आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मित्रांनो, सध्याच्या युगाला कॉम्प्युटरचं आणि इंटरनेटचं युग म्हणतात, हे आता आपण सगळे जाणतोच. आधी कठीण वाटणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आता कॉम्प्युटरच्या माध्यमातून अगदी सोप्या झाल्या आहेत. आपल्या हातातले स्मार्टफोन्स म्हणजे आता जणू मिनी कॉम्प्युटरचं बनले आहेत. केवळ त्यांचा वापर करुन आपण अनेकविध गोष्टी सहजपणे करू शकतो जसं ई-मेल, व्हिडिओ कॉलिंग, ऑनलाईन शॉपिंग आणि असं बरंच काही.
कॉम्प्युटरचं सगळं काम हे मुख्य दोनच गोष्टींवर चालतं. डेटा प्रोसेस करणं आणि वेगवेगळी कॅल्क्युलेशन्स करणं. आता दरवेळी हे आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये असणाऱ्या कॉम्प्युटरनं शक्य होईलच, असं नाही. जसं पाच किलोच्या डब्यात दहा किलोचं सामान राहू शकत नाही, त्यासाठी दहा किलोचाच डबा लागतो. तसं मोठ्या प्रमाणात डेटा प्रोसेस करणं आणि मोठमोठी कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी हवा तसाच मोठ्या क्षमतेचा कॉम्प्युटर, अर्थात सुपरकॉम्प्युटर. जगात बऱ्याच देशांमध्ये असे सुपरकॉम्प्युटर्स वेगवेगळ्या कामांसाठी सध्या वापरले जाताहेत.
पण आज आपण इथं जाणून घेणार आहोत, ते आपल्या भारत देशात सर्वप्रथम निर्माण झालेल्या सुपरकॉम्प्युटरबद्दल.
सुपरकॉम्प्युटर हा सगळ्याच बाबतीत सामान्य कॉम्प्युटरच्या तुलनेत बराच पुढे असतो. साध्या कॉम्प्युटरपेक्षा बऱ्याच मोठ्या प्रमाणातील डेटा तो वेगाने प्रोसेस करू शकतो. बरीच मोठमोठी कॅल्क्युलेशन्सही तो सहजपणे, बिनचूक आणि कमी वेळात करू शकतो.
सुपरकॉम्प्युटरची मेमरीही सामान्य कॉम्प्युटरपेक्षा बरीच जास्त असते. हजारो सामान्य कॉम्प्युटर्सच्या बरोबरीचं एकच सुपरकॉम्प्युटर काम करू शकतो. सामान्य कॉम्प्युटरचा वेग हा MIPS (Million Instructions Per Second) या प्रमाणामध्ये मोजला जातो, तर सुपरकॉम्प्युटरसाठी FLOPS (Floating Point Operations Per Seconds) हे प्रमाण वापरलं जातं म्हणजे एक सुपरकॉम्प्युटर एका सेकंदात किती वेगाने कॅल्क्युलेशन करू शकतो, त्याचं मोजमाप FLOPS मध्ये केलं जातं.
सुपरकॉम्प्युटरच्या निर्मितीचं श्रेय जातं ते भारताचे दिवंगत पंतप्रधान मा. राजीव गांधी यांना. आपल्या देशात आधुनिक तंत्रज्ञान सर्वप्रथम आलं ते त्यांच्यामुळेच. बदलत्या जगाचे वारे ओळखून वेगवान तंत्रज्ञानासोबत जुळवून घेण्यासाठी त्यांनी भारतात संगणक क्रांती घडवली. त्यांच्यामुळेच आज आपल्याला कॉम्प्युटर आपल्या देशात सगळीकडे दिसतोय. जेव्हा आपल्याकडे कॉम्प्युटरच्या येण्यामुळे टेक्नॉलॉजीला गती मिळाली, तेव्हा गरज भासू लागली सुपरकॉम्प्युटरची.
भारताकडे तेव्हा स्वतःचा सुपरकॉम्प्युटर नव्हता, म्हणून राजीव गांधी त्यावेळी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असताना तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्याकडे त्यांनी प्रस्ताव मांडला. रीगन यांनी मात्र तो नामंजूर केला, त्यामुळे काहीसे निराश झालेले राजीव गांधी भारतात परतले ते आपल्या देशात स्वतःच्या सुपरकॉम्प्युटरची निर्मिती करायची ही जिद्द आपल्याबरोबर घेऊनच.
याच प्रयत्नांतून १९८८ साली CDAC (Centre for Development of Advanced Computing) या संस्थेची स्थापना पुणे येथे झाली. डॉ. विजय भटकर यांना संचालक म्हणून नेमलं गेलं.
