आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे स्वातंत्र्यसैनिक, राजकारणावर उत्तम पकड असलेले राजकारणी, उत्तम वकील, दिग्गज साहित्यिक, तत्ववादी विरोधक, इतिहासाचे गाढे अभ्यासक, कुशल प्रशासक अशा कित्येक भूमिकांना न्याय देणाऱ्या चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा वारसा आज इतिहासाच्या पडद्याआड गडप होत चालला आहे. स्वतःतील विवेकाची ज्योत कायम जागती ठेवणारा पहारेकरी अशा शब्दांत गांधीनी त्यांच्या गुणांचे कौतुक केले होते.
सी. राजगोपालचारी.
त्यांना सर्वजण राजाजी याच नावाने ओळखत. त्यांच्याजवळ ज्ञानाचा अद्भुत खजिना तर होताच पण त्याचबरोबर भाषेला वाकवण्याचे कसब होते आणि त्यांच्यातील हजरजबाबीपणाला तर तोडच नाही.
एकदा ते ट्रेनने प्रवास करत होते. त्याच्या शेजारी एक इंग्रज व्यक्ती बसली होती. तक्रारीच्या सुरात ती व्यक्ती म्हणाली, “भारतातील तापमान थोडे जास्तच आहे, नाही?” तेव्हा राजाजी हसतहसत उत्तरले, “इतकी पण, नाही की गर्मीमुळे तुम्ही हा देश सोडून जाल.” अर्थातच त्या व्यक्तीचा चेहरा पाहण्यासारखा झाला असेल.
तामिळनाडूमधील कृष्णागिरी जिल्यातील थोरापल्ली गावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण होसूरमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण मद्रास आणि बंगळूरूमध्ये पार पडले. राजाजींचे विचार काळाच्या चार पावले पुढे होते. त्यांना जितका मानसन्मान मिळाला तितकेच ते टिकेचेही धनी झाले.
रौलट कायद्याविरोधातील सत्याग्रह, गांधीजीनी पुकारलेले असहकार आंदोलन वायाकोम येथील दलितांचा मंदिर प्रवेश सत्याग्रह, सविनय कायदेभंग अशा राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अनेक आंदोलनात त्यांनी हिरीरीने पुढाकार घेतला. रोलट कायद्याला विरोध करताना त्यांनी गांधीजींसोबत तीन महिन्याचा कारावासदेखील भोगला.
गांधींच्या असहकार आंदोलनाला प्रतिसाद म्हणून त्यांनी मद्रास न्यायालयातील वकिलाची नोकरी सोडली. ते गांधीचे अनुयायी असले तरी अंधभक्त बिलकुल नव्हते. म्हणूनच गांधींच्या १९४२च्या चाले जाव आंदोलनाला त्यांनी पाठींबा दिला नाही.
त्यांच्या मते ही वेळ ब्रिटिशांना विरोध करण्याची नाही त्यापेक्षा त्याच्याशी वाटाघाटी करून आणि युद्धात सहाय्य करण्याची तयारी दाखवून त्यांना भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी भाग पाडावे. त्यांचा धार्मिक आधारावर देशाच्या विभाजनालाही आक्षेप नव्हता. याच कारणावरून कॉंग्रेस आणि त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
व्यवसायाने वकील असणाऱ्या राजाजींनी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मद्रास प्रांताची निवडणूक लढवली होती आणि ते मद्रास प्रांताच्या प्रमुखपदी निवडून आले होते. याबरोबरच ते संविधान सभेचेदेखील सदस्य होते. बंगालचे राज्यपाल म्हणूनही काही काळ त्यांनी काम पहिले. तत्कालीन मद्रास प्रांताचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री होते.
देशाच्या पहिल्या सरकारमध्ये त्यांनी उद्योगमंत्री पद भूषवले. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना बंगालच्या राज्यपाल पदी नियुक्त करण्यात आले.
कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वतंत्र पक्ष या नावाने स्वतःचा पक्ष स्थापन केला.काँग्रेसच्या समाजवादी विचारसारणीहून भिन्न असणारा हा देशातील पहिला पक्ष असेल ज्याचा पाया १९५९ साली रचला गेला. लोकशाही देशात राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेस पक्षाला एकही विरोधक नसणे ही गोष्ट त्यांना सातत्याने खटकत होती.
१९५९ साली त्यांनी हा पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांच्यासोबत मिनू मसानी, कन्हैया लाल, माणिक लाल मुन्शी, एनजी रंगा यासारखे दिग्गज नेते पक्षात होते. १९६२ साली लढवलेल्या निवडणुकीत या पक्षाने २२ जागांवर विजय मिळवला होता. १९६७ साली या पक्षाला ४४ जागांवर विजय मिळाला तर १९७१ सालच्या निवडणुकीत या पक्षाला फक्त आठ जागांवर समाधान मानावे लागले.
राजाजींच्या स्वतंत्र पक्षाचा इतिहास एवढ्यापुरताच सीमित राहिला. परंतु राजाजी आणि त्यांच्या पक्षाचे विचार मात्र आजही मार्गदर्शक ठरतात.
राजाजी दूरदृष्टी असलेले नेते होते. भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दलचा त्यांचा अंदाज अगदी अचूक असे. त्यांच्या या अंदाजामुळे अनेकदा ते वादाच्या भोवऱ्यातही सापडत. पण, त्यामुळे त्यांचा निश्चय तसूभरही ढळत नसे. अनेक समकालीन लोकांना फाळणीचा अंदाज येण्याआधीच फाळणी ही भारताच्या प्राब्धतातील अटळ घटना आहे हे राजाजींनी ओळखले.
