आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
आजच्या घडीला सबंध पृथ्वीवर शेकडो धर्म आणि त्यांचे पंथ आहेत. या प्रत्येक धर्मात कुठल्या न कुठल्या गोष्टींचा त्याग करायला सांगितला आहे. काही गोष्टी निषिद्ध मानल्या आहेत. पाप-पुण्याच्या संकल्पनेखाली काही गोष्टी पवित्र तर काही गोष्टी अपवित्र मानल्या गेल्या आहेत.
अनेकदा एका धर्मात एक गोष्ट पवित्र आहे तिला दुसऱ्या एखाद्या धर्मात अपवित्र मानले जाते. वेशभूषा, पोशाख आणि खानपान याबाबतही धर्माधर्मात वेगळेपण पाहायला मिळते. असे असले तरी या वेगवेगळ्या धर्मांतही काही बाबतीत साम्यही आढळून येते. प्रत्येक धर्मात दुसऱ्या धर्माशी सुसंगत किंवा निगडीत अशी एक तरी प्रथा-परंपरा असते.
खाण्यापिण्याच्या बाबतीत काही धर्मातील नियमांत साधर्म्य असल्याचे दिसते. जसे हिंदू धर्मात आणि जैन धर्मात कांदा आणि लसूण हे दोन घटक वर्ज्य करण्यास सांगितले आहेत. हल्ली कोणी या धार्मिक बंधनांना कोणी फारसे गांभीर्याने घेत नसले तरी, ज्यांचा आपल्या प्रथा परंपरांवर दृढ विश्वास आहे, असे लोक हे नियम काटेकोरपणे पाळतात.
परंतु या धर्मात कांदा आणि लसूण वर्ज्य करण्यामागे नेमकी काय कारणे असावीत?
विशेषत: आयुर्वेदात कांदा आणि लसूण यांच्यापासून दूरच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कांदा आणि लसणामध्ये नेमके असे कोणते घटक असतात किंवा यांचे असे काय गुणधर्म आहेत की यांना आपल्या आहारातून वर्ज्य करण्याचे सल्ले दिले जातात.
जैन धर्मात तर याबाबतचे नियम अगदीच काटेकोरपणे पाळले जातात. एखाद्या दुकानात तुम्ही बोर्ड पहिला असेल की, इथे जैन चटणी मिळते. जैन चटणी म्हणजे काय तर त्या चटणीत कांदा आणि लसून वापरलेला नसतो. जैन पावभाजी हाही त्यातलाच प्रकार!
काही हॉटेलमध्येही असे बोर्ड लावलेले आढळतात जिथे लिहिलेले असते, इथल्या जेवणात कांदा आणि लसणाचा वापर केला जात नाही. कांदा आणि लसूण यांना आहारात स्थान न देणारा वर्ग मोठा आहे.
विज्ञानातील वर्गवारीनुसार कांदा हा ॲलीएशस परिवारातील सदस्य आहे. कांद्याचे जे काही प्रकार आहेत ते सगळे याच कुळातील आहेत. आयुर्वेदाने खाण्याचे तीन प्रकार सांगितले आहेत – सात्विक, राजसिक आणि तामसिक. आपण यापैकी कुठले पदार्थ खातो त्यानुसार आपल्या स्वभावावर, वागण्यावर परिणाम होत असतो.
कांदा, लसूण आणि यांच्याच कुळातील इतर पदार्थामुळे आपल्या तामसिक आणि राजसिक गुणात वाढ होते. त्यामुळे आपल्यातील राग, लोभ, मत्सर द्वेष असे तामस गुण वाढतात.
सात्विक आहार घेतल्याने माणसातील सात्विक गुणांची वृद्धी होते. यामुळे अशा व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींनाही आनंद मिळतो. ज्या लोकांना सात्विक आहार घ्यायचा असतो ते लोक कांदा, लसूण यांना आपल्या आहारात अजिबात स्थान देत नाहीत.
