आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
दर रविवारी 12 वाजता “अद्भुत अगम्य साहस की परिभाषा है…” कानी पडलं की देशभरातील लहान मुलं दुपारचं जेवण घेऊन टीव्हीसमोर बसायचे. शक्तिमानच्या रूपाने भारताला पहिला स्वतःचा सुपरहिरो भेटला आणि तिथून पुढे लहान मुलांसाठीच्या मालिका बनण्याचा ओघही सुरू झाला. याच मालिकेच्या निर्मितीबद्दलच्या काही रंजक गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.
शक्तिमानची भूमिका करणारे मुकेश खन्ना हेच या मालिकेचे निर्माते आहेत आणि ही कल्पना सुद्धा त्यांचीच आहे.
मुकेश खन्ना यांचं नाव घराघरात पोहोचलं ते त्यांनी महाभारत या आणखी एका प्रसिद्ध मालिकेत साकारलेल्या भीष्म पितामहच्या पात्रामुळं.
त्याआधी त्यांनी मुख्य भूमिका साकारलेले चार चित्रपट प्रदर्शित झाले होते पण ते चारही फ्लॉप ठरले. त्यानंतर गुफि पेंटल यांनी त्यांना महाभारतात काम करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि त्यांचं आयुष्य बदललं.
त्यांनतर त्या पात्राच्या आठवणीत त्यांनी स्वतःच्या कांपनीचं नाव “भीष्म एंटरटेनमेंट” ठेवलं, आणि त्या कंपनीचा पहिला प्रोजेक्ट ठरला “शक्तिमान”.
प्रसिद्ध अभिनेते राज बब्बरसोबत गप्पा मारत असताना ही कल्पना त्यांना सुचली, की आकाशात कुठूनही कुठं जाऊ शकेल असा सुपरहिरो असावा. मग यावर आधारित चित्रपट यावा असा त्यावेळी त्यांचा प्लॅन होता. पण राज बब्बर यांच्या चित्रपटांच्या तारखा लांबल्यामुळे ते शक्य झालं नाही.
काही महिन्यानंतर मुकेश खन्ना यांना दूरदर्शन मधून एक मालिका करण्याची संधी चालून आली. त्यासाठी त्यांनी पुन्हा या उडणाऱ्या हिरोची कथा सादर करायचं ठरवलं. ही कल्पना तशी खुप खर्चिक होती. त्यावेळी दूरदर्शन सोडून दुसरा कुठला सिरीयल दाखवण्याचा आणि त्यातून कमाई करण्याचा मार्गही नव्हता.
तरी कथेच्या प्रेमापोटी मुकेश खन्ना यांनी हा खर्च करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ही मालिका लहान मुलांसाठी असताना पण त्यांना रविवारचा स्लॉट भेटत नव्हता आणि इतर दिवशी लहान मुलं दुपारी शाळेत असतात. म्हणून शनिवारी रात्री ही मालिका दाखवली जाऊ लागली, ही नॉन प्राईम वेळ पण शक्तिमानच्या प्रसिद्धीमूळे प्राईम वेळ झाली.
कमी वेळेतच मालिकेची प्रसिद्धी वाढली. प्रेक्षकांची पत्रं मुकेशजींकडे येऊन धडकू लागली, सगळ्या पत्रात मालिकेची वेळ बदलावी अशी विनंती असायची. शेवटी वाढता प्रेक्षकवर्ग बघून शक्तीमानला रविवार दुपारची वेळ भेटली आणि मालिकेची प्रसिद्धी अजूनच वाढली. सलग सात वर्ष ही मालिका सर्वोत्तम टी आर पी सोबत सुरू राहिली.
मग असं सगळं व्यवस्थित चालू असताना मालिका बंद पडली. मुख्य खलनायक “किलविष”ला शक्तिमानने मारायच्या आधीच मालिका का थांबली? असा प्रश्न भारतभर पसरला. याबद्दल अफवा, बातम्या, तर्क असं सगळंच उधाण आलं.
शक्तिमान मालिका बघून लहान मुलं इमारतीवरून उड्या मारताय, शक्तिमान वाचवायला येईल म्हणून आग लावताय, अशा सगळ्या गोष्टींमुळे मालिका बंद करावी लागली अशा अफवा जास्त पसरू लागल्या.
मुकेश खन्ना यांच्या काही मुलाखतीत त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलंय. त्याकाळी UNI नावाच्या एका न्यूज चॅनलने याबद्दल खूप कहाण्या रचल्या. तेव्हा मुकेश खन्ना यांनी यागोष्टींमधलं तथ्य शोधण्यासाठी एका खाजगी गुप्तहेर यंत्रणेला कामाला लावलं. त्यांच्या संशोधनार्थी असं कळालं की यातली कुठलीच गोष्ट खरी नाही.
कुठल्याही कारणाने लहान मुलांचे अपघात झाल्यास मालिकेच्या प्रसिद्धीमुळे शक्तिमानचा परिणाम अशी बातमी व्हायची आणि न्यूज चॅनल्स स्वतःच्या फायद्यासाठी विषयाला हवा द्यायचे. यासंबंधी न्यायालयीन खटला ही चालला ज्यात मुकेश खन्नाची बाजू दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडली होती.
ज्याचा निर्णय अर्थातच मुकेश खन्नाच्या बाजूने लागला. तेव्हा वर्तमानपत्रात लिहून आलं की “Shaktiman is not guilty”.
