आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सगळेजण सध्या “पाताल लोक” नक्की बघा असं सांगताय. अमेझॉन प्राईमवर नुकत्याच रिलीज झालेल्या या सिरीजने सोशल मिडियावर चांगलाच प्रतिसाद मिळवला आहे. या सिरीजबद्दल काही महत्वाच्या गोष्टी आपण बघुयात म्हणजे तुम्हाला शेवटी ही सिरीज बघू की नको याचं उत्तर मिळेल आणि तुम्ही आधीच बघितली असेल तर त्याबद्दल अजून काही रंजक गोष्टी तुम्हाला कळतील.
निर्मिती
अत्यंत कमी वेळेत चित्रपट निर्मिती (Film Production) क्षेत्रात अनुष्का शर्मा हिने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. ज्या काळात अभिनेत्री मोठ्या चित्रपटात काम करून स्वतःची ब्रँड व्हॅल्यू वाढवत असतात तिथे अनुष्काने भावासोबत मिळून “क्लीन स्लीट” नावाची कंपनी चालू केली. एन एच 10, फिल्लोरी, परी यांसारखे वेगळ्या धाटणीचे सिनेमे बनवल्यानंतर त्यांनी “पाताल लोक”ची निर्मिती केली. या वेगळ्या दृष्टिकोनातून सिनेमाकडे बघण्याचं धाडस करणाऱ्या निर्मात्यांमुळे या सिरीज मधली प्रत्येक गोष्ट प्रयोगशीलतेतून फुललेली आहे. यात दाखवलेली दिल्ली, गाव, पोलीस, घर म्हणूनच वेगळे वाटतात.
लिखाण आणि दिग्दर्शन
थोडक्यात सांगायचं तर पाताल लोक पत्रकारिता, पोलीस, राजकारण या सामान्य गुन्हेगारीशी निगडित असणाऱ्या घटकांना असामान्य पातळीच्या वैयक्तिक मानसिक संघर्षाला जोडणारी उत्कंठा शिगेला पोहोचवणारी सिरीज आहे. सुख सुविधा असणाऱ्या वर्गाला स्वर्ग लोक ग्राह्य धरलं तर अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठीही संघर्ष करत गुन्हेगारी विश्वात येणाऱ्या आरोपींना आणि पोलिसांना “पाताल लोक” म्हणावं लागेल आणि त्यांची ही कहाणी,अशी शिर्षकाची फोड करता येईल.
एका दुर्लक्षित पोलीस अधिकाऱ्याला कित्येक वर्षांनी तपास करायला आणि त्यातून प्रमोशन मिळेल ही आशा टिकवायला एक केस मिळते. तो तपास करत असताना उलगडत जाणारी परिस्थिती आणि पात्रांच्या वैयक्तिक आयुष्यातले गोंधळ आपल्याला वाईट वाटेल इतक्या वास्तवदर्शीपणे टिपलेले आहेत.
पण हे करत असताना कधीही झालेल्या गुन्ह्याचं हे जस्टीफिकेशन वाटू नये याची ही काळजी घेतली आहे. यातली सगळीच पात्र तात्विकदृष्ट्या बरोबर की चूक कळत नसताना आपल्यासाठी खऱ्याची बाजू जिवंत ठेवण्याचं काम यातला नायक, पोलीस अधिकारी “हाथीराम चौधरी” करतो.
मागच्या वर्षी समीक्षकांनी डोक्यावर घेतलेला “सोनचिडीया”, विवादात सापडलेला “उडता पंजाब” आणि “एन एच 10” सारख्या दर्जेदार चित्रपटांचं लिखाण केलेला “सुदीप शर्मा” या पाताल लोक सिरीजचा “क्रिएटर” आहे. म्हणजे लिखाण, दिग्दर्शन ते एडिटिंगपर्यंत सगळ्याच आघाड्यांवर लक्ष देणारा सगळ्यांचा म्होरक्या. सोबतच त्याने इतर तीन लेखकांसोबत पटकथाही लिहिली आहे.
