आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतीय संस्कृतीत देव आणि धर्मानंतर धर्मिक स्थळांना खूप महत्व आहे. धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या भाविकांची संख्या इतकी मोठी असते की इथले प्रत्येक धार्मिक स्थळ एक पर्यटन स्थळ बनले आहे. त्यातही भारतीय संस्कृतीत तीर्थाटन करण्यास विशेष स्थान आहे. तीर्थाटन केल्याने मनुष्य आपल्या सर्व पापातून मुक्त होतो असे मानले जाते.
भारतातील बारा ज्योतिर्लिंगांचे महत्त्व तर अनन्यसाधारण आहे. या बारा ज्योतिर्लिंगापैकी पहिले ज्योतिर्लिंग आहे सोरटी सोमनाथचे.
सोरटी सोमनाथचे हे मंदिर खूप प्राचीन आहे. इसवी सनापूर्वीही या मंदिराचा उल्लेख आढळतो. मुहम्मद गझनीपासून औरंगजेबापर्यंत अनेक परकीय आक्र*मकांनी या मंदिरावर आक्र*मण करून मंदिरातील संपत्ती लुटली आणि हे मंदिर भग्न केले.
मराठा साम्राज्याच्या विस्तारानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सोमनाथपासून जवळच प्रती सोमनाथचे मंदिर बांधले होते.
स्वातंत्र्योत्तर काळात सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुन्हा एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे मनावर घेतले. १९४७ साली सरदार पटेल यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराची घोषणा केली. सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या संकल्पानुसार १९५० साली या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.
सहा वेळा या मंदिराचे पतन करण्यात आल्यानंतर सातव्यांदा या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली.
गुजरातमधील हे सोमनाथ मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून शास्त्रानुसार बारा ज्योतिर्लिंगाचे तीर्थाटन करताना या ज्योतिर्लिंगाचे दर्शन प्रथम घेतले जाते.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा विचार मांडला तेव्हा नेहरू या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या विचाराने नाखूष होते. पण, गांधींनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराला सहमती दर्शवली. या मंदिराचे बांधकाम सरकारी पैशातून नव्हे तर जनतेच्या पैशातून केले जावे अशी त्यांची अट होती.
मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात आला, जेणेकरून लोकांना या ट्रस्टद्वारे देणगी जमा करता येईल. मुन्शी यांची या ट्रस्टच्या स्थापनेतही मुख्य भूमिका होती.
या मंदिराचे काम पूर्ण होण्याआधीच सरदार वल्लभभाई पटेल यांचे देहावसान झाले. त्यानंतर या मंदिराच्या जीर्णोद्धाराची जबाबदारी के. एम. मुन्शी यांनी घेतली. के. एम. मुन्शी हे पंडित नेहरूंच्या मंत्रीमंडळात कृषी आणि अन्नमंत्री होते.
नेहरुंना मंदिर जीर्णोद्धाराची कल्पना अजिबात आवडली नव्हती.
सोमनाथ मंदिर हे निश्चितच भारतीय संस्कृतीच्या वैभवशाली इतिहासाचे एक प्रतिक आहे, याबाबत शंका नाही. परंतु हे मंदिर हिंदुत्वाचे प्रतिक असल्याने या मंदिराचा जीर्णोद्धार करणे म्हणजे हिंदुत्वाला खतपाणी घालण्यासारखे आहे, असे नेहरूंचे मत होते.
परंतु या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी के. एम. मुन्शी यांनी नेहरूंना विनम्र भाषेत तरीही सडेतोड उत्तरे दिले. ते म्हणाले, “कट्टर हिंदुत्वाचे समर्थन मलाही मान्य नाही. परंतु, सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कल्पनेने सामान्य भारतीय लोकांच्यात एक उत्साह संचारला आहे. त्यांच्या या श्रद्धेची, भावनेची कदर म्हणून हे काम पूर्णत्वास नेले पाहिजे. या मंदिराच्या बांधकामामुळे आधुनिक भारताच्या प्रगतीत कुठलाही अडथळा निर्माण होण्याऐवजी त्यामुळे भारताच्या प्रगतीला हातभारच लागेल. मी स्वतः हिंदू धर्मातील त्याज्य बाबींचा वारंवार निषेध केला आहे आणि माझ्या लिखाणातूनही माझी याबद्दलची भूमिका मांडली आहे.”
