आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारताने जगाला खूप अमुल्य गोष्टी दिल्या आहेत. या सगळ्या गोष्टीत श्रेष्ठ आहे ते बौद्ध धम्माचे शांतीपूर्ण आणि करुणामयी तत्त्वज्ञान. बौद्ध धर्माचा उदय भारतात झाला असला तरी आज भारताबाहेर अनेक देशांत बौद्ध विचारांचा प्रभाव पहायला मिळतो. या विचारप्रणालीने संपूर्ण विश्वाला करुणेचा मार्ग दाखवला. चीनमध्ये बुद्ध धर्माच्या प्रसारासाठी गेले बोधीधर्म या बौद्ध भिक्खुंनी तिथल्या लोकांना बौद्ध धर्माचे ज्ञान तर दिलेच शिवाय या लोकांना स्वसंरक्षणासाठी एक नवी क्लृप्तीदेखील शिकवली. जगभर मार्शल आर्ट्सच्या नावाने ओळखले जाणारे हे तंत्र भारतीय बौद्ध भिक्खू बोधीधर्म यांनी जन्मास घातले आहे, याची कुणालाही फारशी माहिती देखील नाही.
बोधीधर्म एक बौद्ध भिक्खू होते, त्यांनी आपल्या कठोर ज्ञानसाधनेतून एक नवा शोध लावला होता. कुंग-फु आणि मार्शल आर्ट्ससारख्या स्वसंरक्षणार्थ वापरल्या जाणाऱ्या तंत्रांचा शोध त्यांनी स्वतःच लावला होता. परंतु आज हे तंत्र जपान आणि चीनसारख्या देशांपुरतेच मर्यादित राहिल्याने हे तंत्र त्याच देशाचे आहे की काय असे वाटते. चीनमध्ये मार्शल आर्ट्सचे श्रेय बोधीधर्म यांनाच दिले जाते. फक्त मार्शल आर्ट्सच नाहीतर बोधीधर्मांमुळे चीनला अनेक नवनव्या गोष्टींचा फायदा झाला.
बोधीधर्म कोण होते? ते चीनमध्ये का गेले? तिथल्या लोकांनी त्यांचे स्वागत कसे केले? बोधीधर्मांनी चीनमधील लोकांना हे तंत्र का शिकवले? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतीलच. जाणून घेऊया तुमच्या या प्रश्नांची उत्तरे या लेखातून!
बोधीधर्मांचा जन्म एका सधन आणि अत्यंत समृद्ध कुटुंबात झाला. त्यांचा जन्म दक्षिण भारतातील पल्लव राजवंशात झाला होता. त्यांचे वडील कांचीपुरमचे राजा होते. त्यामुळे लहानपणापासूनच बोधीधर्माच्या घरी भरपूर श्रीमंती होती. त्यांचे बालपण अतिशय आनंदात आणि ऐश्वर्यसंपन्न वातावरणात व्यतीत झाले. त्यांना कशाचीही अजिबात कमतरता नव्हती. त्यांचे आयुष्य अगदी ऐषोआरामात चालले होते.
आयुष्यभर हा ऐषोआराम अनुभवण्याची संधी असूनही त्यांनी या वैभवसंपन्न आयुष्याचा त्याग केला. एक सरळ सुखी आयुष्य जगण्याची संधी असतानाही बोधीधर्म यांनी भिक्खूंचे खडतर आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला.
लहानपणापासूनच त्यांना बुद्ध धर्माविषयी एक सुप्त आकर्षण होते. बौद्ध भिक्खूंचे शांतीमय आयुष्य जगण्याचा त्यांनी निश्चय केला होता. बुद्ध धर्मातील आंतरिक शांती शोधण्याची प्रक्रिया त्यांना खूप आवडत असे. शिवाय त्यांना लहानपणी श्वसनाचा विकार होता. यावर उपाय म्हणून त्यांना श्वसनाचे काही व्यायाम करावे लागत. यातूनच पुढे त्यांना ध्यानधारणेविषयी आणखी ओढ वाढत गेली.
ते एक राजपुत्र होते त्यामुळे त्यांना लढाईचे शिक्षण घेणे तर भागच होते. युद्धशास्त्रातही त्यांनी प्राविण्य मिळवले. तरीही ध्यान आणि धम्म यांच्याविषयीचे आकर्षण मात्र दिवसेंदिवस वाढतच होते. अगदी कमी वयातच त्यांनी भिक्खू बनण्याचा निर्णय घेतला. त्यांचा ठाम निश्चय झाल्यावर घरदार सोडून परीव्रज्या घेतली. धम्माच्या शिकवणुकीनुसार ध्यान लावण्याच्या सततच्या अभ्यासाने ते ध्यानातही पारंगत झाले. म्हणूनच त्यांच्यावर बुद्ध धर्माच्या प्रसारासाठी चीनला जाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांची साधना आणि तपश्चर्या पाहता त्यांना बौद्ध धर्माचे २८वे बोधिसत्व बनवण्यात आले.
चीनमध्ये गेल्यानंतर बोधीधर्मांच्या आयुष्याचा खरा प्रवास सुरु झाला. इस ४९५ मध्ये बोधीधर्म चीनमध्ये गेले. पण, त्यांच्याही आधी एका बौद्ध भिक्खूने चीनमध्ये धम्माचा प्रसार करण्याचे काम सुरु केले होते. त्याने तर शाओलीन मंदिराच्या बांधकामाचे काम देखील हाती घेतले होते. बोधीधर्म यांच्यावर बौद्ध धर्माच्या प्रचाराची व्यापकता वाढवण्याची जबाबदारी होती. मात्र जेंव्हा ते चीनमध्ये पोहोचले तेंव्हा त्यांना समजले की या कामात किती अडथळे आहेत. चीनमध्ये ते थेट माउंट सोंग येथील शाओलीन मंदिरात गेले. पण, मंदिरातल्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेश दिला नाही.
