आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतरत्न गोविंद वल्लभ पंत यांना उत्तर भारताच्या आधुनिकीकरणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. ते देशभरातील सर्वांत मोठे हिंदी भाषा अभिमानी म्हणून ओळखले जातात. त्यांनी ४ मार्च १९२५ रोजी सरकारी कामकाज हिंदी भाषेतून करण्यात यावे अशी मागणी ब्रिटिश प्रशासनाकडे केली होती. पंत यांचे मत होते की हिंदी स्विकारणे म्हणजे इतर प्रादेशिक भाषांचा अपमान करणे, असे नाही. पंत यांनी हिंदीच्या प्रचार प्रसारासाठी सदैव प्रयत्न केले. पंत यांच्यामुळे हिंदीला राजकीय भाषेचा दर्जा मिळाला. पंत यांच्या प्रयत्नांमुळेच हिंदीचा देशभरात वापर करण्यास सुरुवात झाली. पंत यांनी महात्मा गांधींच्या हिंदी प्रसाराच्या कार्यात स्वतःला झोकून दिले होते.
गोविंद वल्लभ पंत यांच्या हिंदी भाषा बचावासाठीच्या प्रयत्नांमुळे त्यांचा जन्मदिवस १४ सप्टेंबर हा देशभरात राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर, १० जानेवारीला जगभरात विश्व हिंदी दिवस साजरा करण्यात येतो.
भारतरत्न पुरषोत्तम दास टंडन यांनी हिंदीला देवनागरी राजलीपीमध्ये स्वीकृत करवून घेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील हिंदीच्या प्रसारात मोठे योगदान दिले होते. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघात अटलजींनी हिंदी भाषेतून भाषण केले. त्याकाळी हिंदी भाषेतून केलेल्या त्यांच्या भाषणाचे आंतरराष्ट्रीय समुदायाने स्वागत केले होते.
गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म १० सप्टेंबर १८८७ रोजी आजच्या उत्तराखंडमधील खुंट, अल्मोडा येथे झाला. त्यांचा परिवार महाराष्ट्रातून तिकडे स्थलांतरित झाला होता. त्यांच्या आई गोविंदीबाई यांच्या नावावरून त्यांना गोविंद हे नाव देण्यात आले. त्यांचे वडील मनोरथ पंत रेव्हेन्यू कलेक्टर होते. मनोरथ पंतांच्या कामानिमित्त कायमच बदल्या व्हायच्या. याच कारणामुळे गोविंद वल्लभ पंत यांचे बहुतांश बालपण त्यांच्या आजोळी गेले. ते लहानपणापासूनच एक हुशार विद्यार्थी होते. त्यांनी बी. ए. आणि एल. एल. बी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते.
१९०९ साली पंत यांनी सुवर्णपदक पटकावत कायद्याची पदवी पूर्ण केली होती.
पंत यांनी भविष्यात आपल्या पारिवारिक कामाला फाटा देत, स्वतःला समाजकारण आणि राजकारणात गुंतवून घेतले. गोविंद पंत एक उत्तम वक्ते होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर एक उत्तम सांसद म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती.
जमीनदारी व्यवस्थेचा बिमोड करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. त्यांच्या ऐतिहासिक निर्णयांमुळे असंख्य शेतकऱ्यांना त्या जमिनी मिळाल्या होत्या, ज्यांना कसण्यासाठी ते काबाडकष्ट करत होते. दुर्बलांचे मजबुतीकरण, गरिबांची आर्थिक उन्नती, सामाजिक न्याय आणि विकासवादाचा पुरस्कार, या चार तत्वांमुळे गोविंद वल्लभ पंत यांनी इतिहसात आपले नाव कोरले आहे.
पंत यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात हमाल आणि कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढण्यापासून केली. ब्रिटिश लोकांना हमाल व मजुरांकडून मोफत सेवा घेण्याच्या कायद्याला त्यांनी कोर्टात आव्हान दिले. इतकेच नाही तर त्यांनी कोर्टाच्या न्यायाधिशालाच मराठी बाण्याला शोभतील असे शाब्दिक फटकारे लगावत, त्याला कायद्याच्या भाषेत समज दिली.
एकदा गोविंद पंत पंजाबमधील एका कोर्टाच्या आवारात भटकत होते, त्यावेळी त्यांनी पाहिले की काही तरुण एकमेकांशी भारताच्या तत्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थितीवर चर्चा करत आहेत. पंत लगेचच त्यांच्या चर्चेत सहभागी झाले. पंत यांनी या चर्चेदरम्यान मोठा वाद घातला. पण या चर्चेतून त्यांना स्वातंत्र्य चळवळीचे महत्व पटायला सुरुवात झाली.
पुढे १९२१ साली महात्मा गांधीजींच्या विनंतीला मान देऊन पंत असहकार चळवळीत सहभागी झाले.
१९१४ साली पंत यांनी प्रेम सभेची स्थापना केली. पुढे त्यांच्या प्रयत्नातून उदयराज हिंदू स्कुलची स्थापना करण्यात आली. १९१६ साली पंत यांची काशीपुरच्या नोटीफाईड एरिया कमिटीमधे निवड करण्यात आली. माजी पंतप्रधान पंडितजींचा पंतांवर विश्वास होता. इंग्रज काळातच गोविंद वल्लभ पंत युपीचे (युनायटेड प्रोव्हिन्स ऑफ आग्रा अँड अवध) मुख्यमंत्री बनले होते. पंत यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशात कायदे व्यवस्थित राबविण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात प्रदेशात कधीच जातीय अथवा धार्मिक हिंसाचार घडून आला नाही. त्यांच्या काळात प्रशासनाने उत्तम कामगिरी केली. पुढे भारतात अखिल भारतीय स्तरावर हेच मॉडेल राबविण्यात आले.