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि व्ही. पी. मेनन यांच्यासारख्या व्यक्तींनीही के. एम. मुन्शी यांचे समर्थन केले. सोमनाथ मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आल्यानंतर या मंदिराच्या कामाला गती मिळाली.
थोडक्यात आज गुजरातमधील वैरावळनजीक जे सोरटी सोमनाथाचे प्रसिद्ध मंदिर आहे, त्याच्या उभारणीत के. एम. मुन्शी या नेहरूंच्याच मंत्रीमंडळातील मंत्र्यांचे योगदान अभूतपूर्व आहे.
के. एम. मुन्शी यांची ओळख एवढ्या पुरतीच सीमित नाही. मुन्शी यांनी स्वातंत्र्य लढ्यातही आपले योगदान दिले होते. भारताच्या जडणघडणीत त्यांचेही योगदान राहिले आहे. मुन्शींच्या विचारांवर गांधींवादाचा प्रभाव होता.
गांधीच्या सांगण्यावरूनच त्यांना बॉम्बे विधानसभेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आणि ते असहकार आंदोलनात सहभागी झाले.
भारताच्या फाळणीनंतर उफाळलेल्या हिं*साचारानंतर मात्र त्यांनी अहिंसेचा मार्ग सोडून नागरी यु*द्धाचा मार्ग अवलंबला. १९४१ साली कॉंग्रेसशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला होता.
परंतु, १९४६ साली पुन्हा एकदा ते काँग्रेसमध्ये सामील झाले. गांधीवादाचे अनुयायी ते गांधीवादाचे विरोधक असा त्यांचा प्रवास फारच रंजक आहे.
मुन्शी हे गुजरातीतील एक प्रसिद्ध साहित्यिक होते. गुजरातीशिवाय त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेतूनही कादंबरी लेखन केले. घनश्याम व्यास या टोपणनावानेही त्यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाले.
१९२४ साली मणिलाल जशी यांनी पहिल्यांदा चित्रपट निर्मिती केली. या चित्रपटाचे कथानक हे मुन्शी यांच्या पृथ्वी वल्लभ या कादंबरीवर आधारित होते. या चित्रपटात हिं*सा आणि सेक्स यांचा भरपूर भडीमार होता. गांधींनी याच कारणाने चित्रपटावर टीका केली होती.
निबंधकार आणि चित्रकार लीलावती मुन्शी या के एम. मुन्शी यांच्या द्वितीय पत्नी होत्या. लीलावती मुन्शी या देखील काँग्रेसच्या सदस्या आणि राज्यसभा सदस्यही होत्या.
के. एम. मुन्शी हे शिक्षणतज्ञ होते. त्यांनी भारतीय विद्या भवन आणि भवन्स कॉलेजसारख्या अनेक शिक्षणसंस्थांची देखील उभारणी केली. बॉम्बे युनिवर्सिटीचे ते सदस्य होते. शिवाय अनेक शिक्षणसंस्थांचे ते चेअरमन होते.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असलेले मुन्शी कॉंग्रेसचे सदस्य होते. पण, कमी लोकांना हे माहित असेल की विश्व हिंदू परिषदेच्या संस्थापक सदस्यांच्या यादीत त्यांचेही नाव घेतले जाते.
याच सोमनाथ मंदिराच्या विजयद्वारापासून अडवाणींच्या रथयात्रेची सुरुवात झाली होती. या रथयात्रेनंतरच राम मंदिराच्या बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. राम मंदिराच्या या निर्माणात सोमनाथ मंदिराचाही काही वाटा निश्चित आहे.
अयोध्येत राम मंदिराची तयारी सुरु असताना, या पार्श्वभूमीवर सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी झटणारे के. एम. मुन्शी यांच्या कार्याची आठवण करणे क्रमप्राप्त बनते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.