आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
नागरिकत्व दुरुस्ती कायदा पारित केल्यानंतर या कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. आसामपासून सुरु झालेले निदर्शनांचे हे लोण दिल्लीपर्यंत पोहोचले. दिल्लीतील जामिया मिल्लिया विद्यापीठात देखील या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी निदर्शने करण्यात आली. त्यानंतर या विद्यापीठात पोलिसांनी केलेली कारवाई देखील वादग्रस्त ठरली होती. त्यानंतर हे विद्यापीठ चर्चेत आले होते.
जामिया मिल्लिया विद्यापीठाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झाली होती. या विद्यापीठाची स्थापना मौलाना महमूद हसन यांनी केली होती. गांधीजींनी देखील या विद्यापीठाच्या स्थापनेत हातभार लावला होता. रवींद्रनाथ टागोर यांनीही या विद्यापीठाच्या स्थापनेला पाठींबा दिला होता.
पुरेशा निधी अभावी हे विद्यापीठ अनेकदा बंद पडण्याच्या स्थितीत पोहोचले होते. मात्र गांधीनी या विद्यापीठाला आर्थिक रसद मिळवून दिली आणि हे विद्यापीठ सुरु राहिले.
या विद्यापीठाच्या स्थापनेपासून गांधींचा या विद्यापीठाशी घनिष्ठ संबंध राहिलेला आहे. निधी अभावी जेंव्हा विद्यापीठ चालवणे जिकीरीचे वाटू लागले तेंव्हा गांधीजींनी निधी जमवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला. जमियासाठी हवे तर मी कटोरा घेऊन दारोदार फिरेन पण विद्यापीठ बंद होऊ देणार नाही, अशी गांधीजींनी प्रतिज्ञाच केली होती.
कोणत्याही परिस्थितीत जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठ सुरु राहिलं पाहिजे अशी गांधीजींची इच्छा होती. गांधीजींचा मदतीनेच हकीम अजमल खान, डॉ. मुख्तार अहमद आणि अब्दुल मजीद ख्वाजा यांनी १९२५ साली विद्यापीठाचे स्थलांतर केले. पूर्वी हे विद्यापीठ अलिगढला होते ते दिल्लीच्या करोल बागेत हलवण्यात आले.
ब्रिटीश काळात देशात पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीचा जास्त प्रभाव होता. याऐवजी स्वतंत्रता आंदोलनासाठी क्रियाशील शक्ती संघठीत व्हावे आणि देशी पद्धतीच्या शिक्षणाचा प्रसार करण्याच्या हेतूने या विद्यापीठाची स्थापना १९२० मध्ये झाली.
ब्रिटिशांच्या विरोधात तेंव्हा असहकार आंदोलन आणि खिलापत चळवळीने जोर धरला होता. याच चळवळीच्या वैचारिक मंथनातून देशात राष्ट्रीय शिक्षण सुरु करण्याच्या उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना झाली. असहकार चळवळ आणि खिलाफत आंदोलनाच्या वेळी या विद्यापीठाची भरभराट झाली. पण, १९२२ मध्ये असहकार आंदोलन आणि १९२४ मध्ये खिलापत चळवळ मागे घेण्यात आली. ज्या चळवळीतून ही संस्था उभी राहिली ती चळवळच मागे घेतली गेल्याने जामियाची स्थिती बिघडली.
जामियावर अनेकदा आर्थिक आणि राजकीय संकटेही आली. पण, गांधीजी त्यावेळी म्हणाले होते, “जामिया सुरु राहिलंच पाहिजे. जर आर्थिक चिंता असतील तर मी यासाठी हातात कटोरा घेऊन भिक मागायलाही तयार आहे.”
गांधीजींच्या या वक्तव्यामुळे जामियाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेकांचं मनोधैर्य वाढले. निधी उभारण्यासाठी गांधीजी प्रयत्न करत होते. पण, ब्रिटिशांच्या दबावामुळे कोणीही जामियाला मदत करण्यासाठी पुढे येत नव्हते.
गांधीजींचा सांगण्यावरून जमनालाल बजाज यांनी विद्यापीठासाठी मोठी रक्कम दान दिली. त्यांचे अनुकरण करत आणखीही काही लोक जामियाला देणगी देण्यासाठी पुढे आले. या देणगीमुळे जामिया बंद पडण्यापासून वाचले.
हकीम अजमल खान हे या विद्यापीठाचे पहिले कुलपती होते. गांधीजी पहिल्यांदा दिल्लीत आले तेंव्हा हकीम अजमल खान यांच्याच घरी उतरले होते. यानंतरही हकीम अजमल खान आणि गांधीजींमधील मैत्र कायम राहिले. अल्लामा इक्बाल यांना या विद्यापीठाचे उपकुलगुरू बनवण्याचा प्रस्ताव गांधीजींनी मांडला होता. पण, त्यांनी तो स्वीकारला नाही.
