आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
काही वर्षांपूर्वी भारतात जन्म झालेल्या अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ या आयएमएफच्या डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर झाल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग जगतात टॉप पोझिशन मिळवणाऱ्या अनेक भारतीयांप्रमाणे या दोघांचेही नाव झाले. त्यांच्या या कामगिरीबद्दल अनेक भारतीयांना त्यांचा रास्त अभिमान आहे.
परंतु परदेशात जाऊन मानाचे स्थान भूषविणाऱ्या या मंडळींमुळे भारतावर काय परिणाम होतो? फायदा होतो की नुकसान? हा अनेक लोकांना पडणारा प्रश्न. त्याचे उत्तर जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.
सर्वप्रथम आपण थोडी आकडेवारी बघू. २०१६ पासून सुमारे सहा लाख भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडून दिले आहे. २०१४ पासून सुमारे २३ हजार मिलियनेयर्सनी देश सोडला आहे. श्रीमंत आणि सुशिक्षित लोक मोठ्या प्रमाणावर आपला देश सोडून चांगल्या संधींच्या शोधात परदेशात स्थायिक होत आहेत. भारत या बाबतीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.
वास्तविक पाहता आपल्या देशाची महाप्रचंड लोकसंख्या आणि आपल्याकडे असलेली नैसर्गिक बुद्धिमत्ता यांचा विचार करता अशा प्रकारे बुद्धीजीवी वर्गाचे स्थलांतर होणे ही खरे म्हणजे फार मोठी समस्या असू नये. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे आपले प्रसिद्ध वचन. पण आता मात्र ही समस्या उग्र रूप धारण करते की काय असे वाटू लागले आहे. मोठ्या प्रमाणावर देशातील बुद्धिमान, सुशिक्षित तरुण वर्ग परदेशाकडे आकर्षित होणे हे देशाला संकटात टाकणारे ठरू शकते, अर्थचक्राची गती मंदावू शकते.
सत्तरच्या दशकात भारतामध्ये ‘ब्रेन ड्रेन’ या शब्दाने धुमाकूळ घातला होता. या शब्दाचा अर्थ मानवी किंवा मानवरूपी भांडवल घटणे. सामान्य माणसाच्या भाषेत, चांगल्या संधींसाठी विकसनशील देशांकडून विकसित देशांकडे होणारे कुशल मनुष्यबळाचे स्थलांतर म्हणजे ब्रेन ड्रेन. हे होण्याची अनेक कारणे आहेत. पण यातली महत्त्वाची कारणे म्हणजे राजकीय अस्थिरता, संधींची कमतरता, संघर्ष, आणि आरोग्य विषयक समस्या.
याच्या विरुद्धार्थी शब्द आहे ब्रेन गेन. म्हणजे देशात होणारे कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचे स्थलांतर. थोडक्यात ब्रेन ड्रेनमुळे आपल्याकडील कुशल, बुद्धिमान आणि प्रशिक्षित मनुष्यबळ देशाच्या बाहेर जाते, तर ब्रेन गेनमुळे असे मनुष्यबळ आपल्या देशात येते. सहाजिकच पाश्चिमात्य राष्ट्रांना ब्रेन गेनमुळे बराच फायदा झालेला आहे.
१९७० च्या दशकात भारतातील अनेक तरुण बुद्धिमान विद्यार्थ्यांनी उत्तम दर्जाच्या महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण तर घेतले, पण त्यांना त्या शिक्षणाच्या प्रमाणात पुरेसा पैसा देणाऱ्या संधी परदेशात जास्त गवसल्या. त्यामुळे त्यांचा ओढा परदेशात जाण्याकडे वाढू लागला.
परदेशात गेलेले हे तरुण मोठ्या प्रमाणावर तिकडेच स्थायिक झाले. हा तोच काळ होता जेव्हा भारताला अशा प्रकारच्या गुणवत्तेची सगळ्यात जास्त गरज होती. देश स्वतंत्र असला तरी अजूनही तो पुरेसा स्वबळावर उभा राहू शकेल इतका सक्षम झाला नव्हता. त्यात भारतातील बौद्धिक वैभवाला लागलेल्या गळतीमुळे भारताच्या वाढीच्या गतीला खेळ बसल्यासारखी झाली.
