आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्याला कोणत्याही सेवेची म्हणजेच डॉक्टर, ट्युशन क्लासेस, सुतारकाम, ट्रान्सपोर्ट, इत्यादींची माहिती हवी असेल तर आपण आज स्मार्टफोनच्या उपयोगाने घरबसल्या गूगलद्वारे ती सेवा कुठे उपलब्ध आहे हे शोधू शकतो किंवा सेवा देणाऱ्या आपल्यापासून जवळच्या अंतरावर असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. गुगलवरही टॉप रिजल्ट्स मध्ये ‘जस्ट डायल’ नावाची वेबसाईट येते. ‘जस्ट डायल’ आपल्या नावाप्रमाणेच काम करते, बाजारात उपलब्ध असेलल्या जवळ जवळ सर्व सेवांचा संपर्क क्रमांक तुम्हाला या वेबसाईटवर मिळतोच.
‘जस्ट डायल लिमिटेड’ हे भारताचे अग्रगण्य ‘लोकल सर्च इंजिन’ आहे. जस्ट डायल कंपनी वेबसाईट, अँड्रॉइड ॲप, आयओएस ॲपसारख्या अनेक प्लॅटफॉर्म्सद्वारे टेलिफोनवर आणि एसएमएस द्वारे (व्हॉइस पॅन इंडिया नंबर ८८८८८८८८८८ वरून) लोकल सर्च-संबंधित सेवा पुरवते. जस्ट डायल लिमिटेडने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी ‘सर्च प्लस’ सेवा देखील सुरू केली आहे. एका ॲपद्वारे वापरकर्त्यांसाठी अनेक दैनंदिन कार्ये सोयीस्करपणे कार्यक्षम आणि सुलभ बनवणे हा या सेवांचा उद्देश आहे. जस्ट डायल हे पूर्णपणे स्थानिक शोध आणि संबंधित माहितीचे प्रदाता होण्यापासून ते अशा प्रकारच्या आधुनिक व्यवहारांसाठी सक्षम माध्यम आहे.
जस्ट डायलला भारताचे गुगल असेही संबोधले जाते. जस्ट डायल ही एक ओपन-सोर्स, माहिती पुरवणारी कंपनी आहे. ही कंपनी आज यशाच्या शिखरावर असून अजूनही त्यांचा प्रवास थांबला नाही. मुफ्तीप्रमाणेच ही सुद्धा एका ध्येयवेड्या भारतीयाने अत्यंत कष्टातून सुरु केलेली कंपनी आहे. जस्ट डायलला उत्तुंग यशाकडे नेणाऱ्या व्हीएसएस मणी यांनी आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. आज या कंपनीचे मूल्यांकन सुमारे ६ हजार कोटी इतके आहे.
जस्ट डायल इतक्या मोठ्या प्रमाणात स्थापन होण्यापूर्वी व्हीएसएस मणी यांनी खूप संघर्ष केला. केवळ ५० हजार रुपयांनी कंपनीची सुरुवात केली आणि आज या कंपनीची किंमत सुमारे ६ हजार कोटी रुपये आहे. जस्ट डायलच्या संकल्पनेपासून ते हजारो कोटींच्या सध्याच्या स्वरूपापर्यंत, व्हीएसएस मणींनी अनेक चांगले वाईट अनुभव घेतले, खूप गोष्टी पहिल्या, पण प्रत्येक अनुभवांतून आणि घडलेल्या प्रसंगांतून ते काहीतरी शिकत गेले आणि प्रगतीचा रस्ता कधीही सोडला नाही. व्हीएसएस मणी आणि जस्ट डायलची ही कथा नवउद्योजकांसाठी आणि नवउद्योजक बनू इच्छिणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
तामिळनाडू राज्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला मणी सुरुवातीच्या शिक्षणानंतर चार्टर्ड अकाउंटन्सीचा अभ्यासक्रम पूर्ण करत होता. पण घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याला अभ्यास आणि आपले काम सोडावे लागले. १९८७ साली मणीने एका कंपनीत विक्रेत्याची नोकरी केली. तिथे त्याने दोन वर्षे काम केले. अगदी सुरुवातीपासूनच ‘वेंकटचलम स्तानू सुब्रमणि’ उर्फ मणीने लाखो लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मदत करावी हे स्वप्न पाहिले होते. पहिल्या नोकरीनंतर ते कसे करावे हे त्याला समजले. ज्या कंपनीत त्याने पहिली नोकरी केली तेथे टेलिफोन डिरेक्टरीशी संबंधित अनेक कामे होती.
