आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब
इतिहास साक्षी आहे की भारताने आजवर कुठल्याच देशावर ना आक्रमण केले ना कुठले विजय अभियान चालवले. पण भारताने आपली संस्कृती आणि अस्तित्व वाचवण्यासाठी मोठा लढा जरूर दिला आहे. भारतात राजपुतांच्या इतिहासात १५२६ साली झालेल्या पानिपत आणि १५२७मधे झालेल्या खानवा युद्धाचे फार महत्त्व आहे. असंख्य सैनिकांच्या रक्ताने भारताच्या भूमीचा अभिषेक या दोन युद्धांमुळे झाला होता. हे युद्ध जरी काही काळाने समाप्त झाले तरी त्यांचा इतिहास चिरकालासाठी अमर झाला.
भारताच्या भूमीवर १५२९ साली अजून एक युद्ध लढण्यात आले होते, ज्याचा देखील इतिहास प्रसिद्ध आहे. हे युद्ध भारतीय राजे आणि आक्रमक यांच्यात न होता, मुघल आणि अफगाणी सैन्यात झाले होते.
घागरा युद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या युद्धात सैनिकांनी पहिल्यांदा आपल्या रक्ताने भूमीच नाहीतर बिहारमध्ये वाहत जाणारी घागरा नदी लाल केली होती. या युद्धामुळे बाबाराचे विशेष काही नुकसान झाले नाही पण यानंतर तो एका असाध्य रोगाने आजारी पडला आणि युद्धानंतर एक वर्षाच्या आतच त्याचे निधन झाले होते.
भारतावर राज्य करण्याचे स्वप्न मुघलांच्या अगोदर अफगाणांनी पहिले होते. सुलतान मोहम्मद गझनवी या अफगाण सुलतानाने भारतावर आक्रमण केले होते. यानंतर शाहबुद्दीन मोहम्मद घोरी भारतावर चालून आला होता व त्यानेच येथे मुस्लिम साम्राज्याचा पाया रचला होता. इसवी सन १२०० ते १५२६ या काळात दिल्लीच्या तख्तावर सुलतानांचे राज्य होते. हे सुलतान शासक प्रामुख्याने अफगाणी वंशाचे होते. दिल्लीवर राज्य करणारे अफगाण शासक म्हणून लोदी राजवंशाचे राजे प्रसिद्ध होते.
परंतु बाबराने भारतातील अफगाणी पठाणांची राजवट संपुष्टात आणली होती. शेरशहा सुरीने एकदा अफगाणांना पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, पण अकबराने त्याचा पडाव केला, यानंतर दिल्लीच्या राजकारणात अफगाणांना पुन्हा कधीच संधी मिळाली नाही.
पानिपताच्या युद्धानंतर अफगाणी सत्ता परत येण्याची कुठलीच शक्यता नव्हती. पण फार्मुली आणि नूहानी या दोन पठाणांना मात्र हे मंजूर नव्हते. पानिपत व खानवा येथील पराभवानंतर अफगाणी पठाणांकडे सैन्य व हत्यार दोन्ही नव्हते. पण या काळात आतूनच एक विद्रोहाची ठिणगी पडली आणि तिला वारा देण्याचे काम केले बंगालचा शासक नुसरत शहा याने !
त्याने दिलेल्या सहकार्यामुळे अफगाणी विद्रोहाला चालना मिळाली. नुसरत शहाच्या मनात बाबरबद्दल विशेष राग होता, त्याची बाबरच्या विजयी अभियानाला खंडित करण्याची संपूर्ण तयारी होती. याचाच एक भाग म्हणून त्याने अफगाणांच्या बंडाला पूर्णपणे हवापाणी देण्यास सुरुवात केली.
बाबर चंदेरीच्या विजयी अभियानात व्यस्त असल्याचे पाहून अवध प्रांतातील पठाणांनी बंड पुकारले. याचा बाबराच्या अभियानावर परिणाम होत नव्हता पण, त्याला हा विद्रोह दाबताही येत नव्हता. विद्रोही अफगाणांनी कनौज आणि शमशाबादवर अधिपत्य प्रस्थापित केले होते. यानंतर त्यांनी आग्र्यावर विजय संपादन करण्याची योजना आखण्यास सुरुवात केली.
