आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
स्वातंत्र्य लढ्यात अनेक महान नेत्यांनी आपापल्या परीने योगदान दिले. महात्मा गांधी, नेहरू, सरदार पटेल, भगतसिंग यांचे कार्य समाजाने जाणून घेतले. पण, काही असेही नेते होते ज्यांचे काम आणि नावही आपल्यापैकी अनेकांना माहिती नाही. पण, केवळ कुणाला माहिती नाही म्हणून त्यांच्या कामाला बेदखल करता येत नाही. काही ना काही कारणाने दुर्लक्षित राहिलेल्या या नेत्यांच्या कामाची दाखल घेऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता भाव बाळगणे हे एक भारतीय नागरिक या नात्याने आपले कर्तव्य आहे.
असेच दुर्लक्षित राहिलेले, स्वातंत्र्य चळवळ आणि एकसंघ भारताच्या निर्मितीसाठी झटणारे एक नाव म्हणजे, डॉ. मुख्तार अहमद अन्सारी.
गांधींचे सच्चे अनुयायी असलेले आणि काही काळ कॉंग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या अन्सारींच्या कर्तृत्वाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही, याबबत खेद वाटतो. दिल्लीतील जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाच्या प्रमुख संस्थापकांपैकी एक असणारे डॉ. मुख्तार अहमद अन्सारी यांचा जन्म २५ डिसेंबर १८८० रोजी झाला.
१८९६ मध्ये त्यांनी उत्तरप्रदेश येथील गाजीपूर हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी ते हैद्राबादला आले. पदवीनंतर त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एम. डी. आणि एम. एस.ची डिग्री मिळवली. शिक्षणातील त्यांची प्रगती पाहून त्यांना निजाम स्कॉलरशिप देण्यात आली होती.
नंतर ते लंडनच्या लॉक हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रार म्हणून रुजू झाले. या पदावर विराजमान होणारे ते पहिले भारतीय होते.
अन्सारी यांनी लॉक हॉस्पिटल सोबतच लंडनच्या चेयरिंग क्रॉस हॉस्पिटलसाठीही योगदान दिले. त्याच्या या कामाची पोचपावती म्हणून चेयरिंग क्रॉस हॉस्पिटलमधील एका वॉर्डला त्यांचे नाव देण्यात आले आहे. मद्रासमध्ये शिकत असताना १८९८ मध्ये अन्सारी यांनी पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात एक श्रोता या नात्याने उपस्थिती लावली होती. हे अधिवेशन आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले होते.
१९२७ रोजी मद्रासमध्ये जेंव्हा कॉंग्रेसचे अधिवेशन भरले तेंव्हा अन्सारी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. मधल्या काळात अन्सारींची कॉंग्रेसच्या नेत्यांशी असलेली मैत्री वाढत गेली. कॉंग्रेसच्या या नेत्यांमुळे ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीकडे ओढले गेले.
लंडनमधील ऐषोआरामाचे आयुष्य सोडून ते भारतात स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी दाखल झाले. मुस्लीम लीग आणि कॉंग्रेसच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रीय झाले असले तरी त्यांनी त्यांची वैद्यकीय सेवा सोडली नाही.
अन्सारी खिलाफत चळवळीचेही दृढ समर्थक होते. बाल्कनच्या युद्धात तुर्की सैनिकांच्या उपचारासाठी चालवण्यात आलेल्या मेडिकल मिशनमध्ये डॉ. अन्सारी यांची प्रमुख भूमिका होती. ऑटोमन साम्राज्याच्या सैनिकांसाठी भारतीय मुस्लिमांनी हे मिशन चालवले होय. या मिशनद्वारे मिळालेल्या रकमेतून या सानिकांसाठी आवश्यक औषधे आणि इतर वैद्यकीय उपकरणे पोहोचवली जात.
जिन्ना यांनी स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी लावून धरल्यावर अन्सारींनी जीन्नांची साथ सोडली आणि ते गांधीच्या बाजूने उभे राहिले.
१९२० च्या काळात सांप्रदायिक भेदभावाला आणखी खतपाणी मिळत गेले आणि जिन्ना यांच्या स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राच्या मागणीला जोर आला. परंतु त्याही काळात अन्सारी यांनी गांधींचीच बाजू उचलून धरली. त्यांनी नेहमीच एकसंघ भारताच्या कल्पनेचे समर्थन केले. यामुळे कॉंग्रेस आणि अन्सारी यांच्यातील जवळीक आणखीन वाढली. गांधी आणि अन्सारी यांच्यातील नातेही अधिक दृढ झाले.
वेगळ्या मुस्लीम राष्ट्राला आपला विरोध दर्शवताना अन्सारी म्हणाले होते, “मला वाटते की आपसांतील बंधुभाव हेच आपल एकमेव सूत्र असले पाहिजे. धर्म आणि संप्रदायाच्या नावाने जर भारताचे तुकडे करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर माझ्या मते हा एक स्वैराचार आणि खोटेपणा असेल.”
