आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या व्यक्तीगत जीवनशैलीबाबत अनेक गोष्टींची चर्चा केली जाते. नेहरू एका श्रीमंत कुटुंबातून आल्यामुळे त्यांचे राहणीमान उच्चभ्रू आणि शानशौकीचे होते. त्यांच्या या ऐषोआरामाच्या जीवनशैलीबद्दल अनेक चर्चा होत असतात.
नेहरूंची आवड निवड, पसंत कशी उच्च दर्जाची होती, परदेशात वावरत असतानाही ते कसे विलासी जीवन जगत होते, इत्यादी अनेक गोष्टींची चर्चा केली जाते. यात नेहरूंची चैन आणि विलासी जीवनाबद्दल कुत्सित ताशेरे ओढले जातात.
पण, नेहरूंनी पंतप्रधानपदी असताना खूप कमी पगार घेतला होता. तसेच स्वतःसह इतर मंत्र्यांच्या पगारातही दोन वेळा कपात केली होती.
पंडित नेहरू १९४७ पासून १९६४ पर्यंत देशाच्या पंतप्रधानपदी राहिले. त्यांच्या कार्यकाळात एम. ओ. मथाई हे वीस वर्षे त्यांचे स्वीयसहाय्यक होते. नेहरू पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर एम. ओ. मथाई यांचाही रुतबा वाढला होता.
इतका दीर्घकाळ नेहरूंच्या सहवासात घालवल्यानंतर मथाई यांनी नेहरूंच्या व्यक्तित्वावर आधारित ‘रेमिनिसंन्स ऑफ नेहरू एज’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. यात त्यांनी नेहरूंच्या बद्दल खूप काही लिहिले आहे. वस्तुत: फक्त एका प्रायव्हेट सेक्रेटरीलाच माहिती असू शकतील अशा कितीतरी गोष्टींचा उलगडा त्यांनी या पुस्तकात केला आहे.
नेहरूंच्या धोरणांवर मथाई यांनी कधी कधी तीव्र टीका केली आहे. जिथे त्यांचे व्यक्तित्व त्यांना प्रभावी आणि विलोभनीय वाटले अशा प्रसंगात त्यांचे कौतुकही केले आहे. तर काही ठिकाणी अगदी तटस्थपणे त्यांच्या स्वभावाचे वर्णन केले आहे. नेहरूंची जीवनशैली, त्यांचा दृष्टीकोन आणि त्यांचा लोकांसोबतचा व्यवहार अशा कितीतरी बाबतीत त्यांनी आपले बारीक निरीक्षण या पुस्तकात नोंदवले आहे.
नेहरूंनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्या नंतर सर्वांत जास्त चर्चा होती, ती पंतप्रधानपदासाठी किती पगार असावा याची. नेहरूंच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांना असे वाटत होते की कॅबिनेट मंत्र्यापेक्षा पंतप्रधानाचा पगार जास्त असावा. याबाबत सगळे मंत्री ब्रिटनच्या कॅबिनेटचीच नक्कल करण्याचा आग्रह करत होते.
ब्रिटनच्या पंतप्रधानांना कॅबिनेट मंत्र्याच्या तुलनेत दुप्पट पगार दिला जातो आणि त्यांना कॅबिनेट मंत्र्यापेक्षा जास्त सुविधा दिल्या जातात. भारतातही हीच पद्धत लागू करण्यात यावी, असे इतर मंत्र्यांचे मत होते.
कॅबिनेटमध्ये वरिष्ठ सदस्य गोपालस्वामी आयंगर यांनी संसदेत हा प्रस्ताव चर्चेसाठी मांडला. पंतप्रधानांचे वेतन दुप्पट केले पाहिजे असे गोपालस्वामी यांचे मत होते. यावर इतर कॅबिनेट मंत्र्यांनीही सहमती दर्शवली. परंतु याला एकाच व्यक्तीने विरोध केला, ते म्हणजे नेहरू.
तेंव्हा देशाच्या कॅबिनेट मंत्र्यांना ३००० रुपये प्रती महिना इतका पगार होता. नेहरूंनी पंतप्रधान पदासाठीही कॅबिनेट मंत्र्याच्या बरोबरीनेच पगार असला पाहिजे, असे मत मांडले. त्यांनी स्वतः दर महिना ३००० रुपये इतकाच पगार स्वीकारला.
ब्रिटनच्या पंतप्रधानांना ५०० रुपये मनोरंजन भत्ता मिळतो. त्याप्रमाणे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनाही हा भत्ता लागू करावा अशी विनंती नेहरूंना करण्यात आली. पण, यालाही त्यांनी नकार दिला.
रुपयाची घसरण सुरु झाल्यावर देशाची अर्थव्यवस्था बिकट बनली होती. अशा वेळी मंत्र्यांना जास्त पगार आणि इतर सुविधा देण्याचा आर्थिक ताण खूप मोठा होता. हा ताण कमी करण्यासाठी नेहरूंनी स्वतःसह इतर मंत्र्यांच्या पगारातही कपात केली. यासाठी त्यांनी सर्वांची संमती घेतली आणि मगच पगार कापतीचा निर्णय घेतला.
