आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपण आतापर्यंतच्या सगळ्यात कठीण परिस्थितीत आहोत. काही लोक तर असंही म्हणतायत की हे आतापर्यंतच सगळ्यात वाईट वर्ष आहे.
पण याआधी आपण २००८ मध्ये देखील सगळे हेच म्हणत होतो. एकाच वर्षात जगभरात कित्येक देशात ग्लोबल वार्मिंग, पूर, ज्वालामुखी, वादळं, भूकंप यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. एकाच वर्षात एवढी सगळी संकटं आल्यामुळे प्रत्येकच जण घाबरला होता.
ही संकटं ओसरल्यावर या वर्षाला मानवी इतिहासातील सर्वांत वाईट वर्ष म्हटलं जाऊ लागलं. तेव्हा काही हार्वर्ड विद्यापीठातल्या अभ्यासकांनी एक उपक्रम हाती घेतला. त्यांनी मानवी इतिहासातील सर्वात वाईट वर्ष कुठलं? या प्रश्नाचं उत्तर शोधून काढलं.
त्यांच्या शोधकार्यातून असं कळालं की इसवीसन ५३५-५३६ हे सर्वात वाईट वर्ष होतं.
या इतिहास अभ्यासक आणि शास्त्रज्ञांच्या टीमला हे कसं कळालं?
प्रोकोपीअस नावाचा एक लेखक रोमन साम्राज्यात होता, ज्याने यावर्षाबद्दल काही नोंदी लिहून ठेवल्या आहेत. तो असं लिहितो की, जवळजवळ १८ महिने पृथ्वीवर सूर्यप्रकाश पडला नव्हता. म्हणजे दीड वर्ष सूर्य दिसला नव्हता.
एका दिवसात फक्त चार तास सूर्य दिसायचा, म्हणजे ऊन नाही तर फक्त अंधुक असा प्रकाश पडायचा. यामुळं कुठल्यातरी राक्षसाने सूर्याला गिळून टाकलंय आणि आता सूर्य पुन्हा कधीही दिसणार नाही अशी अफवा लोकांमध्ये पसरली.
ही नोंद खरी आहे हे सिद्ध करणारा एक पुरावाही त्यांना सापडला. संशोधकांना शोधकार्य करत असताना राखेचे काही जुने नमुने सापडले. ही राख आयर्लंड देशातल्या एका ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेली आहे. हा उद्रेक ५३५ ते ५३६च्या दरम्यान झाला असं लक्षात आलं. यामुळे हे स्पष्ट झालं की या उद्रेकातून आकाशात गेलेल्या राखेचं प्रमाण एवढं होतं की सूर्य ही झाकून गेला.
यानंतर अजूनही काही ज्वालामुखींचा उद्रेक झाला आणि या राखेमुळे पृथ्वीच्या उत्तरेकडचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग अंधारखाली गेला. अर्ध्या पृथ्वीवर ऊन न पडल्यामुळे तापमान १-२ अंशापर्यंत घसरलं होतं. यालाच इतिहासात मिनी आईस एज म्हणतात.
ऊन न पडल्यामुळे ऋतुचक्र बदलली. झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं ऊन मिळाल्यामुळे पिकं आली नाही. खायला अन्न, फळं काहीच राहिलं नाही त्यामुळे भुकेने लोकं मरू लागली.
पण यावर्षात फक्त एवढंच झालं नाही. याचवर्षी चीनमध्ये पिवळी राख आकाशातून पडली आणि भयंकर परिस्थिती उद्भवली अशा नोंदी आढळतात. युरोपमध्ये परिस्थिती अजून वाईट करायला यु*द्धप्रसंगांची भर पडली. यु*द्धामुळे जीवित हानी तर झालीच शिवाय आवश्यक गोष्टींचा तुटवडाही पडला.
यु*द्धातून सावरत असतानाच इजिप्त आणि युरोपला एका महामारीलाही सामोरं जावं लागलं.
त्याकाळी आशिया, युरोप, इजिप्त या प्रदेशात व्यापार चालयचा. या व्यापारी मालासोबत इजिप्तमध्ये जन्मलेला प्लेग किड्यांद्वारे युरोपात आला. बुबॉनिक प्लेग या नावाने आता ही महामारी आपल्याला माहीत आहे. अजूनही या प्लेगचे काही रुग्ण जगात आढळतातच.
भारतातही १९९४ साली हा प्लेग आला होता. यात सुरुवातीला मांडीला आणि हाताला फोड येऊन त्यात पस तयार होतो. तेव्हा सामान्य जनतेपासून राजघराण्यातल्या लोकांनाही याची लागण झाली होती.
राजा जस्टीनियन प्लेगमधून बरा होऊ शकला यामुळे की काय त्या प्लेगची उल्लेख “प्लेग ऑफ जस्टीनिअन” असा आढळतो.
या महामारीत युरोपमधली अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या मृत्यू पावली. यात जवळपास ५ कोटी लोकांचा मृत्यू झाला. ऊन नसल्यामुळे प्रसार जास्तच वाढला त्यात वैद्यकीय सुविधांचा अभाव, शहरात वाढणारी लोकसंख्या आणि त्यामुळे होणारी घाण यातून प्लेगने जास्तच गंभीर रूप घेतलं. असे म्हणतात की ही महामारी संपूर्ण आटोक्यात यायला १०० वर्षं लागली.
भुगर्भशास्त्र आणि धातूविज्ञानात झालेल्या संशोधनात असं आढळलं की इसवीसन ६४० मध्ये चांदीची नाणी बऱ्याच प्रमाणात बनवली गेली. यातून असं लक्षात येतं की तब्बल १०० वर्षानंतर व्यापार सुरळीत सुरू झाला होता आणि लोकजीवन रुळावर यायला लागलं होतं.
जगातला सर्वांत खडतर काळ गेला तसा हा ही जाईल, मानवी जीवनाचा इतिहास अशा अनेक संघर्षातून इथपर्यंत आलाय.
५३५ साली माणसाच्या हातात परिस्थिती सुधारण्यासाठी फारसं नियंत्रण नव्हतं. मात्र आज २०२० मध्ये कोरोनाच्या महामारीपासून स्वतःला वाचवायला आपल्याकडे उपाय आहेत. म्हणून नियम पाळा, घरी रहा, सुरक्षित रहा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.