आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या जडणघडणीत अनेक शूरवीरांचा वाटा आहे. यात कित्येक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, तेव्हा आज आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं आहे. आपण आजवर अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा ऐकल्या असतीलच पण आज आम्ही आपल्याला ज्या योद्ध्याबद्दल सांगणार आहोत तो म्हणजे सर्वांत कमी वयात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या एका लहानसा स्वातंत्र्यसैनिकाबद्दल.
त्या स्वातंत्र्यसैनिकाचे नाव होते “बाजी राऊत”.
तो बाजी राऊत ज्याने इंग्रजांचे दात अंबवले होते. अशा या लहान मुलाच्या कारनाम्यांमुळे इंग्रजांना का पळून जावं लागलं होतं? असं काय केलं होतं याने ? ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला आमचा हा लेख वाचवा लागेल.
बाजी राऊतचा जन्म १९२६ साली ओडिशा राज्यातल्या धेनकनाल जिल्ह्यातील एका लहानश्या खेड्यात झाला होता. खूप कमी वयात वडिलांचं निधन झाल्यामुळे फक्त आईने सांभाळून या बाळाला लहानचं मोठं केलं होतं. आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवण्यासाठी ही आई जवळच्या गावात घरकाम करत असे ज्यातून त्यांना पैसे मिळत असत.
धेनकनालचे राजा शंकरप्रताप सिंहदेव गरिबांकडून पैसे उकळण्यात पटाईत होते. त्यांनी बाजीच्या आईकडूनसुद्धा पैसे लुबाडले होते. त्यांच्या या वागण्यामुळे दिवसेंदिवस प्रजेच्या मनात राजाबद्दल राग वाढत होता. एक दिवस असा आला की लोकांच्या संतापाची सीमा ओलांडली गेली.
गावकऱ्यांनी राजाच्या या पिळवणुकीला कंटाळून राजाच्या विरोधात बंड पुकारले. तिथले स्थानिक वैष्णव पट्टनायक ज्यांना वीर वैष्णव म्हणूनसुद्धा ओळखलं जात होतं त्यांनी या आंदोलनाला खतपाणी देण्याचं काम केलं. त्यांनी राजाच्या विरोधात झेंडा उचलला आणि एका समितीची स्थापना झाली.
याच समितीने आणखी एक तुकडी तयार केली होती ज्या तुकडीचं नाव होतं ‘वानरसेना’. या तुकडीमध्ये सगळ्या लहान मुलांचा समावेश होता. या सगळ्या लहान मुलांसोबत या वानरसेनेत बाजीसुद्धा सहभागी झाले.
पट्टनायकांनी एक योजना आखली. त्यांनी रेल्वेमध्ये पेंटरचं काम करण्याच्या निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी केवळ आपल्या आंदोलनाचा स्वार्थ साधून घेण्यासाठी घेतला होता. पेंटर असल्याने ते रेल्वेचा पास वापरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ शकत होते.
त्याचाच वापर करुन ते वेगवेगळ्या गावात जाऊन जास्तीतजास्त लोकांना भेटण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांना भेटून राजाकडून होणाऱ्या अन्यायाची त्यांना जाणीव करुन देत लोकांना राजाच्या विरोधात भडकावण्याचे काम चालू केले.
पट्टनायकांनी या दरम्यान आपलं नेटवर्क भरपूर ताकदवान केलं होतं. भरपूर माणसे जोडली होती. त्यांनी कटकच्या नॅशनल काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठकासुद्धा केल्या आणि त्यांना आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्ष घालण्याचं आवाहन केलं.
त्यांच्याकडून कित्येक प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी मार्क्सचे क्रांतिकारी विचार वाचण्यास सुरुवात केली. मार्क्सच्या विचारांनी ते इतके प्रभावित झाले की त्यांनी हारा मोहन पट्टनाकायसोबत मिळून प्रजामंडळ आंदोलनाची स्थापना केली.
हे आंदोलन आता हळूहळू समाजात पसरू लागलं होतं. पण जेव्हा या जनआंदोलनांनी जोर पकडला. तेव्हा बाकीचे इतर राजे धनकनालच्या राजाच्या मदतीला धावून आले. ते एकजुटीने जनतेच्या या आंदोलनाला फिरवून लावणार होते. काही राजांनी मदत म्हणून आपलं सैन्य धनकनालच्या राजाच्या मदतीला पाठवलं. इंग्रजांनीसुद्धा कोलकात्यावरून आपला एक दूत, २५० बंदूकधारी सैनिकांची सेना घेऊन पाठवला व इंग्रजसुद्धा राजाच्या मदतीसाठी मैदानात उतरले.
धनकनालच्या राजाने आपल्या हुकूमशाहीच्या जोरावर या आंदोलनाला परतवून लावण्याचा प्रयत्न केला. तो आता लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू पाहात होता जेणेकरून लोक या आंदोलनातून माघार घेतील.
यानंतर धनकनालच्या राजाने आपल्या जनतेवर राजभक्त कर किंवा इमानदारी कर आकारण्यास सुरुवात केली. जी लोक हा कर भरू शकत नव्हते त्यांची घरे हत्तीच्या पायी दिली जात असत. त्यांची संपत्ती जप्त केली जाई व त्यांच्यावर अत्याचार केले जात होते.
या सगळ्या प्रकाराने हे आंदोलन अजूनच भडकले आणि आधीपेक्षा जास्तच बळकट झालं. राजा या आंदोलनामुळे खूप त्रस्त होत होता. जनता दिवसेंदिवस राजाने केलेल्या अत्याचारामुळे राजाला फैलावर धरत होती.
