आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जगाच्या इतिहासात अशा अनेक व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी संपूर्ण जगाला अचंबित केले. असे लोक कधीकधी विस्मृतीत जातात पण त्यांना इतिहासाच्या पानावरून खोडून टाकता येत नाही. अशा व्यक्तींच्या आयुष्यावर एक नजर टाकली तरी आपल्यातील सकारात्मक उर्जा कित्येक पटींनी वाढते. अशाच महान लोकांच्या यादीतील एक नाव म्हणजे ग्रिगोरी रास्पुतिन.
रशियन क्रांतीच्या काळात या अवलियाने खूप प्रसिद्धी मिळवली होती. ग्रिगोरीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा एक वेगळा दृष्टीकोन होता. प्रत्येकाला तो जसा भावला तशीच मते त्याच्याविषयी बनत गेली. कोणाला तो वेडा फकीर वाटे तर, कोणाला चमत्कारी रहस्ये असलेला शक्तिशाली माणूस. ग्रिगोरी कुणीतरी पारलौकिक शक्ती प्राप्त असलेला संत असावा अशीही काहींची त्याच्याबद्दलची धारणा होती.
ग्रिगोरी इतका शक्तिशाली होता की कदाचित त्याने दुसरे महायुद्धही रोखले असते असाही लोकांना विश्वास होता.
परंतु ग्रिगोरी मुळात कोण होता हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा हा लेख!
सायबेरियातील पोक्रोवस्केय या गावी १८६९ मध्ये ग्रिगोरीचा जन्म झाला. एफिल विल्किन रास्पुतिन आणि ऍना परसुकोवा यांना एकूण नऊ आपत्ये होती. त्यातील चार मुलांचा लहानपणीच मृत्यू झाला होता. ग्रिगोरी आणि त्याची इतर चार भावंडे फक्त जिवंत राहिली. ग्रिगोरीची इतर भावंडे सामान्य मुलांप्रमाणे धडधाकट होती. तर ग्रिगोरी मात्र अगदीच अशक्त होता. इतर मुलांप्रमाणे तो कधीच आपल्या मित्रांसोबत दंगा मस्ती करण्यात किंवा खेळण्यात रमत नसे.
याउलट ग्रिगोरी तासनतास एकटाच बसत असे. स्वतःशीच काहीतरी पुटपुटत असे. जंगलात दूरदूरवर भटकत असे. जंगलातील एखाद्या प्राण्याशी त्याची गट्टी जमलेली असे. वाटेतील झाडांशी तो हितगुज करी. त्याचे इतर भाऊ-बहिणी घरच्या कामातील वाटा उचलत तिथे, हा मात्र स्वतःतच गुंग राहत असे. त्याला ना मित्र होते ना तो सख्ख्या भावाबहिणींशी मिळून-मिसळून वागत असे. त्याचा हा एकलकोंडेपणा इतरांच्या दृष्टीने चेष्टेचा विषय झाला होता आणि त्याच्या आई-वडिलांसाठी डोकेदुखीचा.
परंतु ग्रिगोरीला मात्र या सगळ्याचा काहीच त्रास नव्हता. आपल्याला कोण वेडे म्हणते किंवा आणखी काय याच्याशी त्याला काहीही देणेघेणे नव्हते. अगदी किरकोळ अंगलटीचा ग्रिगोरी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही अशक्त होता. त्याची नजरही कमजोरच होती. त्याला सांगितलेल्या कुठल्याच गोष्टी लवकर समजत नव्हत्या. काहीसा मंद वाटणारा हा मुलगा आई-वडिलांसाठी चिंतेचाच विषय होता. अंग मेहनतीमुळे त्याच्या शरीरयष्टीत काही फरक पडेल या विचाराने त्यांनी त्याला शेतातील कामे करण्यास सांगितले. पण, ग्रिगोरी ही कामे अजिबात मनापासून करत नसे. त्याचे बालपण अगदीच निरस होते. शेतातील कामात तो रमेल ही त्याच्या पालकांची आशाही त्याने फोल ठरवली.
ग्रिगोरी शेतात रमत नाही हे पाहून त्याला घोड्यांच्या पागेची देखरेख करण्याची जबाबदारी सोपवली. घोड्यांच्या सहवासात त्याचे मन रमत असे. घोड्यांची देखभाल करण्यात त्याला मजा येई. या कामात त्याला आनंद वाटत होता.
