आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
इस्लाम समाजात समाजसुधारकांची गरज आहे. मोक्कार धर्म प्रचारक भरलेत पण समाजाला शिक्षणाचं, स्वच्छतेचं, स्त्री सबलीकरणाचं महत्त्व समजावून सांगणारा समाजधुरीण एकही नाही.
दुर्दैव म्हटलं पाहिजे, हिंदू स्त्रीला तिचे जीवन तिच्या संमतीने जगायला देणारा, तिच्या हातात सामाजिक आणि न्याय जीवन जगण्याचा हक्क देणारा हिंदू कोड बिल जेव्हा नाकारला गेला तेव्हा तुम्ही माझ्या हिंदू कोड बिलाचा खून केलात म्हणून तडकाफडकी कायदा मंत्री पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा द्रष्टा या समाजाला लाभला नाही.
बाईला मुलींनी शिकलं पाहिजे म्हणून आयुष्य वेचणारे फुल्यांसारखे दाम्पत्य या समाजाला लाभले नाहीत! राजा राममोहन रॉयपासून गोखले आगरकर यांच्यासारखी फळी, जिने हिंदू समाजातील पुरोगामीत्व घडवलं हा प्रकार मुस्लिम समाजाबाबत झाला नाही.
समाजातील प्रत्येक गोष्ट फक्त आणि फक्त धर्माच्या भोवती गोल गोल फिरत राहिल्यामुळे असेल पण गरीबी, अज्ञान, धर्मअंधता यांची ठसठसणारी जखम आज भलंमोठं पू भरलेलं गळू झालं तरी त्याचं ऑपरेशन करण्याची हिंमत गेल्या ६ ते ७ दशकांत सरकार ने दाखवली नाही. कारण गळू कापण्याच्या पायी हातातली मुस्लिम व्होटबँक निसटू देणं काँग्रेसला परवडलं नसतं!
आज गुगलवर मुस्लिम समाजसुधारक कोण कोण आहेत हे सर्च करायला गेलं तर हमीद दलवाई, डॉ. झाकीर हुसेन अशी मोजकी नावे सापडतात.
या नवीन काळामध्ये सध्या जिवंत असणारा मुस्लिम समाजसुधारक सापडणे तसे कठीण आहे परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात मात्र या समाजाला पुढे नेण्यासाठी ज्या लोकांनी आपले योगदान दिले त्याच्यामध्ये डॉक्टर झाकीर हुसेन यांचं नाव अग्रगण्य आहे.
विशेष गोष्ट म्हणजे डॉक्टर झाकीर हुसेन हे आपल्या देशाचे तिसरे राष्ट्रपती आणि बहुधा भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले मुस्लिम राष्ट्रपती. त्यांच्यानंतर हा मान डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या वाट्याला आला होता.
डॉक्टर झाकीर हुसेन यांनी १९६७ साली भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले. झाकीर हुसेन हे एकमेव स्वातंत्र्यसेनानी, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेऊन भारताच्या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारली.
मुस्लिम समाजातील आदरणीय व्यक्ती, अत्यंत विद्वान प्रकांड पंडित म्हणून ओळखला जाणारा माणूस, पुरोगामी विचारांचा खंदा पुरस्कर्ता अशी त्यांची ओळख सांगता येईल.
डॉक्टर झाकीर हुसेन यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८९७ रोजी अफगाण-मुसलमान कुटुंबात सध्याच्या तेलंगणातील हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील वकील होते. हुसेन यांना अत्यंत लहान वयामध्ये आपल्या वडिलांचा मृत्यू पहावा लागला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांना पोरके करून त्यांचे वडील हे जग सोडून गेले.
झाकीर हुसेन यांच्यावर गांधीजींचा मोठा प्रभाव होता. गांधीजींच्या राजनैतिक जीवनाची सुरुवात खिलाफत चळवळीपासून झाली होती, जी भारतीय मुस्लिमांनी तुर्कीचे साम्राज्य इंग्रजांपासून वाचावे आणि खलिफा या पदाची पुनर्स्थापना व्हावी म्हणून सुरू केलेली होती.
भारतातील मुस्लीम लोकांमध्ये त्यावेळी दोन गट पडले होते त्यापैकी एक परंपरावादी मुस्लीम लोकांचा गट होता ज्यांना इंग्रजांचे साम्राज्य भारतीय मुसलमानांसाठी धोक्याचे वाटत होते.
