तोडगा निघू शकला नाही.
भारतातच नाही तर पाकिस्तानातील प्रेक्षक वर्गाकडूनही या मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मनोहर श्याम जोशी यांनी या मालिकेचे लेखन इतक्या जबरदस्त पद्धतीने केले होते की, मालिका मनाचा ठाव घेत होती.
रमेश सिप्पी व ज्योती सरूप यांचे दिग्दर्शन आणि अमित खन्ना यांची निर्मिती या सगळ्यांच्या मिश्रणातून फाळणी पूर्वीचे दिवस जिवंत झाले होते. या काळातील घरांची धाटणी, घरातील सजावट, पात्रांचा पेहराव आणि त्याच्या तोंडची भाषा अशा प्रत्येक गोष्टीवर बारकाईने काम करण्यात आले होते.
अनिता कन्वर, कंवलजीत सिंग, मझार खान, दलीप ताहिल, सोनी रझदान, किरण जोनेजा आणि नीना गुप्ता यासारख्या कलाकारांनी आपापल्या भूमिका अस्सलपणे वठवल्या होत्या. प्रसिद्ध कादंबरीकार कृष्ण सोबती आणि पंडित पुष्पेश पंत यांनी ऐतिहासिक सत्यता आणण्यात सहाय्य केले होते. या सर्व कलाकारांची ऑन आणि ऑफ स्क्रीन केमिस्ट्रीही अगदी छान जुळून आली होती.
एका एपिसोडच्या चित्रिकरणासाठी किमान तीन ते चार दिवस तरी लागत असत. या कलाकारांच्या टीमचे अख्खे वर्षच या मालिकेच्या चित्रीकरणात गेले होते. सगळा दिवस सेटवरच जात असे. जणू फिल्म इंडस्ट्रीशिवाय दुसरे जगच माहित नव्हते.
लॉकडाऊनच्या काळात खाजगी वाहिन्यांचे प्रसारण बंद आहे. नव्या मालिकांचे चित्रीकरणही बंद आहे. त्यामुळे दूरदर्शने आपला जुना खजाना पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी उघडा केला आहे.
याच पोतडीतून बाहेर आलेली ही मालिका फाळणीनंतरच्या पिढीलाही पाहायला मिळाली. यानिमित्ताने फाळणी आणि फाळणीच्या परिणामांशी नव्या पिढीची ओळख झाली. देशाच्या इतिहासातील रक्तरंजितपट एका मालिकेच्या माध्यमातून पाहता आला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.