नेहरूंनी दोनवेळा स्वतःसह इतर मंत्र्यांच्या पगारात कपात केली. सुरुवातीला ३००० रुपये दरमहा वेतन होते त्यात कपात करून २,२२५ रुपये करण्यात आले. नंतर यातही कपात केली आणि दरमहा फक्त २००० रुपये इतकाच पगार त्यांनी सुरु ठेवला.
नेहरू जेंव्हा पंतप्रधान पदावरून निवृत्त झाले तेंव्हा त्यांनी पंतप्रधानांना मिळणारा भत्ता आणि पेन्शन यांचाही स्वीकार केला नाही. मथाई यांनी आपल्या पुस्तकात याचाही उलेख केला आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधानांना ज्या पद्धतीने निवृत्तीनंतरही पेन्शन, इतर भत्ते आणि सुविधा मिळतात तशीच सोय भारतातही लागू करावी. पण, नेहरूंनी याला साफ नकार दिला.
परंतु नेहरूंचे हे वागणे मथाई यांना अजिबात पटत नव्हते. त्यांना वाटत होते की, नेहरू फक्त स्वतःला डोळ्यासमोर ठेऊन आणि स्वतःच्या मोठेपणासाठी असे निर्णय घेत आहेत.
मथाई लिहितात, “मला वाटत होते की नेहरु याबाबत थोडे जास्तच आत्मपारखी होत आहे. ते फक्त स्वतःला पाहून निर्णय घेत आहे. ते केवळ स्वतःचाच विचार करत आहेत. त्यांचा गर्विष्ठपणा त्यांच्या अडवा येत आहे. आपल्या लिखाणाच्या जोरावर आपण हवा तेवढा पैसा कमवू शकतो याचा त्यांना गर्व होता. त्यांनी कितीदा माझ्याजवळ हे बोलूनही दाखवले होते.”
मथाई पुढे लिहितात, “या मुद्द्यावर मी त्यांच्याशी बोललो. भविष्यात जर त्यांच्या ठिकाणी कुणी गरीब व्यक्ती पंतप्रधान झाला तर त्याचाही विचार केला पाहिजे. याबाबतीत संसदेचे मत काय आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे.
इतर संसद सदस्यांची मते विचारात घेतली पाहिजेत. त्यांना या सुविधा नको असतील तर ते स्वतः त्याचा त्याग करू शकतात. परंतु तरीही नेहरूंनी हे निर्णय बदलले नाहीत. स्वतःच्या अनुभवावरून त्यांनी हे निर्णय घेतले. त्यांच्या या निर्णयात तसूभरही बदल झाला नाही.”
देशाला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा नेहरू यार्क रोड (ज्याला आता मोतीलाल नेहरू मार्ग म्हटले जाते) वरील निवासात राहत होते. लॉर्ड माउंटबॅटन यांच्या मते देशाचे पंतप्रधान या नात्याने एका प्रशस्त आणि सुरक्षित ठिकाणी राहिले पाहिजे. परंतु नेहरूंना आपले ते यॉर्क रोडवरील चार खोल्यांचेच घर पसंत होते.
माउंटबॅटन यांच्या मते पंतप्रधान निवासासाठी दिल्लीतील ब्रिटीश कमांडर इन चीफ यांचे निवासस्थान अगदी अनुकूल होते. परंतु नेहरूंना तिथे शिफ्ट व्हायचे नव्हते. त्यांना जुने घर अजिबात सोडायचे नव्हते.
परंतु, फाळणी नंतर देशातील परिस्थिती बदलली होती. अशा वातावरणात नेहरूंच्या जीवाला धोका होऊ शकतो असेही लॉर्ड माउंटबॅटन यांचे मत होते. नेहरूंना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची जबाबदारी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर सोपवली.
परंतु कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत राहणे नेहरुंना अजिबात मान्य नव्हते. त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना पोलिसांच्या चौकशीला आणि तपासणीला सामोरे जावे लागेल ही कल्पनाच त्यांना मान्य नव्हती. तरीही सरदार पटेलांनी त्यांची कशीबशी समजूत घातली.
सरदार पटेल नेहरूंना म्हणाले, “गांधींच्या जीवाला धोका आहे, हे माहित असूनही त्यांना सुरक्षा पुरवण्यात हलगर्जीपणा केला आणि आपण त्यांना गमावून बसलो, ही खंत मला नेहमी सतावते. असेच काही तुमच्या बाबतीतही झाले तर, मला हा माझ्यावरील कलंक वाटेल.”
जर नेहरू सुरक्षित ठिकाणी हलण्यास तयार झाले नाहीत तर मी गृहमंत्री पदाचा राजीनामा देईन असे पटेलांनी सांगून टाकले.
सरदारांच्या या भावूक आर्जवा पुढे नाही म्हणणे म्हणजे त्यांच्या भावना बेदखल करण्यासारखे होते. शेवटी नेहरू सुरक्षा व्यवस्थेत राहण्यास तयार झाले आणि पटेलांचा जीव भांड्यात पडला.
आपल्याला त्रिमूर्ती भवनात हलवण्यात पटेलांसोबत लॉर्ड माउंटबॅटन आणि त्यांचे स्वीय सहाय्यक मथाई यांचाही वाटा आहे हे नेहरुंनाही चांगलेच माहित होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.