मंदिरात प्रवेश नाकारल्यानंतर बोधीधर्म त्याच पर्वताच्या वरच्या दिशेने जाऊ लागले. मंदिरातील अधिकाऱ्यांना वाटले काही दिवस थांबेल हा भिक्खू आणि मग निघून जाईल. पर्वतरंगांमध्ये राहून दिवस काढणे तितकेसे सोपे काम नाही. परंतु बोधीधर्म काही कच्चे भिक्खू नव्हते. त्यांनी पर्वताच्या उंच टोकावर जाऊन ध्यान साधना सुरु केली. तिथे जवळच त्यांना गुफा दिसली. या गुफेलाच त्यांनी आपल्या वास्तव्याचे ठिकाण बनवले.
या गुफेतच त्यांनी नऊ वर्षे घालवली. या नऊ वर्षात त्यांनी स्वसंरक्षणासाठी एक खास तंत्र विकसित केले होते. कारण याठिकाणी त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणेही अत्यंत गरजेचे होते.
शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आणि विना हत्याराचे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी या तंत्राचा शोध लावला होता. नऊ वर्षे झाली तरी बोधीधर्म पर्वत सोडून गेले नाहीत हे पाहून मंदिरातील अधिकाऱ्यांचे मत परिवर्तन झाले. त्यांनी बोधीधर्मांना मंदिरात येण्याचे आमंत्रण दिले.
मंदिरात गेल्यानंतर बोधीधर्म यांनी नऊ वर्षाच्या कडक ध्यानधारणेच्या अनुभवातून जे काही ज्ञान प्राप्त झाले होते, त्याची शिकवण देण्याचे काम सुरु केले. त्या दुर्गम पर्वत रांगांमध्ये राहून शाओलीन मंदिराचे अधिकारी देखील शारीरिकदृष्ट्या कमकुवत झाले होते. म्हणून बोधीधर्म यांनी स्वतःहून त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यास पुढाकार घेतला. तेंव्हापासूनच चीनमध्ये कुंग-फु आणि मार्शल आर्ट्सला सुरुवात झाली. हळूहळू हे तंत्र चीनच्या बाहेरही पसरू लागले.
बोधीधर्माने नऊ वर्षांच्या ध्यानसाधनेत फक्त कुंग-फु आणि मार्शल आर्ट्सच नाहीतर आणखीही काही महत्वाचे शोध लावले. अर्थात हे मिथक पूर्णतः सत्य आहे असा दावा करणे चुकीचेच ठरेल. चहाचा शोध देखील बोधीधर्मांनीच लावला असे मानले जाते. बोधीधर्मांच्या आयुष्यातील ही कथा अगदीच रोचक आहे. अर्थात ती किती खरी आणि किती खोटी याबाबत वाद असू शकतात. पण, बोधीधार्माशी संबंधित ही कथा वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
शाओलीन मंदिरात प्रवेश करण्यास बोधीधर्म यांना मनाई केली तेंव्हा ते एका गुफेत ध्यान करत बसले. याठिकाणी त्यांनी नऊ वर्षे घालवली. या नऊ वर्षात त्यांना कधीकधी ध्यान कारताना झोप लागत असे. झोप लागल्याने ध्यानाचा अवधी कमी होत असे. बोधीधर्म यांना आपल्या झोपेवर काही तरी उपाय करायचा होता. जेणेकरून झोपेत वेळ न जाता, जास्तीत जास्त वेळ ध्यान करता येईल. त्यांच्या लक्षात आले की जेंव्हा डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटतात तेंव्हाच आपल्याला झोप लागते.
या पापण्या एकमेकांना चिकटू नयेत यासाठी काय करता येईल, यावर त्यांनी विचार सुरु केला आणि त्यांनी आपल्या पापण्याच कापून टाकल्या.
नंतर बोधीधर्म झोपेच्या वेळतही ध्यान करू शकत होते आणि ध्यान करताना त्यांना झोप लागत नसे. असे म्हंटले जाते की, बोधीधर्म यांनी जेंव्हा पापण्या कापल्या तेंव्हा त्यांच्या डोळ्यातून जे रक्त मातीवर गळले, त्यातून चहाचे झाड उगवले. अशाप्रकारे बोधीधर्म यांनाच चहाच्या शोधाचे श्रेय दिले जाते.
बोधीधर्म यांनी आपल्या या नऊ वर्षाच्या काळात ज्या काही नवनव्या गोष्टी शिकल्या त्या गोष्टी ते शेवटपर्यंत इतरांनाही शिकवत राहिले. त्यांच्यासोबत त्यांचे चार शिष्य होते, अगदी शेवट पर्यंत या शिष्यांनी बोधीधर्मांची साथ सोडली नाही. बोधीधर्म यांनी त्यांच्याकडून एकच गुरुदक्षिणा मागितली, ते म्हणाले की शेवट पर्यंत तुम्हीही बोद्ध धर्मातील ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवत राहा. बोधीधर्म यांनी आपल्या कार्यकाळात ज्या नवनव्या गोष्टी शिकल्या आणि त्यांचे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवले, त्या गोष्टी आजही जिवंत आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.