तो १९ वर्षांचा असताना त्याचे लग्न झाले. एका वर्षातच तो एका मुलाचा बाप झाला. त्याला एका पाठोपाठ एक अशी तीन मुले झाली. पण त्याच्या मागचा दुर्दैवाचा फेरा सुटला नव्हता. त्याच्या तिन्ही मुलांना कुठल्याशा गंभीर आजाराने घेरले आणि यातच त्या कोवळ्या जीवांचा अंत झाला. नाजूक मनाच्या ग्रिगोरीसाठी या वेदना असह्य झाल्या. तो पुन्हा एकाकी राहू लागला. या आघाताने त्याच्या जगण्याचा उद्देशच हरवून गेला होता.
त्याच्या अशा एकलकोंड्या स्वभावामुळे कुठल्याच कामात त्याचे लक्ष लागत नव्हते. त्याला कोणी कामावर ठेवून घेण्यासही तयार नव्हते. शेवटी ग्रिगोरी पोट भरण्यासाठी म्हणून छोट्या-छोट्या चोऱ्यामाऱ्या करू लागला. पण तो पैसे चोरायचा आणि त्याची दारू प्यायचा.
इतक्यात पुन्हा एकदा त्याच्या घरात पाळणा हलला. परंतु चोरी करण्याशिवाय त्याच्याकडे आताही काही पर्याय नव्हता.
शेवटी एकदा तो चोरी करताना पकडला गेला. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्याला शिक्षा म्हणून दूरवरच्या एका प्रसिद्ध चर्चला भेट देण्यास सांगितले. हे चर्च त्याच्या गावापासून सुमारे साडे-पाचशे किमी दूर होते. शिवाय त्याला या चर्चपर्यंत जाण्याचा नेमका रस्ताही माहिती नव्हता. पण, न्यायालयाने दिलेली ही शिक्षा तर त्याला पूर्ण करणे भाग होते. १८९७ मध्ये तो या तीर्थयात्रेवर निघाला. त्याने आपल्या बायकोला, मुलांना आणि भावंडांना भेटून त्यांचा निरोप घेतला.
या तीर्थयात्रेने ग्रिगोरीचे आयुष्यच बदलून गेले. तो तीर्थयात्रेला निघाला तेंव्हा त्याच्या खिशात रुपया देखील नव्हता. त्याला नेमका रस्ता माहिती नव्हता. सोबत खाण्यापिण्यासाठी देखील काहीच नव्हते.
रस्ता माहित नसल्याने तो या गावातून त्या गावात असा भटकत राहिला. वाटेत ज्याला कुणाला त्याची दया येईल, तो त्याला खाऊ-पिऊ घालत असे.
उन्हातान्हातून फिरून आणि पोटभर अन्न नसल्याने त्याची अवस्था अगदीच दयनीय झाली होती. दाढी वाढली. कित्येक दिवस धड अंघोळही केली नसल्याने अंगाचा अगदी वास मारत होता. कपड्यांची अवस्था तर इतकी वाईट की कुणी जवळही येणार नाही. या प्रवासात तो वेगवेगळ्या गावातील चर्चना भेटी देत होता. तिथल्या धर्मगुरुंशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत होता. कधीकधी तो एकटाच बोलत बसे. कुणाशी बोलतोय विचारले तर देवाशी बोलत असल्याचे सांगत असे.
आपली ही तीर्थयात्रा त्याने ईश्वरालाच समर्पित केली होती. अध्यात्मिक गुरूंशी जीवनाच्या रहस्यावर तो चर्चा करी. त्याच्यातील सर्व वाईट गुण नाहीसे झाले होते. तो आता ईश्वराने दाखवलेल्या पवित्र वाटेवरून चालत होता. त्याच्या स्वभावात आता बदल झाला होता. वाटेत जो कोणी भेटेल त्याला तो आपले विचारधन वाटत असे. ज्याला त्याचे बोलणे समजे तो त्याला कोणी अध्यात्मिक गुरु समजत असे.
याउलट ज्याला त्याच्या बोलण्याचा अर्थच लागत नसे, तो मात्र त्याला वेडा फकीर समजत असे. तो लोकांना बायबलमधील वचनांचा अर्थ सांगू लागला. ईश्वरा पर्यंत पोचण्याचा मार्ग दाखवू लागला.
या तीर्थयात्रेने त्याला जीवनाचा अर्थ समजावून दिला होता. एकट्याने आपली वाट चालता येते हे आता त्याला कळून चुकले होते. या वाटेत अनेकदा तो स्वतःवर स्वतःच उपचार करीत असे, त्यामुळे त्याला थोडेसे औषधांबद्दलचेही ज्ञान आले होते. या प्रवासात ग्रिगोरी आरपार बदलून गेला.