इकडे बाबर चंदेरीच्या युद्धात व्यस्त होता. ज्यावेळी अफगाणी सैनिकांच्या विद्रोहाची आणि आग्रा काबीज करण्याचा योजनेची माहिती मिळाली. बाबर हे जाणून होता की जर अफगाणी सैनिकांना स्वतःची ताकद सिद्ध करण्याची संधी मिळली आणि त्यांनी आग्रा काबीज केले तर त्यांना दिल्ली हिसकावून घ्यायला जास्त काळ लागणार नाही. हा विद्रोह चिरडण्यासाठी त्याने स्वतःहून पुढाकार घेतला आणि आक्रमण करण्याचा निर्णय घेतला.
बाबराने ज्या इब्राहिम लोदीला पानिपतावर धूळ चारली होती, त्याचा भाऊ महमूद लोदी याने बंड पुकारून बिहारवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. पूर्वेकडील सत्ताधीश महमूद लोदीला सर्वप्रकारची मदत पुरवत होते.
महमूदला बाबराला हरवून आपल्या भावाच्या अपमानाचा प्रतिशोध घ्यायचा होता.
चंदेरीचे युद्ध जसे संपले तसा बाबर अवध प्रांताच्या दिशेने निघाला. बाबराच्या आगमनाची चाहूल लागताच बिब्बन नावाच्या पठाणाने बंगालमध्ये आश्रय घेतला. बाबरने याचा फायदा घेत लखनऊवर ताबा मिळवला. अफगाणी सैन्य यावेळी बनारस आणि चुनार या दोन भागांवर आपले राज्य निर्माण करण्यात व्यस्त होते. बाबरने लखनऊहुन बिहारच्या दिशेने कूच केली. त्याने बंगालच्या नुसरत शहाला अफगाणी विद्रोह्यांना मदत न करण्याची विनंती केली, पण नुसरत शहाने मोठ्या अभिमानाने हा प्रस्ताव धुडकावून लावला. त्याने बाबरशी उघड शत्रुत्व घेतले.
१५२९ साली बाबरने बंडखोरांवर हल्ला चढवला. एकीकडे बाबराची फौज दुसरीकडे बंडखोरांची फौज आणि दोघांच्या मध्यभागी घागरा नदी, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. महमूद लोदी युद्धात उतरला होता, त्याला वाटले पानिपत, खानवा आणि चंदेरीच्या युद्धानंतर बाबरमध्ये पुन्हा युद्ध करण्याची हिंमत उरलेली नसेल, यासाठी त्याने कमी सैन्य घेऊन युद्ध लढण्याचा निर्णय घेतला.
पण बाबरने त्याला खोटे सिद्ध केले आणि सगळ्या अफगाण सैन्याला चिरडून टाकत त्यांच्या मृत शरीराला घागरा नदीच्या पाण्यात फेकून दिले. असं म्हणतात की त्या हिंसक युद्धात अफगाणी सैनिकांच्या रक्ताने घागरा नदी लाल झाली होती.
महमूद युद्धभूमी सोडून बंगालमध्ये जाऊन लपला. त्याला वाटले की बंगालमध्ये त्याला आसरा मिळेल आणि बाबर तिथपर्यंत येऊ शकणार नाही. पण बाबरला तो तिथे लपल्याची माहिती मिळाली आणि बाबर बंगालच्या दिशेने निघाला.
आतापर्यंत बाबरच्या विरोधात असलेल्या बंगाली सुलतानाची बाबर चाल करून येतोय हे ऐकून तारांबळ उडाली आणि त्याने बाबरला मैत्री प्रस्ताव पाठवून त्याच्याशी करार केला.
त्याने महमूद बंगाल सोडून जाणार नाही, असे वचन बाबरला दिले आणि महमूदला बंगालमध्ये जहागीर दिली. पुढे महमूदने बिहारचा कारभार पाहणाऱ्या मुघल सरदाराशी चर्चा करून आपसात प्रदेश वाटून घेतला, यानंतर पठाणांनी देखील बाबरचे नेतृत्व स्वीकारले.
काही काळातच बाबरने हिंदुस्थानातील आपले साम्राज्य काश्मीर ते ग्वाल्हेर आणि ग्वाल्हेर ते चंदेरी असे विस्तारले होते, आता त्याला युद्ध करायचे नव्हते. यामुळे त्याने १५२९ मध्ये काबूलला जाऊन राहण्याचा निर्णय घेतला पण तो काबूलला जात असताना लाहोरला थांबला जिथे त्याला त्याचा मुलगा हुमायूनचे पत्र मिळाले ज्यात त्याने आग्र्यातील असंतोषाची माहिती दिली होती. यामुळे बाबर परतला. पुढे १५३० मध्ये त्याने हुमायूनला आपला वारस म्हणून नेमले. यानंतर काही दिवसांनी २६ डिसेंबर १५३० मध्ये बाबरचे निधन झाले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.