आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मधुमेह हा आजार आता घराघरात जाऊन पोहोचला आहे. दोन पिढ्यांपूर्वी क्वचितच आढळणारा मधुमेह आता जवळपास प्रत्येक कुटुंबात घुसला आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे हा आजार कधी लहानांपासून वृध्दांपर्यंत येऊन पोहोचला याचा पत्ताही लागला नाही. भारतात या आजारानं चांगलेच हात पाय पसरल्यानंतर याचं चिंताजनक स्वरुप आरोग्य क्षेत्रात काम करणार्यांना समजलं आहे. रोजच्या जगण्यावर गंभीर परिणाम करणारा हा चोरपावलांनी येणारा आजार आहे.
२०२० आणि २०२१ साली आपण करोना नावाच्या महाकाय राक्षसासी लढलो आहोत. ज्यांना मधुमेह होता त्यांना या रोगानं मोठा तडाखा दिला हे आपण पाहिलं. लाईफ़मध्ये चिल मारणारे आणि आयुष्य हलक्यात घेणारे देखील आता सजग बनले आहेत. तरूण वयात मधुमेहाचा विळखा पडल्यानं खडबडून जागे झालेले आता कळवळून आदर्श जीवनशैलीचं महत्त्व सांगत आहेत. उत्तम आहार, विहार आणि नियमित व्यायाम ही त्रिसूत्री अंगीकारणार्याला मधुमेहापासून संरक्षण मिळू शकतं किंवा तशी शक्यता तरी असते.
डायबेटीस हा ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ आहे, पुढे जाणे मेलिटस हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ आहे गोड. मधुमेह हा शब्द ख्रिस्तपूर्व २५० पासून वापरात असून १८८९ साली मेरिंग आणि मिन्कोव्स्की यांनी मधुमेह होण्यात स्वादुपिंडाची भूमिका असल्याचे जाहीर केले. या आजाराच्या संशोधनात सर्वांत मोठी प्रगती १९२२ साली झाली.
बॅण्टिंग आणि त्यांच्या चमुने इन्सुलिन या हार्मोनचा शोध लावून मधुमेह बरा करण्यात याची महत्त्वाची भूमिका जगासमोर आणली.
मधुमेह नेमका काय आजार आहे?
मधुमेह हा चयापचयाशी संबंधित आजार असून यामुळे दीर्घकाळ रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढत रहाते. आपण जे काही अन्न खातो ते आपल्या शरीरातील यंत्रणा ग्लुकोजमधे रुपांतरीत करत असते. ग्लुकोज रक्तप्रवाहात प्रवेश करते आणि शरीरातील पेशी रक्तप्रवाहातून हे ग्लुकोज शोषून घेतात. पेशी जाळण्यासाठी आणि ऊर्जा मिळविण्यासाठी रक्तातील ग्लुकोज वापरली जाते.
इन्सुलिन हा असा संप्रेरक आहे, जो रक्तातील ग्लुकोजची पातळी आणि शरीरातील पेशींमध्ये त्याचे शोषण यावर नियंत्रण ठेवतो. स्वादुपिंडातील बीटा पेशी हे इन्सुलिन तयार करतात. जेव्हा शरीर इन्सुलिनला प्रतिरोधक बनते किंवा इन्सुलिनचे उत्पादन कमी होते तेव्हा रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण जास्त होते. यामुळे पेशींमध्ये ग्लुकोजचे शोषणही मंदावते.
या ग्लुकोजच्या बिघाडलेल्या तंत्रालाच आपण सामान्य भाषेत मधुमेह असे म्हणतो. रक्तातील ग्लुकोजची पातळी सामान्यपणे १२० mg/dl असते. जर हे प्रमाण १८० पेक्षा जास्त असेल तर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण आहात.
मधुमेहाचे सामान्यपणे चार प्रकार आहेत.
टाईप १– हा सामान्यतः लहान मुलांत आढळतो. शरीरातील इन्सुलिनच्या कमतरतेमुळे हा रोग होतो. अनुवांशिकता हे यासाठी मुख्य कारण मानलं गेलं आहे.
टाईप २– लठ्ठपणा, सक्रिय जीवनशैली किंवा अनुवांशिकता यामुळे या प्रकारातला मधुमेह होतो.
गरोदरपणातील मधुमेह– हा स्त्रियांना गर्भधारणे दरम्यान होतो आणि बाळाच्या जन्मानंतर तो निघुनही जातो. मात्र ज्या स्त्रियांना गर्भावस्थेतील मधुमेहाचा त्रास आहे अशांना पुढे आयुष्यात टाईप २ प्रकारातील मधुमेह होण्याच्या शक्यता असतात. गर्भधारणेदरम्यान वजन वाढणे, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही यामागची मुख्य कारणं आहेत.
MOYD– तरूणांत परिपक्वता सुरू होणारा हा मधुमेह आहे. हा मधुमेहाचा दुर्मिळ प्रकार आहे. हा वयाच्या पंचविशीपूर्वी आढळतो. ज्यांचं वजन जास्त आहे अशांना हा त्रास होऊ शकतो.
