आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आपल्या महाराष्ट्राला अतिशय संपन्न असा इतिहास लाभला आहे. सातवाहनांपासून, वाकाटक, शिलाहार, यादव, यांच्यापासून अगदी मराठा साम्राज्यापर्यंत या महाराष्ट्राने अनेक स्थित्यंतरे पाहिली. यादरम्यानच्या काळात अनेक परकीय आक्र*मकांनी महाराष्ट्रावर आक्र*मण केले. इथल्या मातीतील वीरांनी प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन ही भूमी परकीय आक्र*मकांपासून वेळोवेळी स्वतंत्र केली आणि पेशवाईच्या काळात तर साऱ्या भारताचे रक्षण करण्याचे उत्तरदायित्व आपल्या महाराष्ट्राकडे आले.
महाराष्ट्राचा हा सारा इतिहास हा इथे फिरस्ती करताना वारंवार वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतो. कधी बुलंद किल्ले, कधी सह्याद्रीत कोरलेली विस्मयकारक लेणी तर कधी अजोड स्थापत्यशास्त्राचा नमुना असलेली विविध मंदिरे.
या सर्वांमध्ये थोडीशी वेगळी असणारी पण इथल्या पराक्रमाचा इतिहास सांगणारी काही कोरीव शिल्पे आज वर्षानुवर्ष उन्हातान्हात उभी आहेत!
महाराष्ट्रात याच शिल्पांना वीरगळ असे संबोधले जाते. तर इंग्रजी भाषेत यांना ‘Hero Stones’ असे म्हणतात.
महाराष्ट्रात आढळणारे वीरगळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काही वीरगळ हे अगदी १५-२० फूट उंचीचे आहेत तर काही केवळ एक शिल्पपट असलेले आहेत. पण सर्वसाधारणपणे हे वीरगळ तीन किंवा चार शिल्पपटात विभागले जातात.
यापैकी सर्वात खालच्या भागात जेथे तो वीर धारातीर्थी पडला, तेथील यु*ध्दप्रसंग कोरलेला असतो. मग तो प्रसंग मोठ्या लढाईमधील असेल किंवा एखाद्या प्राण्याबरोबर झुंजताना असेल, ढाल-तलवारींनी समोरासमोर लढणारे सैनिक असतील किंवा घोडेस्वारांची लढाई असू शकते. जर का हा वीर गाईंचे रक्षण करताना धारातीर्थी पडला असेल तर त्यात काही गाईंचा कळपसुद्धा दाखवलेला असू शकतो.
खालून दुसऱ्या चौकटीत बऱ्याच वेळा अप्सरा या धारातीर्थी पडलेल्या वीराला स्वर्गात नेत आहे असे दृश्य दाखवले जाते. यात बहुतांश वेळा वीर हा झोपलेल्या अवस्थेत दाखवलेला आहे.
सगळ्यात वर असणाऱ्या पटात वीराच्या उपास्य देवेतेचे चित्रण केलेले आपल्याला दिसून येते मग कधी यात शंकर दिसून येतो तर कधी गणपती. पण बहुतांश वेळा शंकराची पिंड दाखवलेली असल्याने महाराष्ट्रात त्याकाळी जवळपास सर्वांचे उपास्य दैवत शंकर असावे असेच वाटते.
काही वेळा या शिल्पाच्या वर चंद्र आणि सूर्य यांच्या आकृतीसुद्धा कोरलेल्या दिसून येतात. याचा अर्थ असा की या वीराचे स्मरण ‘यावच्चंद्र दिवाकरौ’ म्हणजे जोपर्यंत आकाशात चंद्र आणि सूर्य आहेत तोवर केले जावे!
वीरगळविषयी जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला या शब्दाची फोड आणि त्याचा उगम समजून घेणे आवश्यक आहे. विरगळाची मुख्य संकल्पना ही कर्नाटकातून आली. कर्नाटकात ‘कल्लू’ हा शब्द ‘दगड’ या अर्थाने वापरला जातो. त्यामुळे तिथल्या ‘वीर-कल्लू’ या शब्दाला महाराष्ट्रात नाव मिळाले ‘वीरगळ’.
दगड हा शब्द पुल्लिंगी असल्याने, ‘ती’ वीरगळपेक्षा ‘तो’ ‘वीरगळ’ असे म्हणणे जास्त योग्य आहे. युद्धभूमीवर अथवा कोणत्याही संग्रामात मरण पावलेल्या माणसाच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारलेला कोरीव दगड म्हणजे ‘वीरगळ’ होय. महाराष्ट्रात असे दगड ठिकठीकाणी आढळून येतात. मुख्यत्वे मराठवाडा, पश्चिम व दक्षिण महाराष्ट्र, कोकणातील बरासचा भाग यांमध्ये यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
ही झाली वीरगळची ढोबळ मांडणी. याशिवाय काही वीरगळावर शिलालेखसुद्धा आढळून येतात परंतु महाराष्ट्रात असे वीरगळ फार थोडे आहेत.
एखादा वीर मरण पावला की त्याचे स्मारक उभारण्यामागे काय कारण असावे आणि त्यात नेहमी या वीराला अप्सरा स्वर्गात घेऊन का जात असाव्यात हा एक प्रश्न आपल्याला पडू शकतो.
