आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या विरोधात एक मोठा जन सत्याग्रह उभा करण्यात त्यांनी दिलेले योगदान आणि केलेले लोकशाहीचे संरक्षण यामुळे त्यांचे योगदान आधुनिक भारताच्या इतिहासात फार महत्त्वाचे आहे.
स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादाचे खंदे पुरस्कर्ते असणाऱ्या जयप्रकाश नारायण यांना भारताचा दुसरा प्रधानमंत्री होण्याची संधी चालून होती, पण नंतर घडलेल्या नाट्यमय घटनाक्रमामुळे ती माळ लालबहादूर शास्त्रींच्या गळ्यात पडली.
ती व्यक्ती म्हणजे दुसरीतिसरी कोणी नसून, लोकनायक जयप्रकाश नारायण.
११ ऑक्टोबर १९०२ रोजी उत्तर प्रदेशच्या बालिया जिल्ह्यातील सिताब दियार गावात गावात जयप्रकाश नारायण यांचा जन्म झाला. जयप्रकाश नारायण यांचे गाव हे आकारमानाने फार मोठे होते; इतके की दोन राज्यांच्या तीन जिह्यात या गावाचा समावेश होतो.
बिहारच्या आरा आणि छापरा या दोन जिल्ह्यात आणि उत्तर प्रदेशच्या बालिया जिल्ह्यात या गावाचा समावेश होतो. यामुळे जयप्रकाश नारायण यांचे जन्मस्थळ हे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वाटले गेले असल्यामुळे ते दोन्ही राज्यांचे आहेत.
जयप्रकाश नारायण हे हरषु दयाळ आणि राणी देवी या दाम्पत्याचे चौथे आपत्य होते. हरषु दयाळ हे ब्रिटीश सरकारच्या सिंचन विभागात कार्यरत होते. ९ वर्षाचे होते तेव्हाच जयप्रकाश नारायण गाव सोडून बिहारची राजधानी पटण्याला शिक्षणासाठी गेले. गाव सोडल्यानंतर जयप्रकाश नारायण यांच्या जीवनात बदल घडण्यास सुरुवात झाली.
पटण्याच्या कॉलेजियट स्कूलमध्ये त्यांनी सातव्या इयत्तेत प्रवेश घेतला आणि शिक्षण सुरु ठेवले. १९२० साली त्यांचे १८ व्या वर्षीच १४ वर्षांच्या प्रभादेवींशी लग्न झाले.
आपल्या शालेय जीवनात ते स्वातंत्र्यता आंदोलनाकडे आकर्षित होऊ लागले. १९१९ साली रौलेट ऍक्टच्या विरोधात देशभरात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन छेडले गेले होते. या आंदोलनात ठिकठिकाणी आंदोलने, सभा निदर्शने आयोजित केली जात होती.
त्याच काळात मौलाना अबुल कलाम यांची एक सभा पटण्यात आयोजित करण्यात आली होती. जयप्रकाश नारायण आपल्या साथीदारांना सोबत घेऊन ती सभा ऐकायला गेले होते. मौलाना अबुल कलामांचे भाषण ऐकून प्रभावित झालेल्या जयप्रकाश नारायणांनी स्वातंत्र्यता आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कॉलेज सोडले आणि स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली.
महात्मा गांधींच्या सहवासात राहून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे काम सुरु ठेवले. पुढे त्यांनी पत्नी प्रभादेवीला साबरमती आश्रमात सोडून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेची वाट धरली.
१९२२ साली अमेरिकेच्या बर्कले विद्यापीठात शिक्षणासाठी ते कॅलिफोर्नियाला गेले. तिथे त्यांनी स्वतःच्या शिक्षणाचा खर्च स्वतः केला. त्यांनी तिथे अनेक लहान मोठे कामं पण केली. कधी द्राक्षाच्या बागेत काम केले तर कधी हॉटेलमध्ये वेटर म्हणून नोकरी केली.
याच काळात कामगारांच्या दुरावस्थेची त्यांना जाणीव झाली. तेव्हाच त्यांचा मार्क्सवादाशी संबंध आला आणि त्यांनी मार्क्सवादी तत्वज्ञानाचे वाचन सुरु केले. १९१७ च्या रशियन राज्यक्रांतीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. देशाच्या समस्या सोडवण्यासाठी मार्क्सवाद हाच पर्याय असल्याचे त्यांचे ठाम मत बनले.
पुढे ते भारतात परतले आणि १९२९ साली पंडित नेहरूंच्या सांगण्यावरूनच ते काँग्रेस पक्षात दाखल झाले. महात्मा गांधींच्या सान्निध्यात त्यांनी अनेक लढे दिले खरे पण त्यांना असे वाटू लागले की काँग्रेसच्या मार्गाने स्वातंत्र्य लवकर मिळणे अशक्य आहे.
इंग्रजांना घालवण्यासाठी मार्क्सवादी विचारांवर आधारलेला संघर्षच करायला हवा असे त्यांनी ठरवले. पण भारत स्वातंत्र्य होईपर्यंत ते काँग्रेस मध्येच राहिले.
१९५२ साली काँग्रेस नेत्यांसोबतचे त्यांचे मतभेद टोकाला गेले आणि त्यांनी स्वतःच्या प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी कामगार, शेतकरी आणि शेतमजूर यांचे मोठे जनांदोलन उभारले.
१९७४ साली इंदिरा गांधींचे प्रमुख विरोधक म्हणून ते पुढे आले. इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली आणि सर्व विरोधकांना तुरुंगात डांबले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली, सर्व राजकीय पक्षांवर आणि राजकीय सभांवर बंदी लादली.
तुरुंगात रवानगी करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये जयप्रकाश नारायण यांचा देखील समावेश होता. जयप्रकाश नारायण यांनी तुरुंगातुनच इंदिरा गांधींच्या विरोधात जनआंदोलन उभारायला सुरुवात केली.
आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या विरोधात त्यांनी विद्यार्थ्यांचा मोठा लढा उभारला, या लढ्याला जेपी आंदोलन म्हणून ओळखले जाते. हे आंदोलन यशस्वी ठरले आणि इंदिरा गांधींचे सरकार कोसळले. पुढे जनता पार्टी सत्तेत आली.
या जेपी आंदोलनातून उत्तर प्रदेश, बिहारच्या अनेक नेत्यांना जन्म दिला. आजही ते नेते राजकरणात सक्रिय आहेत. या नेत्यांमध्ये मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव, नितीश कुमार अशा अनेक नेत्यांचा समावेश आहे.
जयप्रकाश नारायण हे भारताचे दुसरे प्रधानमंत्री होऊ शकले असते, नेहरूंच्या काळात काँग्रेसने त्यांना कॅबिनेट मंत्रिपद आणि राष्ट्रपतीपद देखील बहाल केले होते. परंतु जयप्रकाश नारायण यांनी ते सर्व नाकारून आपल्या तत्वांशी तडजोड न करत कामगार आणि शेतकऱ्यांसाठी लढा दिला. यामुळेच त्यांना ‘लोकनायक’ हे बिरुद मिळाले.
८ ऑक्टोबर १९७९ साली वयाच्या ७७ व्या वर्षी जयप्रकाश नारायण यांच्या रूपात असलेला एक थोर राजकारणी, स्वातंत्र्यता सेनानी आणि लोकनेता आपल्यातून हरवला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.