शेवटी त्याला जिथे पोहोचायचे होते त्या चर्चमध्ये तो पोहोचला. तिथल्या प्रमुख गॅब्रिएलने त्याला सेंट पीटर्सबर्गला जाण्याचा सल्ला दिला. त्याची शिक्षा आता संपली होती. या प्रवासात त्याला त्याच्या जीवनाचे ध्येयही सापडले होते. पण, तो सेंट पीटर्सबर्गला जाण्यासाठी तयार झाला.
एव्हाना ग्रीगोरीची ख्याती सगळीकडे पसरली होतीच. १९व्या शतकाची ही सुरुवात होती. जगाचे रूप पालटत होते. रशियन क्रांतीचे युग अवतरत होते. आपापली ताकद दाखवून देण्यासाठी दोन देशातील एकमेकांवरील हल्ले-प्रतिहल्ले वाढले होते. स्वतःचे सामर्थ्य दाखवण्याची जणू स्पर्धा लागली होती. १९०५ मध्ये जपान आणि रशिया यांच्यात जोरदार युद्ध झाले. या युद्धात रशियाकडे मुबलक सैन्यबळ असूनही झालेल्या पराभवामुळे रशियन जनतेतही रोष निर्माण झाला होता. ग्रिगोरी पीटर्सबर्गला पोहोचेपर्यंत तिथले वातावरण गढूळ झाले होते.
जनेतेने राजा निकोलसच्या महालावर हल्ला करण्याचा डाव आखला. सरकारला या हल्ल्याची बातमी मिळताच हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सैन्याची मदत घेतली गेली. राजाच्या महालाबाहेर जमलेल्या जनतेवर धडधड गोळ्या चालवल्या गेल्या. जनतेचा हा रोष अशा प्रकारे त्यांच्याच रक्ताचे पाट वाहून थंड करण्यात आला. तो दिवस रविवारचा दिवस होता. म्हणूनच हा रविवार खुनी रविवार म्हणून ओळखला जातो. या घटनेने संपूर्ण रशियात एकप्रकारे भयानक दडपणाचे वातावरण होते.
इतक्यात निकोलसला पुत्ररत्न झाल्याची आनंदाची वार्ता येऊन थडकली आणि महालातील भीतीचे वातावारण आनंदात परावर्तीत झाले. या मुलाचे नाव अलेक्सइ ठेवण्यात आले. पंरतु अलेक्सइ हिमोफिलिया आजाराने ग्रस्त होता. परंतु राज्याचा तोच एकमेव वारस होता. त्यामुळे अगदी डोळ्यात तेल घालून त्याची काळजी घेतली जात असे.
निकोलसची पत्नी अलेक्झांड्राला याचवेळी ग्रिगोरीची माहिती मिळाली. तिने ग्रिगोरीला राजमहालात येण्याचे आमंत्रण दिले. ग्रिगोरीने हे आमंत्रण स्वीकारले आणि तो राजमहालात गेला. त्यावेळी राजकुमार अलेक्सइ तापाने फणफणत होता. ग्रिगोरीने अलेक्सइच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याने त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. सकाळपर्यंत अलेक्सइचा ताप उतरला. तो आधीपेक्षा आणखीन स्वस्थ झाला. अलेक्सइमधील हा फरक पाहून अलेक्झांड्राचा आनंद तर गगनात मावत होता. त्यांच्या दृष्टीने तर हा चमत्कारच होता. संपूर्ण राज परिवार ग्रिगोरीला शरण गेले. ग्रिगोरी राजपरिवाराचा अध्यात्मिक गुरु बनला होता. ग्रिगोरीला मिळालेल्या या पदामुळे त्याचा सन्मान वाढला होता.
राजपरिवारात ग्रिगोरीबद्दलचा आदर वाढतच होता. त्याच्या सल्ल्याशिवाय एकही निर्णय घेतला जात नव्हता. कालपरवा आलेल्या या फकिराला इतका मानसन्मान मिळाल्याचे पाहून काही लोकांचा जळफळाट सुरु झाला होता.
राजा निकोलसचे राजघराण्यातच अनेक हितशत्रू होते. त्यांच्यासाठी हा ग्रिगोरी म्हणजे मोठी डोकेदुखी ठरला होता. राजा निकोलसचा पुतण्या राजकुमार फेलिक्स युसुपोव याला तर निकोलसचा काटा काढायचाच होता, पण त्याआधी या ग्रिगोरीचा काहीतरी साक्षमोक्ष लावावा लागणार होता. ग्रिगोरीच्या सांगण्यावरून राणी अलेक्झांड्राने काही मंत्र्यांना आपल्या दरबारातून काढून टाकले होते. हे मंत्री देखील ग्रिगोरीवर खार खाऊन होते. हे मंत्री विश्वासू नसल्याने ग्रिगोरीने आधीच राजाला सूचित केले होते. या मंत्र्यांना काढून टाकल्यानंतर तर ग्रिगोरी आणखीनच खुपत होता.