१९९१ च्या अर्थक्रांतीने या गोष्टी काही प्रमाणात बदलल्या. देशात उच्च शिक्षण देणाऱ्या प्रतिष्ठित संस्था आणि मल्टिनॅशनल कंपन्या यांचे पेव फुटले. देश सोडून बाहेर गेलेले अनेक तरुण भारताकडे परतू लागले आणि त्याचबरोबर परकीय चलनही. यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीला चांगलीच गती मिळाली. पण हे सर्व औटघटकेचे ठरले. याचे कारण १९९० मध्ये जवळपास सात मिलियन तरुण परदेशी गेले, तर २०१७ मध्ये ७० मिलियन लोकांनी परदेशाची वाट धरली. याचा अर्थ ब्रेन ड्रेन अजूनही सुरू आहे.
यामागचे प्रमुख कारण आहे पैसा. जिथे पैसा जास्त आहे त्याठिकाणी सहाजिकच हे लोक आकर्षित होतात. थोडक्यात मेंदू पैशामागे जातो, किंवा जिथे त्या मेंदूला किंमत दिली जाते तिथे जातो. साधे शिक्षण क्षेत्राचे उदाहरण घेतले तर भारताच्या तुलनेत अमेरिकेमध्ये शिक्षकांना मिळणारे वेतन सहा पटीने जास्त आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दुप्पट उत्पन्न मिळते तर मॅनेजमेंटमध्ये तिप्पट. याव्यतिरिक्त शिक्षण, चांगल्या दर्जाचे राहणीमान, उत्तम आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षा यासारख्या बाबीही महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक तरुण केवळ आपल्या देशाबाहेरचे जग बघण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी उत्सुक असतात. तेही देशाबाहेर जातात.
परदेशी जाणारे बहुसंख्य लोक तिकडेच स्थायिक होत असले तरी काहीजण मात्र हेतुपुरस्सर मायदेशात परततात ते मुख्यतः परदेशामध्ये त्यांना घरच्या सारखे किंवा कौटुंबिक वातावरण मिळत नाही आणि परतीची ओढ लागते म्हणून. पण बहुसंख्य भारतीय लोकांसाठी अनिवासी भारतीय हे बिरुद मिरवणे मानाचे आणि प्रतिष्ठेचे आहे, हे मात्र कटू सत्य आहे. आणि याचा परिणाम म्हणजे आपण रोप लावत आहोत आणि फळे मात्र अलगदपणे दुसऱ्याच्या ओंजळीत देत आहोत.
ज्या वयात या तरुणांकडे कल्पना, ताकद आणि कौशल्य हे सगळेच असते त्या वयात ते परदेशात जाऊन आपल्या गुणवत्तेचा फायदा त्या देशाला करून देतात आणि यातून भारताला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे तोटा सहन करावा लागतो. जरी ते परत आले तरी ते परत येतात त्यावेळी त्यांच्या कल्पना काळाच्या कसोटीवर उतरतीलच अशा नसतात. त्यामुळे परत आलेल्या या मनुष्यबळाचा देशाला म्हणावा तितका उपयोग होत नाही.
भारत हा जगातील सर्वात मोठा डॉक्टरांचा निर्यातदार देश आहे. आपल्याकडे एका बाजूला आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा मरणासन्न अवस्थेत असताना दुसरीकडे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर डॉक्टर्सनी परदेशी जाणे हा एक विचित्र विरोधाभास आहे. पण सध्यातरी हीच परिस्थिती आहे. जवळपास सर्वच क्षेत्रात थोड्याफार फरकाने हेच चित्र आहे. या समस्येचा गंभीरतेने विचार करून त्यावर त्वरित उपाययोजना करणे ही आपली प्राथमिकता असायला हवी. आपल्याला काय वाटते?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.