आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
प्रत्येक देशाची सेना ही त्या देशाची शान समजली जाते. जितकं प्रभावी सैन्यदल तितका जागतिक राजकारणात तुमचा दबदबा असतो. आपल्या देशाच्या सैन्यदलानं देखील जगभरात नाव कमावलेलं आहे. विशेषत: वायुसेनेनं.
८ ऑक्टोबर १९३२ रोजी स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय वायुसेनेची (आयएएफ) स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत आयएएफची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. आयएएफची क्षमता पाहता जगातील पहिल्या चार हवाई दलांमध्ये त्याचा समावेश होतो. सुखोई एसयू – ३० एमकेआय, राफेल, मिराज २०००, मिग -२०, तेजस, मिग -२१ यासारखी विमानं आणि अपाचे एएच-६४ई, सीएच-४७ चिनूक, ध्रुव, चेतक, चिताह, एमआय-८, एमआय-१७, रुद्रा, एमआय-२६, एमआय-२५/३५ या हेलिकॉप्टर्ससह कितीतरी क्षेपणास्त्रांनी भारतीय वायुसेना सुसज्ज आहे.
वायुसेनेच्या बळावर आपण आतापर्यंत शत्रूंना सडेतोड उत्तरं दिली आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विमानांच्या आणि हेलिकॉप्टर्सच्या अपघातांमुळं वायुसेनेच्या सैनिकसुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहेत.
डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या भीषण अपघातात भारतानं आपले पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ बिपीन रावत यांना गमावलं. या अपघाताला एक महिनाही होत नाही तोच पुन्हा राजस्थानमध्ये एका मीग-२१चा अपघात झाला होता.
२४ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानातील जैसलमेरमध्ये भारतीय हवाई दलाचं ‘मीग-२१ बायसन’ हे लढाऊ विमान कोसळलं. या अपघातामध्ये लखनऊचे रहिवासी असलेले विंग कमांडर हर्षित सिन्हा हुतात्मा झाले. मिग-२१चा हा वर्षातील पाचवा अपघात ठरला.
जेव्हापासून हे विमान भारतीय हवाई दलामध्ये सामील केलं गेलं, तेव्हापासून आतापर्यंत त्याचे ४०० पेक्षा जास्त अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. या अपघातांमध्ये आपण २०० हुन अधिक पायलट गमावले आहेत. आतापर्यंत सर्वात जास्त अपघातग्रस्त विमान म्हणून मीग-२१कडं पाहिलं जातं तरी देखील त्याचा वापर का होत आहे? सेवेत दाखल होऊन ६० वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटूनही अद्याप त्याला निवृत्त का नाही केलं? असे अनेक प्रश्न मिग-२१च्या बाबतीत उपस्थित केले जात आहेत. मात्र, त्याची ठोस उत्तरं अद्याप कुणाकडेही नाहीत.
मीग-२१ (Mikoyan-Gurevich) या विमानाची नाटोच्या रेकॉर्डमध्ये ‘फिशबेड’ अशी नोंद आहे. पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमधील Mikoyan-Gurevich डिझाईन ब्युरोनं या सुपरसॉनिक जेट इंटरसेप्टर विमानाची निर्मिती केलेली होती. १९५९ ते १९८५ या काळात या विमानांचं उत्पादन चाललं. त्यानंतर भारतासह अनेक देशांनी या विमानात अद्ययावत बदल करण्यात आले.
१६ जून १९५५ रोजी मिग-२१नं पहिलं उड्डाण घेतलं होतं. वैमानिकी इतिहासाचा विचार केल्यास हे विमान इतिहासातील सर्वाधिक उत्पादित सुपरसॉनिक जेट आहे. पहिलं सिंगल-इंजिन मिग-२१ विमान १९६३ साली भारतीय हवाई दलात आलं. तेव्हापासून आतापर्यंत विविध प्रकारांतील एकूण ८७४ विमानं हवाई दलामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
सोव्हिएत बनावटीचं हे सुपरसॉनिक फायटर जेट कित्येक वर्षांपासून हवाई दलाचा मुख्य आधार बनलं आहे. १९७० साली विमानात काही महत्त्वपूर्ण बदल करून त्याचं ‘मीग-२१ बायसन’, असं नामकरण करण्यात आलं. मिग-२१ बायसन्स २०२४ पर्यंत पूर्णपणे सेवेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी आणखी किती अपघात होणार आणि किती पायलट्सचे जीव जाणार याचा देखील विचार केला गेला पाहिजे.
