आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या तीन एकदिवसीय मालिकेमधील तिसरा सामना आज सुरू आहे. खरंतर भारताने दोन सामने जिंकून ही मालिका आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे आजचा सामना हा केवळ औपचारिकच असणार आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये सर्वच भारतीय खेळाडूंनी चांगले प्रदर्शन दाखवले होते. मात्र, या सगळ्यामध्ये भाव खाऊन गेला तो दीपक चहर. सहा चेंडूंमध्ये तीन धावा हव्या असताना शानदार चौकार मारत चहरने हा सामना जिंकून दिला होता. एक बॉलर म्हणून संघात असलेल्या चहरने ८२ चेंडूंमध्ये ६९ धावांची नाबाद खेळी करुन आपण एक ऑलराऊंडर म्हणूनही खेळू शकतो हे दाखवून दिलं.
मात्र, याच चहरने काही वर्षांपूर्वी ग्रेग चॅपेल यांचं ऐकलं असतं, तर देशाला कधीच हा ऑलराऊंडर खेळाडू मिळाला नसता.
दुसऱ्या वनडेमधील चहरच्या तुफानी प्रदर्शनानंतर देशाचा माजी जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद याने आपल्या ट्विटमधून एक धक्कादायक बाब उघड केली आहे. भारतीय क्रिकेट टीमचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या सिलेक्शनवेळी चहरला रिजेक्ट केले होते. एवढंच नाही, तर त्यांनी चहरला क्रिकेट सोडून दुसरं काहीतरी काम करण्याचा सल्लाही दिला होता.
सिलेक्शनच्या वेळी चहरची कामगिरी चांगली नव्हती असं नाही. कारण चॅपेल यांनी आपला सल्ला हा चहरची कामगिरी पाहून नव्हे, तर चक्क त्याच्या कमी उंचीमुळे दिला होता. ग्रेग चॅपेल यांची भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून एकूणच कामगिरी खराब राहिली आहे. त्यात आता प्रसाद याच्या या ट्विटमुळे चॅपेल यांच्या नावाने आणखी खडे फोडले जाणार असं दिसतंय.
Deepak Chahar Was rejected by Greg Chappell at RCA for his height and told to look at a different occupation.
And he single handedly won a match with not even his primary skills.
Moral of the story- Believe in yourself and don't take overseas coaches too seriously. pic.twitter.com/cByzg9uorj— Venkatesh Prasad (@venkateshprasad) July 21, 2021
ग्रेग चॅपेल यांच्यामुळे भारतीय क्रिकेट संघातील कित्येक खेळाडूंचं नुकसान झाल्याचं बोललं जातं. सौरभ गांगुली आणि चॅपेल यांच्यातील वाद तर जगप्रसिद्ध आहे. गांगुली चॅपेल यांना वेडा आणि मूर्खही म्हणाला होता. माजी स्फोटक ओपनर विरेंद्र सेहवाग तर चॅपेल यांना ‘भारताला मिळालेला सर्वात खराब प्रशिक्षक’ म्हणाला होता. तर माजी फिरकीपटू हरभजन सिंग याच्या मते, चॅपेल यांच्या मुळे भारताच्या क्रिकेट टीममध्ये असुरक्षिततेची भीती पसरली होती. एवढंच काय, तर सर्वांसोबत चांगले संबंध असणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचंही चॅपेलबद्दल चांगलं मत नव्हतं. चॅपेल यांना सचिन लवकर निवृत्त व्हायला हवा होता याची तर आता जवळपास सर्वांनाच खात्री पटली आहे.
भारतीय संघाचे आतापर्यंत जेवढे प्रशिक्षक राहिले आहेत, त्यांपैकी सर्वांत नावडते प्रशिक्षक म्हणून चॅपेल यांची ओळख बनली आहे.