मूळ कथा ‘तेहलका’ मासिकाचे संपादक तरुण तेजपाल यांच्या “स्टोरी ऑफ माय असॅसीनस्” या पुस्तकावर आधारलेली आहे. पण तरुण तेजपाल यांच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली कोर्टात केस चालू आहे आणि ते जामिनावर बाहेर आहेत, म्हणून सिरीजच्या प्रसिद्धी दरम्यान त्यांचं नाव कुठेही घेतलं गेलं नाही. त्यांच्या मासिकाचे मालकी हक्क असणाऱ्या कंपनीसोबतही त्यांचा वाद होता, आणि नंतर बलात्काराच्या आरोपामुळे त्यांना त्यांचं पद सोडावं लागलं. त्यांनी पुस्तक लिहिल्यानंत चार वर्षांनी त्यांच्या आयुष्यात जवळपास तश्याच घटना घडल्या हा एक विचित्र योगायोग.
चित्रपट दोन दिग्दर्शकांनी मिळून केलाय. अविनाश अरुण यांनी या आधी राष्ट्रीय पुरस्कार विजेता “किल्ला” हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला आहे. दुसरे दिग्दर्शक प्रोसित रॉय यांनी अनुष्का शर्माचा “परी” हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. दोन्ही दिग्दर्शकांच्या आतापर्यंतच्या कामात एक प्रकारचं नावीन्य आहे. पारंपरिक प्लॉटच्या मागे पळण्याची पद्धत सोडून पात्रांच्या अतिवैयक्तिक आयुष्यात जाऊन, त्याच्या कर्माची कारणं शोधणं या दोन्ही दिग्दर्शकांना जमतं. त्यासाठी गरजेचं असणारं वास्तववादी पण भ्रम आहे की काय अशी वाटणारी बालपणीची परिस्थिती निर्माण करावी लागली. आणि त्यात वावरणाऱ्या पात्रांचं खरेपण ही जपावं लागलं. यामुळं या दिग्दर्शकांच्या जोडीने सगळ्यांना आपली वाटेल अशी दुनिया तयार केली पण ही कथा आपली असू नये हे सतत सांगण्याची खबरदारीही घेतली.
पात्र आणि अभिनय
कथेचा नायक “हाथीराम चौधरी” पाताल लोकचा कायमचा रहिवासी असतो. त्याची कुवत सिद्ध करण्याची संधी त्याला कधीच मिळत नाही या कारणाने तो खजिल झालेला दाखवलाय. पण कथा पुढे जाते तेव्हा यामागे असणारी त्याची वैयक्तिक कारणं ही उघडी पडतात.
फारशी शारीरिक ताकद किंवा राजकीय ओळख नसलेला, जाडा पोलीस अधिकारी घरी येतो तेव्हा घरचं वातावरणही त्याच्यासाठी फारसं प्रेरणादायी नसतं. अशा माणसाला मोरल ग्राउंड देऊन नायक करण्याचा धाडसी निर्णय “जयदीप अहलावत” या अभिनेत्याच्या क्षमतेवर विश्वास ठेऊन घेतला गेला होता.
जयदीप अहलावत तुम्हाला आठवत नसेल तर गँगस् ऑफ वासेपुरमधले फैजलचे (नवाजूद्दीनचे) आजोबा आठवा. त्यानंतरही इतर अनेक छोटी पात्र साकारल्यानंतर फायनली त्यांच्या वाट्याला त्याच्या कुवतीप्रमाणे पात्र मिळालं आहे.
ते स्वतः हरियाणाचे असल्यामुळे तो भाषेचा लेहजा त्यांना शोभून दिसतो. पण यातला बराचसा महत्वाचा भाग संभाषणाने नाही तर देहबोलीतुन साकारायचा होता, आणि इथे त्यांनी असामान्य काम केलंय.
या आधी आपल्यासाठी भ्रष्ट किंवा इमानदार असेल तर सिक्स पॅक असलेला पोलीसच प्रसिद्ध होता. पण पहिल्यांदा तुमच्या आमच्या सारखा माणूस त्या खाकीत शिरल्यावर कसा वागेल याचं चित्र बघायला मिळालं.
नीरज काबी या मुरलेल्या अभिनेत्याने संजय कपूर या प्राईम टाइम पत्रकाराची भूमिका साकारली आहे. स्टिंग ऑपरेशन करून सरकार विरोधी सत्य बाहेर आणणाऱ्या हिरोला आता स्वतःच्या नोकरीसाठी संघर्ष करावा लागतोय आणि त्यात हा त्याच्या हत्येचा कट पर्वणी म्हणून येतो.
