आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आज जगासमोर उभी असलेली सर्वात विक्राळ समस्या म्हणजे दहशतवाद! भारतासारखे काही देश दीर्घकाळापासून दहशतवादाचा सामना करत आहेत. मात्र, अमेरिका आणि युरोपीय देशांना मागच्या काही वर्षापर्यंत दहशतवादाची झळ पोहोचली नव्हती. त्यामुळे या प्रभावशाली देशांनी या समस्येची दखलंच घेतली नव्हती.
अमेरिकेसारख्या देशांनीच आपला शस्त्रास्त्रांचा बाजार विस्तारण्यासाठी दहशतवादाला खतपाणीच घातलं. मात्र, दहशतवाद्यांनी थेट अमेरिकेच्या सुरक्षा विभागाचं मुख्यालय असलेल्या ‘पेंटागॉन’वरच हल्ला केला, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीसारख्या देशांमध्ये दहशतवादी हल्ले झाले, त्यानंतर त्यांना या भस्मासुराच्या अस्तित्वाची तीव्र जाणीव झाली.
खरंतर दहशतवाद ही एक मानवी प्रवृत्ती; किंवा विकृती आहे. ही विकृती काही आत्ताच्या काळातच निर्माण झालेली नाही. संघटीत दहशतवादाचा उगम पहिल्या शतकाच्या सुरुवातीलाच झाला. रोमन राज्यकर्त्यांनी आपली पवित्र भूमी हिसकावून घेतल्याची प्रतिक्रिया म्हणून प्रथम काही ज्यू गटांनी एक राजकीय/ धार्मिक चळवळ सुरू केली.
अल्पावधीतच त्यांनी सर्व ज्यू लोकांवर आपली विचारसरणी जबरदस्तीने लादण्यास सुरूवात केली आणि रोमला मदत करणाऱ्यांचं शिरकाण सुरु केलं. ‘झीलॉट्स’ हे या रोमविरोधी चळवळीचं नाव. त्यांच्यापासूनच संघटीत दहशतवादाचा उगम झाला.
त्या काळात धर्म आणि राजकारण यांचा एकमेकांशी घनिष्ट संबंध होता. त्यामुळे ‘झीलॉट्स’ दहशतवादी हे केवळ रोमन साम्राज्याचे शत्रू न राहता ख्रिश्चन धर्माचेही कट्टर शत्रू बनले. ‘झीलॉट्स’ हा शब्द हिब्रू कनाई/कनाइम या शब्दापासून आला आहे. त्याचा अर्थ देवाचे कट्टर भक्त, अनुयायी असा होतो. ‘झीलॉट्स’ या ग्रीक शब्दाचा अर्थ अनुयायी, समर्थक असा आहे. एखाद्या विचार अथवा चळवळीचे कट्टर अनुयायी अशा अर्थाने ‘झीलॉट्स’ हा शब्द वापरला गेला आहे.
झीलॉट्स हे ‘सिकारी’ किंवा ‘खंजीरधारी पुरुष’ म्हणून ओळखले जायचे. सिकार हा एक लहान आकाराचा धारदार खंजीर होता. तो सहजपणे लपवता यायचा. होता. सिकारी अनुयायांनी गनिमी युद्धनीतीचा वापर केला आणि रोमन सैनिकांच्या, प्रशासकाच्या ताफ्यांवर छापे टाकले. सक्तीने कर वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले केले.
त्या काळात जगातलं सर्वात समर्थ साम्राज्य समजल्या जाणाऱ्या रोमन साम्राज्याशी टक्कर घेणारी शक्ती म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याचा झीलॉट्सचा प्रयत्न होता. त्या काळात रोमन साम्राज्याचा भौगोलिक विस्तार आणि सैन्यबळ यांचा जगभरात दबदबा होता.
सुरुवातीच्या काळात झीलॉट्स चळवळ प्राथमिक अवस्थेत असताना त्यांनी रोमन अधिपत्याखाली असलेल्या छोट्या छोट्या खेडेगावांवर हल्ले करण्याचं धोरण स्वीकारला. त्यांना फक्त त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायची होती. त्यांचा बीमोड करण्यासाठी रोमन राज्यकर्त्यांनी १२ हजारांचं सैन्य रवाना केलं.
