आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतात एकापेक्षा एक उत्तम क्रिकेटपटू आहेत. आयपीएलमुळे नव्या खेळाडूंनाही संधी मिळते आहे. या सामन्यांतून भारतीय संघाला उत्तमोत्तम खेळाडू भेटत आहेत. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय क्रिकेट संघ एक मजबूत संघ बनला आहे. देशात आणि बाहेरील मैदानातही आपला संघ जोरदार कामगिरी करत आहे. संघात येणारे नवनवे खेळाडू चांगली कामगिरी करून देशाचा मान जगात उंचावत आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय सामन्यांची वाहवा करत असतानाच आपण देशांतर्गत सामन्यांकडे मात्र दुर्लक्ष करतो. देशांतर्गत सामन्यांतही अनेक खेळाडू क्रिकेटमधील आपले कसब दाखवत आहेत.
नवख्या खेळाडूना क्रिकेटला एक उंची प्रदान केली असली तरी जुन्या क्रिकेटपटूंचे योगदान नाकारता येत नाही. अशा जुन्या खेळाडूतील एक खेळाडू म्हणजे रणजी सामन्यात आपल्या बॅटची करामत दाखवणारा वसिम जाफर. क्रिकेटमध्ये वसिमचे नाव झाले ते रणजी करंडक स्पर्धेमुळेच.
वयाच्या पंधराव्या वर्षापासून क्रिकेट खेळणाऱ्या वसिमने अनेकदा आपल्या खेळाने प्रेक्षक आणि क्रिकेट परीक्षकांनाही आवाक् करून सोडले आहे.
वसिम जाफरचा जन्म १६ फेब्रुवारी १९७८ रोजी मुंबईमध्ये झाला. लहानपणापासून त्याला क्रिकेटची आवड होती. गल्लीतील मित्रांसोबत अख्खा दिवस तो क्रिकेट खेळण्यात घालवत असे. वसिमच्या घरातूनही कधी त्याच्या क्रिकेटला विरोध नाही झाला.
पण वसिमला फक्त फलंदाजी करण्याचीच आवड होती. तो तासानतास फलंदाजीचा सराव करत असे. मित्रांसोबत खेळतानाही तो सहजासहजी बॅट इतरांना कुणाला देत नसे.
क्रिकेट म्हणजे वसिमसाठी जीव की प्राण!
क्रिकेटबद्दलचे त्याचे हेच वेड पाहून घरच्यांनीही त्याला क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्याची परवानगी दिली. घरातून परवानगी मिळताच वसिमने एका क्रिकेट कोचिंगमध्ये सराव सुरु केला. या क्रिकेट ॲकॅडमीमध्ये त्याने क्रिकेटचे आणि फलंदाजीचे सर्व बारकावे शिकून घेतले. यादरम्यान त्याच्या फलंदाजीत बरीच सुधारणा झाली. याच काळात त्याने स्क्वायर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह आणि स्ट्रेट ड्राईव्ह असे विविध प्रकार शिकून घेतले. एकाच वर्षात तो इतका तरबेज झाला की पुढच्याच वर्षी त्याला रणजी स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली.
त्याच्या गेममधली ही विविधता आणि त्यातली सफाई पाहूनच रणजी क्रिकेट संघाची निवड करणाऱ्या समितीने वसिमची निवड केली. १६ वर्षांचा हा कीडमिडा मुलगा काय क्रिकेट खेळणार असे त्याच्याकडे पाहून कुणालाही वाटणे साहजिकच होते. निवड समितीने नेमके याच्यात काय पाहून याची निवड केली असा प्रश्नही तेव्हा अनेकांना पडला असेल. पण वसिमचा खेळ पाहिल्यावर सर्वांनाच आपोआप अशा प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील.
रणजीच्या पहिल्या सामन्यात वसिमला फार काही मोठी खेळी करता आली नाही. पण, दुसऱ्या सामन्यात मात्र त्याने तीन शतक ठोकून इतिहास रचला होता.
या सामन्यानंतरच वसिमची भारतीय क्रिकेट संघात येण्याची वाट मोकळी झाली.
खरे तर त्याकाळात भारतीय क्रिकेट संघात एकसे बढकर एक फलंदाज होते. अशा फलंदाजांमध्ये वसिमची दाखल घेतली जाईल का हा प्रश्न होता.