या साखरेच्या आजारावर नित्य संशोधन चालू असतं आणि याबाबतचे नवनविन खुलासे समोर येत असतात. भारत हा मधुमेही रुग्णांची सर्वांत जास्त संख्या असलेल्या देशांत गणला जातो. मद्रास येथील आयआयएमनं नुकतंच याबाबतीत एक संशोधन समोर आणलं असून मधुमेह आणि जनुकांचा/प्रथिनांचा संबंध स्पष्ट करुन सांगितला आहे.
ज्या जनुकामुळे मधुमेह होण्याचा शक्यता वाढतात त्या जनुकाला शोधण्यात या संशोधकांना यश आलेलं आहे आणि भविष्यात मधुमेह नियंत्रणात याचा मोठा उपयोग होणार आहे. यासाठी ४३०० लोकांचा अभ्यास करण्यात आला ज्यांपैकी १५ टक्के लोकांत ही जनुकं आढळून आली.
चिंतेची बाब ही आहे की भारतातील १५ टक्के जनतेत ही जनुकं आढळली आहेत. भारतात सहापैकी एकाला मधुमेह आहे. भारतात १०.१ करोड मधुमेही आहेत. दुर्दैवाने भारत हा जगाची “डायबेटिक कॅपिटल” म्हणून ओळखला जात आहे.
भारत हा मधुमेही रुग्णात जगातील दुसर्या क्रमांकावरचा देश आहे. २०४५ पर्यंत भारतातील १३.४ करोड लोक मधुमेही असतील असं संशोधन सांगतं. आकडे असं सांगतात की ५७ टक्के केसेस तपासणी अभावी समोरही येत नाहीत.याबाबतीत भारतासमोर सर्वांत मोठे आव्हान जागरुकतेचा अभाव हे आहे.
आयएमए मद्रासनं नेतृत्व केलेल्या एका आंतरराष्ट्रीय संशोधन पथकानं भारतीय आणि दक्षिण आशियायी लोकांमधील जनुकं/प्रथिनं मधील फ़रक ओळखण्यात यश प्राप्त केलेलं आहे, ही अशी जनुकं आहेत ज्यांमुळे मधुमेह, ह्रदविकार आणि उच्चरक्तदाब यांचा धोका वाढतो. या अभ्यासकांच्या मते दक्षिण आशियायी लोकांत ह्रदविकार आणि चयापचयसंबंधी आजारांचा धोका जास्त असतो. याला इतर बाबींसोबतच अनुवांशिकताही कारणीभूत असते.
संशोधकांनी शोध लावलेला पेप्टाईड काय आहे? हा प्रथिनांतला एक छोटासा भाग आहे. पॅनक्रिस्टॅटिन हा क्रोमोग्रॅनिन ए नावाच्या प्रथिनाचा एक छोटासा भाग आहे जो मानवासहित इतर सस्तन प्राण्यांमधेही आढळतो. हे रक्तातील ग्लोकोज/ग्लुकागॉन आणि सल्फ़ोनील्युरिया सारख्या औषधांच्या प्रतिसादात शरीरात इन्सुलिन सोडण्यास प्रतिबंध करते.
जेव्हा शरीरात पुरेशा प्रमाणात इन्सुलिन प्रसारीत होत नाही तेव्हा त्या असंतुलनामुळे टाईप १ मधुमेह होतो. टाईप २ मधुमेहात हे प्रसारीत पावलेलं इन्सुलिन शरीर वापरण्यास असमर्थ ठरतं. संशोधकांना साधारण १५ टक्के भारतीयात पॅनक्रिस्टॅटिन आढळून आलं. याच कारणामुळे भारत आणि आशियायी लोकांत मधुमेहाचं प्रमाण आढळतं.
आता मुख्य प्रश्न हा उद्भवतो की याला प्रतिबंध करणं शक्य आहे का? तर आजच्या घडीला तरी याचं उत्तर “नाही” असंच आहे. मग या शोधाचा मानवी आरोग्यासाठी उपयोग काय? तर ज्यांच्यात या प्रकारची जनुकं/प्रथिनं आढळतात त्यांना मधुमेह प्रतिबंधक उपाय चालू करता येणं शक्य होणार आहे आणि मधुमेह होण्यापासून बचाव करण्यात काही प्रमाणात का होईना यश येणार आहे. हा जनुकांत आढळणार असल्यानं जन्मलेल्या बाळाला भविष्यात मधुमेह होऊ शकतो याची शक्यता गृहित धरुन त्यानुसार जीवनशैलीतले बदल लहानपणापासूनच केल्यानं पुढे जाऊन यावर मात करता येणं शक्य होणार आहे. जगभरातील मधुमेहींची प्रचंड मोठी आकडेवारी बघता हा प्रतिबंधही लाभदायकच ठरेल यात शंका नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.