आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
गेल्या सात वर्षांपासून बालमजुरीविरोधात ती लढा देते आहे. बालकांसाठी सुरक्षित असणाऱ्या भारताचे स्वप्न ती बघत आहे. तिची इच्छा आहे की भारत हा बालकांसाठी इतका मुक्त असावा की ते आपल्या समस्या मांडू शकतील.
शिक्षणाचा आणि इतर अधिकार त्यांना मिळावेत म्हणून ती प्रयत्न करते आहे.
वयाच्या १७ व्या वर्षी बुलंद उडान ह्या सामजिक संस्थेची स्थापना करणाऱ्या अंजू वर्मा ह्या मुलीचा प्रवास नक्कीच सर्वाना प्रेरणा देणारा आहे.
बालहक्कांसाठी लढा देणाऱ्या अंजूने २०१७ साली बुलंद उडान ह्या आपल्या संस्थेची स्थापना केली होती. आजपर्यंत तिच्या संस्थेच्या माध्यामतून तिने ७०० पेक्षा अधिक बालमजुरी करणाऱ्या मुलांना यशस्वीरित्या शाळेत पाठवलं आहे.
तिने बाललैंगिक अत्याचाराचे १५ प्रकार शासनासमोर आणले आहेत. इतकंच नाहीतर तिने ४० बालविवाह रोखले असून एका स्त्रीभ्रूण हत्येला देखील तिने यशस्वीरित्या थांबवलं आहे.
हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील दौलतपूरमध्ये जन्मलेल्या अंजूला बालपणापासूनच भेदभावाचा सामना करावा लागला होता. तिचा जन्म झाल्यावर तिच्या आजीने तब्बल ५ दिवस जेवण केलं नव्हतं घेतलं, कारण ती घरात जन्मलेली दुसरी मुलगी होती, त्यांना मुलाची अपेक्षा होती.
परंतु अंजूच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग तेव्हा आला ज्यावेळी ती सुट्टीत आपल्या आत्याच्या घरी गेली होती. त्या प्रसंगानंतर तिचं आयुष्य पालटलं होतं.
अंजूचं आयुष्य बालपणापासूनच चार भिंतीच्या मध्ये गेलं. उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्याच्या घरी जाण्यसाठी ती सदैव उत्साही असायची, कुठल्याही १० वर्षांच्या मुलीप्रमाणे आपल्या महिन्याभराच्या सुट्टीकडे अंजू अत्यंत उत्साहाने बघत होती.
पण पुढे तिच्या ताटात काय वाढून ठेवलं आहे, याची तिला अजिबात कल्पना नव्हती. ती त्यावेळी पाचव्या इयत्तेत होती.
आत्याच्या घरी जाऊन आपण सुखात आणि चैनीत राहू अशी तिची पूर्वकल्पना होती, ती तिथे गेल्याबरोबरच धुळीस मिळाली. अंजूला आत्या रोज सकाळी पाच वाजता उठवायची आणि तिच्याकडून १५ जणांचा चहा तयार करुन घ्यायची.
तिला भाजी निवडायला आणि कापायला लावयाची, इतकंच नाही घराची सगळी कामं आत्या अंजू कडून करवून घेत होती. तिची आत्या तिचा मानसिक छळ करायची, अंजूला चहा बनवता येत नाही इतकं म्हणून तिच्या आत्याने तिला बऱ्याचदा मारहाण देखील केली होती.
रात्री आत्या तिच्याकडून भांडी घासून घेत असे. इथे काय घडतंय हे घरी अजिबात सांगायचं नाही, अशी सक्त ताकीद अंजूला देण्यात आली होती. एखाद्या मोलकरणीसारखी वागणूक अंजूला त्याठिकाणी मिळत होती.
अखेरीस २० दिवसांनी तिचे वडील त्या गावात आले असतांना संधीचा फायदा घेऊन अंजून त्यांच्यासोबत घरी परत आली, आत्याकडे घडलेल्या प्रकाराचा गंभीर परिणाम अंजूच्या मनावर झाला होता.
तिच्या दृष्टीकोनात एक मोठा बदल ह्या प्रसंगानंतर झाला होता. ह्या घटनेनंतर तिला वाटू लागलं होतं की ती मुलगा म्हणून जन्माला आली असती तर किती बरं झालं असतं.
पुढे वयाच्या ११ व्या वर्षी तिची एक मैत्रीण तिच्या एका मैत्रिणीचा बाल विवाह करण्यात आला. यामुळे ती फारच विचलित झाली होती. जेव्हा तिने यासंदर्भात मैत्रीणीना विचारणा केली तेव्हा तीची मैत्रीण तिला म्हणाली की प्रत्येकाला आयुष्यात सर्व सुख मिळत नाही. प्रत्येकाच्या घरचे पुढारलेल्या विचारांचे नसतात.
