आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सामान्यतः आपला आणि डासांचा जाणीवपूर्वक संबंध हा एकतर डासांनी आपल्याला चावण्याच्या वेळी, आपण त्यांना मारण्याच्या वेळी किंवा डासांनी आपल्या कानाशी येऊन गुणगुणण्याच्या वेळी येतो असं म्हणता येईल. डासांनी खरंतर माणसाच्या दैनंदिन जीवनात एक वेगळी क्रांती घडवून आणली असं म्हणता येईल. मच्छरदाणी, डास मारण्यासाठी असलेली रॅकेट, डास मारण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या उदबत्त्या, वेगवेगळे स्प्रे, मशीन, अशा अगणित गोष्टी आपल्या रोजच्या जगण्यात डासांनी आणल्या.
उन्हाळा येताच डासांचा त्रास सुरू होतो. जसजशी गरमी वाढत जाईल तशी डासांची फौजच हजर होत जाते आपल्या दिमतीला. त्यामुळे मग भारतासारख्या भल्यामोठ्या लोकसंख्येच्या आणि दाटीवाटीच्या देशात डेंग्यू, चिकनगुनिया किंवा मलेरिया सारखे आजार पसरू लागतात. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक यापासून सुटका होण्यासाठी अनेक उपाय करतात.
कधीकधी तर आपल्या तोंडून सहज बाहेर पडतं की हे डास नसते तर बरं झालं असतं. या डासांचं थोडंसंही अस्तित्व आपल्याला त्रासदायक वाटतं. पण हेच आपल्याला त्रासदायक वाटणारे डास खरोखरच जगातून नाहीसे झाले पाहिजेत की नाही यावर विज्ञानाचा दृष्टिकोन मात्र वेगळा आहे.
होळी झाली की हळूहळू आपल्याकडे उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागते. त्यातून मग सर्वत्र डासांमुळे होणारे आजारही पसरू लागतात. रुग्णालयांमध्ये डेंग्यू, मलेरिया सारख्या रोगांचे रुग्ण वाढू लागतात.
जगात बरेच लोक डास चावल्यामुळे खूप अस्वस्थ होतात. मुख्य म्हणजे डासांच्या चावण्यामुळे त्वचेला खाज येण्यासारखी समस्या तर असतेच पण त्यातून पुढे विविध आजार होतात. अशा वेळी जगातून डास नाहीसे झाले तर… असा प्रश्न लहान मुलांच्याही मनात घर करून राहतो. या बाबतीत विज्ञान काय म्हणते ते जाणून घेऊया.
डास हे कीटकांच्या गटाशी संबंधित आहेत. माश्या जश्या उडतात त्याप्रमाणेच डास हे उडणाऱ्या प्रकारातले प्राणी किंवा कीटक आहेत. ज्यात प्रौढ डास हे शिशु प्रकारातल्या/कमी वयातल्या डासांपेक्षा पूर्णपणे भिन्न दिसतात. डासांना मधमाशीसारखे चार पंख नसून दोनच पंख असतात. डासांच्या अनेक प्रजाती आहेत पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. डास हे अंडी घालण्यासाठीच प्राण्यांना आणि माणसांना चावतात व त्यांचे रक्त शोषतात.
आपण ज्याला डास म्हणतो ते ३५०० विविध प्रकारचे कीटक आहेत आणि या सगळ्यांचंच वर्तन,कार्य वेगळ्या प्रकारचं आहे. बहुतेक प्रकारचे डास हे अगदी ठरवल्याप्रमाणे रात्रीच सक्रिय असतात आणि काही दिवसा सक्रिय असतात.
यात एक गंमत आहे. सर्व डासांमध्ये फक्त मादी डासच आपल्याला चावतात हे आपल्याला बऱ्याचदा माहीत नसते. फक्त मादी डासच चावतात कारण मादी डासाला अंडी घालण्यासाठी अतिरिक्त रक्ताची गरज असते. पण त्याच वेळी बिचारे नर डास शाकाहारी असल्याप्रमाणे फक्त वनस्पतींमध्ये तयार होत असणारा रस पितात.
जेव्हा मादी डास एखाद्या संक्रमित व्यक्तीला चावते आणि त्याचे रक्त शोषते आणि नंतर दुसऱ्या व्यक्तीला चावते, तेव्हाच दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होतो. त्यामुळे आजार पसरतात. सर्व डासांपैकी केवळ ४० प्रकारच्याच माद्या धोकादायक असतात कारण त्याच काही विशिष्ट जातीच्या माद्या, मानवांमध्ये रोग पसरवण्याचे काम करतात.
आपल्यासारखे सर्वसामान्य लोक भलेही डास नकोत असं म्हणून डासांना जास्तीत जास्त लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात पण वैज्ञानिक लोक मात्र डासांना वैज्ञानिक अभ्यासासाठी जतन करून ठेवतात जेणेकरून ते त्यांच्यावर संशोधन करू शकतील.
अनेकांना हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात सर्वाधिक मृत्यू हे डासांमुळे होतात. डासांची ताकद दाखवण्यासाठी काही लोक अलेक्झांडरच्या मृत्यूचे उदाहरण देतात, ज्या जगज्जेत्या अलेक्झांडरला कोणी हरवू शकले नाही त्याचा मृत्यू मात्र डासाने चावल्यामुळे झाला, तो अलेक्झांडर एका डासाकडून हरला, अशी दंतकथा आहे.
डासांची दहशत !
जगात कमी धोकादायक असूनही, हे डास मलेरियासारखे प्राणघातक आजार पसरवतात. अनेक देशांमध्ये, विशेषत: आफ्रिका, दक्षिण आशिया आणि अमेरिकेत हजारो, लाखो लोक डासांमुळे होणाऱ्या आजारांनी ग्रस्त आहेत आणि त्यापैकी बहुतेक रुग्णांमध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांचा समावेश आहे. अशा स्थितीत मलेरियाचा प्रसार संपला तर जग अधिक निरोगी होणार नाही का, असा प्रश्न विचारला जात आहे.
डास नाहीसे झाल्यास सगळाच विषय संपेल, मग आजारांचा प्रश्नच उद्भवणार नाही. पण शास्त्रज्ञ म्हणतात की डास फार महत्वाचे आहेत. डास अनेक प्रक्रियांमध्ये उपयुक्त आहेत.
डास हे अशा परिसंस्थेचा भाग आहेत जिथे जीव अन्नासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. जगात कोट्यवधी डास आहेत जे स्वतः इतर प्राण्यांचे अन्न आहेत. डास हा अन्नसाखळीचा प्रमुख भाग आहे. पाण्यात राहणारे छोटे, कमी वयाचे डास हे अनेक माशांचे आवडते अन्न आहे. बेडूक, ड्रॅगनफ्लाय, मुंग्या, कोळी आणि इतर प्राण्यांच्या आहारात डासांचा समावेश होतो. याशिवाय नर डास वनस्पतींमध्ये परागण प्रक्रिया पूर्ण करण्यात हातभार लावतात.
शास्त्रज्ञ सध्या काही प्रकारच्या धोकादायक डासांना सामोरं जाऊन, त्यांना पकडून, त्यांचा अभ्यासही करत आहेत आणि त्यांच्यापासून बचाव कसा करायचा यावरही त्यांचं संशोधन सुरू आहे.
त्यामुळे डासांनी नष्ट व्हावं असं आपल्याला कितीही वाटलं तरी यापेक्षा आपणच त्यांच्यापासून सुरक्षित राहणं आपल्याला परवडणारं आहे एवढं नक्की !
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.