“सटल” अभिनय अपेक्षित असणाऱ्या प्रत्येक पात्रांसाठी नीरज काबी यांचीच निवड व्हावी असं सुंदर काम त्यांनी केलंय. अभिषेक बॅनर्जी यात “त्यागी” या खलनायकाच्या भुमिकेत दाखवला आहे. सगळ्यात डार्क पात्र आणि तितकंच क्लिष्ट वागणं असल्याने इथं एक दमदार अभिनयाची गरज होती जी पूर्ण होते.
याआधी छोटी आणि बहुदा विनोदी पात्र साकारल्यामुळे या लेखक, कास्टिंग डिरेक्टरची ही बाजू दुर्लक्षित राहिली होती. आरोपींमध्ये एक तृतीयपंथी पात्रही आहे. त्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला खरंतर सगळ्यात अवघड काम मिळालं होतं. तृतीयपंथी पात्राच्या जाणीवा यात जेवढ्या संवेदनशीलपणे मांडल्या आहेत तेवढ्या इतर कुठल्या भारतीय चित्रपटात दिसत नाही. मुळात पात्रांची यादी मोठी आहे आणि ते साकारणाऱ्या कलाकारांबद्दलही बोलायला बरंचसं आहे. या भागात जराही कसर निर्मात्यांनी बाकी ठेवलेली नाही.
तांत्रिक बाबी
राष्ट्रीय चित्रपट विजेत्या “शिप ऑफ थीसीयस” आणि प्रसिद्ध “तुंबाड” चित्रपटाचं एडिटिंग केलेल्या संयुक्ता काझा हिने पाताल लोकचं एडिटिंग केलं आहे, म्हणून ते त्या दर्जाचं असणं सहाजिकच आहे.
सेक्रेड गेम्ससारख्या सिरीजमध्ये दोन विश्व वेगळे करायला लागणारे कट खूप शार्प असतात इथं मात्र सिनेमॅटोग्राफरसोबत काम करून एडिटिंग खूप सॉफ्ट ठेवली आहे. यामुळं बदलणारी विश्वं वेगळं करण्यापेक्षा अंतर्मुख करतात. पोलीस हाथीराम एक आय-कार्ड चोरी करून नंतरच्या शॉटला तेच कार्ड एका वेगळ्याजागी दाखवलं आहे, तो सिन बघून तुम्हाला नक्कीच ही तांत्रिक बाब किती खुबीने साकारली आहे ते कळेल. तसंच काम कॅमेराचंही झालंय. चेसिंग सिन खूप मानवी ठेवलेत आणि सीननुसार बदलनारं कलर पॅलेट तुमच्या मूड सोबत कसं खेळतं हे कळण्यासाठी तर तुम्हाला सिरीज दुसऱ्यांदा बघावी लागेल. कुठलंच मुख्य पात्र कधीच भडक रंगाचे कपडे घालत नाही हे ही विशेष.
बऱ्याच जणांनी असं म्हटलंय की ही सिरीज आपल्यासमोर असलेला पण आपल्याला कळत नसलेला भारतीय समाज आपल्यासमोर उघडा पाडते. मला वाटतं की शेवटी ही सिरीज पात्रांच्या कर्माची/स्वभावाची वैयक्तिक कारणं आणि त्याच्याशी काहीही घेणं देणं नसणारी व्यवस्था त्यांना कसं वापरून घेते, याचं दुर्दैवी सत्य समोर आणते. पण शेवटी सकारात्मक आशा ठेवता येईल असा कोपरा ही दाखवते.
जर तुम्हाला स्क्रीनवर हिंसा बघण्यात काही प्रॉब्लेम नसेल तर ही सिरीज चुकवू नये अशी आहे.
जर ही सिरीज बघायला अमेझोन घेतलं असेल तर “जॅक रायन” नावाची सिरीजही मी रेकमेंड करेल. याच प्रकारची अजून एक सिरीज बघायची असेल तर नेटफ्लिक्सवर “दिल्ली क्राईम” नावाची सिरीज नक्की बघा. निर्भया प्रकरणाला सर्व तथ्यांसह पोलिसांच्या दृष्टिकोनातून ही सिरीज उलगडते, शेवटी डी. सी. पी. अवर्तिकाचं पात्र साकारणाऱ्या शेफाली शाहचे तुम्ही नक्कीच फॅन व्हाल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








