आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन”.भगवद्गीतेतील या श्लोकाला मनात ठेऊन काम करणाऱ्या व्यक्ती खूप कमी असतात. कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवताही आपलं काम तेवढ्याच तत्परतेने करणाऱ्या लोकांची अशीच खाण भारताला स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी भेटली.
लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडीत जवाहरलाल नेहरु, डॉ. राजेंद्र प्रसाद , नेताजी सुभाषचंद्र बोस आणि असे अनेक क्रांतिकारक भारताला स्वातंत्र्यलढ्यात मिळाले. यामध्ये एक नाव उठून दिसते ते म्हणजे स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं.
नेताजींच्या मृत्यूचं गुढ आजही कायम आहे परंतु त्यांच्या मृत्यूनंतरही अजून एक रंजक गोष्ट त्यांच्या आयुष्यात घडली आणि ती म्हणजे त्यांच्या कुटूंबियांनी नकारलेला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार. याच रंजक गोष्टीची पार्श्वभूमी आणि सत्यता आज आपण पडताळणार आहोत.
भारतरत्न पुरस्काराची सुरुवात करण्याचे श्रेय जाते ते तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांना. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली २ जानेवारी, १९५४ या दिवशी.
सुरुवातीला फक्त साहित्य, कला, विज्ञान आणि सामाजिक क्षेत्रांत दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराची व्याप्ती नंतर वाढवून देशसेवेसाठी केलेल्या कार्यापर्यंत करण्यात आली.
हा पुरस्कार देताना जात, धर्म, व्यवसाय, लिंग या पैकी कोणत्याही गोष्टींच्या आधारे भेदभाव केला जात नाही. हा पुरस्कार देताना फक्त त्या व्यक्तीने केलेल्या कार्याची दखल घेतली जाते.
या पुरस्काराचे पहिले मानकरी होण्याचा सन्मान भारताचे एकमेव गवर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी, भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि १९३० साली भौतिकशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या डॉ. सी. वी. रमण यांना जातो.
त्यानंतर १९५५ साली स्वातंत्र्यसेनानी भगवान दास, सर विश्वेश्वरैया, आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यानंतरच्या काळात भारतातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१९९१ साली भारतरत्न पुरस्कारासाठी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाचा विचार चालू होता. तशी तयारीही त्यावेळी कार्यरत असलेल्या पी. व्ही. नरसिंहराव सरकारने केलेली. परंतु नेताजींच्या कुटुंबियांनी हा पुरस्कार स्विकारण्यास नकार दिला असा खुलासा सरकारने जाहीर केलेल्या काही गुपित कागदपत्रांच्या आधारे सिध्द होतो.
यासंबंधी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांना १० ऑक्टोबर १९९१ रोजी एक पत्र लिहिलं आहे. राव यांनी लिहीलं होतं की,
“सुभाषचंद्र बोस यांनी देशाप्रती दिलेल्या अमुल्य योगदानाबद्दल आणि स्वातंत्र्यलढ्यात घेतलेल्या सक्रिय सहभागाचा सन्मान म्हणून त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याचा प्रस्ताव भारत सरकार मांडत आहे”.
हा पुरस्कार नेताजींच्या जन्मदिनी म्हणजेच २३ जानेवारीला दिला जावा म्हणून नरसिंह राव यांनी अजुन एक पत्र लिहिल्याची नोंद आहे. त्या नुसार २२ जानेवारी, १९९२ रोजी राष्ट्रपती भवनात सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली.
परंतु सुभाषचंद्र बोस यांची मुलगी अनिता बोस यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. पुरस्कार स्वीकारला तर नेताजींच्या आठवणीची उंची कमी होऊ शकते असं स्पष्टीकरण त्यांनी त्यावेळी दिलं.
अशा वेळी घोषीत केलेल्या भारतरत्न पुरस्काराचं काय करायचं हा प्रश्न तत्कालीन सरकारच्या पुढे उभा राहिला. तत्कालीन गृहमंत्र्यांनी या बाबतीत राष्ट्रपतींशी चर्चा केली. भारतरत्न परत घेण्याची कसलीही तरतुद त्या वेळी नव्हती. भारतरत्न सरकारच्या संग्रही ठेवता येत नाही म्हणून गृहमंत्रालयाने तो पुरस्कार स्वत: कडे ठेवण्याचा निर्णय घेतला. समारंभावेळी नाव पुकारत असताना नेताजींच्या नावाचा उल्लेख करुन त्या बद्दल अधिक काहीही माहिती दिली जाणार नाही असं गृहखात्याने त्या वेळी जाहीर केलं.
वेळ गेली तरी काही व्यक्तींच्या कर्तुत्वाची छाप अनेक वर्ष तशीच राहते आणि म्हणूनच १९९२ नंतर २०१४ मध्ये पुन्हा सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली. परंतु पुन्हा नेताजींच्या कुटुंबाने हा सन्मान घेण्यास नकार दिला. १९४५ मध्ये झालेल्या विमान अपघाताचा तपास करुन नेताजींच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न सरकारने करावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
२०१४ मध्ये नेताजींचे नातु चंद्रकुमार बोस यांनी दिलेलं वक्तव्य खालीलप्रमाणे-
“नेताजी १९४५ पासून बेपत्ता आहेत. जर तुम्ही “मरणोत्तर भारतरत्न” पुरस्कार देणार असाल तर त्यांच्या मृत्यूचं कारण आणि वेळ तुम्ही सांगायला हवी. पण याचा पुरावा कुठे आहे.?”.
चंद्रकुमार बोस यांच्या मते त्यांनी त्या वेळी नेताजींच्या ६० नातेवाईकांशी चर्चा केली होती. भारतरत्न पुरस्कारासाठी यापैकी एकही सदस्य उत्साहीत नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे. नेताजींच्या कर्तुत्वाचा योग्य सन्मान भारतरत्न पुरस्कार करु शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे.
नेताजींच्या कुटुंबाने २०१४ मध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेताजींच्या मृत्यूची तपासणी करण्यासाठी विशेष समिती नेमण्याची विनंती केली होती. नेताजींचे अजुन एक नातु, सुगतो बोस यांच्या मते, ” नेताजींना ४३ लोकांनंतर भारतरत्न कसं काय दिलं जाऊ शकतं.? त्यांना राजीव गांधींनंतर पुरस्कार कसा दिला जाऊ शकतो.? नेताजींच्या कर्तुत्वाची उंची भारतरत्नपेक्षाही जास्त आहे “.
अशा प्रकारे एका महान क्रांतीसेनानीला आता पर्यंत भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात भारत सरकार यशस्वी होऊ शकलं नाही.
पण काही व्यक्तींच्या कर्तुत्वाला पुरस्काराची गरज नसते याचं उत्तम उदाहरण म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भारतरत्न पुरस्काराची ही रंजक कथा आहे.
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” या श्लोकाचं जीवंत उदाहरण म्हणून नेताजी आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहेत एवढं नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.