आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब
गोपालदास सक्सेना उर्फ कवी नीरज.
हिंदी काव्यातील प्रेरणा पुरुष, ख्यातनाम गीतकार, आणि आपल्या गीतातून प्रेमाची वेगळी परिभाषा मांडणारे साहित्यिक म्हणून सुपरिचित आहेत. कवी हरीवंशराय बच्चन यांच्यानंतर तरुण मनावर राज्य करणारे एक सिद्धहस्त कवी.
इतर कुठल्याही साधन-संपत्ती आणि प्रसिद्धीपेक्षा त्यांना आपल्या कवितेवर जास्त प्रेम होते. त्यांच्या गीतातून प्रकट होणारे मानवी प्रेम आणि करुणा, जीवनाचे विविध आयाम, सामाजिक सौहार्दाचे दृढ संकेत आणि गूढ मानवी संवेदना आपल्याला मोहात पडतात.
कवी नीरज यांच्या काव्यात एक अद्भुत अशी नशा आहे. त्यांच्या कविता वाचल्यानंतर त्यांनी लिहिलेली गीते ऐकल्यानंतर माणूस म्हणून आपण स्वतःवर आणि भोवतालावरही प्रेम करू लागतो. प्रेम आणि करुणा हीच तर त्यांच्या कवितेची मूळ प्रेरणा होती. ते अध्यात्मिक होते, धार्मिक होते पण धर्माच्या नावावर चालणारा द्वेष आणि व्यापार त्यांना पसंत नव्हता.
म्हणूनच तर ते लिहितात,
“अब तो मजहब कोई, ऐसा भी चलाया जाए
जिसमें इन्सान को, इन्सान बनाया जाए
आग बहती हैं यहाँ, गंगा में, झेलम में भी
कोई बतलाए, कहाँ जाकर नहाया जाए
मेरा मकसद है के महफिल रहे रोशन यूँ ही
खून चाहे मेरा, दीपों में जलाया जाए”
गोपालदास सक्सेना यांचा जन्म ४ जानेवारी, १९२५ रोजी युपीमध्ये (युनायटेड प्रोव्हिन्सेस ऑफ आग्रा अँड अवध) झाला. युपीमधील इटावा जिल्ह्यातील पुरवली गाव हे त्यांचे जन्मस्थान. सहा वर्षांचे असतानाच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यांना पुढील शिक्षणासाठी आपले गाव सोडून एटा येथे राहणाऱ्या आपल्या आत्याकडे जावे लागले. लहानपणापासूनच अनेक आव्हानांनी वेढलेल्या जीवनात त्यांनी कितीतरी चढ उतार पहिले.
१९४२ साली कशीबशी शाळा पूर्ण केली आणि दिल्लीमध्ये टायपिस्टची नोकरी पकडली. नोकरी करत करत त्यांनी पुढील शिक्षण सुरूच ठेवले. आई आणि भावंडांची जबाबदारी त्यांच्यावरच होती. नोकरी करत करत त्यांनी १९५१ साली बी. ए. आणि १९५३ साली पहिल्या श्रेणीत हिंदी साहित्यातून एम.ए. पूर्ण केले.
मेरठ कॉलेज येथे काही दिवस हिंदीचे अध्यापन केले. त्यानंतर ते अलिगढच्या धर्म साजन कॉलेजमध्ये हिंदीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि तिथेच कायमचे स्थयिक झाले.
त्यांनी अनेक कवीसंमेलनांतून आपल्या कविता सादर केल्या. कवी नीरज यांना ऐकण्यासाठी लोक उतावीळ होत असत. आपल्या काव्याने त्यांनी काव्यमैफिलींना चार चांद लावले.
कलकत्त्यात भीषण दुष्काळ पडला, तेंव्हा त्यांनी काव्यसंमेलनातून मिळणारा पैसा कलकत्त्यातील लोकांसाठी देऊन टाकला.
त्यांना कवीसंमेलनांत प्रसिद्धी मिळू लागली तसतसे चित्रपट गीतांसाठी त्यांच्याकडे विचारणा होऊ लागली. पण, ते कवीसंमेलनातच इतके व्यस्त असत की, त्यांनी चित्रपटांसाठी गीते लिहायला सुरुवातीला नकार दिला. पण, वारंवार विचारणा होऊ लागल्यावर त्यांना नकार देणे अशक्य झाले.
‘नई उमर की नई फसल’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा गीत लिहिले. त्यांनी आपल्या काही कविताच गीत म्हणून दिल्या होत्या, ज्या संगीतबद्ध करून चित्रपटांत वापरल्या गेल्या. त्यांची कविता ‘कारवाँ गुज़र गया’ जेंव्हा चित्रपट गीताच्या रूपाने रेडीओवरून प्रसिद्ध झाली तेंव्हा कवी नीरज अगदी एका रात्रीत प्रसिद्ध झाले.
