आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
८० च्या दशकात पाकिस्तानमध्ये सैन्याने सत्तांतर केले होते, तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावेळी भारतात आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि जनता पार्टी सत्तेत आली होती.
या काळात टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक गिरीलाल जैन यांनी असे विधान केले होते की जर आज इंदिरा गांधी सत्तेत असत्या तर त्यांनी भारतीय लष्कराच्या बळावर जुल्फिकार अली भुट्टो यांची सुटका केली असती!
खरंतर हे गिरीलाल जैन असं म्हणाले म्हणून इंदिरा सत्तेत असत्या तर त्यांनी तसं केलं असतं असं नाही, पण यातून इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या पंतप्रधान महिलेची भारताच्या सैन्यावर आणि राजकारणावर पकड किती मजबूत होती, याची जाणीव झाल्यावाचून राहत नाही.
परराष्ट्र धोरण आणि प्रशासकीय कामकाजाच्या बाबतीत इंदिरा गांधींनी त्यांचे पिता आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना लाजवेल अशी कामगिरी करून दाखवली होती.
यशस्वी राजकारणाचे बीजारोपण इंदिरांमध्ये करण्याचे काम पंडित नेहरूंनीच केले होते. इंदिरा गांधींच्या प्रशासकीय वज्रमुठीची आणि धोरणी राजकारणाची प्रचिती तत्कालीन अमेरिकन राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांना आली होती.
१९७१ च्या युद्धात आपल्या बुद्धीचातुर्याच्या बळावर त्यांनी दोन महासत्तांच्या सैन्याला एकमेकांच्या समोर उभे करण्याची किमया करून दाखवली होती आणि तत्कालीन अमेरिकन राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांच्या योजनेवर पाणी फिरवले होते. या मागील कथा फार रंजक आहे.
बांग्लादेशच्या निर्मितीपूर्वी तो भाग पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जात होता आणि त्यावर पाकिस्तानची सत्ता होती. पश्चिम पाकिस्तानचे मुसलमान स्वतःला पूर्व पाकिस्तानमधील मुसलमानांपेक्षा श्रेष्ठ समजत होते.
पश्चिम पाकिस्तानातून पूर्व पाकिस्तानचे दमन केले जात होते. यात प्रामुख्याने पाकिस्तानी लष्कराचा सहभाग होता. तत्कालीन पाकिस्तानी शासक जनरल याह्या खानने हे सर्व उद्योग सुरू केले होते, या याह्या खानला अमेरिकन सत्ताधीशांचा मोठा पाठिंबा लाभला होता.
याह्या खानच्या माध्यमातून अमेरिका चीनशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होती. एकप्रकारे पाकिस्तानची लष्करी राजवट अमेरिकेच्या पथ्यावर पडत होती.
अमेरिकेला या सर्वात धोका वाटत होता तो इंदिरा गांधींच्या खेळीचा, त्यांना असे वाटायचे की इंदिरा गांधी आपल्या सैन्याच्या बळावर पाकिस्तानच्या तावडीतून पूर्व पाकिस्तान मुक्त करतील आणि जनरल याह्या खानची राजवट उलथवून टाकतील. यामुळेच सुरुवातीपासून तत्कालीन अमेरिकन राष्ट्रपती रिचर्ड निक्सन आणि परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांनी इंदिरांबद्दल अगदीच चुकीची भूमिका बनवली होती.
१९७१ च्या नोव्हेंबर महिन्यात इंदिरा गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेल्या, त्याठिकाणी त्यांची भेट अमेरिकन राष्ट्रपतींशी भेट होणार होती.
या भेटी दरम्यान निक्सन यांनी इंदिरा गांधींबद्दल अवमान जनक शब्द वापरले तर किसिंजर यांनी भारतीयांना ‘बास्टर्ड’ ही उपमा दिली. दुसऱ्या दिवशी निक्सन जेव्हा इंदिरा गांधींची भेट घेणार होते त्यावेळी त्यांनी इंदिराजींना फार तुसडेपणाची व तुच्छतेची वागणूक दिली.
त्याला उत्तर म्हणून इंदिरा गांधींनी पण फक्त औपचारिकता म्हणूनच निक्सन यांना प्रतिसाद दिला. ज्यामुळे निक्सनचा चांगलाच अपमान झाला.
पुढे निक्सन यांनी पूर्व पाकिस्तानात हस्तक्षेप केला तर भारताला वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल असा धमकीवजा इशारा दिला पण इंदिरा गांधींनी त्यावेळी त्याला केराची टोपली तर दाखवलीच पण त्या लगेच कुठलाही करार न करता मायदेशी परतल्या.