त्या कंपनीत नोकरी करत असताना फोनवर आधारित डिरेक्टरी सेवा सुरू केली तर त्याला भरपूर वाव मिळेल याची त्याला कल्पना आली होती. ग्राहकाला विक्रेत्याकडे आणि विक्रेत्याला ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचे काम अशा प्रकारच्या सेवेतून सहज होऊ शकणार होते. ग्राहकांना अनेक विक्रेते प्रदान करणे आणि विक्रेत्यांना ग्राहकांची माहिती देणे, यातून मिळणाऱ्या कमिशनची रक्कम मोठ्या स्वरूपात असणार होती.
ही संकल्पना मनात ठेऊन व्हीएसएस मणीने त्याच्याबरोबर काम करण्यासाठी आणखी दोन जणांची निवड केली. अशा प्रकारे १९८९ साली २५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीने ‘आस्क मी’ नावाची कंपनी सुरु झाली. या व्यवसायात बरीच क्षमता होती, पण जोखीमही तितकीच होती. कारण १९८९ साली भारतातील फार कमी लोकांना टेलिफोनची माहिती होती आणि अत्यल्प जणांनी टेलिफोनचा वापर केला होता.
इतके अडथळे असूनही हा व्यवसाय ५ शहरांमध्ये पोहोचला. पण बिकट आर्थिक परिस्थितीमुळे हा प्रकल्प बंद करावा लागला. साहजिकच, जर एखाद्या व्यवसायातून पैसे मिळत नसतील तर तो व्यवसाय चालवणे शक्य नाही. शिवाय तीन भागीदारांमध्ये समन्वय नसल्यामुळे तिघेही गुंतवणूकदार यातून वेगळे झाले.
१९९२ नंतर मणीने काही साथीदारांसह मोफत वेडिंग प्लॅनर मासिकाचे काम सुरू केले. नियतकालिकात बँडवाले, केटरर्स, फॅशन डिझायनर्स आणि कपड्यांचे किरकोळ विक्रेते इत्यादी विवाहांशी संबंधित व्यावसायिकांची माहिती होती.
मणी आणि त्याच्या बरोबर असलेल्या गुंतवणूकदारांचे जमले नाही आणि पुन्हा ते वेगळे झाले. या नियतकालिकाच्या कामापासून वेगळे झाल्यानंतर मणीने स्वतः विवाह नियोजकाचे काम सुरू केले आणि दिल्लीच्या अग्रगण्य वृत्तपत्रांद्वारे याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. या नियतकालिकाचे काम मात्र चांगले झाले आणि मणीने सुमारे ८०,००० रुपये साठवले. त्याने ही रक्कम केवळ त्याच्या मूळ संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी म्हणजेच, डायल-इन सेवेसाठी खर्च केली.
मणीने साठलेल्या ८०,००० रुपयांपैकी ३०,००० रुपये त्यांनी बँकेच्या एफडीमध्ये ठेवले. उर्वरित ५० हजार रुपयांसह ते आपलं ‘स्वप्न’ साकार करण्यासाठी स्वप्ननगरी मुंबईकडे रवाना झाले. जेव्हा ते मुंबईत कोणत्याही कार्यक्रमाला जात तेव्हा ते लोकांना त्यांच्या सेवेबद्दल सांगत. लोकांनीही त्याच्या या संकल्पनेचे कौतुक केले आणि ‘कोणत्या नंबरवर फोन करून ही सेवा मिळवता येईल?’ असं लोक कुतूहलाने विचारत असत.
आपल्याला अधिक सोप्या नंबरची गरज असल्याचे मणीला लक्षात आले. हा नंबर त्याला त्याच्या व्यवसायाच्या नावापेक्षा अधिक महत्वाचा होता. मणीची नजर ८८८-८८८८ या क्रमांकावर पडली. हा नंबर मुंबईतील कांदिवली टेलिफोन एक्सचेंजचा होता. एक्सचेंजने ८८८ पासून नवीन मालिका सुरू केली होती. एक्सचेंजच्या जनरल मॅनेजरकडे मणी गेले आणि त्यांनी आपली भन्नाट संकल्पना जनरल मॅनेजरला सांगितली.
जनरल मॅनेजरला संकल्पना आवडली आणि नंबर मणीला देण्यात आला. त्यावेळी मणीला कोणी प्रतिष्ठित व्यक्ती ओळखत नव्हती. एका मुलाखतीत याबद्दल बोलताना मणी म्हणाले, “जेव्हा तुम्ही एखादं स्वप्न पाहाल आणि ते मनापासून साध्य करण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा निश्चितच ते स्वप्न साकार होईल.” त्या दिवसांत टेलीफोन लाईन मिळण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागत असे आणि एका लाईनसाठी सुमारे १५ हजार रुपये खर्च होत असत. पण मणीकडे फक्त ५० हजार रुपये होते आणि त्यांना इतक्याच रकमेत सर्व काही भागवायचे होते.