या अफवांमुळे शक्तिमान मालिकेच्या टी आर पीमध्ये उलट वाढ झाली. पण मालिका बंद व्हायचं कारणही आर्थिकच होतं. त्याकाळी डी डी नॅशनल मालिका त्यांच्या चॅनलवर दाखवायची फिस घेत असे. शनिवारी साडेतीन लाख आणि रविवारी शो मिळाले तेव्हा साडेसात ते दहा लाख रुपये द्यावे लागत.
जाहीरातींतून मिळणारे पैसे ही कमाई. ही वाढणारी फिस आणि कमाई यांची सांगड घालणं शक्य होत नव्हतं. निर्माते आणि चॅनल यांच्यात बरीच बोलणी चालली. जवळ जवळ एक वर्ष लांबलेल्या चर्चेतून काहीच निष्पन्न होत नव्हतं. त्यात फिस वाढवून सोळा लाख करणार अशी बातमी मुकेश खन्ना यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांना मालिका बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
मुख्य खलनायक हरवण्याच्या आधीच शक्तिमान निघून गेला. 1997 पासून 2005 पर्यंत ही मालिका चालली. 2018 मध्ये शक्तिमान नवीन अभिनेत्याला घेऊन पुन्हा सुरू करण्याबद्दल मुकेशजींनी माहिती दिली होती. पण अजूनतरी तस काहीच ठोस चित्र दिसत नाहीए, पण प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि आर्थिक फायदा यांच्या दबावात ही मालिका पुन्हा नव्याने बनेल हे नक्की.
या पात्राच्या प्रसिद्धीला बघून याच कथानकाला “sonic” चॅनलवर ऍनिमटेड माध्यमातुनही दाखवण्यात आलं. काही कॉमिक्स स्वरूपातली पुस्तकं ही आली. देश विदेशात या मालिकेबद्दल आणि मुकेश खन्ना बाबत लिहूनही आलं.
ही मालिका एवढी प्रसिद्ध होण्यामागचं कारण काय? असं विचारलं तर फक्त पहिला भारतीय सुपरहिरो असं म्हणणं, मालिकेला कमी लेखण्यासारखं असेल. आजही एवढ्या चॅनल्सवर एवढे पैसे ओतून लहान मुलांना टार्गेट करून मालिका बनवल्या जातात तरी कुठलंच पात्रं एवढं प्रसिद्ध होत नाही.
याचं एक कारण मला असं वाटतं की लहान मुलांसाठी काहीतरी बनवताना “ते लहानच आहेत ना” या अविर्भावात सगळं काम केलं जातं. आजच्या जगात मोठ्यांपेक्षा लहानांची कल्पनाशक्ती, तंत्रज्ञानाबद्दलची साक्षरता, जगाचं ज्ञान हे तुलनेने जास्त गतीने वाढतंय. मात्र मालिका बनवताना अजूनही त्यांना काहीच कळत नाही अशा पद्धतीने, क्रोमा लावून सोपी ऍनिमेशन, अतिसामान्य अभिनय, हलका फुलका विषय, छोटे संवाद, विनोदाची गर्दी असं सगळं केलं जातं.
शक्तिमानचे निर्माते याबाबत खूप सजग होते. ओपनिंग क्रेडिटमध्ये “अद्भुत अगम्य साहस की परिभाषा है, ए मानवता की आशा है” एवढे अवघड शब्द घेण्याचं धाडस आजही कोणी करत नाही. यातले विनोद आणि संवाद मेलोड्रॅमॅटीक असले तरी उथळ नाहीत.
शरीर, आत्मा, सत्य, न्याय, पंचमहाभूत, अवकाश अशा काहीशा अवघडपणाची त्याला फोडणी होती. यामुळं कुठल्याही लहान मुलाला “मोठी लोकं करतात ते करायचंय” या त्यांच्या आंतरिक प्रेरणेला एक चित्रभाषा भेटली. ते स्वतः ला लहानपणीच शक्तीमानमध्ये न बघता, ते मोठे झाल्यावर असं तत्वनिष्ठ, मदत करणारे बनतील अशी त्यामागची प्रेरणा असायची.
मालिकेतील सगळ्यांचे अभिनय उत्तम होते. मालिकेतले ऍक्शन सीन्स प्रसिद्ध ऍक्शन डिरेक्टर श्याम कौशल यांनी केलेत. त्यानंतर त्यांनी ‘क्रीश’ पासून ‘गँँग्ज ऑफ वासेपुर पर्यंत’ कित्येक महत्वाच्या चित्रपटात काम केलं.
प्रत्येक एपिसोडच्या शेवटी शक्तिमान लहान मुलांना प्रबोधनपर असं काहीतरी सांगायचा, यामुळे पालकांचं काम कमी व्हायचं, मुलांना ते स्वतःहून ही मालिका बघ असं संगायचे, जे आज कुठल्याच मालिकेबद्दल ते सांगू सांगू शकत नाहीत.
स्वतः मुकेश खन्ना यांनी वैयक्तिक आयुष्यातही काही पथ्य पाळली. त्यांनी कधीही खलनायकाची भूमिका केली नाही, कुठल्याच पार्टीत गेले नाही, निर्व्यसनी राहिले, स्वतःच चारित्र्य खरंच शक्तिमान असल्याप्रमाणे जपलं. त्यांनी शक्तिमानला एवढ्या गांभीर्याने घेतलं म्हणून ही मालिका एवढी जास्त यशस्वी ठरली.
आता कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात ही मालिका पुन्हा डी डी नॅशनलवर रोज 1 वाजता दाखवली जात आहे. तुम्ही नक्की बघत असालच, तुमाला या मालिकेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.