आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
हिमालयाच्या कुशीतलं दुसरं सर्वात उंच शिखर नंदादेवी गेली पन्नास वर्षं पर्यटक आणि गिर्यारोहकासाठी प्रतिबंधीत क्षेत्र आहे. या मागचं कारण पर्यावरण असं दिलं जात असलं तरिही प्रत्यक्षात यामागचं कारण आहे चीन. आज चीननं जगभरात व्हायरस पसरवून धुमाकूळ घातलेलाच आहे मात्र पन्नास वर्षांपासूनची एक टांगती तलवारही नंदादेवीच्या रुपानं भारतावर चीनच्या क्रुर महत्त्वाकांक्षेमुळे आहे.
चमोलीमधील तपोवन हिमकडा कोसळल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे १९६५ साली झालेलं एक सिक्रेट मिशन ज्याच्या अपयशानं भारतावर आजही आहे धोक्याची टांगती तलवार!
जगातली महासत्ता बनलेला अमेरिका. जगावर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा आणि ती पूर्ण करण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाणारा देश. आशिया खंडातल्या चीननं मात्र साठच्या दशकापासूनच अमेरिकेच्या नाकी नऊ आणलं आहे. अमेरिकेच्या सामर्थ्याला टक्कर देणारा हा देश. ही टक्कर देण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची क्रुरता बाळगणारा. साठच्या दशकात चीननं केलेल्या अण्वस्त्र चाचण्या अमेरिकेला हादरवून टाकणार्या होत्या.
त्याकाळात दोन तुल्यबळ असणार्या महासत्ता म्हणजे अमेरिका आणि रशिया. या दोन देशात शीतयुध्द चांगलंच पेटलं होतं. त्यातच अमेरिकेला त्रास द्यायला व्हिएतनामची जास्तीची डोकेदुखी होतीच. एकूण अमेरिकेचे ग्रह काही बरे नव्हते. अशातच एक दिवस चीननं शांतपणे यशस्वी अण्वस्त्र चाचण्या केल्या. ऐन युध्दाच्या धामधुमीत अमेरिकेला चीननं जोर का धक्का शांतपणे दिला होता.
रशिया आणि व्हिएतनाममधे गुंतलेल्या अमेरिकेचं आशिया खंडाकडे थोडं दुर्लक्ष झालं होतं. याचाच फ़ायदा घेत चीननं या चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. चीनला महासत्ता बनण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा कायमच राहिली आहे. अमेरिकेला पायउतार करायला लावण्यासाठी चीन काहीही करू शकतो हे वेळोवेळी दिसून आलंच आहे.
चीनचा शेजारी असलेल्या भारताच्या सीमेवर कायमच अस्थिरता आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच चीन कधी आक्रमण करेल याची अनिश्चितता आहे. १९६२ च्या भारत-चीन युध्दात भारताला हरवल्याचा अनुभव ताजा असतानाच चीननं अण्वस्त्र चाचण्या केल्या. याने भारतालाही घाम फ़ुटला. खरं तर चीननं ना भारताला ना अमेरिकेला कोणालाच कसलाच इशारा दिला नव्हता.
आम्ही केवळ आमचं सामर्थ्य अजमावत आहोत इतकं जुजबी उत्तर देऊन चीन चाचण्या करून जो काय संदेश द्यायचा तो देऊन गप्प बसला होता.
चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेकडे कोणतंही नवीन अस्त्र नव्हतं आणि जुन्या मिसाईलच्या जोरावर तो अण्वस्त्रधारी चीनचा केसही वाकडा करू शकणार नव्हता. इकडे भारताची परिस्थितीही काही वेगळी नव्हती. अस्वस्थ झालेला भारत आणि हादरलेली अमेरिका यांनी हातमिळवणी केली. मात्र चीनला घाबरून अमेरिकेनं उचललेल्या या पावलामुळे भारत धोक्यात आला आणि हा धोका गेली पन्नासहून अधिक वर्षं टळलेला नाही.
या अण्वस्त्र चाचण्यानंतर चीन जगभरात ताकदवान देश म्हणून ओळखला जाऊ लागला. चीनची ही सामर्थ्यशाली प्रतिमा बनणं अमेरिकेसाठी धोकादायक होतं. चीनला लगाम लावण्याचा विचार अमेरिकेला दिवसरात्र छळू लागला आणि तेव्हाच १९६५ साली मिशन नंदादेवी हे एक गुप्त मिशन अमेरिका आणि भारत यांच्या संयुक्त विद्यमानं आखलं गेलं. चीनच्या परमाणू हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी हे मिशन आखण्यात आलं होतं.