या सगळ्याला कारण म्हणजे, चॅपेल यांची प्रशिक्षणाची पद्धत आणि त्यांचा स्वभाव. चॅपेल यांच्या प्रशिक्षणाची पद्धत ही इतर प्रशिक्षकांपेक्षा वेगळी होती. साधारणपणे कोणताही प्रशिक्षक खेळाडूंशी चर्चा करुन, त्यांचं मत विचारात घेऊन रणनीती आखतो. मात्र, चॅपेल हे फक्त आपलंच खरं करत होते. त्यांच्या रणनीतीनुसार खेळल्यानंतर आपली टीम जिंकेल किंवा हरेल, चॅपेल यांना जणू त्याच्याशी काहीच घेणंदेणं नव्हतं. चॅपेल हे विदेशी प्रशिक्षक असल्यामुळे तसं करायचे असा आरोप मोठ्या प्रमाणात केला जातो. पण, जॉन राईट, गॅरी कर्स्टन हेदेखील विदेशी प्रशिक्षकच होते. त्यांच्याबद्दल मात्र कोणालाही कोणतीही तक्रार नव्हती. इतर प्रशिक्षकांच्या कारकिर्दीमध्ये संघाचा चेहरा हा कॅप्टनच होता. चॅपेल मात्र आपल्या कारकिर्दीमध्ये स्वतःच संघाचा चेहरा होण्याचा प्रयत्न करत राहिले.
चॅपेल यांच्यावरील सर्वांत मोठा डाग म्हणजे, त्यांच्या कारकिर्दीमध्ये खेळाडूंचा ‘नॅचरल गेम’ बिघडल्याचा आरोप. सर्व खेळाडूंमध्ये काही ना काही नैसर्गिक कौशल्य असते. खेळाडूंच्या या कौशल्याला चालना देणे, त्यावर काम करणे आणि त्यामध्ये सुधार करणे ही एका प्रशिक्षकाची जबाबदारी असते. चॅपेल मात्र आपल्या पद्धतीनेच गेम खेळण्याबाबत ठाम रहायचे. त्यामुळे कित्येक खेळाडूंचे नैसर्गिक कौशल्य दबून जात होते.
चॅपेल यांच्या कारकिर्दीमध्येच कित्येक खेळाडूंनी आपला फॉर्म गमावला होता. यामध्ये सचिन-सेहवाग ही जोडी, सौरभ गांगुली आणि विशेष म्हणजे इरफान पठाण यांचा फॉर्म याच काळामध्ये गेला होता. यामुळे नव्या खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच, बऱ्याच जुन्या खेळाडूंचे चॅपेल यांच्यासोबत खटके उडू लागले होते. अशा प्रकारचे वातावरण निर्माण झाल्यानंतर सुसंवाद साधून वाद कमी करण्याचा प्रयत्न प्रशिक्षकाने करायला हवा. मात्र, चॅपेल यांनी याच्या उलट केले. त्यांनी ज्युनिअर आणि सीनिअर खेळाडूंमध्ये अधिक दरी कशी निर्माण होईल याकडे लक्ष दिले. ब्रिटिश नसूनही ब्रिटिशांची फोडा आणि राज्य करा ही नीती चॅपेल प्रभावीपणे राबवत होते.
चॅपेल यांच्यामुळे नुकसान झालेल्या खेळाडूंमध्ये चहरचंही नाव आलं असतं. मात्र, त्याने चॅपेल यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करुन आपल्या खेळावर लक्ष दिलं, आणि परिणाम सगळ्यांसमोर आहे.
चहरचं उदाहरण देत वेंकटेश प्रसादने असं म्हटलं आहे, की आता तरी राज्याच्या संघांनी विदेशी प्रशिक्षकांऐवजी भारतीय प्रशिक्षकांना संधी देण्याचा विचार करावा; ज्यामुळे देशातील नव्या खेळाडूंचं नुकसान टळेल. दरम्यान, चहरने दुसऱ्या वनडे सामन्यात केलेल्या खेळीमुळे त्याला आगामी टी-२० विश्वचषकाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये केवळ बॉलर म्हणूनच नाही, तर ऑल राऊंडर म्हणून स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारताने हा सामना आणि मालिका जिंकली असली, तर चहरने आपल्या खेळीने करोडो क्रिकेटप्रेमींचं मन जिंकलं होतं. शिवाय, प्रसादने केलेल्या ट्विटनंतर लोकांना चहरबद्दल आणखी कौतुक वाटत आहे. कोणी काहीही म्हटलं, तरी आपल्या स्वप्नांच्या मागे धावणं न सोडता, प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. म्हणजे मग एक ना एक दिवस तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळतेच; हेच चहरच्या स्टोरीमधून दिसून येतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.