आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
कोरोनाच्या संकटकाळात या व्हायरसच्या संकटातून सावरण्यासाठी एका रोबोटनं देखील दिवसरात्र रुग्णालयांमध्ये फिरून कोरोना रुग्णांची सेवा केली. ‘मित्रा’ असं या रोबोटचं नाव. बालाजी विश्वनाथन यांच्या ‘इन्व्हेंटो रोबोटिक्स’ या कंपनीनं या रोबोटची निर्मिती केली. ‘मित्रा’च्या निमित्तानं रोबोटिक्स जगतात बालाजी विश्वनाथन हे अल्पकाळात आघाडीचं नाव बनलं आहे. रोबोटिक्स इंजिनिअर ते एका रोबोट कंपनीच्या मुख्य कार्यकारी पदापर्यंतची त्यांची मजल अनेक नवउद्योकांना प्रेरणा देणारी आहे.
बालाजी यांनी अमेरिकेच्या मॅरिलँड विद्यापीठातून कम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर उद्योगजगतातील आघाडीच्या बॅबसन कॉलेजमधून त्यांनी एमबीएची पदवी मिळवली. वॉशिंग्टनच्या रेडमॉन्ड शहरातील मायक्रोसॉफ्टच्या मुख्य कार्यालयात इंजिनिअर म्हणून त्यांनी करिअरला सुरुवात केली.
मायक्रोसॉफ्टनंतर ‘ब्लॅकडक’ या कंपनीत त्यांनी प्रोडक्ट मॅनेजर म्हणून काम पाहिलं. त्यानंतर स्टार्टअप जगतात पाऊल ठेवण्याचं बालाजी यांनी ठरवलं. सुरवातील ‘झिंगफीन’, ‘बी लीमीटलेस’ आणि ‘नालंदायू’ हे स्टार्टअप्स त्यांनी अमेरिका आणि भारतात सुरु केले.
२०१६ साली बंगळुरुत एका गॅरेजमध्ये आपल्या दोन सहकाऱ्यांसह बालाजी यांनी ‘इन्व्हेंटो रोबोटिक्स’ ही कंपनी सुरु केली. या कंपनीनं अल्पावधीतच ‘मित्रा’ रोबोटची निर्मिती केली. २०१७ च्या जागतिक उद्योग परिषदेत याच मित्रा रोबोटचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवउद्योजक तसेच तत्कालीन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची कन्या इवांका ट्रम्प यांच्या हस्ते करण्यात आलं.
इन्व्हेंटो रोबोटिक्स ही कंपनी सध्या स्टॅन्डर्ड चार्टर्ड, एचडीएफसी, बॉश, अपोलो, फोर्टीस रुग्णालयासाठी रोबोटिक्स तंत्रज्ञान पुरवत आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात काही मानवी रोबोट्सच्या माध्यमातून थर्मल स्क्रीनिंगसह इतर सुविधा नागरिकांना पुरवण्यात आल्या होत्या. या रोबोट्समुळे कोरोना रुग्ण आणि डॉक्टर्समध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात बरीच मदत झाली होती.
मित्रा या रोबोटमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे कोरोनाकाळात रुग्णालय प्रशासनाचा ताण हलका होण्यास मदत झाली होती. या रोबोटमध्ये फेशियल रिक्गनिशन टेक्नोलॉजी वापरण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे संपर्कात आलेल्या लोकांची नावं आणि त्यांचे चेहरे हा रोबोट लक्षात ठेवू शकतो.
या रोबोटला लावलेला कॅमेरा आणि व्हीडिओ स्क्रीनद्वारे रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टर्समध्ये अत्यंत सहजरित्या संपर्क होऊ शकत होते. हा मित्रा रोबोट डॉक्टर किंवा नर्सचा सहाय्यक म्हणून देखील काम करु शकतो. रुग्णांच्या समस्या रुग्णालय प्रशासनापर्यंत पोहोचवणं, रुग्णांना औषध घेण्याची आठवण देखील हा रोबोट करुन देतो. सामाजिक क्षेत्रात उपयुक्त असा जगातला सर्वोत्तम रोबोट बनवण्याचं बालाजी यांचं ध्येय आहे.
कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनचा फटका अनेक क्षेत्रांना बसला. याचा फटका बालाजी यांच्या कंपनीला देखील बसला. या काळात पुरवठादारांकडून साहित्य मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. त्यामुळे रोबोट्सच्या निर्मितीमध्ये ३ ते ४ महिन्यांचा विलंबही झाली.