अमेरिकन गुप्तहेर संघटना सीआयए आणि भारताची आयबी यांच्यात हातमिळवणी करण्यात आली. या गुप्त मिशनद्वारे एक न्युक्लिअर सेन्सिग डिव्हाईस बसविण्याचा निर्णय घेण्यात आला जेणेकरून चीनच्या हालचालींवर पाळत ठेवता येईल आणि चीनला चाप बसेल. हे डिव्हाईस ५६ किलो इतक्या भरभक्कम वजनाचं होतं आणि ते इंस्टॉल करण्यासाठी भारताचं दुसर्या क्रमांकाचं उंच नंदादेवी शिखर निवडण्यात आलं.
चीनच्या टेस्टींग ग्राऊंडवरून नंदादेवीचं अंतर १ हजार ४८५ किमी होतं. या न्युक्लिअर जनरेटरचं फ़्युएल असणार्या प्लुटोनियम कॅप्सुल्सना इनस्टॉल करायचं होतं. या कॅप्सुल्स जास्त प्रमाणात रेडिएशन्स निर्माण करणार्या होत्या, शिवाय अत्यंत धोकादायकही होत्या. असं सांगितलं जातं की यांची क्षमता हिरोशिमा, नागासाकीच्या अण्वस्त्र हल्ल्याच्या निम्म्या क्षमतेची होती.
१९६५ साली इंडो-अमेरिकन अशी एक टीम बनवली गेली जी या कॅप्सुल्स इन्स्टॉल करणार होती.
यासाठी त्यांना २४ हजार फ़ुटांची चढाई करावी लागणार होती आणि अर्थातच हे काम सोपं नव्हतं. याचा अंदाज असला तरिही या टीमला अंदाज नसलेलं असं भयानक हीम वादळ वाटेत गाठ पडलं. हे वादळ इतकं भयानक होतं की हा चमू पुढे सरकूच शकत नव्हता. पुढे जाणं म्हणजे मरण कवटाळणं होतं. अखेरीस या चमुला मिशन थांबविण्याविषयी विचार करावा लागला.
यावेलील टीम लिडर होते मनमोहन सिंह कोहली. टीम लिडर म्हणून हा निर्णय सर्वस्वी त्यांचा असणार होता. वादळाला न जुमानता पुढे जायचं तर टीम मेंबर मृत्युमुखी पडण्याचा धोका तर होताच शिवाय सोबतच्या कॅप्सुल्सही सुरक्षित स्थळी न जाण्याचा धोका होता. अर्ध्या वाटेत त्या गायब होणं जास्त धोक्याचं होतं. सर्व बाजूंनी विचार करता मिशन अर्धवट सोडून परत फ़िरणंच शहाणपणाचं होतं आणि हाच निर्णय मनमोहन सिंह कोहलींनी घेतला.
मात्र परत फ़िरत असतानाच सोबत ज्या कॅप्सुल्स होत्या त्यातील रेडिओ ॲक्टिव्हेशनमुळे प्रचंड उष्णता प्रसारण पावू लागली. आपल्यासोबत किती धोकादायक गोष्ट आपण घेऊन चाललो आहोत याची त्यांना कल्पना होतीच. परतीचा संपूर्ण प्रवास या कॅप्सूल्ससोबत करणं धोकादयक आणि मृत्यूला आमंत्रण देणारं होतं. म्हणून जवळच असणार्या एका सुरक्षित कॅम्पवरच या कॅप्सूल्स ठेवून मागे फ़िरण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
गेलेला सर्व चमू सुरक्षित परतला आणि पुढच्या वर्षी म्हणजे १९६६ साली ही मोहिम पुन्हा हाती घेण्यात आली. ज्या ठिकाणी कॅप्सूल्स ठेवल्या होत्या तिथे ही टीम पोहोचल्यावर त्यांना आढळलं की त्या कॅप्सूल्स तिथून गायब झालेल्या आहेत. यानंतर असंख्य अमेरिकन आणि भारतीय टीमना या कॅप्सूल्स शोधण्यासाठी या भागात पाठविलं गेलं. इंच इंच शोधूनही आजपर्यंत या कॅप्सूल्स आजतागायत सापडलेल्या नाहीत.
या गायब कॅप्सूल्समुळेच या पर्वताच्या आजूबाजूला असणार्या गावातील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ही कॅप्सूल इनस्टॉल करायला गेलेल्या टीममधील सदस्यांना कॅन्ससारख्या रोगाला बळी पडावं लागलं होतं. या कारणासाठीच नंदादेवीवर चढाईला बंदी घालण्यात आलेली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.