सर्व अडचणींवर मत करत मणीने ८८८-८८८८ या क्रमांकासह १९९६ साली ‘जस्ट डायल’ सुरू केले. सुरुवात एका गॅरेजपासून झाली, या गॅरेजमध्ये भाडे तत्त्वावर घेतलेले फर्निचर आणि संगणक ठेवण्यात आले. आपल्या एका मुलाखतीत या गोष्टीचा संदर्भ देत मणी म्हणतात, “पॅशन हे व्यक्तीच्या यशाची दारे उघडणारी गुरुकिल्ली आहे. आपल्याकडे फक्त पॅशन असल्यास पैसा आणि संसाधनांची कमतरता असूनही आपण ध्येय साध्य करू शकतो”
भारत सरकारने १९९६ साली टेलिकॉम लिबरलायझेशन पॉलिसी आणली. म्हणजेच आता देशभरात लँडलाईन फोन मिळणे कठीण नव्हते. जसजशी लँडलाईनची संख्या वाढली, ‘जस्ट डायल’ची देखील वाढ होत गेली. काही काळानंतर भारतात मोबाईल फोन आले. पण मोबाईल आले तेव्हा इंटरनेटमध्ये एवढी मोठी क्रांती झाली नव्हती. त्यादिवसांत इंटरनेटचा वेग कमी असायचा तसेच इंटरनेट कोणत्याही मोबाईलवर चालत नव्हते. पण मोबाईल फोन आल्यानंतरही जस्ट डायलचा व्यवसाय आधीपेक्षा कैक पटींनी वाढला.
१९९९ साली मणीकडे एक भारतीय गुंतवणूकदार व्यापारी आला. त्याची कंपनी अमेरिकन स्टॉक एक्सचेंजवर एनलिस्टेड होती. त्या व्यापाऱ्याला मणीच्या कंपनीत शेअर्स हवे असल्याचे त्याने सांगितले, त्याबदल्यात तो मणीला त्याच्या कंपनीतील शेअर देणार होता. पण मणीने स्पष्ट नकार दिला. मणी त्यांना सहज म्हणाले, “मला रोख रक्कम पाहिजे. जर तुम्ही रोख रक्कम दिली तर मी तुम्हाला माझ्या कंपनीतील काही शेअर्स देऊ शकतो.” त्या गुंतवणूकदाराने रोख रक्कम देण्याचे मान्य केले. तरी मणी समोर एक समस्या होतीच. नेमकी किती रोख रक्कम सांगायला हवी? मणी यांनी त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंटच्या कंपनीचे मूल्यांकन विचारले असता त्यांनी १५ ते २० लाख रुपये सांगितले.
जर गुंतवणूकदाराला कंपनीचे मूल्यांकन २० लाख रुपये सांगितले तर गडबड होईल असा विचार मणीने केला आणि गुंतवणूकदाराला विचारले, “तुम्हाला किती पैसे द्यायचे आहेत?” यावर यावर गुंतवणूकदार म्हणाला अडीच कोटी डॉलर्स! कंपनीच्या बँक खात्यात तितकेच पैसे आले आणि मणी अवघ्या तीन वर्षांत करोडपती झाले.
स्मार्टफोन्स आल्यानंतर जस्ट डायल लोकांची ‘लाईफ लाईन’ बनली. स्थानिक शोधात ‘जस्ट डायल’ अग्रेसर होता. जर एखाद्याला डॉक्टर किंवा बाईक सर्व्हिस सेंटर, आपल्या जवळील रेस्टॉरंट्स किंवा जवळच्या हॉस्पिटलची गरज असेल तर लोक पटकन फोनवरून जस्ट डायलच्या क्रमांकावर संपर्क साधतात.
जेव्हा १९९९ साली त्यांच्या कंपनीला एक गुंतवणूकदार मिळाला तेव्हा मणींनी एक वर्षाची सुट्टी घ्यावी असा विचार केला. मणीने विश्रांती घेण्यासाठी जगभरात त्याच्या कुटुंबासह वेळ घालवला. या दरम्यान त्यांनी योगाभ्यासापासून ते ध्यानापर्यंत सर्व काही केले. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी रजा सहा महिन्यांपर्यंत वाढवली. दीड वर्षानंतर ते अखेर कामावर परतले, कारण आयुष्य हे फक्त मौजमजा करण्यासाठी नसून काही कर्तृत्व गाजवण्यासाठी आहे हे त्यांच्या लक्षात आले होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.