रोबोट्सच्या माध्यमातून बालाजी विश्वनाथन याचं आरोग्य क्षेत्रात मोठं योगदान आहे. बालाजी हे एक उत्तम लेखक आणि वक्ता सुद्धा आहेत. क्वॉरावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या लेखकांच्या यादीत ते आघाडीवर आहेत.
नव्या संशोधनांसाठी त्यांना ‘नॅशनल डिझाईन रिसर्च फोरम’कडून तीनदा सन्मानित करण्यात आलं आहे. सिंगापूरमध्ये झालेल्या ‘यंग इन्व्हेस्टर’ स्पर्धेत ते आशिया विभागातून अंतिम फेरीत दाखल झाले होते. बालाजी हे उत्तम वक्ता असून त्यांना जागतिक व्यासपीठांवर अनेकदा बोलवलं जातं. त्यांनी चीनच्या टियानजीन शहरात झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेतही सहभाग नोंदवला होता. भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपती आणि शास्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याशी संशोधनांवर चर्चा करण्याची संधी देखील बालाजी यांना मिळाली होती.
तामिळनाडूच्या कुंभकोणम या गावात बालाजी यांचं बालपण गेलं. त्यांचे वडिल बँक मॅनेजर होते. वडिल कार्यरत असलेल्या बँकेमार्फत अनेक नवउद्योजकांना कर्ज दिलं जायचं. त्यामुळे उद्योगांची सुरवात आणि पुढे त्यांची वाटचाल कशी असते, याचे बाळकडू बालाजी यांना त्यांच्या वडिलांच्या कामामुळे मिळाले.
बालाजी यांच्या आजोबांनी बँकेतील नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरु केला होता. बर्मावरून परतलेल्या आईच्या वडिलांचा प्रिटींग प्रेसचा उद्योग शुन्यातून उभा राहताना बालाजी यांनी पाहिला. घरीच व्यवसायाची पार्श्वभूमी असल्यामुळे या क्षेत्रातील चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू त्यांनी जवळून पाहिल्या.
सध्या स्टार्टअप्सचे अच्छे दिन सुरु आहेत. मात्र, दशकभरापूर्वी जेव्हा बालाजी या क्षेत्रात उतरले तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती. अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर बालाजी आणि त्यांच्या पत्नीनं ‘नालंदायू’ ही कंपनी सुरु केली. या कंपनीमार्फत मोठ्या विद्यापीठांचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सहजरित्या ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याचा बालाजी यांचा मानस होता. मात्र, हार्वर्ड आणि एमआयटीसारख्या संस्था त्यांच्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ मोफत देऊ शकतात, ही संकल्पनाच त्याकाळी विद्यापीठ प्रशासनाला पटवून देणं फार कठीण होतं, असं बालाजी एका मुलाखतीत सांगतात.
आपल्या कंपनीच्या रोबोटचा एक भन्नाट किस्सा बालाजी यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. ‘दुबईतील एका कार्यक्रमात आमच्या कंपनीचे रोबोट्स आम्ही दाखवत होतो. माणसांसारखे हावभाव करणाऱ्या या रोबोट्सकडून काही तांत्रिक कारणांमुळे एक मोठी चुक झाली. या कार्यक्रमात उपस्थित वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याला थम्प्स अप करण्याऐवजी या रोबोनं चुकीचं बोट दाखवल्यानं बरीच पंचाईत झाली होती. मात्र, रोबोटची ही चूक खिलाडूवृत्तीनं घेत त्या अधिकाऱ्यानं रोबोटला गमतीत एक चमाट मारली’.
कुठल्याही स्टार्टअपसाठी सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे पैसा. हा पैसा उभारण्यासाठी गुंतवणूकदार मिळवणं हे एक मोठं आव्हान नवउद्योजकांपुढे असतं. हेच आव्हान सुरवातीच्या काळात बालाजी यांना देखील पेलावं लागलं. इन्व्हेंटो रोबोटिक्सच्या स्थापनेनंतर जवळपास ३ वर्षांनंतर या कंपनीला गुंतवणूकदारांकडून निधी मिळाला. आर्थिक पाठबळ मिळाल्यानं भविष्यात या कंपनीकडून अनेक दर्जेदार रोबोट्स आपल्याला पाहायला मिळतील यात शंका नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.