आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
१८ जूनपासून भारत आणि न्यूझीलंड दरम्यान ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’चा अंतिम सामना रंगणार आहे. मात्र, याच दरम्यान एक दिवसीय सामने खेळण्यासाठी भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जात आहे. परिणामी भारतीय क्रिकेट संघ एकाच वेळी दोन ठिकाणी दोन सामने खेळताना दिसणार आहे. त्यातील एक सामना कसोटी आहे तर दुसरा एक दिवसीय, त्यामुळे खेळाडूंची सोयीनुसार फेरफार करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दोन संघ तयार केले. मात्र, हे दोन्ही सामने जर एकाच प्रकारचे असते तर, दोन तुल्यबळ संघ तयार करणं शक्य झालं असतं का? आतापर्यंत अशी परिस्थिती कधी निर्माण झाली आहे का? असे काही प्रश्न क्रिकेट चाहत्यांना नक्कीच पडले असतील. तर, याच उत्तर ‘हो’ असंच आहे!
१९३०साली इंग्लंडच्या दोन संघांनी एकाचवेळी न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजसोबत कसोटी सामने खेळले होते.
१९२६मध्ये वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडला कसोटी क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर दोन वर्षांनंतर वेस्ट इंडीजनं इंग्लंडचा दौरा केला आणि आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. न्यूझीलंड मात्र, अजूनही पदार्पणाच्या क्षणाची वाट पाहत होतं. या दोन्ही देशांमध्ये आपला संघ पाठवण्यास इंग्लंडचं तत्कालीन क्रिकेट प्रशासक मंडळ (एमसीसी) उत्सुक होतं. मात्र, १९२८-२९ व १९३२-३३ या दोन अॅशेस मालिका आणि १९३०-३१ या नियोजित दक्षिण आफ्रिका दौऱ्या दरम्यान वेळ काढणं कठिण होतं.
१९२९-३० या हंगामात एमसीसीने नियोजन करून वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडमध्ये आपले संघ पाठवण्याचा निर्णय घेतला. यामुळे वेस्ट इंडिजला पहिल्यांदाच यजमान पद भूषवण्याची संधी मिळणार होती तर, न्यूझीलंड आपल्याच भूमीत कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला होता.
तीन कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या वेस्ट इंडिजच्या संघामध्ये प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हान उभं करण्याची क्षमता असलेले खेळाडू होते. त्यामुळे अनुभवी खेळाडूंचा संघ वेस्ट इंडिजला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला एक संघ नवख्या न्यूझीलंडमध्ये पाठवला गेला. तसं पाहिलं तर नियोजित अॅशेस मालिकेनंतर इंग्लंडचा संघ काही दिवसांसाठी न्यूझीलंडचा दौरा करू शकला असता. मात्र, जागतिक स्तरावर क्रिकेटच्या भवितव्याचा विचार करून एमसीसीने आपला एक वेगळा संघ खास न्यूझीलंड दौऱ्यासाठी पाठवला. यामुळे न्यूझीलंडला मानाने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
इंग्लंडच्या दोन्ही कसोटी संघाचे कर्णधारही होते नवखे
इंग्लंडचा तत्कालीन कर्णधार ऑर्थर गिलियननं दोन्ही दौऱ्यांमधून माघार घेतली. त्यामुळं ऑर्थरचा मोठा भाऊ आणि ससेक्स संघाकडून खेळणाऱ्या हॅरोल्ड गिलियनला न्यूझीलंड दौर्यासाठी इंग्लंडचा कर्णधार म्हणून नेमण्यात आलं. तर, कॅरिबियन बेटांवर गेलेल्या अनुभवी खेळाडूंचे नेतृत्व करण्याची जबाबदारी ३९ वर्षीय फ्रेडी कॅल्थोर्प यांच्याकडे देण्यात आली. कर्णधार म्हणून खेळण्याची ही फ्रेडीची पहिलीच वेळ होती.
एकाच सामन्यात तब्बत १७ खेळाडूंनी केलं पदार्पण !
इंग्लंड आणि न्यूझीलंड दरम्यान जी कसोटी मालिका खेळवली गेली त्यात तब्बल १७ खेळाडूंनी (न्यूझीलंडचे ११ आणि इंग्लंडचे ६) पदार्पण केलं. क्राईस्टचर्चच्या एएमआय स्टेडिअमरवर दोन्ही संघांमध्ये हा तीन दिवसांचा ऐतिहासिक कसोटी सामना रंगला.
स्टॅन निकोलस आणि मॉरिस अलोम या इंग्लंडच्या दोन नवख्या गोलंदाजांनी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या न्यूझीलंडला अडचणीत आणलं. आठ गडी राखून इंग्लंडच्या संघाने हा कसोटी सामना खिशात घातला.
कसोटी क्रिकेटमध्ये ‘जॉर्ज हेडली’ नावाच्या वादळाची झाली सुरुवात
त्याचवेळी पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला अनुभवी इंग्लिश खेळाडूंचा भरणा असलेला संघ वेस्ट इंडिजसोबत दोन हात करत होता. इंग्लंडचा संघ चांगलाच अनुभवी आणि वरिष्ठ म्हणावा असाच होता. कारण, या संघात सलामीवीर जॉर्ज गन (वय ५१वर्ष), त्याचा साथीदार अँडी सडॅम त्याच्यापेक्षा तुलनेने लहान होता पण तोही 39 वर्षांचा होता. निगेल हेग, एव्हर्ट एस्टिल आणि रोनाल्ड स्टॅन्फोर्थ हे देखील अनुक्रमे ४२, ४१ आणि ३८ वर्षांचे होते. विशेष म्हणजे ५२ वर्षीय विल्फ्रेड रोड्स हे देखील या संघात होते. ११ जानेवारीला ब्रिजटाऊनमध्ये मालिकेतील पहिला कसोटी सामना झाला. वयाच्या विशीत असलेल्या वेस्ट इंडिजच्या जॉर्ज हेडलीनं आपल्या दुसऱ्याच इनिंगमध्ये १७६ धावा चोपल्या. अतिशय अटी-तटीचा हा सामना अनिर्णित राहिला.
भारतीय संघाने देखील खेळल्या आहेत एकाच वेळी दोन स्पर्धा
१९९८ मध्ये भारतीय संघाने वेगवेगळ्या ठिकाणी सामने खेळले होते. क्वालालंपूर येथे राष्ट्रकुल स्पर्धा व टोरांटो येथे पाकिस्तानविरुद्ध भारताने सहारा कप खेळला. त्यावेळी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात एक संघ सहारा कप खेळण्यासाठी पाठवण्यात आला होता. यासं घात राहुल द्रविड, सौरव गांगुली यांचा समावेश होता. त्याचवेळी सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी अजय जडेजाच्या नेतृत्वात अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण व सचिन तेंडुलकर यांचा समावेश असलेला संघ पाठवण्यात आला होता. मात्र, दोन्ही ठिकाणी भारतीय संघ अपयशी ठरले होते.
आता पुन्हा भारताचे दोन संघ दोन ठिकाणी क्रिकेटचे सामने खेळणार आहे. त्यातील एक सामना कसोटी आहे तर दुसरी एक दिवसीय मालिका आहे. मात्र, एकाचवेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कसोटी सामने खेळण्याची किमया आतापर्यंत फक्त इंग्लंडलाचं साध्य करता आली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.