मिग-21 लढाऊ विमानांच्या मोठ्या प्रमाणात अपघात होण्याचं एक कारण म्हणजे हवाई दलात दीर्घकाळ इतर लढाऊ विमानांची अनुपस्थिती. कित्येक वर्षे हवाई दलात नवीन लढाऊ विमानांचा समावेश केला गेला नव्हता. त्यामुळं संपूर्ण भार मिग-२१ वर राहिला.
याशिवाय १९८०, ९० आणि २००० दशकांच्या सुरुवातीला पायलट प्रशिक्षणासाठी फक्त सुपरसॉनिक मिग-२१ लढाऊ विमानं वापरली जात होती. याच काळात या लढाऊ विमानाचे अनेक अपघात झाले आहेत. आतादेखील प्रशिक्षणासाठी मिग-२१चा वापर जास्त केला केला जातो.
गेल्या पाच वर्षांत ५७ विमान अपघात झाले आहेत. ज्यामध्ये आयएएफ, नेव्ही, आर्मी आणि कोस्टगार्ड अपघातांचा समावेश आहे. त्यापैकी मीग-२१ बायसनचे सहा तर मीगच्या इतर व्हेरियंटचे ११ अपघात झाले आहेत.
आतापर्यंत मिग-२१चे सर्वात जास्त अपघात झालेले आहेत. असं असूनही आजही पायलट त्याला सर्वोत्तम फायटर जेट मानतात. आजही मिग-२१ सर्वोत्तम फायटर प्लेन आहे, ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी भारतीय वायु सेनेचे माजी प्रमुख बीएस धानोआ आणि आरकेएस भदौरिया यांनी स्वत: ही विमानं उडवली होती.
या विमानानं आतापर्यंत प्रत्येक यु*द्धात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान यु*द्ध आणि १९९९ सालच्या कारगिल यु*द्धात मिग-२१ नं पाकिस्तानचा पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. भारतीय हवाई दलाकडे मिग-२१ विमानांचे ४ स्क्वॉड्रन्स आहेत. स्क्वॉड्रन्समधील लढाऊ विमानांची एकूण संख्या १६ ते १८ पर्यंत असते. या अंदाजानुसार, हवाई दलाकडे ६४ मिग-21 विमाने उपलब्ध आहेत.
बालाकोट ह*ल्ल्यादरम्यान विंग कमांडर अभिनंदन यांनी याच मिग-21 विमानाचा वापर करून पाकिस्तानी हवाई दलाचं एफ-16 हे विमान पाडलं होतं.
मिग-२१ हे एकमेव विमान आहे ज्याचा वापर जगातील ६० हून अधिक देशांनी केला आहे. या विमानाचे आतापर्यंत ११ हजार ४९६ युनिट्स बनवण्यात आले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे १९८५ मध्ये रशियानं या विमानाचं प्रॉडक्शन थांबवलं असून त्याला निवृत्तीदेखील देण्यात आली आहे. रशियासह असे अनेक देश आहेत, ज्यांनी अनेक वर्षांपूर्वी मिग-२१ सैन्यातून निवृत्त केलं आहे.भारतात मात्र, आजही त्यांचा वापर केला जात आहे.
१९९० मध्ये मिग-२१ला निवृत्ती देण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. परंतु, आजपर्यंत ते अपग्रेड करून चालवलं जात आहे. अपग्रेड होऊनही त्याच्या अपघातांची संख्या घटलेली नाही. विविध अपघातांमुळं विमानाची प्रतिष्ठा खराब झाली आहे. २००६मध्ये रिलीज झालेला आमिर खानचा ‘रंग दे बसंती’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट, मिग-21 अपघातात आपला जीव गमावलेल्या आयएएफ पायलटच्या गोष्टीभोवती फिरतो. तेव्हापासून तर मिग-२१ अपघातांचा मुद्दा जास्तच प्रकर्षानं समोर आला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.