आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
संजीव भिकचंदानी आणि इन्फोएज सारख्या अनेक यशस्वी उद्योगांच्या कथा आपण आजवर ऐकल्या असतील. भारताची अर्थव्यवस्था सतत वाढणारी असल्यामुळे आणि भारत ही एक मोठी बाजारपेठ असल्याने प्रामाणिक प्रयत्न आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर येथे अनेक उद्योग यशस्वीरीत्या चालू शकतात. पण तिथेच काही यशस्वीरीत्या चाललेले उद्योग ठप्पही झाले आहेत. त्यांची कारणं वेगवेगळी असतील. अशाच एका यशाच्या शिखरावरून कोसळलेल्या उद्योगाची एक कथा आपण जाणून घेणार आहोत.
ठिगळे लावलेल्या कपड्यांपासून सुटा-बुटापर्यंत जाण्याच्या आणि स्वतःसाठी एक भव्य उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याच्या प्रेरणादायी कथा आपण अनेकदा ऐकतो. तथापि, काही लोकांनी केवळ यशासह येणारे उच्चांकच पाहिले नाहीत तर नंतर गंभीर नुकसान देखील अनुभवले आहे. आज आपण अशा काही भारतीय अब्जाधीशांबद्दल जाणून घेणार आहोत जे श्रीमंतीच्या शिखरावरून घसरले आणि पुन्हा गरिबीत किंवा तुरुंगात चाचपडत राहिले.
रामलिंग राजू:
१९८७ साली ‘सत्यम कॉम्प्युटर्स सर्व्हिसेस लिमिटेड’चे संस्थापक रामलिंग राजू यांनी देशातील चौथी सर्वात मोठा आयटी सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी तयार केली. २००८ साली या कंपनीची किंमत २ अब्ज डॉलर्स होती. चांगला नफा मिळवण्यासाठी, राजुने रिअल इस्टेट मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या हेतूने कंपनीच्या निधीमध्ये फेरफार करण्यास सुरुवात केली. त्यामुळेच २००८ च्या मंदीनंतर अनेक गोष्टी उघडकीस आल्या. यानंतर, राजू, त्याचे भाऊ आणि इतर ७ जणांना तुरुंगवासाची शिक्षा झाली.
रमेश चंद्र:
आयआयटीचा माजी विद्यार्थी रमेश चंद्र याने १९७१ साली ‘युनिटेक’ नावाची रिअल इस्टेट कंपनी स्थापन केली. बहुतेकदा रिअल इस्टेटचे मार्केट कोणत्याही काळात तेजीत असते, यामुळे युनिटेकने लवकरच यशाचे शिखर गाठले आणि ३२ अब्ज डॉलर्स किमतीची दुसरी सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी म्हणून युनिटेकचा उदय झाला. मात्र, २००८च्या आर्थिक मंदीमुळे कंपनीची आर्थिक घडी विस्कटली.
अशा आर्थिक गोंधळाच्या दरम्यान रमेश चंद्र याने दूरसंचार (टेलिकॉम) क्षेत्रात प्रवेश करण्याचे ठरवले. युनिटेक कंपनीने २००९ साली ‘युनिकॉर्न’ नावाची मोबाईल नेटवर्क सेवा भारतात आणली. युनिकॉर्न कंपनी नॉर्वेजियन दूरसंचार कंपनी ‘टेलीनॉर’ ग्रुपच्या संपूर्ण मालकीची एक उपकंपनी होती. सुरुवातीला युनिकॉर्नला उत्तम प्रतिसाद मिळाला पण टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सहभागामुळे युनिकॉर्नला मिळत असलेला प्रतिसाद बंद झाला. या घोटाळ्यात २०११ साली रमेश चंद्र यांच्या दोन्ही मुलांना म्हणजेच संजय आणि अजय चंद्र यांना अटक झाली. फेब्रुवारी २०१७ मध्ये, टेलिनॉर ग्रुपने ‘भारती एअरटेल’मध्ये भारतीय व्यवसायाचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली.