या सैन्याने २ हजार झीलॉट्सना पकडून त्यांचा शिरच्छेद केला. या कारवाईमुळे झीलॉट्सचं मनोधैर्य ढासळेल; अशी राज्यकर्त्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात घडलं उलटंच. या रोमन हल्ल्याने झीलॉट्सना अधिक चिथावणी मिळाली आणि ते आणखी आक्रमक झाले.
झीलॉट्स चळवळीचा संस्थापक गॅलिलिया इथला जुडास हा होता. त्या काळात अनेक तरुण या आक्रमक विचारसरणीकडे आकृष्ट होऊन झीलॉट्स चळवळीत सहभागी होऊ लागले. मात्र, सर्वसामान्य ज्यू नागरिकांमध्ये झीलॉट्सबाबत फारशी आस्था नव्हती. झीलॉट्स ही गुन्हेगारी टोळी असून त्यांच्यामुळे ज्यू समाज आणि देश जगभरात बदनाम होत आहे, अशीच त्यांची भावना होती. अनेक देशांनी झीलॉट्स हे दरोडेखोर असल्याचंच मानलं होतं.
झीलॉट्स चळवळीतल्या लोकांना मक्काबी शहिदांच्या कथांबद्दल आकर्षण होतं. राष्ट्रातल्या पापांचा नाश करण्यासाठी बलिदान देण्याच्या त्यांच्या इच्छेला अनुसरून मक्काबी शहिदांच्या कथा प्रेरणादायी होत्या.
मक्काबी शहिदांचा मृत्यू हा लोकांच्या पापांचे प्रायश्चित्त म्हणून; एक यज्ञ म्हणून समजला गेला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना ईश्वराचा आशीर्वाद मिळाला अशी तत्कालीन धारणा होती. आपल्यावर इस्राएलच्या देवानेच राज्य केलं पाहिजे. त्यासाठी बलिदान दिलं तर देवाने मक्काबी शहिदांना मदत केली तशीच मदत यहुदींना रोमच्या विरोधात मिळेल; अशी झीलॉट्सची श्रद्धा होती.
सम्राट वेस्पाशियनचा मुलगा टायटस याने झीलॉट्सचा बंदोबस्त करण्यासाठी गिशलाकडे कूच केले आणि शहराला वेढा घातला. झीलॉट्स नेते सायमन आणि जॉन या दोघांनाही जेरुसलेममध्ये जाण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.
टायटसने जेरुसलेमही जिंकलं तेव्हा सायमन आणि जॉन दोघांनाही पकडण्यात आलं. टायटसच्या विजय मिरवणुकीत त्यांना साखळदंडांनी जखडून फिरवण्यात आलं. नंतर दोघांचाही शिरच्छेद करण्यात आला.
जेरुसलेमच्या विनाशानंतर झेलॉट्स आणि सिकारीचे अनुयायी तिथून परागंदा झाले आणि त्यांनी ‘डेड सी’वर असलेला मसाडा हा सागरी किल्ला ताब्यात घेतला. तिथे ते आणखी तीन वर्षे तग धरून राहिले. एलाझार बेन यायर या झीलोट नेत्याने रोमचा गुलाम होण्यापेक्षा मरण पत्करलं; असा संदेश देणारी अनेक जाहीर भाषणं दिली. त्यामुळे तब्बल ९६० लोकांनी सामूहिक आत्महत्या केली, असं एका कथेत नमूद करण्यात आलं आहे. यात तथ्य कितपत आहे, हे समजण्यासाठी मार्ग नाही.
राज्यकर्त्यांना शह देण्यासाठी सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण करणं, धर्म, पंथ किंवा विशिष्ट विचारधारेची ‘नशा’ सामान्य जनता आणि विशेषतः युवा वर्गामध्ये निर्माण करणं, सत्ता आणि संपत्तीची लौकीक; किंवा स्वर्ग, ईश्वरी कृपेची आमिषं दाखवून त्यांना हिंसेच्या मार्गावर यायला प्रवृत्त करणं हीच संघटीत दहशतवादाची कार्यपद्धती शेकडो वर्षांपूर्वीपासून चालत आली आहे आणि आज आपण कितीही सुशिक्षित आणि सुसंस्कृत झाल्याचा दावा करत असलो तरीही आजही तेच तसेच पुढे सुरु आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.