मुल्सिम लीगच्या मुद्द्यांवर सहमती दर्शवत त्यांनी छोडो भारत चळवळीला विरोध केला. ब्रिटन त्याकाळी दुसऱ्या महायु*द्धात गुंतला होता. १९४१-४२ साली त्यांनी कॉंग्रेससमोर एक प्रस्ताव मांडला की मुस्लीम लीगशी तडजोड करून त्यांनी पुढील वाटचाल आखली पाहिजे.
त्यांच्या या प्रस्तावावरून बरीच टीका झाली. पण, त्यांचे म्हणणे अंमलात आणले असते तर फाळणीच्या वेळी जो प्रचंड आणि नाहक रक्तपात झाला तो टाळणे शक्य झाले असते.
काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना कॉंग्रेस पक्ष सोडण्यास भाग पडले.
१९५१ साली ते देशाचे गृहमंत्री होते. त्या नात्याने त्यांनी पंतप्रधान नेहरुंना चीनच्या वाढत्या आक्र*मक पवित्र्याबद्दल सावध केले होते. चीनच्या विस्तारवादी आक्र*मकतेमुळे भारताचे सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकते. परंतु, नेहरूंनी वेळीच हा धोका ओळखला नाही. नेहरूंना यातील धोका जाणवत नसल्याबद्दल त्यांना प्रचंड चीड होती. याच करणावरून त्यांनी नेहरू सरकारमधील गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला.
अकरा वर्षानंतर त्यांनी केलेले भाकीत खरे ठरले. भारत हिंदी-चीनी भाई-भाईच्या नाऱ्यात गुंगला असतानाच, चीनने भारतावर ह*ल्ला करून अनेक भारतीय प्रदेशांवर अवैध वर्चस्व मिळवले.
अर्थव्यवस्था, परराष्ट्र संबंध, आणि राजकीय क्षेत्राबद्दल राजाजींचे विचार आजही सुसंगत ठरतात. परमिट राज नाहीसे व्हावे, लायसन्स राज नष्ट व्हावे, सरकारी व्यवस्थेतील भ्रष्टाचार बंद व्हावा, अशी त्यांची मागणी होती. या मुद्द्यांना धरून ते सतत सरकारबद्दलची आपली नाराजी व्यक्त करत असत.
भांडवलशहांच्या पैशाचा प्रभाव देशाच्या राजकारणावर पडता कामा नये असे त्यांचे स्पष्ट मत होते. जे आजही सुसंगत वाटते.
गांधींसोबत देशाची नैतिक शक्ती देखील गेली की काय असा सामान्य माणसाचा समज होऊ नये, अशी माझी तीव्र इच्छा असल्याचे ते म्हणत. आपल्या सगळ्या मतांची सरकारला स्पष्ट कल्पना मिळावी म्हणून त्यांनी नेहरुंना एक खुले पत्रच लिहिले. ज्यात त्यांनी वरील सर्व मुद्द्यांचा समावेश केला होता.
सातत्याने कॉंग्रेस पक्षाला मिळणारा विजय पाहता देशातील राजकारणावर बड्या उद्योगपतींची कृपादृष्टी असल्याचे स्पष्ट दिसते आहे, असेही ते म्हणाले होते. निवडणूक प्रक्रिया अशा भांडवलदाराच्या प्रभावातून मुक्त होण्यासाठी ते निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी सातत्याने करत होते. अशी सुधारणा करण्याची मागणी त्यांच्यानंतर कुणीही केली नाही.
निवडणुका होण्यापूर्वी सहा महिने सरकार बरखास्त करावे असे त्यांचे मत होते जेणेकरून सरकारच्या कामाचा मतदारांच्या मतदानावर फारसा प्रभाव राहणार नाही. प्रसार माध्यमांनी कोणत्याही पक्षाची भलामण करण्यालाही त्यांचा विरोध होता. त्याच्या मते ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलमुळे मतदार प्रभावित होतात. यासारख्या पोलवर बंदी आणण्यात यावी अशी त्यांची मागणी होती.
कोणताही एक पक्ष किंवा उमेदवाराने निवडणूकीचा खर्च न करता सरकारने निवडणुकांवर होणाऱ्या खर्चासाठी एक सामुहिक निधी जमा करावा आणि तो निवडणुकीदरम्यान खर्च करावा असाही उपाय त्यांनी सुचवला होता. उमेदवारांनी जर निवडणुकीदरम्यान खाजगी संपत्ती खर्च केली तर, त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणे व्यर्थ ठरेल असे त्यांचे मत होते.
ते स्वतःच्या विमोचन या मासिकाद्वारे दारूबंदीचा प्रचारही करत असत. देशातील विविध प्रश्नांना संबोधित करण्यासाठी त्यांनी आपली लेखणी झिजवली. चक्रवर्ती तीरुगमन या त्याच्या गद्य रचनेसाठी त्यांना तमिळ मधील साहित्य अकादमी पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते. गीता आणि उपनिषदांची देखील त्यांनी चिकित्सा केली आहे.
राजकारणातील चाणक्य म्हणून उल्लेखल्या जाणाऱ्या या विवेकसंपन्न नेत्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.