रानबॅक्सी सिंग ब्रदर्स:
मालविंदर आणि शिविंदर या रानबॅक्सी सिंग ब्रदर्सनी त्यांच्या आजोबांनी स्थापन केलेल्या फार्मा कंपनीच्या रानबॅक्सीमध्ये ३३.५% हिस्सा विकत घेतला होता. त्यानंतर यांतील एका भावाने त्यांचा संपूर्ण वारसा २००८ साली २ अब्ज डॉलर्सला विकला. काही चुकीच्या आणि वाईट गुंतवणूकींमुळे त्यांची उर्वरित संपत्ती रिकामी झाली. त्यांच्या कुप्रसिद्ध गुंतवणुकीपैकी एक म्हणजे तथाकथित अध्यात्मिक गुरू गुरिंदर सिंग ढिल्लन यांना दिलेले ३००० कोटी रुपयांचे कर्ज. या भावांकडे आततापर्यंत ५०० दशलक्ष डॉलर्स उरले आहेत. या दोघांवर सध्या रेलिगेअर आणि हेल्थकेअर कंपनी ‘फोर्टिस’कडून कोट्यवधींचा गंडा घालण्याच्या आरोपाखाली खटला सुरू आहे.
विजय मल्ल्या:
किंगफिशर हे नाव माहित नसलेला तरुण या देशात क्वचितच सापडेल. किंगफिशर उद्योगसमूह आणि विजय मल्ल्या हे काही वर्षांपासून आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. सुरुवातीला अब्जाधीश असणाऱ्या विजय मल्ल्याला वयाच्या २८ व्या वर्षी त्याच्या वडिलांचा दारूचा व्यवसाय वारसाहक्काने मिळाला आणि त्याने त्याचे कोट्यवधी डॉलरच्या व्यवसायात रूपांतर केले. मल्ल्याने ‘किंगफिशर एअरलाइन्स’ स्थापन करून एअरलाईन सेक्टरमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पण २००८ साली मंदीच्या काळात अडचण निर्माण झाली. त्यानंतर, मल्ल्याच्या ९००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची बातमी समोर आली आणि त्यानंतर तो भारतातून पळून गेला. सध्या त्याने यूकेमध्ये आश्रय घेतला आहे. भारतातील विविध बँकांकडून त्याने ९००० कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून ही रक्कम परत मिळावी म्हणून त्याच्या संपत्तीचा सरकारमार्फत लिलाव करण्यात आला.
निरव मोदी:
लक्झरी डायमंड ज्वेलर्स नीरव मोदी, एकेकाळी व्यापार आणि उद्योग क्षेत्रात हे एक मोठे नाव म्हणून गणले जायचे. पण २०१८ साली घोटाळा झाल्याच्या बातमीनंतर या कीर्तीवर काळीमा फसली गेली. नीरव मोदीने ७ वर्षांच्या कालावधीत ‘पंजाब अँड नॅशनल बँक’ (पीएनबी) कडून सुमारे १४,००० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे उघड झाले. या घोटाळ्यात निरव मोदी बरोबरच त्याचा नातेवाईक मेहुल चोक्सी आणि पीएनबीचे काही कर्मचारी सामील आहेत. ही बातमी पसरल्यानंतर निरव मोदीने भारत सोडून पळून जात लंडनमध्ये आश्रय घेतला.
हे सर्व उद्योजक यशाच्या शिखरावर तर होतेच पण प्रामाणिकपणे आणि योग्य बुद्धिमत्ता वापरून कारभार केला असता तर आज निश्चितच भारताच्या अर्थव्यवस्थेच्या उत्थानाला त्यांचा हातभार लागला असता. पण फक्त व्यवसायाचे शिक्षण घेऊन किंवा कोणतंही उच्च शिक्षण घेऊन आपल्याला ‘प्रामाणिकपणा’ हा संस्कार दिला जात नाही. वैयक्तिक गुण असल्याने तो आपल्यात असावा लागतो. या कहाण्या पाहून नवउद्योजकांनी सावधपणे आपली पावलं उचलावीत. आर्थिक मंदीतून बाहेर पडताना संयम दाखवावा. कारण शेवटी पुढच्याला ठेच लागली तर मागचा शहाणा होतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.