आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जगभरात गाढवांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे. असं म्हणतात की पुढील ५ वर्षात त्यांची संख्या अजून मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. आज जगभरात ४४ दशलक्ष गाढवं आहेत, यापैकी पाकिस्तान आणि आफ्रिकन देश या आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या देशात गाढवांचे वास्तव्य आहे.
चीन दरवर्षी तब्बल ५० लाख गाढवं या देशातून आयात करतो आणि त्यापासून औषधांची निर्मिती करतो. बऱ्याचदा संख्या कमी असल्यास तस्करी आणि चोरी करून गाढवं चीनला पाठवली जातात. याच कारणामुळे जगभरात गाढवांची संख्या कमी होत आहे.
चीनमध्ये एका पारंपरिक चिनी औषधाच्या निर्मितीसाठी अनेक प्राण्यांचा वापर केला जातो. या औषधांचा व्यापार तब्बल १३० अब्ज डॉलर्सचा आहे. अनेक प्रकारचे पशु-पक्षी, उदाहरणार्थ- साप, विंचु, कोळी आणि झुरळं यांचा वापर करून ह्या पारंपरिक औषधांची निर्मिती केली जाते. गाढवाचा वापर देखील अशा विशिष्ट औषधाच्या निर्मितीसाठी केला जातो.
गाढवाच्या चरबीपासून तयार होणाऱ्या जिलेटीन पासून एजियाओ हे औषध तयार करण्यात येते. चीनच्या प्राचीन वैद्यक शास्त्रानुसार हे औषध शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी दिले जाते. सांधेदुखी आणि लैंगिक समस्येवर देखील या जिलेटीनचे औषध वापरले जाते. हे औषध चॉकलेटसारखे पण कडक असते. त्यामुळे या औषधाला पाण्यात विरघळून घेतले जाते.
औषधाच्या निर्मितीसाठी गाढवांंना मारलं जातं आणि त्यांच्या मृत शरीराला एका केमिकलमध्ये ठेवण्यात येतं. काही काळाने त्यांचा मृत शरीरावरचे चामडे काढून त्याला गरम पाण्यात नीट उकळवलं जातं. या प्रक्रियेत गाढवाच्या त्वचेतून एक चिपकट पदार्थ बाहेर येतो, ज्याला एजियाओ म्हटले जाते. अनेक आजरांच्या उपचारासाठी आणि लैंगिक समस्येच्या निराकरणासाठी या औषधाचा वापर केला जातो. यामुळे चीनमध्ये याची मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
एका संस्थेच्या रिपोर्टनुसार २०१३ सालापासून २०१६ पर्यंत एजियाओचे उत्पादन ३२०० टन वरून ५६०० टन इतके वाढले आहे. उत्पादनात तब्बल २० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
वाढत्या मागणीमुळे चीनमध्ये १९९२ साली गाढवांची टंचाई निर्माण झाली, कारण तिथे उद्योग धंद्यात मोठी वाढ देखील झाली होती. यामुळे एजियाओ बनवण्यासाठी चीनने गरीब देशातून गाढवांची आयात करायला सुरुवात केली. गाढवांचा संवर्धनासाठी काम करणाऱ्या द डाँकी सँच्युरी या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात चीन दरवर्षी ५० लाख गाढवांची आयात करतो. यासाठी कायदेशीर आणि बेकायदेशीर दोन्ही मार्ग अवलंबले जातात.
पशु-पक्षांची खरेदीविक्री आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार अवैध असली तरी सुद्धा बेकायदेशीरपणे ढोबळमानाने चीन दरवर्षी ५० लाख गाढवांची आयात करत असावा अंदाज लावला जात आहे. औषधाची मागणी पूर्ण करण्यासाठी आफ्रिका, पाकिस्तान आणि ब्राझीलमधून गाढवांची आयात केली जाते. २००७ साली एकट्या ब्राझीलमध्ये गाढवांच्य संख्येत ३० टक्के घट आढळून आला होत. असं मानलं जातं, एवढं असून देखील अवैध तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे.
बऱ्याचदा एका देशातून दुसऱ्या देशात नेताना गाढवांचे निधन होते. याची संख्या तब्बल २० टक्के इतकी आहे. समुद्री यात्रेत गाढवांंना खायला काहीच दिलं जात नाही. जर कुठला आजार पसरला तर त्यांच्या देखभालीसाठी कुठला पशु चिकित्सक देखील नसतो. चीनमध्ये या गाढवांंना अतिशय वाईट परिस्थितीत ठेवलं जातं.
सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार चीनच्या मागणीला पूर्ण करण्यासाठी अगदी गर्भवती नवजात आणि आजारी गाढवांची तस्करी देखील केली जाते. गाढवांंना प्रजननासाठी सुदृढ होण्यात बराच काळ जात असतो, याच कारणामुळे त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
पाकिस्तानमधून दरवर्षी ८० हजार गाढवांची निर्यात केली जाते, पण सध्या कोरोनामुळे गाढवांची निर्यात मंदावली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.