शेवटी, फेलिक्स युसुपोवने ग्रिगोरीचा काटा काढण्याचे ठरवले. ग्रिगोरीला कायमचा आपल्या मार्गातून हटवण्यासाठी त्याला जीवे मारण्याची योजना आखली. त्याने ग्रिगोरीला रात्रीच्या भोजनाचे आमंत्रण दिले. ग्रिगोरीच्या वाईन मधून त्याला विष पाजण्याचा त्यांचा मनसुबा होता.
ठरल्याप्रमाणे ग्रिगोरी या भोजनासाठी फेलिक्सकडे हजर झाला. त्याने त्याच्यासाठी भरलेला वाईनचा ग्लास उचलताच त्याच्या मनात पाल चुकचुकली. वाईनचा एक घोट त्याने घेतला पण त्याची शंका खरी ठरल्याने त्याने तो घोट परत थुंकला आणि तो तिथून उठून जाऊ लागला. राजकुमार फेलिक्सचा डाव पुरता फसला होता. ग्रिगोरी उठून काही अंतर चालून गेला इतक्यात राजकुमार फेलिक्सने आपल्या बंदुकीने त्याच्यावर गोळी झाडली. या हल्ल्याने ग्रिगोरी जखमी झाला आणि तो खाली कोसळला. पण, तो जिवंत होता.
राजकुमाराने ग्रिगोरीला पाण्यात टाकले. जखमी अवस्थेतील ग्रिगोरी पाण्यात पडल्यानंतर स्वतःला वाचवू शकला नाही. तिथेच त्याचा मृत्यू झाला.
ज्या राजघराण्यामुळे तो प्रसिद्ध झाला. त्याला मानसन्मान मिळाला, त्याच राजघराण्याच्या हितशत्रूंनी त्याचा काटा काढला. ग्रिगोरी या राजघराण्याच्या कपटशाहीचा हकनाक बळी ठरला. राजघराण्याचा एक महत्वाचा सदस्य असूनही इतिहासात त्याचे महत्व नेहमीच नाकारले गेले. त्याचे वर्णन करताना एक वेडा फकीर किंवा चोर असेच केले गेले. त्याने चोरी केली असली तरी, त्याला मिळालेल्या शिक्षेने त्याला आरपार बदलून टाकले होते.
एक मंद मुलगा, ज्याला कधीच कुणी फार महत्त्व दिले नाही, तो त्याला झालेल्या एका साध्याशा शिक्षेमुळे पूर्णतः बदलून जातो आणि थेट राजघराण्यात स्थान मिळवतो, ग्रिगोरीचा हा प्रवास एखाद्या परीकथेप्रमाणे वाटणारा असला तरी तो खरा आहे.
ग्रिगोरी आपल्या ज्ञानामुळेच हे साध्य करू शकला. गावागावातून भटकताना त्याला जीवनाचा खरा अर्थ गवसला. हाच अर्थ त्याने इतरांनाही शिकवण्याचा प्रयत्न केला. राजघराण्यात तर त्याला संतासाराखाच मान देण्यात आला. पण,फक्त काही नतद्रष्ट लोकांमुळे ग्रिगोरीचे आयुष्य अर्ध्यातच संपले. राजघराण्याशी प्रामाणिक राहण्याची किंमत त्याला आपला जीव देऊन चुकवावी लागली. संपूर्ण आयुष्यात ग्रिगोरीने आपल्यातील दुर्गुणांवर मात करून चांगुलपणा आत्मसात केला होता. पण, हाच चांगुलपणा त्याच्या प्राणावर बेतला.
ग्रिगोरी हा त्याकाळातील प्रचंड प्रभावी व्यक्ती होता असे म्हटले जाते. तो जर जिवंत राहिला असता, तर त्याने दुसरे महायुद्ध होऊच दिले नसते असेही काहीजण म्हणतात. परंतु इतक्या सामर्थ्यशाली ग्रिगोरीची इतिहासात म्हणावी तशी दाखल घेतली गेली नाही.
ग्रोगोरीच्या आयुष्यावर अजूनही प्रकाशझोत पडणे आवश्यक आहे. इतिहासात ग्रिगोरी दुर्लक्षित रहिला असला तरी, त्याचा ठसा मात्र पुसून टाकणे शक्य नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Re