तरीही क्रिकेट संघाची निवड करणाऱ्यांनी वसिमला संधी द्यायचे ठरवले. आणि २००० मध्ये वसिमचा भारतीय क्रिकेट संघात प्रवेश झाला.
वसिम संघात आल्यानंतर भारतीय संघाचा पहिलाच सामना दक्षिण आफ्रिकेशी होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळण्यात आला. भारतीय संघाच्या वतीने सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी वसिमला मिळाली. रणजी सामन्यात आपल्या बॅटच्या करामती दाखवणारा वसिम या सामन्यातही नक्कीच काही तरी अफाट कामगीरी करेल असे भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीला वाटत होते.
पण, रणजी सामन्यात तीन शतक ठोकणारा वसिम यावेळी मात्र फक्त १० धावांवरच बाद झाला. त्याच्याकडून अपेक्षा ठेवलेल्या सगळ्यांनाच त्याने निराश केले. या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. आपल्याच मैदानात भारतीय संघाच्या झालेल्या या नामुष्कीजनक पराभवानंतर भारतीय संघावर चारी बाजूंनी टीका होऊ लागली. निवड समितीच्या अकलेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
पहिल्याच संधीची माती केल्यानंतर वसिमला सरळ सरळ संघातून नारळ देण्यात आला. यानंतर २००० ते २००२ या काळात वसिम संघाबाहेरच होता. २००२ साली त्याला पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघात निवडले गेले. यावेळी त्याला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या संघात सामील होण्याची संधी देण्यात आली.
दुसऱ्या देशातील मैदानावर खेळण्याचा हा त्याचा पहिलाच अनुभव होता.
दक्षिण आफ्रिकेसोबतच्या या सामन्यात त्याने दोनवेळा अर्ध शतक ठोकले. त्याच्या या कामगिरीने टीकाकारांनाही सडेतोड उत्तर मिळाले.
तो दुसऱ्यांदा वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला तेव्हा कॅरिबियन मैदानावर त्याने एकट्याने २१२ धावा काढल्या. आपल्या बॅटने त्याच्या बाबतीत शंका व्यक्त करणाऱ्यांना त्याने चांगलेच उत्तर दिले होते.
वसिमचा खेळ निश्चितच चांगला होता, तरीही भारतीय संघात त्याला स्वतःचे स्थान निर्माण करता आले नाही. कधी त्याला खेळ करता येत नव्हता तर कधी शारीरिक दुखापतीमुळे त्याला संघात सामील होता आले नाही. या दरम्यान त्याने फक्त प्रथम श्रेणी सामन्यांवरच लक्ष केंद्रित करण्याला प्राधान्य दिले.
त्याने एकूण २४२ प्रथम श्रेणी सामने खेळले. आणि या प्रत्येक सामन्यात त्याने सरासरी एक अर्धशतक याप्रमाणे धावा काढल्या आहेत. या सरासरीने त्याने प्रथम श्रेणी सामन्यातच एकूण १८,११० धावा केल्या आहेत. यामध्ये ५३ शतक आहेत आणि ८६ अर्धशतक आहेत.
वसिम पूर्वी मुंबई संघातून खेळत असे मात्र आता विदर्भ संघातून खेळतो. वयाच्या ४०व्या वर्षीही तो ताज्या दमाच्या खेळाडूप्रमाणे खेळ करू शकतो. विदर्भ संघाचे कर्णधार पद स्वीकारल्यानंतर त्याने या संघाला पहिल्यांदा ईराणी कप मिळवून दिला. या वयात द्विशतक ठोकून त्याने अजूनही आपल्यातील जोश हरवला नाही हे सिद्ध केले आहे. विदर्भ संघाच्या वतीने खेळताना त्याने २८६ धावा काढल्या. त्याच्या या दमदार सुरूवातीमुळे विदर्भ संघाने ८०० धावांचा पर्वत उभा केला होता.
मुंबई संघाला वसिमने आठ वेळा रणजी कप मिळवून दिला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये वसिमने जी कमाल केली आहे, ती अनेक नवखेळाडूंना प्रेरणा देणारी आहे. देशांतर्गत सामन्यातही आपण चांगली खेळी करून चांगले नाव कमवू शकतो हे त्याने दाखवून दिले. खेळात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी वसिम जाफरी ही एक आगळीवेगळी प्रेरणा आहे हे मात्र नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.