भारतातील मुस्लिमांमध्ये शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे तरच त्यांची प्रगती शक्य आहे, हे अन्सारी यांनी ओळखले होते. मुस्लिमांसाठी चांगल्या शिक्षण संस्था निर्माण झाल्या पाहिजेत, असे त्यांना वाटे. याच दृष्टीकोनातून त्यांनी दिल्लीमध्ये जामिया मिल्लिया विद्यापीठाच्या स्थापनेत पुढाकार घेतला.
या विद्यापीठाचे प्रमुख संस्थापक हकीम अजमल खान यांचे १९२७मध्ये निधन झाल्यानंतर अन्सारी हेच या विद्यापीठाचे कुलगुरू राहिले. विशेष म्हणजे १९३६मध्ये त्यांचा मृत्यू झाला तेंव्हा त्यांना प्रिय असलेल्या याच विद्यापीठाच्या परिसरात त्यांना दफन करण्यात आले.
स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी, नेहरू, पटेल यांच्या विचारांवर, भूमिकांवर नेहमीच चर्चा होत राहिली. त्यांनी केलेल्या कामाचीही चर्चा होत राहिली, पण अन्सारी यांच्या बाबतीत मात्र असे झाले नाही. देशपातळीवर त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आपण कमी पडलो.
प्रत्येक प्रदेशातील काही प्रमुख नेते स्वातंत्र्य चळवळीत आघाडीवर होते त्याच्या त्यांच्या प्रदेशातही त्यांची चर्चा होते, त्यांच्या कामाची पोच दिली जाते. जसे बंगाल मध्ये बोस आणि चित्तरंजन, तामिळनाडूमध्ये राजगोपालचारी, पंजाबमध्ये लाला लजपत राय, असे कितीतरी नेते आहेत ज्यांची त्यांच्या त्यांच्या जन्मस्थानी तरी नाव आहे, स्मारके आहेत. पण अन्सारी यांच्या बाबतीत असेही काही घडले नाही.
इतर नेत्यांवर पुस्तके लिहिली जातात, लेख छापले जातात. पण, अन्सारी यांची दाखल मात्र एका अक्षरानेही कुणी घेत नाही. मुशीरुल हसन यांनी आपल्या पुस्तकात असे म्हंटले आहे की अन्सारी दुसऱ्या फळीचे नेते होते. ज्यांना ते ज्या प्रदेशातून आले त्या प्रदेशाने आणि ज्या समुदायातून आले त्या समुदायानेही विस्मृतीत ढकलले होते.
अर्थात, अन्सारी यांच्याशी जाणूनबुजून असा व्यवहार करण्यात आला असे नाही. परंतु तरीही यामागे काही कारणे आहेत. अन्सारी यांच्या समकालीन मुस्लीम नेत्यांशी त्यांची तुलना केल्यास इतर नेते कायमच चर्चेत राहिले, त्यांचा समाजावर पगडाही होता.
अन्सारी यांनी मात्र आपले काम स्वतः पुरतेच मर्यादित ठेवले. त्यांनी कधीही आपल्या कामातून लोकांवर प्रभुत्व राखण्याचा प्रयत्न केला नाही. शिवाय, फाळणीचा मुद्दा आला तेंव्हा कॉंग्रेसला भारतीय मुस्लिमांचाही पाठींबा मिळवण्यात अपयश आले.
फाळणीच्या बाजूने असणाऱ्या मुस्लिमांना तर ते पटवून देऊ शकले नाहीत पण, भारताच्या बाजूने असणारे मुस्लीमही कॉंग्रेसशी जोडले गेले नव्हते. त्यामुळेच कॉंग्रेस सोबत असणाऱ्या मुस्लीम नेत्यांकडेही दुर्लक्ष झाले.
अन्सारी यांचा वाडा आजही दिल्लीच्या दरियागंज परिसरात आहे, फक्त ज्या रस्त्यावर हा वाडा आहे, त्या रस्त्याला अन्सारी रोड म्हणून ओळखले जाते. अन्सारी यांच्या दरियागंजमधील या वाड्याचे नाव होते ‘दारुस्सलाम’ म्हणजे ‘शांती स्थळ’.
गांधी जेंव्हा जेंव्हा दिल्लीला भेत देत तेंव्हा तेंव्हा त्यांच्या मुक्कामाची सोय अन्सारी यांच्या याच कोठीवर केली जायची. शिवाय, अरुणा असफआली, मनुभाई शाह यांसारख्या क्रांतीकाराकांनाही लपून बसण्यासाठी या कोठीची मदत होत असे. कॉंग्रेसच्या अनेक बैठका देखील या कोठीत पार पडलेल्या आहेत. तरीही डॉ. मुख्तार अहमद अन्सारी हे नाव मात्र काळाच्या पडद्या आड गेले आहे.
अन्सारी यांच्या सौहार्दमय आणि सामंजस्य पूर्ण विचार समजून घेणे हे एक भारतीय म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.