इंदिरा गांधींच्या जागी दुसरा कुठला राष्ट्रप्रमुख असता तर त्याची अमेरिकेच्या भीतीने घाबरगुंडी उडाली असती पण इंदिरा या सर्वार्थाने स्वाभिमानी राजकारणी होत्या.
अमेरिकेचा दौरा करण्याचा काही दिवस अगोदर इंदिरा गांधी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोव्हिएत रशियाला गेल्या होत्या त्यावेळी त्यांनी तिथे पंतप्रधान किशिगन यांना सरळ तेथील प्रमुख राज्यकर्ते रशियन राष्ट्रपती ब्रेंझनेव यांच्या भेटीसाठी नेण्याची मागणी केली. त्यांनी रशियन राष्ट्रपतींशी दीर्घ चर्चा केली होती.
एकाच वेळी त्या अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन्ही महासत्तांच्या ताकदीचा अंदाज घेत होत्या, त्या परराष्ट्र धोरणाचे अत्यंत यशस्वी डावपेच खेळत होत्या.
नोव्हेंबरमध्ये ज्यावेळी त्या अमेरिकेतुन भारतात परतल्या त्यावेळी त्यांनी आपला निर्धार पक्का केला होता. तीन दिवसांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारताने पूर्व पाकिस्तानात आपल्या लष्करी कारवाईला सुरुवात केली आणि पूर्व पाकिस्तानवर असलेली पाकिस्तानी लष्कराची पकड कमजोर होत होती.
ही गोष्ट जेव्हा अमेरिकेच्या कानावर पडली त्यावेळी निक्सन यांचे धाबे दणाणले आणि त्यांनी चीनकडे भारताला रोखण्याची विनंती केली पण हे सर्व त्यांच्यावरच उलटले. चीनने अमेरिकेला स्पष्ट नकार कळवला.
निक्सन यांनी इंदिरा गांधींना युद्धबंदी करण्याची मागणी केली पण इंदिरा गांधींनी त्या मागणीला सरळ केराची टोपली दाखवली. यामुळे जळफळाट झालेल्या निक्सन यांनी अमेरिकन नौदलाच्या सातव्या तुकडीला भारताच्या दिशेने रवाना केले पण त्यांच्यासमोर रशियन युद्धनौका उभ्या होत्या.
त्यामुळे अमेरिकेची खेळी अयशस्वी ठरली. पुढे इंदिरा गांधींनी युद्ध बंदी केली पण १७ डिसेंबरला भारतीय सैन्याने बांगलादेशमध्ये फ्लॅगमार्च केल्यानंतर !
हा असा काळ होता ज्यावेळी इंदिरा गांधींनी ठरवलं असतं तर त्यांना पाकिस्तानवर सहज विजय मिळवता आला असता पण त्यांनी तसे केले नाही, पूर्व पाकिस्तानची मुक्तता हाच आपला उद्देश होता अशी माहिती त्यांनी रशियाच्या माध्यमातून पाकिस्तानी जनतेला दिली. इंदिरा गांधींनी याह्या खानची लष्करशाही संपुष्टात आणली.
बांग्लादेशच्या स्थापनेनंतर त्याला सर्वप्रथम मान्यता भूतानने दिली आणि त्यानंतर भारताने दिली. एका महिन्याच्या आत संयुक्त राष्ट्रातील अनेक देशांनी बांग्लादेशला मान्यता दिली. यामुळे बांग्लादेश एक सार्वभौम राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले आणि अमेरिका तोंडावर आपटली.
निक्सन यांच्या धोरणांना अपयश आले. आपल्या ताकदीचा बळावर इतर देशांवर प्रभुत्व प्रस्थापित करण्याच्या अमेरिकेच्या मनसुब्याना तिलांजली मिळाली. इंदिरा गांधींना अटल बिहारी वाजपेयींनी त्यांच्या अजोड खेळीसाठी ‘दुर्गा देवीची’ उपमा दिली होती.
इकडे पाकिस्तानमध्ये मात्र याह्या खानची सत्ता जाऊन जुल्फिकार भुट्टो सत्तेत आले आणि त्यांनी जनरल याह्या खान यांची रवानगी तुरुंगात केली. पुढे ज्यावेळी जुल्फिकार भुट्टो यांची सत्ता पुन्हा डगमगु लागली त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान नव्हत्या म्हणूनच गिरीलाल जैन यांनी तसे विधान केले होते.
इंदिरा गांधी या खऱ्या अर्थाने भारताच्या आयर्न लेडी होत्या!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.