मग मोहम्मद अली जौहर यांना या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बनवण्यात आले. जामिया सोबतच १९२० साली देशात आणखी तीन विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. यामध्ये कशी विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ आणि बिहार विद्यापीठाचाही समावेश आहे.
राष्ट्रवाद, ज्ञान आणि स्वायत्त संस्कृती या मुल्यांवर जमियाचा पाया उभारला आहे. आलेल्या संकटावर मात करत जमियाचा हळूहळू विस्तार होत गेला. पण, जामियाने नेहमीच स्वातंत्र्याची पाठराखण केली आहे. ज्या मूल्यांच्या आधारावर या विद्यापीठाची स्थापना झाली, त्या मूल्यांच जामियाने नेहमी पालन केलं आहे.
पुढे ही संस्था दिल्लीत हलवल्यानंतर याच्या पुनर्जीवनासाठी जोमाने प्रयत्न सुरु झाले. डॉ. झाकीर हुसेन, डॉ. अबीद हुसैन आणि डॉ. मोहम्मद मुजीब या तिघांनी जमियाला नवसंजीवनी देण्याच्या कामात स्वतःला झोकून दिले.
डॉ. झाकीर हुसेन यांनी या विद्यापीठातून पहिल्यांदा संध्याकाळच्या प्रौढ शिक्षणाचे वर्ग सुरु केले. त्यांनी सुरु केलेला हा शैक्षणिक उपक्रम खूपच लोकप्रिय झाला होता.
जामिया ही देशातील पहिली अशी संस्था होती, जिथे शिक्षक प्रशिक्षण सुरु करण्यात आले. देशभरातल्या विविध भागातून शिक्षक होण्याची आस बाळगणारे अनेक लोक इथे प्रशिक्षण घेण्यासाठी येत असत.
१९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. पण, त्यानंतर झालेल्या फाळणीमुळे झालेल्या हिंसक दंगलीच्या झळा या विद्यापीठालाही बसल्या होत्या. फाळणीच्या काळात दिल्लीत हिंसाचार उफाळला होता. जामियाच्या समृद्ध ग्रंथालयाचे आणि विद्यापीठाच्या इमारतीचेही नुकसान झाले होते. तेंव्हा या विद्यापीठाची पाहणी करण्यासाठी गांधीजी स्वतः त्याठिकाणी गेले होते.
गांधीजींचा सर्वात धाकटा मुलगा देवदास गांधी हे इथे इंग्रजी आणि हिंदी विषय शिकवत. तर गांधीजींचा नातू रसिकलाल यांनी याच विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. गांधीजींची १५०वी जयंती साजरी झाली तेंव्हा गांधीजींनी जामिया मिल्लिया विद्यापीठाला लिहिलेल्या पात्रांचे प्रदर्शन या विद्यापीठात भरवण्यात आले होते.
१९६२ मध्ये जामिया मिलीया इस्लामियाला विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. १९८८ साली या केंद्रीय विद्यापीठाची मान्यता देण्यात आली. आज या विद्यापीठात ५६ पीएचडी अभ्यासक्रम, ८० मास्टर्स अभ्यासक्रम, १५ मास्टर्स डिप्लोमा, ५६ पदवी अभ्यासक्रम आणि शेकडो डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस चालवले जातात.
या विद्यापीठात मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी ५०% आरक्षण आहे. यातील ३०% जागा मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी, १०% विद्यार्थिनीसाठी, तर १०% इतर मागास मुस्लीम आणि अनुसूचित जातींकरता राखीव आहेत.
बाकीच्या इतर ५०% जागा खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी आहेत. यातही ५% जागा ही दिव्यांगांसाठी आरक्षित आहे. आरक्षित जागा शिल्लक राहिल्यास त्याठिकाणी खुल्या गटातील विद्यार्थ्यांना त्याठिकाणी संधी देण्यात येते.
सध्या या विद्यापीठात ३८ शैक्षणिक विभाग तर २७ अभ्यासकेंद्रे आहेत. भारतासह इतर देशातील विद्यार्थीदेखील या विद्यापीठात प्रवेश घेतात. या विद्यापीठा अंतर्गत ८ महाविद्यालये आहेत. जामिया मिलीयाच्या ग्रंथालयात ४ लाखांपेक्षा जास्त पुस्तकं, संदर्भग्रंथ आणि इतर साहित्य उपलब्ध आहे. २०१५ साली या विद्यापीठाला NAACकडून A ग्रेड मानांकन मिळाले होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.