दुसरा एक सुधारित पुरोगामी मतप्रवाह असणाऱ्यांचा गट होता ज्यांना इंग्रज भारत सोडून निघून जावे आणि भारताला स्वतःचे राजकीय स्वातंत्र्य मिळावे असे वाटत होते.
थोडक्यात परंपरावादी मुसलमान लोकांना भारतामध्ये जुने मुस्लिम शासन यावे असे वाटत होते, त्यासाठी त्यांचा इंग्रजांना विरोध होता. दुसरीकडे जो उदारमतवादी मुस्लिम लोकांचा गट होता त्यांना ही कल्पना आता अशक्य आहे हे कळत होते. इथून पुढे भारतामध्ये लोकशाहीचा उदय व्हावा आणि भारताला स्वतःचे असे राजकीय मत आणि शासन प्रणाली असली पाहिजे असे या गटाचे म्हणणे होते.
गांधीजींनी ही गोष्ट हेरली आणि खिलाफत चळवळीला पाठिंबा म्हणून असहकार चळवळ सुरू केली याच्या पाठीमागे त्यांची दूरदृष्टी अशी होती की जे मुस्लीम आहेत त्यांना इंग्रजांविरुद्धच्या लढाईमध्ये एकत्र सामील करून घ्यायचे.
गांधीजींनी जे असहकार चळवळ सुरू केले त्याला सहाजिकच भारतातील मुस्लिम समाजाचा मोठा पाठिंबा लाभला. तिथूनच मोठ्या प्रमाणात मुस्लिम तरुण गांधीजींकडे आकर्षित व्हायला सुरुवातही झाली.
तुर्कस्तानविरोधात सुरू झालेल्या खिलाफत चळवळीला पाठिंबा देण्यासाठी असहयोग आंदोलन सुरू झाले. नंतर या आंदोलनामध्ये पंजाब आणि बंगाल प्रांतामध्ये इंग्रजांनी जी जुलमी राजवट चालवली होती त्याचा विरोध करण्याचा कार्यक्रम देखील जोडण्यात आला.
स्वराज्य शब्दाचा वापर प्रथमतः याच असहकार चळवळीमध्ये केला गेला. या आंदोलनाच्या माध्यमातूनच गांधीजींनी स्वदेशीचा पुरस्कार केला.
स्वदेशी शिक्षणाचा देखील पुरस्कार केला. याअंतर्गत इंग्रजांनी लादलेले शिक्षण झुगारून द्या, इंग्रजांच्या नोकऱ्या, इंग्रजांच्या पदव्यांचा त्याग करा असेही आवाहन केले गेले.
गांधीजींच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोर यांनी स्वतःला मिळालेली सर ही पदवी परत करून टाकण्याचे जाहीर केले. स्वतः गांधीजींनी त्यांना इंग्रजांकडून मिळालेली कैसर-ए-हिंद ही उपाधी सोडून दिली.
गांधीजींच्या हाकेला प्रतिसाद देऊन देशभरातील अनेक लोकांनी सरकारी नोकरीचा त्याग केला, स्वतःचे शिक्षण देखील सोडून दिले याच्यामध्ये झाकीर हुसेन यांचाही समावेश होता. या आंदोलनाअंतर्गत जवळजवळ तीस हजार लोकांना अटक करण्यात आली, अनेक ठिकाणी इंग्रजांचे प्रतिकात्मक पुतळे पेटवले गेले.
लोकांनी रस्त्यावर येऊन निदर्शने केली. ५ फेब्रुवारी १९२२ रोजी उत्तर प्रदेश मधील चौरीचौरा या गावी लोकांनी पोलीस चौकी पेटवली आणि त्याच्यामध्ये २२ इंग्रज अधिकारी ठार झाले जेव्हा ही गोष्ट गांधीजींना कळली तेव्हा त्यांनी ही असहकार चळवळ मागे घेतली.
परंतु या आंदोलनाचा एक उद्देश मात्र सफल झाला तो म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाज इंग्रजांविरुद्धच्या लढाईमध्ये रस्त्यावर पहिल्यांदा उतरले. या आंदोलनाचा दुसरा एक परिपाक म्हणजे अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटीच्या विरोधात देशातील मुस्लिम समाजाने सुरू केलेली जमिया मिलाया इस्लामिया हे स्वदेशी ढंगाचे शैक्षणिक संस्थान.
गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्यानंतर डॉक्टर झाकीर हुसेन हे जर्मनीला आपली अर्थशास्त्रामधील डॉक्टरेट मिळवण्यासाठी गेले परंतु त्यांच्या डोक्यात जामिया मिलियाचा विषय कायम राहिला.
इकडे असहयोग आंदोलन बंद झाल्यानंतर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे सगळे आर्थिक स्त्रोत बंद झाले. सुरुवातीला या विद्यापीठाला खिलाफत चळवळीच्या माध्यमातून पैसा पुरवण्यात येत असे. परंतु ही चळवळ बंद पडल्यानंतर विद्यापीठाचे आर्थिक स्त्रोत देखील बंद पडले.
दुसरीकडे अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटीला जामिया मिलियाचे अस्तित्व नको होते. त्यांनीही आपल्या परीने जामिया मिलियाच्या आर्थिक मुसक्या आवळायला सुरुवात केली. या सगळ्या गोंधळामध्ये विद्यापीठ बंद पडण्याची वेळ आली.
शिक्षकांचे पगार देखील वेळेवर होत नव्हते. विद्यापीठाला कोणी कुलगुरूही नव्हता. अशा परिस्थितीत गांधीजींनी मात्र हे विद्यापीठ वाचावे म्हणून प्रयत्न सुरू केले. देशातील मुस्लिम समाजाने सुरू केलेले हे विद्यापीठ चालावे म्हणून भीक मागण्याची वेळ आली तरी बेहत्तर परंतु आपण हे विद्यापीठ वाचवू असा त्यांना विश्वास होता.
गांधीजींनी या संदर्भात झाकीर हुसेन यांच्याकडे मदत मागितली. झाकीर हुसेन यांनी जामिया मिलियाचे कुलगुरूपद स्वीकारण्याचे कबूल केले. त्यावेळी कुलगुरूसाठी मासिक पगार ठरला होता १५० रुपये, परंतु झाकीर हुसेन यांनी फक्त ८० रुपये वेतन स्वीकारले आणि आपले काम सुरु केले.
जे शैक्षणिक संस्थान डबघाईला आले होते त्याला चालवण्याची जबाबदारी झाकीर हुसेन यांनी उत्तम प्रकारे पार पाडली. १९२५ पासून जवळ-जवळ २१ वर्षे झाकीर हुसेन जामिया मिलियाचे कुलगुरू राहिले.
त्या काळात त्यांनी हे संस्थान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देईल हे पाहिले. विद्यापीठाला आर्थिक मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केले, सरकार दरबारी विद्यापीठातर्फे भांडणारा सशक्त प्रतिनिधी म्हणून त्यांनी भूमिका निभावली. अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटीचा विरोध देखील त्यांनी मोडीत काढला.
झाकीर हुसेन यांच्या अनुशासनाची झलक अनेक वेळा विद्यार्थ्यांना बघायला मिळत असे. त्यावेळी जामिया मिलिया विद्यापीठांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने व्यवस्थित गणवेश आणि चकचकीत बूट घालून आले पाहिजे असा आदेश झाकीर हुसेन यांनी काढलेला होता परंतु त्याचे पालन कोणीही करत नव्हते.
हे पाहून एक दिवस स्वतः झाकीर हुसेन विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापाशी बूट पॉलिशचे साहित्य घेऊन बसले आणि तिथून येणार्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बुटाला त्यांनी स्वतः पॉलिश केली होती.
आता इतका मोठा कुलगुरुपदी विराजमान असलेला माणूस आपले बुट पॉलिश करतोय हे बघून अनेक विद्यार्थ्यांना आपल्या चुकांची जाणीव झाली आणि त्यानंतर विद्यापीठांमध्ये नेमून दिलेला ड्रेस कोड आहे तो सगळे विद्यार्थी पाळू लागले.
ज्या अलिगड मुस्लिम विद्यापीठाने त्यांना इतका विरोध केला होता त्या विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषवण्याची संधी त्यांना १९४८ साली मिळाली.
त्यानंतर ते राज्यसभा सदस्य देखील झाले. त्यांची गुणवत्ता बघून त्यांना युनेस्कोवर देखील काम करण्याची संधी मिळाली.
१९६७ साली काँग्रेस पक्षातर्फे त्यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकून त्यांनी भारताचे तिसरे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
झाकीर हुसेन यांच्या झळाळत्या कार्याकडे नजर टाकली तर निश्चितपणे भारतातील मुस्लिम समाजाला आज अशा व्यक्तिमत्त्वाची गरज आहे हेच प्रकर्षाने जाणवते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.