आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
एकदा नेहरूंचे सचिव एमओ मथाई आपल्या एका मित्रासोबत कुतुबमिनार बघायला गेले होते. तेव्हा त्यांना त्याच्या मित्राने विचारलं की मोरारजी देसाई माणूस म्हणून कसे आहेत? मथाई यांनी क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं “समोर तो लोखंडाचा खांब दिसतोय ना, त्याला गांधी टोपी घाला, मोरारजी देसाई तुमच्यासमोर असतील.. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या, एकदम साधेसरळ, सच्चे आणि तत्त्वनिष्ठ..”
खुद्द नेहरूंनी एकदा मथाईंना सांगितलं होतं की भारतीय राजकारणात ज्या दोन सर्वात इमानदार लोकांना ते भेटले ते म्हणजे, पुरुषोत्तमदास टंडन आणि मोरारजी देसाई. १९७७ ते १९७९ या कालावधीत भारताचे पंतप्रधानपद भूषवणारे मोरारजी देसाई एक सच्चे गांधीवादी होते.
एकदा त्यांच्यावर “राईटीस्ट” आहात म्हणून बोल लावण्यात आले, तेव्हा त्यांनी अतिशय शांतपणे उत्तर दिलं की, “हो मी आहे राईटीस्ट कारण आय बिलीव्ह इन डुइंग थिंग्स राईट.”
अशा मोरारजी देसाईंचा जन्म २९ फेब्रुवारी १८९६ रोजी गुजरातच्या भदेली गावात झाला. मोरारजी यांनी आपलं प्राथमिक शिक्षण गुजरातमध्येच पूर्ण केलं. त्यानंतर मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून पदवी प्राप्त केल्यानंतर ते गुजरातच्या प्रशासकीय सेवेत रुजू झाले.
१९२७-१९२८च्या गोधरा कांडानंतर त्यांच्यावर लागलेल्या पक्षपातीपणाच्या आरोपांमुळे त्यांनी १९३० साली डेप्युटी कलेक्टरपदाचा राजीनामा दिला. सरकारी नोकरी सोडल्यानंतर त्यांनी स्वतःला स्वातंत्र्यसंग्रामात वाहून घेतलं. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली त्यांनी सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात सहभाग नोंदवला.
१९३१ मध्ये गुजरात कॉंग्रेस कमिटीचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. थोड्याच कालावधीत ते गुजरात कॉंग्रेसचे अत्यंत महत्त्वपूर्ण नेते बनले. १९३७च्या निवडणुकांनंतर त्यांच्याकडे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गृहमंत्रालय सोपवण्यात आले.
१९५२ साली त्यांना मुंबईचा मुख्यमंत्री बनवण्यात आले. त्याकाळी भाषेच्या आधारावर गुजरात आणि महाराष्ट्र असे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली होती. पण मोरारजी याविरोधात होते. त्यातच १९६०साली त्यांनी आंदोलनकर्त्यांवर गोळी*बार करण्याचा आदेश दिला, यात १०५ लोकांचा मृत्यू झाला. परिणामी मोरार्जीना केंद्रात बोलावण्यात आलं.
देशाचं गृहमंत्रीपद भूषवताना त्यांनी नेहरूंच्या समाजवादाचा कायम विरोध केला. हळूहळू त्यांचे पक्षातील वजन वाढू लागले. नेहरूंच्या नंतर पंतप्रधान म्हणून त्यांनाच लोक बघू लागले. परंतु नेहरूंच्या मृत्यूनंतर लाल बहादूर शास्त्रींनी त्यांची जागा घेतली.
त्यानंतरही जेव्हा १८ महिन्यातच शास्त्रीजी गेल्यानंतर पंतप्रधानपद रिक्त झाले, मोरारजींच्या नावाची चर्चा रंगू लागली. याचवेळी इंदिरा गांधीचे नावही पुढे आले. पक्षांतर्गत झालेल्या मतदानात इंदिराजींच्या बाजूने निकाल लागला आणि मोरारजी उपपंतप्रधान झाले. काही कालावधीतच इंदिराजींचे अनेक धोरणं न पटल्याने त्यांनी कॉंग्रेसमधून राजीनामा दिला.
आणीबाणीच्या काळात अनेक मोठे नेते कारागृहात डांबले गेले, यातच मोरारजी देखील होते. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं.
आणि मोरारजी देसाई भारताचे सहावे पंतप्रधान बनले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसच्या बाहेरची व्यक्ती पंतप्रधान बनण्याची ही पहिलीच वेळ होती. १९७७ ते १९७९ असे दोन वर्ष ही धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला.
ही बाब फार कमी लोकांना माहिती असेल की मोरारजी देसाईंना पाकिस्तानने आपल्या सर्वोच्च सन्मानाने नावाजलं आहे. मोरारजी देसाई असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न आणि पाकिस्तानच्या ‘निशाण-ए-पाकिस्तान’ हे दोन्ही सन्मान प्राप्त झाले आहेत.
मोरारजी कट्टर गांधीवादी होते हे तर सर्वश्रुतच आहे. त्यांनी कायमच खादी आणि स्वदेशी वस्तूचं समर्थन केलं.
याबाबतीतला त्यांचा एक किस्सा फार प्रसिद्ध आहे. एकदा एक पत्रकार त्यांची मुलाखत घेत होती. त्यांनी सहज तिला म्हटलं की तू एवढं गांधीजी गांधीजी करते पण मग खादीचा वापर का नाही करत? यावर तिने ते महाग असतात असं सांगितलं.
तेव्हा क्षणाचाही विलंब न करता ते म्हणाले की, “तुम्ही वापरता ते कुठे स्वस्त असतात. कितीही काहीही करा पण एक दिवस असा येईल जेव्हा संपूर्ण देश खादीचा वापर करताना दिसेल.”
आज मोठमोठ्या माॅलमधून “ब्रँडेड खादी” विकताना दिसते तेव्हा त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.