आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
ब्रिटीश भारतात आले. आपल्यावर १५० वर्षे राज्य केलं. ब्रिटीशांचं राहणीमान आणि भारतीयांचं राहणीमान यात त्याकाळी जमीन-अस्मानाचा फरक होता. स्वतःच्या सोयीसाठी, शानशौकीसाठी त्यांनी अनेक गोष्टी भारतात आणल्या. त्यातीलच एक म्हणजे चहा आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
यातही सगळ्यात वरती नंबर लागतो चहाचा. आज चहा आवडत नाही किंवा पीत नाही असा भारतीय एखादाच असेल. चहा हे मूळ चीनी पेय. जगाच्या एकूण उत्पन्नाच्या जवळपास ६५% चहा भारत आणि चीनमध्ये पिकतो. आता ग्रीन टी, लेमन जिंजर आईस्ड टी असे विविध चहाचे प्रकार बाजारात आले आहेत.
इंग्लंडमध्ये साधारण पंधराव्या शतकात हे चीनी पेय फार लोकप्रिय होतं. हा चहा कोरा असायचा, त्यात मध, दुध, साखर वगैरे टाकून त्याला एक वेगळी चव दिली जायची. त्याकाळी घरी कोणी पाहुणा आला की त्याला चहा देणे हा त्यांच्या ‘कल्चर’चा एक अविभाज्य भाग बनला. त्यांच्यासोबत ही पद्धत भारतात आली. आजही आपण कोणी घरी आलं की पहिला प्रश्न विचारतो की, चहा घेणार का?
ब्रिटीशांनी ही चहाची चटक आपल्याला लावण्याआधी आपण तुळस, हळद अशा काही वनौषधी पाण्यात टाकून उकळून त्याचा अर्क प्यायचो, म्हणजेच आजी-आई आपल्याला देते तो काढा. तब्बेतीला चांगलं असतं म्हणून वैद्य हे हमखास प्यायला सांगायचे.
पाचव्या शतकात भारतात आलेल्या ह्यून या चीनी प्रवाशाने या औषधी काढ्याबद्दल आपल्या प्रवासवर्णनात लिहून ठेवले आहे. अजून एका डच व्यापाऱ्याने सुरतमध्ये एका बनियाला काही मसाले घातलेला हा काढा पिताना बघितले आणि “हे औषधी पेय आहे” अशी नोंद करून ठेवली.
पुढे ब्रिटिशांना आसामच्या टेकड्यांवर चहासारखंच पिक अठराव्या शतकात आढळलं.
१८४०च्या दरम्यान भारतीयांना अफूचं पिक घ्यायला लावून ईस्ट इंडिया कंपनीने ते चीनमध्ये विकलं. त्याबदल्यात तिथला चहा जास्ती किंमतीत भारत, युरोप आणि इतर देशात विकून मोठ्या प्रमाणात नफा कमवला.
रॉबर्ट फॉरच्यून हा शास्त्रज्ञ रॉयल हॉर्टीकल्चर सोसायटीच्या वतीने १८४८ ते १८५१ दरम्यान चीनला संशोधन करण्यासाठी गेला होता. तिथे त्याने चीनच्या राजाच्या मालकीच्या भागातून चहाची काही रोपं चोरली. “वार्डियन केस” या पद्धतीचा वापर करून ती कलकत्त्याच्या चितगाव बंदरात आणली. तिथून त्यांची लागवड आसाममध्ये केली.
हिमालयाच्या पायथ्याची सुपीक जमीन, मुबलक पाऊस, अशा अनुकूल वातावरणामुळे या चहाचा दर्जा चीनपेक्षा चांगला होता. या चहाची चव, रंग बघून गोरे लोक फारच खुश झाले.
हाच ‘दार्जीलिंग’चा टॉप क्वालिटी चहा तेव्हाच्या मध्यमवर्गीय ब्रिटीशांमध्ये स्टेटस सिम्बॉल बनला होता.
तेव्हाच्या लिप्टन, लिओन इत्यादी ब्रॅंड्सनी चहा सर्वच वर्गात लोकप्रिय केला. हा चहा युरोप आणि रशियामध्ये जास्ती किंमतीत विकून ईस्ट इंडिया कंपनीने मोठा नफा मिळवायला सुरुवात केली. हळूहळू भारतीयांमध्येही चहाची आवड निर्माण होऊ लागली आणि आता तर चहा हे “इंडिअन बेवरेज” म्हणूनच जगात ओळखलं जातं.
ओरिजिनली चीनचं हे पिक भारतात पिकणाऱ्या चहाच्या तुलनेत बरंच मागे पडलं. ब्रिटीशांनी आणलेला हा चीनमधूनच चोरून आणलेला हा चहा आज जगभरात “दार्जीलिंग टी” म्हणून प्रसिद्ध आहे.
आज “चहाची टपरी” हा कित्येक भारतीयांच्या उत्पन्नाचा मार्ग आहे.
१८६० नंतर ब्रिटीशांनी कोऱ्या चहात दुध आणि साखर टाकून त्याच्या चवीत अजूनच बहार आणली. या चहाची चव भारतीयांना इतकी आवडली की आजही त्याचं व्यसन काही सुटत नाहीये. खरंतर कोरा चहा तब्येतीसाठी जास्ती योग्य पण पावसाळ्यात आणि थंडीच्या मौसममध्ये आलं घातलेला चहा पिण्यासारखं स्वर्गीय सुख दुसरं नाही हे कोणताही भारतीय मान्य करेल.
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