वैष्णव पंथीय लोक जे राम, कृष्णाची भक्ती करतात त्यांना आपल्या अध्यात्मिक उन्नतीसाठी सात्विक आहार महत्वाचा वाटतो. त्यांना आहारात कांदा लसूण वर्ज्य असतो. सात्विक आहारात, ताजी फळे, भाज्या, दुध आणि दुधाचे पदार्थ, धान्य अशा पौष्टिक आहारावर जोर दिला जातो.
आयुर्वेदानुसार ज्यांना ध्यान, भक्ती आणि अध्यात्माच्या मार्गात उन्नती करायची आहे, ते कधीच कांदा आणि लसणाचे सेवन करत नाहीत. कांदा आणि लसूण यांचे अतिप्रमाणात सेवन करणारे कधीच भगवंताची प्राप्ती करू शकत नाहीत. असे लोक भगवंताचे भक्त होण्याच्या पात्रतेचेही राहत नाहीत, असेही आयुर्वेदाने म्हटले आहे.
भगवंताच्या प्राप्तीत येणाऱ्या अडथळ्यांना दूर सारायचे असेल तर, बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. यामध्ये कांदा आणि लसणापासून दूर राहण्याला महत्व दिले जाते.
कांदा आणि लसणामुळे भक्तीत आणि ध्यान करण्यात अडथळे येतात असे आयुर्वेद म्हणते. शरीरातील चेतना जागृती करण्याच्या कामात यामुळे अडथळा निर्माण होत राहतो. ध्यान करत असताना मेंदूची एकाग्रता कमी होते. ज्यामुळे आवश्यक ती प्रगती साधली जात नाही.
पाश्चिमात्य चिकित्सा पद्धतीत मात्र लसूण आणि या कुळातील इतर घटक आरोग्य वर्धक मानले जातात. या पद्धतीनुसार लसूण फारच गुणकारी आहे. लसणामध्ये नैसर्गिक प्रतिजैविके असतात. परंतु सध्या या चिकित्सापद्धतीत जे नवे संशोधन होत आहे, त्यातही लसूण आणि कांदा यांचे अतिरिक्त सेवन हानिकारक असल्याचे समोर आले आहे.
कच्चा लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरात बाटुलिज्म विषाणूंची वाढ होते. या विषाणूंची संख्या वाढल्यास आरोग्य बिघडू शकते. शरीर निरनिराळ्या आजारांचे माहेर घर बनू शकते. अध्यात्मिक मार्गात प्रगती करू इच्छिणाऱ्या लोकांच्या मते, लसूण आणि कांदा यामुळे आपल्या मज्जासंस्थेवरच परिणाम होतो.
लसूण आणि कांद्यामुळे कामोत्तेजना वाढते. कांदा खाल्ल्यानंतर काहीच वेळात वीर्याची गती वाढते. ज्यामुळे वासना बळावते. कांदा खाल्यानंतर जोपर्यंत याचा परिणाम आपल्या रक्तात असतो तोपर्यंत आपल्यातील कामोत्तेजना वाढलेली असते.
कांद्यातील उग्र दर्प आपल्या मानसिकतेवर परिणाम घडवून आणतो म्हणूनच कांदा चिरताना आपल्या डोळ्यातून पाणी येते.
पावसाळ्याच्या दिवसात तर कांद्याचे सेवन अजिबात करू नये असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. म्हणून काही जण या काळात चातुर्मासाचे पालन करतात. या दिवसात कांदा खाल्ल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो. अजीर्ण आणि कफाचा त्रासही होऊ शकतो. अशी बरीच करणे आहेत ज्यामुळे काही धर्मात कांदा आणि लसूण यांना वर्ज्य मानले जाते.
धार्मिक कार्यक्रम आणि व्रतवैकल्याच्या दिवशीही कांदा आणि लसूण वापरून जेवण बनवले जात नाही. आपली मन:स्थिती आपल्या आहारावर अवलंबून असल्याचे मानले जाते. मनस्थिती एकाग्र आणि स्थिर असले तर अध्यात्मिक प्रगती वेगाने साधता येते.
रोजच्या जीवनातही आपल्या मनस्थितीवरच आपला व्यवहार अवलंबून असतो. म्हणून मनावर लगाम घालण्यासाठीच हे पदार्थ वर्ज्य करण्यास सांगितले जाते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.