पंत ८ जानेवारी १९२४ ला स्वराज पक्षाकडून संयुक्त प्रांताच्या विधानपरिषदेवर निवडून आले. त्यांनी आपल्या तर्कसंगत आणि सारगर्भित भाषणाच्या बळावर बऱ्याचदा परिषद दणाणून सोडली होती. सायमन कमिशनच्या विरोधात त्यांनी अत्यंत प्रखरपणे आपली भूमिका मांडली होती.
१९३० चा मिठाचा सत्याग्रह, १९३२ चे सविनय कायदेभंग आंदोलन, १९४० चा वैयक्तिक सत्याग्रह आणि १९४२ चे भारत छोडो आंदोलन, या सर्व आंदोलनांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होते. त्यांना या आंदोलनामुळे ७ वर्षे कारावास देखील झाला होता. लखनऊमध्ये एका मोर्चात नेहरूंना वाचवण्यासाठी ते स्वतः जखमी झाले होते.
पंत १९३७ ते १९३९ पर्यंत संयुक्त प्रांताचे प्रधानमंत्री अर्थात प्रीमियर होते. जेव्हा काँग्रेस सरकारांची सहमती न घेता, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन सहभागी झाला त्यावेळी काँग्रेसने आपली सर्व सरकारे बरखास्त केली होती, यात पंत यांचे सरकार देखील होते. यानंतर ते पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर प्रदेशचे ८ वर्ष मुख्यमंत्री होते. ते बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक श्री. मदन मोहन मालवीय यांचे शिष्य होते.
१९५५ ते १९६१ या काळात त्यांनी अत्यंत निष्ठेने केंद्रात गृहमंत्री पद भूषविले. भाषेच्या आधारावर प्रांतरचना करण्यात त्यांनी अत्यंत मह्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. पंत एक कुशल अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांच्या देशसेवेसाठी त्यांना १९५७ साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले.
गोविंद पंतांचे व्यक्तिमत्व बहूआयामी स्वरुपाचे होते. ते उत्तम नाटककार होते. मार्कण्डेय पुराणाच्या आधारावर त्यांनी वरमाला हे नाटक लिहिले होते. राजमुकुट, अंगूर कि बेटी या दोन नाटकांचे लेखन पंत यांनी केले होते. त्यांनी लिहिलेल्या ‘फॉरेस्ट प्रॉब्लेम्स इन कुमाऊ’ या पुस्तकावर इंग्रजांनी निर्बंध आणले होते. १९८० साली हे पुस्तक पुन्हा प्रकाशित करण्यात आले. ब्रिटिश लोक गोविंद पंतांच्या भीतीने काशीपूरला गोविंदगड म्हणून ओळखायचे.
धार्मिक भेदभावावर आणि संप्रदायिकतेवर गोविंद वल्लभ पंतांनी कडाडून हल्ला चढवला होता. त्यांच्या मते यामुळे स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग अधिक खडतर होत होता. ते नेहमी म्हणायचे की आपण सर्व बंधुतुल्य राष्ट्रवासी आहोत, आपल्यातील रक्त देखील एकाच रंगाचे आहे. धर्मांधता हा एक शाप आहे आणि मानवता हीच खरी ईश्वरसेवा आहे,असे गोविंद वल्लभ पंतांचे मत होते.
गोविंद वल्लभ पंत यांचे राहणीमान अत्यंत साधेपणाचे व शालीन स्वरुपाचे होते.
त्यांनी एकदा मंत्रालयातील चहा नाश्त्याचे बिल मागवले आणि चहा वगळता, त्यांनी केलेल्या नाश्त्याचे बिल आपल्या खिशातून त्यांनी दिले होते.
त्यांच्या मते सरकारी पैशाचा वापर हा फक्त जनतेच्या हितासाठी करण्यात आला पाहिजे.
सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन करताना ज्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्यावर लाठीचार्ज केला होता, तोच ते मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या ऑफिसात व्यवस्थेला होता. एकदा पंतांनी त्याला बोलावून घेतले आणि त्याची आस्थेने विचारपूस केली होती. गोविंद वल्लभ पंतांच्या या स्वभावाने अनेकांना भुरळ घातली होती.
७ मार्च १९६१ रोजी गोविंद वल्लभ पंत यांचे निधन झाले. सदैव लोककल्याणासाठी झटणारे महापुरुष म्हणून इतिहासात त्यांचे नाव कोरले गेले आहे. पंत यांनी आयुष्यभर साधेपण मिरवले. कुठलाही बडेजाव केला नाही. त्यांच्या वागण्यातील सहजतेने लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. हिंदी भाषेवर त्यांची अपार माया होती. हिंदीला एक राष्ट्रीय स्वरूप देण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. गोविंद वल्लभ पंत हे काँग्रेसच्या विचारधारेचे खरे पाईक होते. त्यांनी आयुष्यभर गांधीवाद जपला आणि वाढवला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.