हिंदी कवितेसोबतच त्यांनी हिंदी चित्रपट गीते देखील लिहिली. त्यांनी लिहिलेली कित्येक गीते आजही लोकांच्या तोंडी रुळलेली दिसतात. त्यांची गीते त्याकाळी इतकी लोकप्रिय झाली की सलग तीन वर्षे त्यांना चित्रपट सृष्टीतील सर्वश्रेष्ठ गीतकार पुरस्कार मिळाला.
गोपालदास यांनी लिहिलेली काही चित्रपट गीते:
- लिखे जो ख़त तुझे, वो तेरी याद में, हज़ारों रंग के नज़ारे बन गए (फिल्म: कन्यादान)
- खिलते हैं गुल यहां, खिल के बिखरने को (फिल्म: शर्मीली)
- ओ मेरी ओ मेरी ओ मेरी शर्मीली (फिल्म: शर्मीली)
- आज मदहोश हुआ जाए रे मेरा मन (फिल्म: शर्मीली)
- शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर मिलाई जाए थोड़ी सी शराब (फिल्म: प्रेम पुजारी)
- रंगीला रे, तेरे रंग में यूं रंगा है मेरा मन, छलिया रे न बुझे है किसी जल से ये जलन (फिल्म: प्रेम पुजारी)
- फूलों के रंग से, दिल की कलम से, तुझको लिखे रोज़ पाती (फिल्म: प्रेम पुजारी)
- चूड़ी नहीं ये मेरा दिल है, देखो-देखो टूटे ना (फिल्म: गैम्बलर)
- दिल आज शायर है, गम आज नगमा है. शब ये ग़ज़ल है सनम (फिल्म: गैम्बलर)
- ए भाई! ज़रा देख के चलो, आगे ही नहीं पीछे भी (फिल्म: मेरा नाम जोकर)
- बस यही अपराध मैं हर बार करता हूं, आदमी हूं आदमी से प्यार करता हूं (फिल्म: पहचान)
- काल का पहिया घूमे रे भइया (फिल्म: चंदा और बिजली)
- और हम खड़े खड़े बहार देखते रहे, कारवां गुज़र गया गुबार देखते रहे (फिल्म: नई उमर की नई फसल)
त्यांच्या गीतांतून आणि कवितांमधून रोमान्स झळकत होता तसेच सामाजिक प्रश्नावरील भाष्य देखील व्यक्त होत होते. हिंदी साहित्यातील त्याच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना दोनदा सन्मानित केले.
१९९१ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर २००७ साली त्यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले. यासोबतच त्यांना यश भारती आणि विश्व उर्दू परिषद पुरस्कार देखील मिळाला.
रसिकांनी आणि समीक्षकांनीही त्यांची तोंडभरून स्तुती केली. कलाकाराला जसे जाणकार रसिक भेटतात तसेच टीकाकार देखील भेटतात. एकीकडे स्तुतीसुमनांचा वर्षाव होत असताना दुसरीकडे टिकेचे कडवट घोट देखील पचवावे लागतात. कोणत्याही कलाकाराच्या आयुष्यातील या दोन बाजू गृहीतच असतात.
हिंदी साहित्यातील प्रसिद्ध कवी ‘दिनकर’ यांनी त्यांना हिंदीतील वीणा अशा शब्दांनी गौरवले तर इतर काहींनी त्यांना संत कवीची देखील उपाधी दिली. तर काही लोक मात्र त्यांना निराशवादी आणि मृत्युवादी म्हणूनही नकारात्मक सूर आळवत होते.
हिंदी साहित्यातील हायकू आणि मुक्तकसारख्या प्रकारातही त्यांच्या लेखणीने आपली कमाल दाखवली. कवीसंमेलनानिमित्त केलेल्या सततच्या दौऱ्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम जाणवू लागले.
१९ जुलै २०१९ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी त्यांना मृत्यूने गाठले.
आपल्या काव्याने महफिलींची रौनक वाढवणाऱ्या नीरज यांना भौतिक समृद्धीचा फारसा हव्यास नव्हताच. अगदी शेवटच्या क्षणी देखील ओठांवर एखादी नवी पंक्ती आणि नवी कविता असावी एवढीच त्यांची इच्छा.
“आँसू जब सम्मानित होंगे, मुझको याद किया जाएगा
जहाँ प्रेम की चर्चा होगी, मेरा नाम लिया जाएगा”
त्यांच्या साहित्य आणि एकूणच जीवन प्रवासाबद्दल त्यांच्याच शब्दांत एवढेच म्हणता येईल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.