सुपरकॉम्प्युटर निर्माण करायचं काम सुरू झालं. सुमारे तीन वर्षांत ते पूर्ण होणं अपेक्षित होतं, आणि यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी या संस्थेला देण्यात आला होता.
अनेक शास्त्रज्ञांनी अथक मेहनत करून १९९० साली सुपरकॉम्प्युटरचं पहिलं प्रतिकात्मक मॉडेल तयार केलं. त्याच वर्षी झुरीक कॉम्प्युटर शोमध्ये हे मॉडेल सादर करण्यात आलं, तेव्हा त्यानं जगभरातल्या तज्ज्ञांना चकित करून सोडलं होतं. अमेरिकेनंतर भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचा सुपरकॉम्प्युटर बनला होता. त्यामुळे आपसूकच भारताला याबाबतीत अमेरिकेच्या नंतरचं दुसरं स्थान मिळालं.
अखेर जुलै १९९१ मध्ये समोर आला तो आपला पहिला संपूर्णतः भारतीय बनावटीचा सुपरकॉम्प्युटर, ज्याला नाव दिलं गेलं ‘परम 8000’. संस्कृत भाषेमध्ये या शब्दाचा अर्थ होतो, सर्वोच्च. परम 8000मध्ये सुमारे ६४ सीपीयू व एका विशिष्ट प्रकारचे Inmos T800 Transputers हे प्रोसेसर्स वापरण्यात आले होते. परम 8000 हा बरीचशी अत्यंत अवघड कॅल्क्युलेशन्स अतिशय सहजतेने करू शकत होता.
हळूहळू त्याने स्वतःचं आणि स्वतःसोबतच भारताचंही नाव संपूर्ण जगात उज्ज्वल केलं. त्यानं अमेरिकेचा सुपरकॉम्प्युटर Cray X-MPलाही मागे टाकलं होतं, कारण परम 8000 बनवण्यासाठी लागलेला खर्च हा Cray X-MPच्या किमती एवढाच होता आणि त्याची क्षमताही तुलनेत जास्त होती. हा सुपरकॉम्प्युटर जर्मनी, रशिया तसंच इंग्लंडलाही निर्यात करण्यात आला.
पुढच्याच वर्षी CDACने परम 8600 हा या सिरीजमधील आणखी एक सुपरकॉम्प्युटर तयार केला. यामध्ये इंटेलचा त्यावेळी नुकताच आलेला Intel i860 प्रोसेसर वापरण्यात आला होता. यातसुद्धा Inmos T800 Transputers हे प्रोसेसर्स वापरण्यात आले होते.
परम 8000साठी वापरली गेलेली ‘पारस’ ही प्रोग्रामिंग सिस्टीम या सुपरकॉम्प्युटरलाही वापरली गेली.
१९९४ साली परम 9000 हा या सिरीजमधला आणखी एक सुपरकॉम्प्युटर लॉंच केला गेला. भरपूर प्रमाणातील डेटाची प्रोसेसिंग ही एकाच वेळेस समांतररित्या करता यावी, हाच याच्या निर्मितीमागचा उद्देश होता. याच डिझाईनमध्ये थोडे बदल करून अधिक आधुनिक करण्यात आलं.
यात तीन प्रकारचे सुपरकॉम्प्युटर्स होते. परम 9000/SS हा Supersparc II हा प्रोसेसर वापरून बनवण्यात आला. परम 9000/US हा Ultrasparc प्रोसेसर, तर परम 9000/AA मध्ये DEC Alpha प्रोसेसरचा वापर करण्यात आला. त्यानंतरही परम 10000, परम पद्म, परम युवा, परम युवा II, परम ईशान, परम शिवाय, परम ब्रम्हा आणि गेल्यावर्षीचा परम सिद्धी Ai हे सगळे याच परंपरेचे वारसदार आहेत.
सध्या भारतातले सगळ्यात वेगवान सुपरकॉम्प्युटर्स म्हणून पुणे इथल्या IITM (Indian Institute of Tropical Meteorology) मध्ये बनलेले प्रत्युष आणि मिहीर हे दोन सुपरकॉम्प्युटर्स ओळखले जातात. सुमारे ४३९ कोटी रुपये किंमत असलेल्या या सुपरकॉम्प्युटर्सचा वेग साधारण ६.८ PETAFLOPS इतका आहे. या सुपरकॉम्प्युटर्सना अनुक्रमे प्रत्युष आणि मिहीर ही सूर्याची नावं देण्यामागचा उद्देश हा असावा की, हे दोन्ही सुपरकॉम्प्युटर्स प्रामुख्याने हवामानाचा अंदाज लावण्यासाठी सध्या वापरले जातात. पावसाचा वेग, वादळ, भूकंप, मासेमारीचा अंदाज याप्रमाणेच पूर, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज लावण्यासाठीही हे सुपरकॉम्प्युटर्स उपयोगी ठरतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.