त्रस्त झालेल्या राजाने आपण आपल्या सगळ्या जनतेला काही करू शकत नाही हे पाहून या आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या वीर वैष्णव यांच्यावर निशाणा साधला व त्यांची सारी संपत्ती व जमिनी जप्त केल्या.
एवढेच नाही तर १९३८ साली हारा मोहन यांच्या घरावर छापा मारत त्यांना व अन्य नेत्यांनासुद्धा अटक करण्यात आली पण पट्टनायक इथून पळून जाण्यात यशस्वी झाले.
पट्टनायक आपल्या हाती आले नाहीत ही गोष्ट अधिकाऱ्यांना समजताच ते प्रचंड संतापले आणि त्यांना शोधण्यासाठी अजून जोर लावण्यात आला. अधिकाऱ्यांना अशी बातमी मिळाली की वीर पट्टनायक हे भुवन नावाच्या एका गावात लपले आहेत. हे समजताच राजाने भुवन गावावर जोरदार हल्ला करत वीर वैष्णवांचा पत्ता विचारू लागले. परंतु गावकरी आपलं तोंड न उघडता आपल्याला काहीच माहिती नाही यावर ते ठाम राहिले. माहिती न दिल्या कारणाने त्यांचा प्रचंड छळ झाला तरीसुद्धा राजाला माहिती मिळवण्यात यश आले नाही.
या सगळ्या प्रकारा दरम्यान अधिकाऱ्यांना अशी बातमी मिळाली होती की पट्टनायक ब्राम्हणी नदी पार करून गावकऱ्यांच्या सुरक्षिततेमुळे या गावातूनसुद्धा पसार झाले आहेत. राजाला ही माहिती मिळताच राजाने पट्टनायकांच्या शोधार्थ सगळी सेना त्यांच्या मागावर लावली. पण त्या सैन्याच्या तुकडीला रोखण्यास संपूर्ण गाव साखळी करून उभे राहिले व सेनेला पुढे जाऊ दिले नाही.
लोकांना बाजूला हटवण्यासाठी या सैनिकांनी गोळ्या चालवण्यास सुरुवात केली व २ लोकांचे बळी गेले तेव्हा ही साखळी पांगली व सैन्याचा रस्ता मोकळा झाला.
११ ऑक्टोबर १९३८ च्या रात्री ही सैन्य तुकडी एका घाटावर असलेल्या बोटीजवळ येऊन पोहचली. याच वेळी १२ वर्षीय बाजी हे त्या बोटीत थांबून घाटाची सुरक्षा करत होते.
बाजीला असं सांगण्यात आलं होत की दुश्मन सैन्याची तुकडी काहीही झाले तरी बोटीच्या मार्फत नदीच्या दुसऱ्या किनारी जाता कामा नये. बाजी सुरक्षा करत आहेत हे त्या सैनिकांना माहिती नसल्याने त्यांनी बाजीला आम्हाला तिकडच्या बाजूस सोड असे सांगितलं पण बाजीने त्यांना स्पष्ट शब्दांत नकार दिला.
बऱ्याचदा बोलून सुद्धा आपलं न ऐकल्याने चिडलेल्या सैनिकांनी आपल्या बंदुकीचे बट बाजींच्या डोक्यात एवढ्या जोरात मारले की यात त्यांच्या डोक्याचे हाड फॅक्चर झाले.
एवढ्याश्या बालकावर त्या सैनिकांनी केलेला असा अत्याचार पाहून आपणास त्यांच्या क्रूरतेची कल्पना येईल. बाजीच्या जीवावर हल्ला झालेला असतानासुद्धा तो शांत न बसता मोठमोठ्याने ओरडत राहिला, जेणेकरून गावकऱ्यांना सैनिक आले आहेत ही बातमी मिळावी. पण इंग्रज सैनिक तेवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी बाजीवर पुन्हा हल्ला केला व त्याच्यावर गोळी झाडली.
जेव्हा बाजीना गोळी लागल्याची घटना गावकऱ्यांना समजली तेव्हा ते प्रचंड पेटून उठले. समोरून येत असलेल्या गावकऱ्यांचा क्रोध पाहून वीर पट्टनायकांना शोधण्यासाठी आलेले सैनिक प्रचंड घाबरले आणि आपल्या जीवाच्या आकांताने पळून जाऊ लागले. जाताना त्यांनी बाजीच्या नावेचा उपयोग केला व बोटीतून गावकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या ज्यात ४ गावकरी मृत्युमुखी पडले.
हे सगळं झाल्यानंतर पट्टनायकांनी सगळ्या मृतवीरांचे मृतदेह गोळा केले व रेल्वेने ते कोलकात्याला घेऊन गेले. कोलकात्याला पोहचताच पट्टनायकांना घेण्यासाठी लाल सलामचे नारे देत प्रचंड गर्दी गोळा झाली होती. तिथे बाजी राऊत व इतर मृतांच्या पार्थिवांना कोलकात्याच्या गल्ल्यांमधून अंतयात्रा काढून नंतर मानसन्मान देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. या मृतवीरांना पाहण्यास या वेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. बाजी राऊत याचं ते एवढंसं शव उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकत होतं.
या आंदोलनात ही एक १२ वर्षीय बालकाने स्वातंत्र्यासाठी दिलेली प्राणांची आहुती विशेष होती, कारण एवढ्या कमी वयात त्यांना आपल्या स्वातंत्र्याची आलेली समज व त्यासाठी इंग्रजांची आपल्या छातीवर झेललेली गोळी हे सगळेच अलौकिक आहे.
या बालवीराला शतशत नमन!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.