मैत्रिणीच्या वाक्यांचा मोठा आघात अंजूच्या मनावर झाला होता. इतक्या लहान वयात आपली मैत्रीण एका ठिकाणी लग्न करून जात आहे, शिक्षण सोडत आहे, हे बघून ती व्यथित झाली होती.
आपले आईवडील आपल्याला शिकवत आहे, यामुळे तिच्या मनात आईवडिलांविषयी आदर निर्माण झाला होता.
आपल्या वर्गातील काही मुली शाळा आटोपून लवकर घरी जातात हे तिच्या लक्षात आलं, त्या असं का करतात म्हणून त्यांना विचारणा केल्यावर त्या मुली म्हणाल्या आम्हाला काही हेच एक काम नसतं, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कामाला असून त्याठिकाणी आम्हाला जायचं असतं, आम्हाला रात्री जेवण देखील तयार करायचं असतं.
हे ऐकून अंजू अजून जास्त विचलित झाली. तिने या संदर्भात आपल्या शिक्षिकेला विचारणा केली तेव्हा तिला ‘बाल मजुरी’ ह्या शब्दाची ओळख झाली.
तिला हे देखील कळालं की बालमजुरी हा कायदेशीर गुन्हा आहे आणि जे तो गुन्हा करतात त्यांना सहा महिन्यांचा कारावास होतो.
मग तिने मनाशी निश्चय पक्का करून आपल्या मैत्रिणी ज्या बालमजुरी करायच्या त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईवडीलाना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यासाठी प्रसंगी ती घरी नातेवाईकाकडे जाते आहे, असं खोटं देखील सांगायची, पण ती प्रयत्न करत होती, तरी तिला यश मिळत नव्हतं.
मग तिला तिच्या शिक्षिकेने गावच्या सरपंच्यांच्या कानी हे प्रकरण घालण्याची सूचना केली. हे कठीण काम होतं तरी तीने गावच्या काही पंचायत सदस्यांना आपल्या बाजुने यशस्वीरित्या वळवलं होतं.
पुढे त्यांना त्या मैत्रिणीच्या घरी घेऊन जाऊन त्यांच्या आईवडिलांना ते जे करत आहेत, तो कायदेशीर गुन्हा असल्याचे आणि ५० हजार दंड अथवा जेलमध्ये जावं लागु शकतं अशी धमकीवजा सूचना त्यांना तीने जाऊन दिली. तेव्हा कुठे हा प्रकार थांबला.
पुढे त्या मुलींना ३३ % वरून ७०% मिळवण्यापर्यंत तिने मदत केली. पण ती आता थांबली नव्हती. काही दिवसांतच तिला कळून चुकलं की अनेक मुलं अजूनही शाळेत येत नाही, मग त्या मुलांना शाळेत आणण्यासाठी तिने प्रयत्न सुरू केले.
ती १०० विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्यात यशस्वी झाली होती.
पुढे तीचे कार्य मोठे होत गेले, तिला TEDx मध्ये व्याख्यान देण्यासाठी देखील आमंत्रित करण्यात आले होते.
ऑक्टोबर २०१७ ला आपल्या चुलत भावाच्या सोबतीने सात जणांची टीम घेऊन तिने बुलंद उडानची स्थापना केली. आधी ७ जणांच्या गटाने सुट्टीच्या दिवशी गावोगावी मुलांना ती शाळेत पाठवण्याचे ती आवाहन करत होती.
पुढे तिच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढून ७० झाली. अनेक पदवी पदव्युत्तर शिक्षण घेणारे मुलं, तिच्या ह्या समाजकार्यात सहभागी झाले.
अंजूचे वडील राजेंद्रकुमार हे एक रिक्षाचालक असून महिन्याकाठी २० हजार रुपये कमावतात. आपल्या पगाराचा आर्धा भाग ते अंजूवर खर्च करतात. उडानच्या माध्यामतून हे कार्य निरंतर सुरु ठेव असंच तिला त्यांनी सांगितलं आहे.
आज अंजूला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं असलं तरी ती म्हणते जोपर्यंत शेवटचा मुलगा शाळेत शिकायला जात नाही, तोपर्यंत हा संघर्ष असाच सुरु राहील, पुरस्कारांचे त्यासमोर काहीच मोल नाही.
अंजू वर्मा यांच्या संघर्षाला सलाम !
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.