तर, एक तर त्या वीराचे स्मरण म्हणून ते स्मारक उभारत असावेत आणि दुसरे म्हणजे हे स्मारक पाहून इतर वीरांना त्यातून स्फूर्ती मिळावी हा दुसरा भाग असावा. तर मग ही स्वर्गाची काय भानगड?
तर याचे उत्तर आपल्याला प्राचीन महाकाव्यांमध्ये मिळून जाते. ‘महाभारतात’ जर रणांगणावर वीर मरण पावला तर त्याचे स्वर्गातले स्थान निश्चित होते असे दिले आहे. पुढे भीष्म असे म्हणतात की, जेव्हा वीराच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागतील तेव्हा तो वीर साऱ्या पापातून मुक्त होऊन त्याला स्वर्गाचे स्थान मिळेल.
भीष्म सामान्य माणूस आणि यो*द्ध्यातला फरक सांगताना म्हणतात की, क्षत्रियाचा मृत्यू हा कधीही घरात येऊ नये तर क्षत्रियाचा मृत्यू हा केवळ बाणांनीच झाला पाहिजे.
जर वीराने रणांगणावरून पळ काढला नाही तर त्याला पुढे मृत्युनंतर इंद्राच्या बरोबरीचे पद मिळते असासुद्धा एक समज पूर्वीच्या काळी होता. याच प्राचीन भारतीय समजाचे दृश्य आपल्याला भारतातील अनेक वीरगळांवर दिसून येते.
संस्कृत साहित्यामधून आपल्याला मृत्यनंतरच्या जीवनात असलेल्या आनंदाची अनेक वर्णने मिळतात. हीच वर्णने आपण जर वीरगळांकडे नीट पाहिले तर त्यातून सहज लक्षात येतात. असे म्हणतात की वीराला सद्गती मिळाली की स्वर्गातील अनेक अप्सरा त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा मनात ठेवून त्याच्याजवळ धावून येतात.
वीरगळावरील मधल्या शिल्पात जमिनीवर आडवा पडलेला किंवा उभा असलेला वीर आणि त्याच्याभोवती उभ्या असलेल्या साऱ्या अप्सरा हे याच समजाचे प्रतीक आहे.
तसाच दुसरा प्रसंग म्हणजे विमानातून वीराला स्वर्गात नेण्याचा. त्याला पुराणातील गोष्टीचा संदर्भ देता येतो. तो म्हणजे अंबरीश राजा आणि इंद्र यांच्यात जे यु*द्ध झाले त्यात अंबरीश राजा जेव्हा मरण पावला तेव्हा त्याने पहिले की त्याचा जो सेनापती होता ‘सुदेव’ तो एका सजवलेल्या विमानात बसून आपल्याहून श्रेष्ठ अशा जगात जात आहे. अर्थात त्यावेळेस विमान होते का नाही हा पुढचा प्रश्न कारण कोणतेही भौतिक पुरावे आपल्याला काही सापडत नाहीत, परंतु पुराणात विमानाचा उल्लेख मात्र जरूर येऊन जातो.
माझ्या पाहणीत तरी विमानासदृष्य कोणतीही आकृती पाहण्यात आली नाही परंतु अनेक ठिकाणी आपल्याला पालखी दिसून येते. कदाचित या पालखीलाच ‘विमान’ म्हणून संबोधले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येथे एक लक्षात घेतले पाहिजे की सर्वच ठिकाणी या अशा पालख्या आढळून येत नाहीत, इतर ठिकाणी वीर हा उभा किंवा झोपलेल्या अवस्थेत असतो. मग काही विशिष्ट ठिकाणीच पालखी का? कदाचित पालखी दाखवणे म्हणजे त्या वीराला सैन्यात मानाचे स्थान होते असा अर्थ काढला जाऊ शकतो का? मात्र पुराव्यांशिवाय याचे उत्तरही मिळत नाही.
भारतात आढळणाऱ्या या सर्व प्राचीन स्मृतीशिल्पांचे जतन करून त्यांची एक सूची तयार केली पाहिजे जेणेकरून कोणती आकृती कोणत्या ठिकाणच्या वीरगळावर आहे हे पटकन समजू शकेल. कुणीतरी हे काम हाती घ्यायला हवे हे खरे, पण कुणी? या प्रश्नाचे उत्तर अजून मिळाले नाही हे दुर्दैव.
पण एक मात्र आहे की वीरगळ या विषयाचा अभ्यास करायचा असल्यास पायाला सतत भिंगरी हवी आणि नवीन नवीन ठिकाणांवरून वैशिष्ट्यपूर्ण वीरगळांची टिपणे काढून जमेल तो इतिहास पुढे आणला पाहिजे.
इतिहासाची ही स्मृतीशिल्पे जतन करण्यासाठी प्रयत्न केली पाहिजेत, गावातील लोकांना यांचे महत्त्व पटवून देऊन त्याला शेंदूर न फासण्याबद्दल समजावले पाहिजे, जेणेकरून अभ्यासकांना इतिहासाचा हा ठेवा जसाच्या तश्या स्वरूपात अभ्यासण्यासाठी उपलब्ध होईल आणि त्यातून काही नवीन इतिहास सापडण्याची शक्यता वाढेल.
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.